Monday, August 30, 2021

"नांगरणी"

 


लेखक : आनंद यादव

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


                                            पृष्ठे- ३४४, मूूल्य- २८० रुपये.

आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील "झोंबी" नंतरचा पुढचा भाग "नांगरणी"! आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला मन हेलावून टाकणारा आणि अत्यंत प्रेरणादायी संघर्ष "झोंबी" मधे वाचायला मिळाला. त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या दोन भागांतील या कादंबरींची नावेही तितकीच समर्पक आहेत. "झोंबी"चा शब्दशः अर्थ 'झुंज' किंवा 'लढाई'. यादव यांनी दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांचा असणारा प्रखर विरोध आणि दारिद्र्य यांच्यासोबत दिलेली अगदी टोकाची लढाई त्यांनी "झोंबी" मधून मांडली आहे. "नांगरणी" हे नावसुद्धा तितकच समर्पक आहे. जमिनीमध्ये कणखर सकसता आणण्यासाठी, उत्तम पिकासाठी तिच्यावर धारदार अवजारांनी उभे-आडवे घाव घालून मशागतीस होणारी सुरुवात म्हणजे "नांगरणी". यादव यांच्या आयुष्याची होणारी अशीच मशागत या पुढील भागात, "नांगरणीत" आहे ज्यामधून त्यांचा अंदा पासून ते लेखक आनंद यादव बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखीत केलेला आहे. माझ्या वाचनात बरीच आत्मचरित्रे वाचनात आली त्यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा! असाच एक प्रेरणादायी संघर्ष "नांगरणी"! परिस्थितीसोबत दोन हात करायला शिकवणारे हे अतिशय सुंदर आत्मचरित्र! कुठेतर वाचनात आलं होतं की आनंद यादव यांचं चरित्र ग्रामीण भागात राहून मोठी स्वप्ने बघणाऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे पण खरं तर फक्त ग्रामीण भागासाठीच नाही तर ते अशा प्रत्येक व्यक्तीसाठी एक ऊर्जास्रोत जे आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतात. परिस्तिथीला दोष न देता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेऊन अतिशय कठीण संघर्षातून ते खेचून आणण्याची कहाणी म्हणजे आनंद यादव यांचं हे आत्मचरित्र. एका भूमिहीन शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला, अठराविश्वे दारिद्र्यात जगणारा, जिथे दोन वेळच्या खायचीदेखील भ्रांत, घरातून शिक्षणाला होणारा प्रखर विरोध अशा वातावरणातून पुढे येऊन साहित्यातील एक उच्च शिखर गाठणाऱ्या आनंद यादव यांची कहाणी खूप काही सांगून जाते. 

दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी आनंद यादव घरातून पळून रत्नागिरीला जातात. रत्नागिरीला गेल्यानंतर तिथे भाई अर्थातच पु.ल.देशपांडे आणि सुनिता ताई यांच्या संपर्कात आल्यानंतर खरं तर त्यांच्यातील साहित्यिकाला एक दिशा मिळाली. बी.ए. आणि पुढे एम.ए. पर्यंतच्या शिक्षणासाठी यादव यांना भाई आणि सुनिता ताईंकडून मोलाची मदत झाली आणि ती कृतज्ञता त्यांनी या आत्मचरित्रात बऱ्याचवेळा बोलूनदेखील दाखवली आहे. हे पुढचे शिक्षण घेत असताना साहित्यलेखनात त्यांची प्रगती होत असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती ही नेहमीच त्यांच्या आड येत होती. घरी सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्याने घर चालवण्यासाठी घरच्यांची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचं ध्येय या दोघांमध्ये होणारी त्यांची तारेवरची कसरत वाचकाला बऱ्याच वेळा भावनिक करून जाते. दर दोन वर्षांनी मूल जन्माला घालणारी त्यांची आई जेव्हा २०-२२ वर्षें वयाच्या आनंद यादव यांच्याजवळ आता मला मूल नाही जन्माला घालायचं म्हणून मन मोकळं करते तेव्हाचा प्रसंग लेखकासोबतच आपल्याही डोळ्यात पाणी आणतो, लेखकासोबतच नकळत आपणही त्याच्या वडिलांचा राग करतो. घरची परिस्थिती अशी सर्वच बाजूंनी प्रतिकूल असली तरीही आपले शिक्षण आणि साहित्य या दोन्ही गोष्टी सांभाळून ते घराकडेदेखील लक्ष देत राहिले. हा सर्व संघर्ष त्यांनी त्यांच्या शब्दांतून आपल्यासमोर उभा केला आहे. त्यांच्या साहित्यातील गुणांना खरी ओळख मिळाली जेव्हा ते पुणे आकाशवाणीसोबत जोडले गेले. माडगूळकर आणि इतर मोठ-मोठ्या लोकांच्या सहवासाने त्यांच्यातील कवी-लेखक अधिक समृद्ध झाला. तरीही त्यांचा आर्थिक आणि भावनिक संघर्ष काही सुटला नव्हता. त्यांच्या हिरवं जग या कवितासंग्रहाला मिळालेल्या पारितोषिकाने ते एक नवकवी म्हणून साहित्यविश्वात ओळखले जाऊ लागले. एम.ए. पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नव्याने नोकरीचा शोध सुरू केला आणि शेवटी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर मधील महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून रुजू झाले. झोंबीपासून चालू झालेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा, अंदा ते आनंद यादव हा अतिशय भावस्पर्शी प्रवास नांगरणीच्या शेवटाने सुखावह होतो. 

संघर्षावस्थेत येणाऱ्या प्रत्येक संकटाचा नेटाने सामना करून, प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून स्वतःला घडवणाऱ्या आनंद यादव यांचं प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावं अशा आत्मचरित्रातील एक टप्पा "नांगरणी".





संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये