Saturday, October 16, 2021

"आग्ऱ्याहून सुटका"

 



लेखक : डॉ. अजित जोशी

प्रकाशक : शिवप्रताप प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २९२, मूूल्य- ३३० रुपये.


तसे पहायला गेले तर शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे. आजपर्यंत बऱ्याच लेखकांनी शिवचरित्रातील घटनांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्यादेखील लिहिल्या ज्याच्या माध्यमातून त्यांनी इतिहासाचे अनेक पैलू लोकांसमोर उलघडून दाखवले. कादंबरीच्या स्वरूपात मांडलेल्या अशा ऐतिहासिक घटना आणि पात्रे जरी प्रेरणादायी असले तरी त्यांना नेहमीच एक कल्पनेची जोड असते, त्यामुळे कादंबरीतून मांडलेला इतिहास हा पूर्णपणे खरा कधीच मानता येत नाही परंतु तो सत्याच्या अधिक जवळ जाणारा असतो असं नक्कीच म्हणता येईल. इतिहासाचं जतन न केल्याने म्हणा अथवा तटस्थपणे न लिहिला गेल्याने म्हणा स्वराज्याचा, शिवरायांचा, संभाजी महाराजांचा बराचसा इतिहास हा एकतर अंधारातच राहिला किंवा कादंबऱ्यांतील काही काल्पनिक घटनांनाच खरा इतिहास मानला गेला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर संशोधनात्मक लिखाण खूपच कमी झाले आहे हेदेखील त्यामागील एक कारण आहे असं म्हटलं तरी चालेल. शिवचरित्रात अनेक अद्भुत, थरारक, रोमांचकारी प्रसंग आहेत आणि त्यातीलच एक सर्वांत चित्तथरारक प्रसंग म्हणजे औरंगजेब बादशहाच्या आग्ऱ्यातील नजरकैदेतून महाराजांची झालेली सुटका. फक्त मराठे किंवा स्वराज्याच्याच नाही तर अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुघल आणि स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग! मिर्झाराजा जयसिंग याच्याबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात स्वराज्याचा बराच मोठा मुलुख, बरेच किल्ले मुघलांना द्यावे लागले. अशा परिस्थितीत जर शिवाजी महाराज कायमचे आग्ऱ्यात अडकले गेले असते तर हे श्रीं चे राज्य उभे तरी राहिले असते का? आणि याचीच दुसरी बाजू, जर महाराज तिथेच अडकून पडले असते तर औरंगजेबाला आपल्या आयुष्याच्या शेवटची जवळपास २७ वर्षें दख्खनेत घालवावी लागली असती का? त्याला याच दख्खनच्या मातीत गुडघे घासत जीव सोडावा लागला असता का? हे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. औरंगजेबाच्या तोंडून निघालेलं वाक्य, "हमारी जिंदगी की सबसे बडी गलती यह है की हमनें सिवा को आगरा से भागने दिया"! हे सांगण्यास पुरेसे आहेत की इतिहासावर या एका घटनेचा किती मोठा प्रभाव आहे आणि याचा काय परिणाम झाला आहे. औरंगजेबासारख्या महाकपटी, धूर्त बादशहाच्या कडेकोट पहाऱ्यातून महाराज आपले सर्व सहकारी आणि संभाजी महाराजांसोबत सहीसलामत कसे निसटले असतील या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सध्या सर्वमान्य असणारी "मिठाईच्या पेटाऱ्यांची कथा"! महाराज आग्ऱ्याच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून संभाजी महाराजांसोबत पळाले असेच आपण आजपर्यंत ऐकत, वाचत आलो. परंतु खरंच महाराजांना संभाजी महाराजांसोबत पेटाऱ्यातून पळून जाणं शक्य होतं का? हा विचारच आपण कधी केला नाही. शिवाजी महाराजांच्या इतर मोहिमांवर नजर टाकली तर नेहमी काळाची पावले ओळखून आपली वाटचाल करणारे महाराज हा पेटाऱ्यांचा, जोखमीचा मार्ग निवडून त्या नजरकैदेतून सुटतील हे मनाला पटत नाही. शिवाय एकाचवेळी स्वराज्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा जीव (महाराज स्वतः आणि संभाजी महाराज) धोक्यात घालण्यासारखे पाऊलदेखील महाराज उचलतील का? हासुद्धा एक प्रश्नच आहे. शिवाय आग्ऱ्यातून सुटल्यानंतर महाराज राजगडावर कसे पोहचले? कोणत्या मार्गाने पोहचले? नंतर संभाजी महाराज राजगडावर कसे पोहचले? याच्याही सर्वमान्य अशा सुरस कथा आहेत. आग्ऱ्यातून सुटकेबद्दलचे हे सर्व समज तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत का याचा आपण कधी विचारच नाही केला. "मोठे कारस्थान उपयोगी पडले" हे शब्द आहेत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे! आग्ऱ्यातील नजरकैदेतून सुटकेच्या कटाला खुद्द छत्रपतीच जर "मोठे कारस्थान" म्हणत असतील तर तो कट किती गुंतागुंतीचा आणि कुटील असला पाहिजे याचा फक्त विचारच केलेला बरा. डॉ. अजित जोशी यांनी याच ऐतिहासिक घटनेवर नव्याने सखोल संशोधन करून, जुन्या आणि नव्या ऐतिहासिक पुराव्यांचा पुन्हा एकदा अभ्यास केल्यानंतर, याघटनेदरम्यान तसेच या घटनेपूर्वी झालेल्या बऱ्याच ऐतिहासिक प्रसंगांचा तांत्रिकदृष्ट्या विचार करून जी सांगड घातली आहे त्यातून हे पुस्तक, "आग्ऱ्याहून सुटका" साकारलं आहे. इ. स. १६६६ मध्ये आग्ऱ्यात काय घडले? शिवाजीराजे नजरकैदेत का व कसे अडकले? आग्ऱ्याहून निसटण्यासाठी राजांनी कोणता कट रचला? मुघलांच्या कडेकोट पहाऱ्यातील सैनिकांची दिशाभूल करून महाराज नजरकैदेतून कसे निसटले? त्यांना त्यासाठी बादशहाच्या लोकांपैकी कोणी मदत केली असेल का? महाराज संभाजीराजांसोबत त्या नजरकैदेतून एकाच वेळी, एकाच मार्गाने निसटले की संभाजीराजांना नंतर स्वतंत्रपणे सोडवले गेले? तसे असेल तर संभाजी महाराज नंतर राजगडी कसे पोहचले? या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. अजित जोशी यांनी त्यांच्या नवीन संशोधनाच्या आधारे "आग्ऱ्याहून सुटका" या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे आणि बखरी, तत्कालीन परिस्थिती, संदेशवहन आणि राजकारण तसेच शिवाजी महाराज, औरंगजेब, मिर्झा राजा जयसिंग आणि त्याचा पुत्र रामसिंग यांचे स्वभावविशेष या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून, तर्कशास्त्राच्या आधाराने घेतलेला शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेचा हा थरारक वेध. डॉ. अजित जोशी यांच्या मेहनतीतून साकार झालेला, आवर्जून वाचावा असा एक संशोधनात्मक ग्रंथ "आग्र्याहून सुटका".





संदीप प्रकाश जाधव

1 comment:

  1. खुप छान सारांश लिहिला आहे, वाचलेच पाहिजे

    ReplyDelete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये