लेखक : नंदा खरे
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठे- २८५, मूूल्य- ३०० रुपये.
'मनुष्य हा प्रगतशील प्राणी आहे' हे लहान असताना शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेलं वाक्य! आज माणसाच्या आयुष्यात हरघडी काही न काही नवीन शोध लागून त्यामार्फत अविरतपणे त्याची प्रगती चालू आहे. इतिहासावर नजर टाकली तर मागच्या १०० वर्षांत माणसाने अफाट प्रगती केली आहे, खास करून या एका शतकाच्या उत्तरार्धात माणसाने केलेली प्रगती अविश्वसनीय अशी आहे. आज अगदी सामन्यातला सामान्य माणूस घरबसल्या अशा अनेक गोष्टी करू शकतो ज्याचा २०-२५ वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल. या पावलापावलावर होत जाणाऱ्या प्रगतीने मानवी आयुष्य अधिकाधिक सुखकर होत चालले आहे यात शंकाच नाही परंतु सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी प्रगती भविष्यात संपूर्ण मानवजातीलाच आव्हान ठरू शकते हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोठमोठया शास्त्रज्ञांनी या भविष्यातील धोक्याची कल्पना आधीच देऊन ठेवली आहे शिवाय आपण नक्की कुठं थांबलं पाहिजे हे ठरवूनच आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आली आहे हेदेखील वेळोवेळी सांगितलं जातं. कारण माणसाची ही उत्तरोत्तर होणारी प्रगती जितकी 'तारक' आहे तितकीच ती 'मारक' आहे याची बरीच उदाहरणे आज मिळतील. हे सर्व लिहायचे कारण म्हणजे अलीकडेच माझ्या वाचनात आलेली नंदा खरे यांची एक अतिशय उत्तम कादंबरी "उद्या"! मानवाच्या प्रगतीला डोळ्यासमोर ठेऊन भविष्याचा वेध घेऊन लिहिलेली नंदा खरे यांची ही कादंबरी "उद्या"! नजीकच्या भविष्यकाळातलं एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं हे या कादंबरीतून डोकावतं. माणूस करत असलेल्या प्रगतीमुळे येऊ घातलेला भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदा खरे यांनी “उद्या” मध्ये विविध गोष्टींची सांगड घालून, आपल्या स्वातंत्र्यावर कशाप्रकारे अतिक्रमण होऊ शकतं हे खूप स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्यासाठी नंदा खरे यांनी आठ प्रकरणांतून ही कादंबरी उलगडत नेली आहे. "अस्तित्व", "सर्व्हलन्स", "लोगो न् पेनं", "जंगलात शेतं", "बचके कहाँ जाओगे", "मुळं-पारंब्या", "लांडगेतोड" आणि "कुत्रे" अशा अतिशय सूचक शीर्षकांतून उलगडत जाणाऱ्या, मानवी अस्तित्वावरच प्रशचिन्ह उभं करणाऱ्या भविष्यवेधी कथांमधून ही कादंबरी आकार घेते. माणसाचं आयुष्य आज इतकं वेगानं बदलतंय की एखाद्या वर्षातच बऱ्याच गोष्टी कालबाह्य वाटायला लागल्या आहे, रोज-रोज बदलत जाणारं तंत्रज्ञान माणसाची मुळं उखडून एका वेगळ्या भूमीत, विश्वात रुजायला भाग पाडतंय. आजवर स्थलकाळातीत मानली जाणारी अनेक मूल्यं प्रगतीच्या या वावटळीत पाचोळ्यासारखी उडून गेली आहेत. कधी काळचं आपलं स्थिर जगणं विसरून माणूस आज या गतीमान प्रगतीचाच एक भाग झाला आहे. आपलं आजचं, उद्याचं आणि असलोच तर परवाच्याही आयुष्याचा विचार करून नंदा खरे यांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कादंबरी "उद्या" मधून. “उद्या” कांदबरीत भविष्यातील विविध पात्रांच्या जीवनात, प्रगतीच्या नावाखाली त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील आर्थिक ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे माणसाचे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं पहायला मिळते. लोकांच्या जीवनातील प्रेम, करुणा या भावनेचे स्थान आता जवळपास नाहीसं झालेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे समाजात मोठ्या प्रमाणात वाढलेली गुन्हेगारी. निसर्गात कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्रीवर या सर्वांचा होणार वाईट परिणाम आणि अशा परिस्थितीत स्त्रियांचे एकट्याने बाहेर पडण्याचे हिरावलेलं स्वातंत्र्य. नियंत्रणाबाहेर गेलेल्या लोकसंख्येत आपलं अस्तित्व प्लास्टिक कार्डापुरतं मर्यादित होत जाणं. रोल नंबर्स, बारकोड्स, वेगवेगळी प्रकारची कार्डच्या माध्यमातून मानवी आयुष्य चिन्हरूप, अंकरूप होत जाणं. या अपरिहार्य स्थितीत आपल्या अस्तित्वाचा कोंब त्यातल्या सत्त्वानिशी जपायचा कसा हा कळीचा प्रश्न घेऊन जगणारी ही भविष्यातील "उद्याची" पात्रे. नंदा खरेंची ही कादंबरी वाचत असताना बऱ्याच वेळा यातील अनेक गोष्टी "उद्याच्या" नसून आजच घडताहेत की काय असा भास होतो. भविष्यकाळातील एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं आणि त्यामधे अगदी अलगद अडकत जाणारा माणूस हे या कादंबरीचं मुख्य कथानक आहे. माणसाकडूनच निर्माण झालेल्या या जाळ्यात जितक्या तांत्रिक सुखसोयी उपलब्ध आहेत, तितकीच तांत्रिक पातळीवर प्रत्येक माणसावर पाळत ठेवली जात आहे. इथे प्रचंड प्रमाणात सर्वेलन्स आहे, सर्वत्र कॅमेरे आहेत, चेहऱ्यांवरचे बारीक हावभाव ओळखण्याचं सॉफ्टवेअर आहे, 'अस्तित्व कार्डा'सारख्या तांत्रिक सेवांतून जीवनाचं, अस्तित्वाचं प्रचंड केंद्रीकरण, एकीकरण झालं आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसाच्या आयुष्यातून निघून गेलेला खाजगीपणा. प्रत्येक संभाषण, प्रत्येक देवाण-घेवाण हे सगळं कॅमेऱ्यांना लक्षात घेऊनच करावं लागतं. सर्वेलन्स दैनंदिन जीवनात किती मुरलाय याचं वर्णन कादंबरीत काही ठिकाणी अगदी सहज आलं आहे. राज्यव्यवस्था आणि भांडवलदारांची म्हणावी तर स्वतंत्र वर्तुळं आणि उतरंडी आहेत, पण त्यांच्यातली रेषा धूसर आहे. लोकशाही तत्त्वाला धरून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या पदांवर एकाच छोट्या, सत्ताधारी वर्तुळातली तीच तीच माणसं आलटून-पालटून बसतात. राज्य कुठे संपतं आणि कॉर्पोरेशन कुठे सुरू होते, हे सांगणं अशक्य झालं आहे. तीच परिस्थिती संरक्षणव्यवस्था आणि सर्वेलन्स मधली. आम जनतेला पोलिसांकडून संरक्षण कमी आणि तिच्यावर पाळत ठेवणं जास्त जातंय. या सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींचं होणारं 'हंटिंग', स्त्रियांचं घटत जाणारं प्रमाण. याचाच फायदा घेऊन ठिकठिकाणी श्रीमंतांना बायका-सुना-वेश्या म्हणून मुली पुरवण्यासाठी अनेक राजकीय दलं आणि अधिकारी यांचा चालणारा "कारभार". परंतु सिस्टिमवर 'भरोसा' ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याने नंदा खरेंच्या "उद्या" मधील सर्व पात्रे नाईलाजाने हे सर्व सहन करत आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांतून निरनिराळ्या पातळ्यांवर, खेड्यांपासून महानगरांपर्यंत, सगळेच समाजातले घटक या जाळ्यात कसे अडकले आहेत हे नंदा खरे यांनी अतिशय तपशिलात मांडलं आहे. समाजातील वेगवेगळ्या वर्तुळांत राहणारी कादंबरीतील पात्रे हळूहळू एकत्र येऊन कादंबरीची "उद्याची" कथा पूर्णत्वास येते.
कुत्रीचं एक पिलू आईची नजर चुकवून रस्त्यावर गेलं, मोठी कार भरपूर आवाज करत येत होती. पिलू घाबरून चारी पाय फाकवून रस्त्यावर पसरलं. आई ताठरली, जास्त सावध झाली. गाडी गेली, पिलाच्या दोन्ही बाजूने गेली, योजनापूर्वक नव्हे, सहज. पिलू उठून आईकडे पळालं, आज-आत्ता वाचलंही, पण उद्या...? उद्या कशावरून वाचेल? नंदा खरेंच्या "उद्या" या कादंबरीचा हा शेवट वाचकाला फक्त प्रश्नच विचारात नाही तर भविष्यात येऊ घातलेल्या संकटाची भीतीदायक कल्पना देणारा आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण आज खरोखर कुठल्या दिशेने जात आहोत आणि त्याचा भविष्यात आपल्या आयुष्यावर, येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय घेण्यासाठी प्रत्येकाने वाचावी अशी कादंबरी "उद्या"! आज आपण वाचूही पण उद्या......?? उद्याचे काय??
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment