लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी
पृष्ठे- २१२, मूूल्य- २२० रुपये
डॉ. एस. एल. भैरप्पा! "साक्षी", "आवरण", "उत्तरकांड", "पारखा" आणि आता "परिशोध"! जितकं वाचत जावं तितकं अधिकच वाचक त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडेल असे विषय! आजपर्यंत त्यांची वरील जी पुस्तके मी वाचली ती सगळीच वाचकाला त्याच्या वैचारिक पातळीच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारी आहेत हे जाणवलं! प्रत्येकवेळी एक काहीतरी दर्जेदार वाचन केल्याचा अनुभव देणारे विषय! वाचकाच्या मन आणि मेंदूवर ताबा घेणारे त्यांच्या हर-एक पुस्तकातील विषय मानसिक पातळीवर न संपता वाचकाला नेहमी अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. "अन्वेषण" या मूळ कन्नड कादंबरीचा सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ही कादंबरी "परिशोध"! "अन्वेषण" चा शब्दशः अर्थ "शोध". ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे मानवी जीवनाच्या "परिशोधाची" आणि भैरप्पांनी हा शोध विश्वनाथ अरसीकेरे या अनाथ मुलाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणला आहे. ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ या प्रश्नात कादंबरीच्या कथेचे सार आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे, भैरप्पांनी विश्वनाथचा हा शोध त्याच्या स्वतःच्या तोंडून नव्हे तर त्याच्या आयुष्यात आलेल्या विविध लोकांच्या अनुभवातून उलगडत नेला आहे. जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर, देशपांडे वकील अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो आणि यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या शोधातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी "परिशोध"! एका जीवघेण्या संघर्षाचा अविरत चाललेला शोध म्हणजे ही कादंबरी "परिशोध"!
वयाच्या ९-१० व्या वर्षीच आई-बहीण-आजी यांचा प्लेगच्या साथीत झालेला मृत्यू आणि पुढे वडिलांनी केलेल्या दुसऱ्या लग्नानंतर अनाथ झालेला 'विश्वा' अर्थातच 'विश्वनाथ'! घर आणि गाव सुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात शेजारच्या गावातील एका जंगमाकडून त्याचा सांभाळ सुरू होतो. जंगमाच्या आधाराने रुळावर येणारी विश्वाच्या आयुष्याची गाडी पूर्णपणे भरकटून जाते ती जंगमाच्या मृत्यूनंतर! नंतर पोटासाठी त्याचा प्रवास चालू होतो वेगवेगळ्या गावांतून. याच प्रवासादरम्यान त्याच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांच्या निवेदनातून "विश्वाचे" आयुष्य वाचक अनुभवत राहतात. सुरूवातीला कंठीजोईस म्हणजेच विश्वनाथच्या आजोबांपासून सुरू झालेला या शोधाचा प्रवास विश्वनाथच्या शाळेतील मुख्याध्यापकांपर्यंत येऊन थांबतो. वेगवेगळी वळणे घेत जाणारा, विश्वाच्या माध्यमातून वाचकाला विचारमग्न करणारा हा प्रवास माणसा माणसातील नातेसंबंध आणि स्त्री-पुरुष संबंधातीळ पीळ उलगडून तर दाखवतोच पण सोबतच माणसाच्या मनात सतत चाललेल्या नैतिक- अनैतिकतेच्या द्वंद्वावरसुद्धा विचार करायला भाग पाडतो. जंगमाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे आधार हरवलेल्या विश्वाने केलेले आत्महत्येचे प्रयत्न, अनपेक्षितपणे मिळालेल्या शरीरसुखाच्या अनुभवाने त्याला पुन्हा एकदा जगण्याची निर्माण झालेली इच्छा, देशपांडे वकिलांच्या घरी काम करून रहायला जाणे आणि त्यादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर कोणालाही न सांगता त्याचं तिथून निघून जाणं, नाटक कंपनीतील नोकरी, मुंबईत व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत असताना वेश्यावस्तीतील त्याचा मुक्काम, साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे केलेला पत्नीचा त्याग, विश्वाच्या या निर्णयामुळे त्याच्या पत्नीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विश्वाच्या मुलाचा झालेला मृत्यू - अशा क्रमाने विश्वाचे आयुष्य सतत ढवळत राहते, त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो एक गूढ वाटत राहातो. विश्वाच्या या प्रवासात गुंतून गेलेल्या वाचकाच्या मनातही नकळत विश्वाचा ‘शोध’ चालू होतो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, यशस्वी होणे या सर्वसामान्य माणसाला हव्या असणाऱ्या गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत की गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न विश्वा करत राहतो. या प्रयत्नाला वाचक त्याच्या आयुष्यातीलच एखादे पात्र असल्याप्रमाणे सुरुवातीपासूनच चिकटून राहतो. कादंबरीतील शेवटच्या प्रकरणात विश्वनाथच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकांसमोर येतात. विश्वनाथ लिहीत असलेल्या त्याच डायरीतील एक विचार - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." जो वाचकाच्या डोक्यात कितीतरी वेळ घोळतच राहतो. वाचक आपल्या आयुष्याला या एका विचारासोबत 'रिलेट' केल्याशिवाय राहूच शकत नाही. शेवटी कादंबरी संपते तीदेखील प्रश्नचिन्हांवरच! विश्वाला प्रत्यक्ष भेटायचं आणि त्याच्याकडूनच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असं ठरवणारे हेडमास्तर स्वत:लाच प्रश्न विचारतात - 'समोर बोलत असतानाही विश्वा आपल्याला कितपत सत्य सांगू शकेल? आणि 'त्यातलं मी किती जाणू शकेन?' या प्रश्नांसोबतच वाचकाला विचारात गुंतवून भैरप्पांनी मानवी आयुष्याचा हा न संपणारा "परिशोध" थांबवला आहे.
संग्रही घेऊन आवर्जून वाचावी अशी कादंबरी!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment