लेखक : किरण येले
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे- १९२, मूूल्य- २५० रुपये.
माणूस आणि प्राण्यांमध्ये निसर्गाने जर सर्वांत मोठा फरक कोणता ठेवला असेल तर तो म्हणजे माणसाची विचार करण्याची ताकद! "Survival of the Fittest” हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यांमधे बलवान नर म्हाताऱ्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मध्यभागी ठेवतात आणि म्हाताऱ्या तसेच आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा असतो की एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण इथेच आहे! थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो तो `माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे. पण हजारो वर्षांपासून समाजप्रिय म्हणून राहणाऱ्या या मानवरूपी प्राण्याची आजची वैचारिक पातळीच त्याने बनवलेल्या या समाजव्यवस्थेची आज सर्वांत मोठी शत्रू झाली आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवले किरण येले यांचा "तिसरा डुळा" हा कथासंग्रह वाचत असताना! बऱ्याच दिवसांनंतर डोकं आणि मन सुन्न करणारं काहीतरी दर्जेदार साहित्य वाचनात आलं. आजच्या भावनाशून्य जगात माणसाला आपल्या आसपास घडणाऱ्या बऱ्याच घटना बघण्यासाठी आणि आपल्या खालावत जाणाऱ्या वैचारिक पातळीला पुन्हा एकदा सावरण्यासाठी आवश्यक असणारा 'तिसरा डोळा' उघडण्याची ताकद किरण येले यांच्या "तिसरा डुळा" या कथासंग्रहात आहे. या कथासंग्रहात असणारी प्रत्येक व्यक्तिरेखा कधी ना कधी आपल्या सर्वांच्या अनुभवात येऊन गेली आहे. आपल्या आसपासच्या जगात वावरणाऱ्या या व्यक्तिरेखा कितीही परिचयाच्या वाटल्या तरी अशा लोकांचं जग आणि त्यांचं जगणं यांच्याशी कधीही आपल्याला देणं-घेणं नसतं. त्यामुळंच त्यांचं सुख, दुःख, वेदना, हसणं आणि हसत हसत आयुष्याशी लढणं आपल्याला कधी माहीत होत नाही. फोटो फ्रेमचं दुकान असलेला हारुन, रोजंदारीवर काम करणारा जमील, साई मंदिराच्या दारात भीक मागून जगणारा धनकू, कचरा वेचणारी रखमा, मुसलमान असूनही हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साक आणि जत्रेत रस्त्यावर महादेवाचं चित्र काढून स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरणारा जगल्या अशा या कथासंग्रहातील प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाला अस्वस्थ करतात. किरण येले यांनी वाचकांपुढे उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेवर मारलेली एक चपराकच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी असो वा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी असो गरीब तसेच परिस्तिथीने पिचलेल्या आपल्याच समाजबांधवांना पायाखाली घेण्याची काही लोकांची वृत्ती आपल्या मनात बरेच प्रश्नदेखील उपस्थित करते ज्यांची उत्तरं देण्याचं बळ आजतरी आपल्याजवळ नाही. समाजाचाच एक भाग असूनही समाजापासून अलिप्त राहणाऱ्या लोकांना वाचक या "तिसऱ्या डुळ्याने" अनुभवत राहतो आणि शेवटी न संपणाऱ्या विचारचक्रात हरवून जातो.
किरण येले यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सर्व कथांची मांडणी केली आहे. संग्रहातील काही कथांना हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी दिली आहे, ज्यामधे धर्माच्या नावाखाली चालणारं चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर येतं. या कथा वाचत असताना नकळत आपण आजच्या परिस्थिसोबत कथेतील पात्रांची तुलना करू लागतो आणि त्या पात्रांच्या रूपातील आपल्या आसपासचे चेहरे डोळ्यासमोर आणण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करू लागतो. 'हारुन फ्रेम वर्क्स' मधे या दंगलीचं लोण हारुनच्या दुकानापर्यंत, घरापर्यंत पोहोचतं आणि नंतर त्याचं अस्तित्वच गिळून टाकतं, उरते ती फक्त राख! 'ईस्साक पक्का हिंदू होता' कथेतला हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साकही धर्माच्या या चक्रात भरडला जातो. 'जावेद जिवंत आहे' या कथेत नूर हॉटेलचा मालक नूर, जमील, जमीलशी निकाह करून मुसलमान झालेली रखमा, उस्मान, नवीनभाई अशा व्यक्तिरेखांमधून पुढे सरकत शेवटी जेव्हा जावेद कोण हे वाचकाला समजते तेव्हा एक अनामिक भीती वाचकाला स्पर्शून जाते. 'झुंबर' कथेत भेटतात धनकू, दगडूशेठ, शेठच्या मुलाची ती लग्नाची वरात. लग्नाच्या या वरातीमध्ये धनकूच्या डोक्यावर आहे लखलखतं झुंबर; दारिद्र्याचं! मिरवणुकीत धनुकच्या डोक्यावरील हे 'झुंबर' कोसळतं ते धनकूला घेऊनच. 'प्रॉपर्टी एक्झिबिशन' या कथेत बंद पडलेल्या फॅक्टरीचे सांगाडे, त्यांना चिकटलेलं कामगारांचं रक्त, घाम आणि तिथं उभी राहणारी टॉवर संस्कृती वाचकाला अस्वस्थ करते. या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे 'तिसरा डुळा'. जत्रेत डोंबारी खेळ करणारी मंगळी आणि रस्त्यावर शंकराचं चित्र काढणाऱ्या जगल्याचा मुलगा यांची ही कथा. जगल्या मेल्यावर मंगळीवर उपासमारीची वेळ येते आणि तेव्हाच तिला जो मार्ग सापडतो त्यातून जन्माला येणारी ही शेवटची कथा. शंकरासारखं डमरू वाजवणाऱ्या, तांडव करणाऱ्या, शंकराची गाणी पाठ असणाऱ्या म्हादूला शंकराचं सोंग बनवून पैसे कमवण्याचा विचार मंगळीच्या डोक्यात येतो आणि त्यानंतर शंकरावर प्रचंड भक्ती असलेल्या आपल्या मुलाला, म्हादूला शंकर बनवून जत्रेत फिरवायला चालू केल्यानंतर जे होतं ते म्हणजे "तिसरा डुळा".
आवर्जून वाचावा असा कथासंग्रह "तिसरा डुळा"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment