Sunday, June 28, 2020

"लक्ष्यवेध"


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस



शिवचरित्राला बऱ्याच लेखकांनी हात घातला पण त्यांपैकी काही मोजक्याच लेखकांना ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचवता आलं आणि त्यांपैकीच एक म्हणजे कादंबरीकार रणजित देसाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र श्रीमानयोगी सारख्या अजरामर कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले. त्यांनीच लिहिलेल्या आणखीन ही काही कादंबऱ्या स्वामी,राधेय,पावनखिंड,मेख मोगरी,लक्ष्यवेध. एखाद्या लेखकासाठी कादंबरी ही एक अशी गोष्ट आहे जिथे लिहिताना त्याला आपल्या काल्पनिक विचारांना हवी तेवढी मुभा देता येते पण रणजित देसाईंनी ती मुभा देताना त्यांच्या सर्व कादंबऱ्या मूळ विषयाला जराही धक्का न लावता ज्याप्रमाणे वाचकांसमोर आणल्या आहेत त्यातच त्यांच्यासारख्या लेखकाचं मोठेपण. त्यांची कोणतीही कादंबरी वाचताना त्यातील पात्रे,ठिकाणे,घटना आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतातच.

रणजित देसाईंसारख्या लेखकाच्या एखाद्या पुस्तकाचे विश्लेषण करण्याइतका मोठा मी नक्कीच नाही पण तरीही त्यांनी लिहिलेल्या "लक्ष्यवेध" या ऐतिहासिक कादंबरीचा माझ्या शब्दांत परिचय करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.

शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोठं असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यावर चालून आलेल्या शत्रूंचं असणारं अफाट कर्तृत्व,अफाट पराक्रम आणि या अशाच मोठ मोठ्या शत्रूंवर आपल्या बुद्धीचातुर्याने, युद्धकौशल्याने, पराक्रमाने शिवाजी महाराजांनी केलेली मातच त्यांचं मोठेपण सिद्ध करते. शिवचरित्र सुद्धा सजलेय ते अशा बऱ्याच अचाट, अतुलनीय, अलौकिक, अविश्वनिय ऐतिहासिक घटनांनी. तसं पहायला गेलं तर शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आणि त्याच घटनांमधील एक ऐतिहासिक घटना म्हणजे शिवाजी महाराज - अफजलखान भेट. याच शिवाजी महाराज - अफजलखान ऐतिहासिक भेटीवर लिहिली गेलेली रणजित देसाई यांची ही थरारक कादंबरी "लक्ष्यवेध". 

अफजलखानाचं स्वराज्यावर चालून येणं हे त्यावेळच्या एका मोठ्या संकटांपैकी एक होतं आणि त्या संकटाचा झालेला शेवट हा स्वराज्य उभारणीस मिळालेली सर्वांत मोठी चालना होती.त्याचं कारणही तसंच होतं, अफजलखान हा एक अचाट शक्तीचा माणूस ज्याने औरंगजेबासारख्या पराक्रमी माणसाला सुद्धा नमवलं होतं.अत्यंत हुशार, कुशल सेनापती, राजकारणात पटाईत, कपटी अशी ओळख असलेला असा हा अदिलशाही सरदार जेव्हा अफाट सैन्यानिशी स्वराज्यावर चालून येण्यास विजापुरहून निघाला तिथूनच सुरु होतो या कादंबरीचा प्रवास. "लक्ष्यवेध" मधे रणजित देसाईंनी ज्या बारकाईने या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी लिहिलेय तेसुध्दा घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लागू न देता ते खरंच अप्रतिम. अफझलखानासारखे संकट शिवाजी महाराजांनी अत्यंत संयमाने हाताळले आणि परतवून लावले.पण या संकटासोबतच शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेलं वादळ म्हणजे त्यांची पहिली पत्नी सईबाईंचा झालेला मृत्यू.या वाईट घटनेची पार्श्वभूमी सुद्धा रणजित देसाईंनी ज्याप्रमाणे या कादंबरीच्या सुरुवातीलाच मांडलेय ती वाचताना डोळ्यांत पाणी येणारच. या वादळाला मागे सारून स्वराज्यावर घोंगावत येणाऱ्या अफजलखान नामक वादळाला सामोरे जायला त्वरित तयार होणारे महाराज देसाईंनी या कादंबरीमधे रंगवताना कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी घेतलेय.

वाईपासून प्रतापगडापर्यंत हिरव्यागार रानावर राजकारणाचा पट मांडला जात होता.चढे घोड्यानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्जना होती आणि खानाला मारल्याशिवाय स्वराज्य साधणार नाही हे राजे पुरते जाणून होते. तर या दोन राजकारण - धुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजे "लक्ष्यवेध". या सर्व घटनाक्रमात शिवाजी महाराज आणि अफझलखान या दोन्हीही बाजूंकडून ज्या इतर धुरंधरांनी मेहनत घेतली मग ते वाटाघाटी करणारे दोन्ही बाजूंचे वकील असोत वा प्रत्यक्ष भेटीच्या वेळी महाराज-अफझलखानासोबत असणारे त्यांचे निवडक सैनिक, यासर्वांचंही खूपच बारकाईने वर्णन देसाईंनी केलेलं आहे. 

एवढ्या प्रचंड फौजेनिशी आलेला अफझलखान वाई सोडून कोयना खोऱ्यात का उतरला? आणि निःशस्त्रपणे गडावर का गेला? याला ठोस असं उत्तर आजघडीला तरी कोणाकडेच नाही.पण तरीही ही कादंबरी वाचल्यानंतर अशा प्रश्नांचे उत्तर काही प्रमाणात तर नक्कीच मिळू शकेल.

जरी अफझलखान वध ही सर्वांना अगदी लहानपणापासून माहीत असलेली ऐतिहासिक घटना असली तरीही रणजित देसाईंनी लिहिलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी आवर्जून वाचण्यासारखी ही कादंबरी "लक्ष्यवेध".




संदीप प्रकाश जाधव








Sunday, June 21, 2020

"जुगाड"


लेखक : किरण गुरव

प्रकाशक : दर्या प्रकाशन


मराठी साहित्यातील एक सशक्त कथाकार किरण गुरव यांची "जुगाड" ही पहिलीच कादंबरी.

आपल्यापैकी प्रत्येकाच्याच अगदी ओळखीचा शब्द "जुगाड" आणि प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे, कशासाठी तरी नक्कीच केला असेल असा हा "जुगाड". पण पुस्तक वाचत असताना मला जाणवलेला लेखकांना याठिकाणी अभिप्रेत असणारा "जुगाड" म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी केलेली धडपड. हिच धडपड किरण गुरव यांनी अतिशय साध्या आणि शैलीदार भाषेत मांडली आहे त्यांच्या पहिल्याच कादंबरी "जुगाड" मधे.

अभियांत्रिकी शिक्षणाचे पेव फुटल्यानंतर जो तो हेच शिक्षण घेऊन जेव्हा बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करतो आणि मग स्वप्नांचा पाठलाग करताना असणारी जीवघेणी स्पर्धा, त्यातून होणारी घुसमट सहन करत करत बेकारीच्या खाईमधे होरपळून जाणारी एक पिढी यांचं किरण गुरव यांनी या कादंबरीमधे केलेलं वर्णन विचार तर करायलाच लावतं पण मनसुद्धा अक्षरशः हेलावून टाकतं. जरी कादंबरीची कथा एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली असली तरी ती कथा अशा सर्वांची आहे जे गावा-गावातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन महानगरांमधे अशाश्वत अशा रोजगारासोबत जगण्याची आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची कसरत करत आहेत.

या कादंबरीचे कथानक फिरते कथेचा नायक शशा भोवती. शशा जो आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून पुण्यासारख्या महानगरामधे नोकरीनिमित्त आलेला तरुण.या कादंबरीचे विश्लेषण करायचं झाल्यास ते दोन भागात करावे लागेल, पहिला भाग म्हणजे शशाचे पुण्यातील दिवस तर दुसरा भाग म्हणजे नोकरी गेल्यामुळे त्याच नोकरीसाठी पुण्यातून परत गावाकडे येऊन सुरु केलेली नवीन नोकरी आणि तिचा पुन्हा तसाच शेवट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण पूर्ण करून महानगरांमध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या प्रत्येक तरुणाचे पहिले काम म्हणजे राहण्यासाठी स्वस्त-कामचलाऊ जागा शोधणं आणि या कथेपुरती ही जागा आहे "श्री" लॉज. कथेची सुरुवात होते खोली नंबर ५७, "श्री" लॉज पासून जिथे राहतो कथेचा नायक शशा त्याच्यासारख्या अशा अनेक तरुणांसोबत. लॉजचे मालक शितोळे हे एक अवली पात्र, भाडेकरूने कितीही टांगा मारायचा प्रयत्न केला तरी शितोळेची त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याची पद्धत आणि लॉजच्या एखाद्या गोष्टीबद्दल कोणी तक्रार घेऊन आलाच तरी लॉजची खरी गरज मालकाला नसून इथे राहणाऱ्यालाच आहे हे पटवून सांगणारा शितोळे लेखकाने अगदी मस्त रंगवलाय.सुरवातीला कडक आणि व्यवहारी वाटणारा शितोळे इतकाही भावनाशून्य नाही हे पहिल्या भागाच्या शेवटी जाणवते. लॉजमधे राहणारे सर्वचजण वेगवेगळ्या क्षेत्रात - वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे, सगळ्यांच्या कामाच्या वेळा वेगळ्या आणि त्यामुळेच सकाळी सकाळी ऑफिससाठी आवरताना सगळ्यांची जी कसरत चालू असते ती सांगताना लेखकांनी जे वर्णन केलंय भले ते संडास-बाथरूम च्या लाईनचे असो वा पावसात गळणाऱ्या खोलीच्या भिंतीचे असो वाचताना वाटत राहतं की आपणही तिथेच त्यांच्यासोबतच आहोत.फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टमधे काम करणारा प्रत्येकजण इथे धडपडतोय छोट्याश्या कंपनीत का असेना पण पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी. कारण कंत्राटी कामगार भरतीचे जे पेव महानगरांमध्ये फुटलेय त्यामुळे वाढीस लागलेली नोकरीची अशाश्वतता. प्रत्येक कंपनीमध्ये असलेले प्रोडक्शन आणि कॉलिटी मधिल विळा-हातोड्याचे नाते लेखकाने इथेही मस्त रंगवलंय. कंत्राटी कामगार आणि पर्मनंट कामगार यांच्यातील शीतयुद्ध सुद्धा वाचताना सतत जाणवत राहते.याच कंत्राटी कामगारांच्या गर्दीमधला नोकरी गेलेला शशा आणि त्याचा परममित्र पुषप्या. नोकरी गेल्यानंतर नोकरीच्या शेवटच्या दिवशी शशाची होणारी घालमेल आपल्यालाही अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही.नोकरी गेल्यामुळे क्षणा क्षणाला शशाला घरच्यांची काळजीने येणारी आठवण वाचणाऱ्या प्रत्येक नोकरदाराला आपले कुटुंब डोळ्यासमोर डोळ्यासमोर घेऊन येते. कंत्राटी कामगाराला किती तारेवरची कसरत करावी लागते हे वाचताना समजते. नवीन नोकरीच्या शोधासाठी रोज सकाळी उठून तयार होऊन शशा आणि पुष्प्याचे पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरणे, नोकरीच्या शोधात नकळत अगदी भंगार वाल्यापर्यंत जाऊन पोहोचणं मनाला चटका लावून जाते. शशाचे नोकरीसाठी सासवडच्या एका कंपनी पर्यंत जाणे आणि त्याच्या तिथेपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन अप्रतिम. तिथून परतत असताना तयार झालेले पावसाळी वातावरण, त्यानंतर पडलेला तुफान पाऊस, शश्याच्या अगदी जवळच आकाशातून पडलेला तो विजेचा लोळ, त्यातून अक्षरशः मरणाला शिवून आलेला शशा आणि त्याही परिस्थितीत शशाचे "श्री" लॉज वर येऊन पोहचणे सगळे कसे लेखक आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. पुण्यात येऊन नोकरी करण्यापूर्वी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात शशा कोल्हापूरच्या उद्यमनगर सारख्या ठिकाणी काम करायचा. याठिकाणी उद्यमनगरमधे काम करणाऱ्या जुन्या मेस्त्री लोकांचे लेखकांनी केलेल्या वर्णनामुळे लेखकांचे बारिक निरीक्षण दिसून येतं. तर अशा उद्यमनगर सारख्या ठिकाणी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे शशाला सासवडच्या कंपनीमधे नोकरीची ऑफर मिळते खरी पण नियतीला ते मान्य नसल्यामुळे किंवा कदाचित शशालासुद्धा मनातून सासवडला जायचंच नसलेल्या इच्छेमुळे त्याचं अचानक आजारी पडणं आणि हे आजारपण गावी समजल्यामुळे गावाकडून मामाने त्याला घरी परत घेऊन जाण्यासाठी येणं या सगळ्यात शशाच्या मनाची अस्वस्थता लेखकाने अगदि बारकाईने मांडली आहे.इतके दिवस राहिलेला "श्री" लॉज सोडताना झालेली शशाची मानसिक अवस्था आणि स्वारगेट स्टँड मधून कोल्हापूरला गाडी निघताना आपला परममित्र पुष्प्याला जड अंतःकरणाने दिलेला अखेरचा निरोप यांचं वर्णन वाचताना थोडंसं वाईट नक्कीच वाटतं. पुण्याला अखेरचा रामराम करून गावाकडे परत जाणं हा झाला कथेचा एक भाग जो कादंबरी रुपात वाचताना एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

शशाच्या मामाने केलेल्या खटपटीमुळे शशाला गावाकडे जी दुसरी नोकरी मिळते ती एका नवीन चालू होणार असणाऱ्या बॉक्साइट कॅल्सीनेशन फॅक्टरीत मेकॅनिकल इंजिनिर/साईट इंजिनिर म्हणून आणि तेही अगदी त्याच्या गावशेजारच्या पाटगाव तालुक्यातील कोकणात. गावापासून, घरच्यांपासून जवळ शिवाय नवीनच चालू होणारी फॅक्टरी आल्यामुळे लवकर पर्मनंट होण्याची शक्यता या सगळ्यामुळे खुश होऊन नोकरीवर लागलेला शशा पुढे परत कसा बेरोजगार होतो याची कथा आहे दुसऱ्या भागामध्ये. गावाकडची एक प्रतिष्ठित व्यक्ती, राधामाई मिनरल प्रॉडक्ट चे चेअरमनसाहेब श्रीयुत शेळनोलीकर चव्हाण यांनी घातलेला घाट म्हणजे ही नवीन फॅक्टरी.इथे शशाची भेट होते साईटवरच्या फिटर लोकांसोबत युसूफ, साजी आणि जय ज्यांना अगदी देशभर फिरून अशा नवीन चालू होणाऱ्या फॅक्टरिंमध्ये मोठ मोठ्या मशनरी फिटिंगचा दांडगा अनुभव.कोणत्याही प्रकारचे आणि कितीही मोठे मशीन "जुगाड" करून का होईना फिट करण्यात ही मंडळी पटाईत. साईटवर आलेल्या मोठ मोठ्या मशनरिंचं युसूफने आपल्या खास अंदाजात आणि काही ठिकाणी "जुगाड"करून केलेल्या फिटिंगचे लेखकाने केलेलं वर्णन वाचताना आपल्याला हे सर्व त्या साईटवरच उभे राहून पाहत असल्याचा भास होतो.गावाकडे डोंगर उतारावर उभ्या राहत असलेल्या या फॅक्टरीच्या आसपासच्या निसर्गाचे उत्तम असे वर्णन करायला लेखक नाही विसरला. याच ठिकाणी शशाची भेट होते त्याच्या थोडे आधी या फॅक्टरीत जॉईन केलेल्या सिव्हिल इंजिनिर सीमा मॅडम सोबत.सुरवातीला खडूसपणे आणि शशापासून अंतर ठेवून राहणारी सीमा मॅडम नंतर शशाची चांगली मैत्रीण बनते ती शशाने अगदी कठीण समयी तिला केलेल्या कामातील मदतीमुळे. नंतर चेअरमन साहेबांच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा मी पणामुळे मटेरियल सप्लायर सोबत झालेला वाद आणि त्यामुळे हळूहळू बंद पडत गेलेलं फॅक्टरीचं काम याचं वर्णन वाचताना नायकाची दया आल्याशिवाय राहत नाही.याच वेळी शशाचं गावी जाऊन येणं, तिथल्या मित्रांना भेटल्यावर झालेली जाणीव जी की अभियांत्रिकीशिवाय इतर पर्याय ज्यांनी निवडले त्यांचं आयुष्यात स्थिरस्थावर होणं आणि आपण अजूनही नोकरीसाठी धडपड करत राहणं. तरीही शशा परत साईटवर जातो हा विचार करून की टिकून राहणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यातच पुढच्या उज्वल यशाची शक्यताही दडलेली आहे.पण बंद पडत जाणाऱ्या फॅक्टरी मधून एक एक करून सर्व कामगारांचं निघून जाणं, सीमा मॅडमचं अचानक कामावर यायचं बंद होणं आणि नोकरीत लागल्यापासून न मिळालेल्या पगारासाठी शशाने चेअरमन साहेबांना सतत आठवण करून देऊनसुद्धा पगार न देताच त्याला नोकरीवरून काढून टाकणे या सर्वांमुळे खचून गेलेला शशा आणि त्याचं पुन्हा बेरोजगार होणं हा दुसऱ्या भागाचा शेवट.


प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही मनाला भिडणारी, वाचल्यानंतर आयुष्याचा नव्याने विचार करायला लावणारी,कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ऊर्जा देणारी किरण गुरव यांची कादंबरी "जुगाड".





संदीप प्रकाश जाधव

















Sunday, June 14, 2020

"दंशकाल"


लेखक : हृषीकेश गुप्ते

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


हृषीकेश गुप्ते....माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक...जे मला आवडतात त्यांच्या गूढकथा आणि रहस्य कथांसाठी....हा परिचय त्यांच्याच एका कादंबरी विषयी "दंशकाल"....

तसे कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ पाहून अंदाज आलाच असेल की ही एक रहस्यकथा आहे.कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने अशा विषयाला हात घातला आहे जो आजही इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्या समाजमनाने घट्ट पकडून ठेवला आहे आणि त्याची जाणीव वाचताना प्रत्येकवेळी होत राहते, तो म्हणजे 'अंधश्रद्धा'. त्याचबरोबर ज्या कुटुंबासोबत हे कथानक जोडलं गेलंय त्या कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत ज्या पद्धतीने मांडली आहे ते अगदिच अप्रतिम.रहस्यमय पद्धतीने पुढे सरकणाऱ्या कथानकाचा आश्चर्याच्या धक्क्याने केलेला शेवट हा सर्वांवर कळस.

कथानकाची सुरुवात होते आजसुद्धा रहस्य आणि गुढकथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून.कोकणातील भूगाव मध्ये देशमुखांच्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरणारी ही रहस्यमय कादंबरी - कथा. कथेच्या मध्यभागी आहे कथेचा नायक अनिरुद्ध. नायकाच्या लहान काकाला, भानूकाकाला अचानक लागलेले वेड ही या रहस्यमय कथेची पहिली पायरी. भानूकाकाला लागलेल्या वेडानंतर वाड्यामध्ये  ज्या एका अनामिक शक्तीची चाहूल नायकाला सतत लागत राहते तिचे अगदि अफलातून वर्णन हृषीकेश गुप्ते यांनी केलंय जे वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहिल्याशिवाय राहत नाही.जसे की मध्यरात्री अंधारात बाईच्या वेषात प्राण्यासारखे चार पायांवर चालत वाड्यात फिरणारी एखादी आकृती असो किंवा विहिरीमध्ये पडलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी नायकाने केलेले प्रयत्न असोत किंवा भानू काकाला वेडाचा झटका आल्यानंतर त्याचं केलेलं वर्णन सगळेच अगदि थरारक. हे वर्णन करताना त्याला आवश्यक अशी जी वातावरण निर्मिती लेखकाने आपल्या शब्दांमध्ये केलेय त्याला तोड नाही.

देशमुख कुटुंबातील इतर सदस्य आण्णा,आई,नंदाकाका,रेवती काकू, गारगी,आत्या, आत्यांचे यजमान,नायकाची पत्नी अनु या प्रत्येकाचं भानूकाका आणि नायकाभोवतीचं आयुष्य गुप्तेनीं अगदी अशा पध्दतीने मांडलंय की ते वाचताना वाटावे आपल्याच आजूबाजूला हे सर्व कुठे तरी घडत असावे.अण्णांचा नायकाबरोबरच संपूर्ण गावाला असणारा धाक,आईची भानुकाकासाठी असणारी काळजी, पैलवानी ताकद असलेल्या नंदाकाकाची समलैंगिकता तसेच नायकाचे रेवा काकू आणि अनु सोबतचे नाजूक नाते कादंबरीच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता अगदि सहजपणे मांडलंय लेखकाने.

नंतर नायकाला येणाऱ्या गूढ अनुभवांसोबतच देशमुख कुटुंबाने भानूकाकाला दिलेला दत्ताचा अवतार आणि त्याच्या नावाने बांधलेल्या मठातून वाढीस लागणारी अंधश्रद्धा, आजही समाजात वावरताना आपल्याला जी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रुपात दिसते.याचबरोबरच ज्या विहिरीमध्ये पडून नायकाच्या आईचा मृत्यू होतो त्या विहिरीला देवपण देऊन तिथे चालू केलेली लोकांना कौल देण्याची पद्धत यांचे अगदि बारकाईने वर्णन लेखकानेे केले आहे. पुढे हीच लोकांच्या भावनांशी केलेली खेळी देशमुख कुटुंबाला कशी देशोधडीला लावते हे कादंबरीमधे ज्या रितीने लेखकाने मांडलंय ते खरंच विचार करण्यासारखं आहे.मठामध्ये चालणारा गैरप्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांकडून देशमुख वाड्याची होणारी जाळपोळ आणि सोबतच देशमुख कुटुंबाची होणारी फरफट हे वाचून मनाला कुठेतरी सतत वाटत राहतं, नक्की चूक कोणाची होती?वेड लागलेल्या भानूची? की त्याच्या वेडाचा बाजार मांडून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या आईची? की मठामध्ये येणाऱ्या लोकांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन वेगळेच धंदे चालवणाऱ्या यजमानांची?

शेवटी देशोधडीला लागलेले देशमुख कुटुंब जेव्हा नायकाच्या घरी मुंबईला राहायला येते तेव्हा तिथे अनुला, नायक व रेवती काकूच्या नाजूक नात्याबद्दल समजणे आणि नायकाला भूगावच्या वाड्यामध्ये मध्ये जाणवलेल्या गूढ-अनामिक शक्ती नेमक्या काय होत्या हे लक्ष्यात येणे म्हणजे या रहस्यमय कथेची शेवटची पायरी.

रहस्य व गूढकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ही एक थरारक आणि वाचताना नक्कीच अंगावर काटा आणणारी हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेली कादंबरी  "दंशकाल'.




संदीप प्रकाश जाधव




Sunday, June 7, 2020

"शोध"


लेखक : मुरलीधार खैरनार

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


एखाद्या पुस्तकाचा परिचय स्वतःच्या भाषेत इतरांसाठी करून देण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न. "शोध" ही मुरलीधर खैरनार यांची कादंबरी बऱ्याच दिवसांपूर्वी वाचून पूर्ण केली होती आणि वाचनातूनच जोडला गेलेला मित्र श्रीजीवन तोंदले याने तेव्हाच सुचवले होते या पुस्तकाबद्दल blog लिहिण्यासाठी,पण लिहिण्यासाठी नसलेले धाडस म्हणा किंवा ती आली नसलेली वेळ यामुळे ते राहूनच गेले.तर असो, आता थोडंसं या पुस्तकाविषयी.....

एखादा रहस्यपट पहायला खुर्चीमध्ये बसावे आणि तो संपेपर्यंत जागेवरून उठूच नये असंच काहीसं होतं "शोध" ही कादंबरी वाचायला हाती घेतल्यानंतर. श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य,अत्यंत वेगवान - उत्कंठावर्धक असा घटनाक्रम,धाडस,रोमांचक अद्भुत थरार,कुटनीती या सर्वांतून साकारलेली उत्कृष्ट अशी कादंबरी म्हणजे "शोध". 

शोध या कादंबरी चा विषयच मुळी जोडला गेलेला आहे तो म्हणजे आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या एका अतुलनीय पराक्रमा सोबत. ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हापासून. साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरतेहून स्वराज्यात परत येताना,जवळपास ७ हजार जनावरांवर लादलेला लुटीतला २५ लाख कोटी रुपये किंमतीचा प्रचंड ऐवज हरवला! हो हो हरवला.....कुठे गडप झाला तो खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि तो हरवलेला खजिना शोधण्यासाठी आज वर्तमानात केलेली धडपड म्हणजेच "शोध".

वाचत असताना अगदी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत मनात येत राहतो एकच प्रश्न तो म्हणजे "आता पुढे काय होणार?" आणि याच एका प्रश्नामुळे वाचक शेवटपर्यंत कथेसोबत जोडलेला राहतो.प्रत्येक २०-२५ पानां नंतर इतिहास आणि वर्तमानामध्ये होणाऱ्या थरारक घटनांची सांगड वाचकांचा कुठेही गोंधळ उडू न देता ज्या पद्धतीने केली आहे याचे सगळे श्रेय लेखकाला.वाचताना वर्तमानासोबतच इतिहास सुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभा राहील अशी मांडणी.

शिवकाळातील अस्सल संदर्भ आणि  वर्तमान काळातील वास्तव घटना यांची सांगड घालून अतिशय उत्कृष्टपणे लिहिली गेलेली ही मुरलीधर खैरनार यांची आवर्जून वाचावी अशी अस्सल मराठी थ्रिलर कादंबरी  "शोध". 





संदीप प्रकाश जाधव





"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये