लेखक : सदानंद देशमुख
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पृष्ठे- २०५, मूूल्य- २५० रुपये.
विश्वास पाटलांची "पांगिरा" ही पाण्यासारख्या ज्वलंत विषयाला हात घालणारी, अस्सल ग्रामीण कादंबरी ८-९ महिन्यांपूर्वी वाचली होती. त्यावेळी सदानंद देशमुख यांची "तहान" ही अशाच विषयावरील कादंबरी बऱ्याच लोकांनी वाचायला सुचवली. नंतर "तहान" संग्रही घेतली खरी पण इतर पुस्तके वाचण्याच्या नादात बरेच दिवस तशीच पडून राहिली. अलीकडेच Pustakexpress.Com वर "तहान"चा परिचय वाचल्यानंतर या कादंबरी वाचनाची "तहान" आणखी न वाढवता लगेचच वाचायला हातात घेतली. "तहान" ही कोणत्याही प्रकारची असू शकते सत्तेची, भोगाची, आसक्तीची आणि ती भागवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे जरी खरे असले तरी या गोष्टींसाठी माणूस स्वतःच्या मनाला मुरड घालू शकतो प्रसंगी पूर्णपणे दुर्लक्षसुद्धा करू शकतो परंतु पाणी ही एक अशी गोष्ट आहे जिथे माणूस पूर्णपणे हतबल होऊन जातो. 'पाणी म्हणजे जीवन' हे फक्त पुस्तकांत वाचून माहिती असणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष काय असतं, तहानेने व्याकुळ होणाऱ्या खेड्यांतील लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि पाण्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाण्याशिवाय काय हाल होतात याचं विदारक आणि तितकंच प्रत्ययकारी चित्रण सदानंद देशमुख यांनी "तहान" मधून केलेलं आहे. १-२ बैठकींत पूर्ण होऊ शकणाऱ्या या २०५ पानी छोटेखानी कादंबरीच्या माध्यमातून ज्या मोठ्या आणि गहन विषयाला सदानंद देशमुख यांनी लोकांसमोर मांडले आहे ते खरेच विचार करायला लावणारे आहे. १९९८ साली लिहिल्या गेलेल्या या कादंबरीतील बऱ्याच घटना वाचत असताना आज २०२१ मध्ये महाराष्ट्रातील अशी हजारो खेडी डोळ्यांसमोर येतात जिथे प्रत्यक्ष त्या घटना घडत आहेत. वाचत असताना प्रत्येक पानावर वाचकाच्या मनात एकच विचार येत राहतो की जर हे असंच चालू राहिलं तर पुढच्या पिढीचं भविष्य काय असेल? पाण्याच्या तहानेनं व्याकूळ होणाऱ्या हजारो खेड्यांचं चित्रण पारखेड या गावाला प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन देशमुख यांनी केलेलं आहे. शहरात राहून आपण टाळत असलेल्या किंवा दुर्लक्ष करत असलेल्या वास्तवाकडे आपल्याला ही कादंबरी खेचून नेते. या गावातील पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष, तळ गाठलेल्या विहिरी, कोरडा धुरळा, पाण्यापायी एका कोवळ्या मुलीचा कोरड्या विहिरीत पडून झालेला मृत्यू, अधम परिस्थितीत तेथील लोकांचं जगणं, खेडे आणि शहर यांच्यात असणाऱ्या अंतराची होणारी जाणीव, घाणेरडा वास मारत असतानाही नाईलाजास्तव ते पाणी पिऊन जगणारे, आजारी पडणारे लोक हे सर्व कादंबरीतून अनुभवनाऱ्या वाचकाला कादंबरीच्या शेवटी शेवटी हे वातावरण अक्षरशः घेरून टाकते. वाचून झाल्यानंतर कितीतरी वेळ हा विषय, यातील लोक, यातील घटना आपल्या डोक्यात घोळतच राहतात आणि अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात.
पारखेड गावातील शेवाळे या शेतकरी कुटुंबाला प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कादंबरी. कृषिसंस्कृतीचा प्रतिनिधी असणारा राघोजी शेवाळे, बदलणाऱ्या काळानुसार जगलं पाहिजे असं म्हणणारा त्याचा तरुण मुलगा बबन शेवाळे, राघोजीची सतत भांडणारी बायको रामकोर, लग्नाला आलेली तरुण मुलगी वर्षा आणि राघोजीचं जीवापाड प्रेम असणारी एक बैलजोडी मुरल्या-छबिल्या यांच्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून सदानंद देशमुख यांनी हा पाण्यासारखा गंभीर विषय मांडला आहे. "तहान" ही कादंबरी पाण्याच्या या दुर्भिक्षासोबतच दोन पिढ्यांचा संघर्षदेखील चित्रित करते. आपल्या शेतात राबणारी आपली बैलजोडी ही आपल्या संसाराचा अविभाज्य भाग आहे अशी श्रद्धा असणारा राघोजी! आपलं आयुष्य हे या दोन बैलांच्या जीवावर चाललं आहे याची जाणीव ठेवून त्यांना जीवापाड जपणारा राघोजी हा छबिल्या आणि मुरल्या यांच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. याउलट केवळ आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टीने या बैलांकडे पाहणारा त्याचा मुलगा बबन! पाणीटंचाईच्या काळात संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी याच बैलजोडीचा आधार घेऊन बबन पाण्याचा व्यवसाय चालू करतो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून त्यांचं राहणीमान तर बदलत जातंच पण अधिकाधिक पैसे कमावण्याच्या नादात बैलांकडे होणारं त्याचं दुर्लक्ष राघोजीसोबतच वाचकाच्या डोळ्यांतसुद्धा पाणी घेऊन येतं. पाण्याचा हा व्यवसाय करत असताना रत्नाचा बबनच्या आयुष्यात झालेला प्रवेश, तिच्यावर त्याने उडवलेला पैसा, अतिपैसे कमावण्यासाठी त्याने चालू केलेली बैलांची कुतरओढ, त्यातून बैलांचे होणारे हाल, पाण्यासाठी चालू झालेलं गावाचं आंदोलन, पाण्याचा प्रश्न मिटला की आपल्या बैलांना आराम मिळेल या एकाच भावनेने आंदोलनात सामील झालेला राघोजी, आंदोलनादरम्यान उसळल्या गेलेल्या दंगलीत स्वतःचा पाय मोडून घेऊन असहाय होऊन घराच्या ओसरीवर पडून राहणारा, पैशाच्या मागे लागलेल्या कुटुंबाकडून दुर्लक्षित होणारा, आपलं दुखणं विसरून बैलांसाठी तडपडणारा राघोजी शेवाळे, गावात सरकारकडून टँकरने पाणीपुरवठा चालू झाल्यानंतर बबनच्या धंद्याला लागलेली घरघर, रत्नासोबत असणारं बबनचं नातं समजल्यानंतर त्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणारा पोलिस आणि गावातीलच त्याच्या परिचयाचे काही लोक, पाण्याचा धंदा जवळपास बंद झालेला असताना झालेली ही पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी बबनची होणारी कसरत, पाण्याच्या पैशातून घरात आणलेल्या गोष्टींचे परत घरातून बाहेर जात असताना शेवटी बबनला झालेला पश्चात्ताप आणि बैलांप्रति उफाळून आलेलं प्रेम या सर्वांतून पुढे सरकत असताना पावला-पावलावर पाण्याचं महत्व सांगणारी ही अतिशय उत्कृष्ट कादंबरी "तहान". शेवटी एका असहाय्य तडफडीचा वाचकाला अनुभव देत ही कादंबरी जिथे संपते तिथेच आपल्या मनात पुन्हा सुरू होते आणि आपल्याला अस्वस्थ करत राहते. शेवाळे कुटुंबाच्या माध्यमातून सदानंद देशमुख यांनी पाण्याच्या दुर्भिक्षाकडे ज्या पद्धतीने लक्ष वेधलं आहे ते खूप विचार करायला लावतं.
आवर्जून वाचावी अशी कादंबरी.
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment