लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे- २८६, मूूल्य- ३०० रुपये.
"देवाज्ञा"! नारायण धारप यांच्या कल्पनाशक्तीच्या पेटाऱ्यातून निघालेली एक भन्नाट भयकादंबरी! वेगवेगळ्या मार्गांनी मृत्यूला स्पर्श करून आलेल्या लोकांना हेरून, संमोहित करून परत त्यांना त्याच मृत्यूसमयीच्या अवस्थेत घेऊन जाऊन निरनिराळे प्रयोग करणारा एक आचार्य आणि त्याचा मठ यांच्याभोवती फिरणारे कथानक! मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांना जीवन आणि मृत्यूच्या मधेच अडकवून गैरकृत्यांसाठी वापर करता यावा म्हणून स्वतःच्या मठात त्यांना रहायला बोलावणारा हा आचार्य म्हणजे या कादंबरीतील एक गूढ पात्र आहे! नेहमी रहस्यांकडे आकर्षित होणाऱ्या मानवी मनाची नेमकी नस पकडून धारप यांनी एकाहून एक सरस भयकथा-कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं कथानक वाचकांसमोर आणून ठेवलं जे वाचताना त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज येतो. "देवाज्ञा" मधील विषयदेखील अगदी असाच अफलातून आहे. प्रत्येक व्यक्तीला मरणानंतर माणसाचे काय होते हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते, मृत्यूनंतरच्या आयुष्याचे हे कुतूहल हाच एक धागा पकडून धारपांची ही कादंबरी सजली आहे. त्यांच्या या रहस्यकथेचा एक भाग बनून वाचक कथेसोबत जोडला जातो आणि त्यामुळेच कादंबरीत घडणाऱ्या बऱ्याच घटना अक्षरशः आपल्याच अंगावर आल्याचा भास वाचत असताना कित्येकदा होतो. वाचक कथेत पूर्णपणे गुंतून गेला असताना अनपेक्षित धक्क्यातून वेगळे वळण घेऊन शेवटाकडे जाणारे कथानक आणि त्यातून निर्माण होणारा क्लायमॅक्स हे धारपांच्या भयकथांचं वैशिष्ट्य ज्याला ही "देवाज्ञा" देखील अपवाद नाही. संगीता या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाने या कादंबरीची सुरुवात होते. या आत्महत्येच्या प्रयत्नातून अगदी मृत्यूला स्पर्शून आलेल्या संगीताचा हॉस्पिटलमधे असताना परिचय होतो तो आचार्यांशी! निःस्वार्थी भावनेने आचार्य करत असलेल्या सामाजिक कार्याने संगीता प्रभावीत होते आणि त्यामुळेच आचार्यांकडून त्यांच्या मठात रहायला येण्याचं निमंत्रण ती अगदी निःसंकोचपणे स्वीकारते. मठातील संगीताच्या प्रवेशानंतर कादंबरी खऱ्या अर्थाने वेग पकडते आणि वाचक कथेत गुंतायला चालू होतो. संगीताप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूला स्पर्श करून आलेल्या, समाजाच्या विविध स्तरातील आणि वयोगटातील मठात राहणाऱ्या इतर काही पात्रांच्या आयुष्याचा फ्लॅशबॅकमधे जाऊन परिचय करून देताना धारपांनी अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी मांडणी, वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय मठात आलेल्या लोकांना तिथे राहण्याची कोणतीच सक्ती नसल्याने मधेच मठ सोडून गेलेल्या काही लोकांच्या कथादेखील वाचकाच्या कुतूहलात भर टाकतात. आचार्य करत असलेल्या प्रयोगातून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे हे संगीतासोबतच वाचकासाठीसुध्दा हळूहळू एक गूढ प्रकरण होऊ लागते. मठात सध्या राहत असलेल्या तसेच पूर्वी काही विचित्र अनुभव आल्यामुळे मठ सोडून गेलेल्या पात्रांची मदत घेऊन संगीताने आचार्यांच्या या मठाच्या माध्यमातून चालणाऱ्या गूढ, रहस्यमय प्रयोगाचा लावलेला छडा आणि या सर्व प्रवासादरम्यान घडणाऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनांतून होणारा कादंबरीचा शेवट! अनपेक्षित धक्क्यातून होणारा शेवट हा या कथानकाचा कळस आहे. मृत्यूरेषेच्या पलीकडे कशाला तरी स्पर्शून आलेल्या लोकांमध्ये झालेले बदल मग ते काहींना स्पर्शून गेलेल्या अनामिक अशा चांगल्या शक्तीमुळे झालेले असोत अथवा काहींना झालेल्या वाईट शक्तीच्या संसर्गाने झालेले असोत, या दोन टोकाच्या शक्तींमधील संघर्ष हा या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय हा अगदी नेहमीच्याच पठडीतील शेवट धारपांनी केला असला तरी ज्या पध्दतीने धारप यांनी कथेत गुंतून गेलेल्या वाचकाला धक्का देऊन शेवट केला आहे त्याला तोड नाही.
अतिशय रोमहर्षक, अकल्पित आणि एक भन्नाट विषय! वाचकाला जागेवर खिळवून ठेवणारं, एखाद्या भयपटाला शोभणारं कथानक! भयकथांचं वेड असणाऱ्यांनी आर्जून वाचण्यासारखी नारायण धारप यांची कादंबरी "देवाज्ञा".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment