लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे- २२३, मूूल्य- २५० रुपये.
भयकथा असोत की गूढकथा नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी या दोन नावांचा विचार डोक्यात आल्याशिवाय मराठी वाचक पुढे जाऊच शकत नाही! मराठी साहित्यविश्वात गूढकथा आणि भयकथा हा साहित्य प्रकार खऱ्या अर्थाने समृद्ध केला असेल तर तो या दोन व्यक्तींनीच! या दोन दिग्गजांची तुलना करणं तसं चुकीचंच होईल कारण दोघांचीही वाचकाला गुंतवून ठेवण्याची शैली वेगळी आहे पण दोघांमध्ये समान धागा जर कोणता असेल तर तो त्यांची प्रचंड कल्पनाशक्ती! दोघांनीही त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर लिहिलेले एकाहून एक कथासंग्रह, कादंबऱ्या आजही वाचकाला भुरळ घालतात. तरीही मला जास्त आकर्षित करतात ती धारपांचीच पुस्तके. आपल्या खास लेखनशैलीने वाचकाला रहस्यकथेचाच एक भाग बनवून टाकण्याची त्यांची जादू खासच! पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक त्या कथेसोबतच जोडला राहतो. धारपांची जवळपास ६-७ पुस्तके आजपर्यंत मी वाचली आणि आणखीन बरीच संग्रहीदेखील घेऊन ठेवली आहेत पुढच्या 'मेजवानीसाठी'. याच पुस्तकांच्या पंक्तीमधील वाचून हातावेगळी केलेली एक भन्नाट रहस्य कादंबरी "ग्रहण"! एखाद्या गूढ चित्रपटाला लाजवेल असं कथानक! कादंबरीच्या चौथ्याच पानावर धारपांनी वाचकाला असा काही जबरदस्त धक्का दिला आहे की कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय ती बाजूलाच नाही ठेवता येणार. जवळपास निम्म्याहून अधिक कथा पुढे गेल्यानंतरही वाचक या धक्क्यातून बाहेर नाही येत. अगदी नेहमीप्रमाणे होणारी या कथेची सुरुवात. आपला नवरा अरविंद आणि दोन मुलांसोबत स्वतःच्या प्रशस्त वाड्यात आनंदाने राहणाऱ्या मिसेस पोतदार यांच्याभोवती फिरणारी या कादंबरीची गूढकथा. एके संध्याकाळी मुलांसाठी आईस्क्रीम आणण्याच्या निमित्ताने वाड्यातून बाहेर पडलेल्या मिसेस पोतदारांच्या आयुष्यात वाड्यापासून अवघ्या १०० पावलांवरील दुकानातून परतत असताना असा काही प्रकार घडतो की त्यांच्या पुढच्या आयुष्यालाच कलाटणी मिळते आणि या घटनेने धारपांनी ज्या पद्धतीने वाचकाला सुरुवातीलाच सुन्न करून सोडलं आहे त्याला तोड नाही. ही कथा पुढे हळूहळू उलगडत जाताना कथेत होणारा इतर पात्रांचा प्रवेश जसे सारंग आणि त्याचं कुटुंब सोबतच डॉ. शेखर आणि त्याचं कुटुंब शिवाय मिसेस पोतदारांच्या दोन समांतर आयुष्यातील इतर पात्रे या सर्वांत वाचक असा काही अडकून जातो की नकळत वाचकाच्या डोक्यातही एक विचारचक्र चालू होते ज्यात मिसेस पोतदार नेमक्या कोण आहेत? त्या कुठून आल्या आहेत? त्यांच्यासोबत पुढे काय होईल? त्यांचं कोणतं आयुष्य नेमकं खरं असेल? आईस्क्रीम आणायला जाण्यापूर्वीचं की ते घेऊन परत येताना समोर आलेलं नवीन आयुष्य? त्यांच्या आयुष्यातील कोणत्या व्यक्ती खरेच अस्तित्वात असतील? हेच विचार नाचत राहतात. मिसेस पोतदारांची ही कथा पुढे सरकत असताना इतरही अनेक ठिकाणी धारपांनी वाचकांची मती गुंग केली आहे जसे मिसेस पोतदारांच्या आधीच्या आयुष्यात आईचे होणारे निधन आणि या नवीन आयुष्यात त्यांच्या वडिलांचं अस्तित्वात नसणं, बँकेत अचानकच अरविंदचं तिच्या समोर येणं, नंतर अरविंदच्या वेगळ्या आयुष्याची होणारी ओळख, पूर्वायुष्यातील आपल्या घरी शहानिशा करण्यासाठी गेल्यानंतर तिच्या आईनेच तिला नाकारणे परंतु टायगर या त्यांच्या घरातील कुत्र्याकडून होणारं विचित्र वर्तन या सर्व गोष्टी कथेतील रहस्य आणखीनच वाढवतात. एक अतिशय गूढ रहस्य आपल्या डोळ्यासमोरून उलगडत जात असल्याचा अनुभव धारपांनी त्यांच्या खास शैलीतून वाचकांना करून दिला आहे.
गूढकथा - रहस्यकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "ग्रहण".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment