लेखक : रणजित देसाई
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
शिवचरित्राला बऱ्याच लेखकांनी हात घातला पण त्यांपैकी काही मोजक्याच लेखकांना ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचवता आलं आणि त्यांपैकीच एक म्हणजे कादंबरीकार रणजित देसाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र श्रीमानयोगी सारख्या अजरामर कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले. त्यांनीच लिहिलेल्या आणखीन ही काही कादंबऱ्या स्वामी,राधेय,पावनखिंड,मेख मोगरी,लक्ष्यवेध. एखाद्या लेखकासाठी कादंबरी ही एक अशी गोष्ट आहे जिथे लिहिताना त्याला आपल्या काल्पनिक विचारांना हवी तेवढी मुभा देता येते पण रणजित देसाईंनी ती मुभा देताना त्यांच्या सर्व कादंबऱ्या मूळ विषयाला जराही धक्का न लावता ज्याप्रमाणे वाचकांसमोर आणल्या आहेत त्यातच त्यांच्यासारख्या लेखकाचं मोठेपण. त्यांची कोणतीही कादंबरी वाचताना त्यातील पात्रे,ठिकाणे,घटना आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतातच.
रणजित देसाईंसारख्या लेखकाच्या एखाद्या पुस्तकाचे विश्लेषण करण्याइतका मोठा मी नक्कीच नाही पण तरीही त्यांनी लिहिलेल्या "लक्ष्यवेध" या ऐतिहासिक कादंबरीचा माझ्या शब्दांत परिचय करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.
शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोठं असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यावर चालून आलेल्या शत्रूंचं असणारं अफाट कर्तृत्व,अफाट पराक्रम आणि या अशाच मोठ मोठ्या शत्रूंवर आपल्या बुद्धीचातुर्याने, युद्धकौशल्याने, पराक्रमाने शिवाजी महाराजांनी केलेली मातच त्यांचं मोठेपण सिद्ध करते. शिवचरित्र सुद्धा सजलेय ते अशा बऱ्याच अचाट, अतुलनीय, अलौकिक, अविश्वनिय ऐतिहासिक घटनांनी. तसं पहायला गेलं तर शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आणि त्याच घटनांमधील एक ऐतिहासिक घटना म्हणजे शिवाजी महाराज - अफजलखान भेट. याच शिवाजी महाराज - अफजलखान ऐतिहासिक भेटीवर लिहिली गेलेली रणजित देसाई यांची ही थरारक कादंबरी "लक्ष्यवेध".
अफजलखानाचं स्वराज्यावर चालून येणं हे त्यावेळच्या एका मोठ्या संकटांपैकी एक होतं आणि त्या संकटाचा झालेला शेवट हा स्वराज्य उभारणीस मिळालेली सर्वांत मोठी चालना होती.त्याचं कारणही तसंच होतं, अफजलखान हा एक अचाट शक्तीचा माणूस ज्याने औरंगजेबासारख्या पराक्रमी माणसाला सुद्धा नमवलं होतं.अत्यंत हुशार, कुशल सेनापती, राजकारणात पटाईत, कपटी अशी ओळख असलेला असा हा अदिलशाही सरदार जेव्हा अफाट सैन्यानिशी स्वराज्यावर चालून येण्यास विजापुरहून निघाला तिथूनच सुरु होतो या कादंबरीचा प्रवास. "लक्ष्यवेध" मधे रणजित देसाईंनी ज्या बारकाईने या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी लिहिलेय तेसुध्दा घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लागू न देता ते खरंच अप्रतिम. अफझलखानासारखे संकट शिवाजी महाराजांनी अत्यंत संयमाने हाताळले आणि परतवून लावले.पण या संकटासोबतच शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेलं वादळ म्हणजे त्यांची पहिली पत्नी सईबाईंचा झालेला मृत्यू.या वाईट घटनेची पार्श्वभूमी सुद्धा रणजित देसाईंनी ज्याप्रमाणे या कादंबरीच्या सुरुवातीलाच मांडलेय ती वाचताना डोळ्यांत पाणी येणारच. या वादळाला मागे सारून स्वराज्यावर घोंगावत येणाऱ्या अफजलखान नामक वादळाला सामोरे जायला त्वरित तयार होणारे महाराज देसाईंनी या कादंबरीमधे रंगवताना कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी घेतलेय.
वाईपासून प्रतापगडापर्यंत हिरव्यागार रानावर राजकारणाचा पट मांडला जात होता.चढे घोड्यानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्जना होती आणि खानाला मारल्याशिवाय स्वराज्य साधणार नाही हे राजे पुरते जाणून होते. तर या दोन राजकारण - धुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजे "लक्ष्यवेध". या सर्व घटनाक्रमात शिवाजी महाराज आणि अफझलखान या दोन्हीही बाजूंकडून ज्या इतर धुरंधरांनी मेहनत घेतली मग ते वाटाघाटी करणारे दोन्ही बाजूंचे वकील असोत वा प्रत्यक्ष भेटीच्या वेळी महाराज-अफझलखानासोबत असणारे त्यांचे निवडक सैनिक, यासर्वांचंही खूपच बारकाईने वर्णन देसाईंनी केलेलं आहे.
एवढ्या प्रचंड फौजेनिशी आलेला अफझलखान वाई सोडून कोयना खोऱ्यात का उतरला? आणि निःशस्त्रपणे गडावर का गेला? याला ठोस असं उत्तर आजघडीला तरी कोणाकडेच नाही.पण तरीही ही कादंबरी वाचल्यानंतर अशा प्रश्नांचे उत्तर काही प्रमाणात तर नक्कीच मिळू शकेल.
जरी अफझलखान वध ही सर्वांना अगदी लहानपणापासून माहीत असलेली ऐतिहासिक घटना असली तरीही रणजित देसाईंनी लिहिलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी आवर्जून वाचण्यासारखी ही कादंबरी "लक्ष्यवेध".
संदीप प्रकाश जाधव