Sunday, October 18, 2020

"राधेय"


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


शिवाजी सावंत यांच्या "मृत्युंजय" या कादंबरीत मी कर्ण वाचला होता पण तरीही खूप लोकांकडून रणजित देसाईंच्या "राधेय" या कादंबरीबद्दल ऐकत-वाचत आल्याने आणि खासकरून pustakexpress.com मधे कादंबरीबद्दल वाचल्यानंतर "राधेय" वाचण्याचा मोह टाळता नाही आला आणि त्यामुळेच एक अतिशय दर्जेदार पुस्तक संग्रही आले.

मराठी साहित्यातील सर्वांना परिचित नाव रणजित देसाई. श्रीमानयोगी, लक्ष्यवेध, मेखमोगरी या पुस्तकांनंतर रणजित देसाईंच्या राधेय या कादंबरी वाचनाचा अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा. त्यांचं कोणतंही पुस्तक वाचताना नकळतपणे वाचकाचे त्या काळात जाणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. कादंबरीकार रणजित देसाईंची अशीच एक सुंदर कादंबरी "राधेय". दानशूर, शूरवीर अशी ख्याती असणाऱ्या कर्णाच्या आयुष्याचे अतिशय उत्कृष्ट वर्णन म्हणजे ही कादंबरी. कर्णाचे आचरण करायचं असेल तर कर्ण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कर्णाला समजून घेणं जितकं कठीण आहे तितकंच ते सोपंसुद्धा आहे. त्याचं कारण म्हणजे कर्णाची कथा जितकी ती कर्णाची तितकीच ती आपलीही, प्रत्येकाच्या मनात एक कर्ण दडलेला असतो. आणि तो समजून घेण्यासाठी महाभारताची पाने वाचण्याची गरज नाही. आपल्या मनाचीच चार पाने पालटली तर प्रत्येकाला स्वतःमध्ये एक कर्ण दिसेल. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन रणजित देसाईंनी लिहिलेली ही एक अजरामर कादंबरी "राधेय". महाभारतातील उपेक्षित पात्रांपैकी एक पात्र म्हणजे कर्ण. ज्येष्ठ कौंतेय असूनही ज्याला आपले आयुष्य राधेय म्हणून जगावे लागले असा महारथी कर्ण. क्षत्रिय कुळातील असूनसुद्धा नियतीमुळे ज्याला नीच कुळातील वागणूक सहन करावी लागली असा हा कर्ण. साक्षात सुर्यपुत्र असूनही जो सूतपुत्र म्हणून लहानाचा मोठा झाला असा कर्ण . ज्याच्या कर्तुत्वापुढे साक्षात इंद्रालासुद्धा याचकांच्या रांगेत उभं राहावं लागलं असा श्रेष्ठ दानवीर. पांडवांसोबतच्या युद्धात मृत्यू डोळ्यासमोर असूनही ज्याने मैत्रीसाठी, निष्ठेसाठी मृत्यूला कवटाळले असा मित्र . कर्तृत्व आणि दातृत्व ज्याच्या ठायी ठायी वसलं आहे असा महापराक्रमी, दिग्विजयी राजा. अशा कर्णाची कथा म्हणा अथवा व्यथा म्हणजेच रणजित देसाईंची ही कादंबरी "राधेय".

कादंबरीची सुरुवात चंपानगरीत झालेल्या कृष्ण आणि कर्ण यांच्या भेटीपासून होते. नंतर पुढे महाभारतातील एक एक घटनांमधून उलगडत जाणारे कर्णाचे आयुष्य. द्रौपदी स्वयंवर , इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना, राजसूय यज्ञ, कौरव-पांडवांचा द्यूत, द्रौपदी वस्त्रहरण, पांडवांचा वनवास अशा घटनांचा उल्लेख करत पुढे सरकणारे कथानक. कादंबरी कर्णाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली असल्याने या सर्व घटनांचा कर्णाच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे आपल्याला समजण्यापुरताच त्यांचा पसारा रणजित देसाईंनी मर्यादित ठेवला आहे. पण तरीही लेखक वाचकाला त्या काळात घेऊन जाण्यात कमालीचे यशस्वी झालेत. आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या कर्णाचा दातृत्व गुण जरी सर्वांना माहित असला तरी एक सुतपुत्र म्हणून जगताना त्याचा जीवन प्रवास किती खडतर, वेदनामय होता हे या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. सर्वश्रेष्ठ योद्धा असूनसुध्दा सुतपुत्र म्हणून पावला पावलावर सहन करावा लागणारा अपमान, जन्मतःच मातृप्रेमाला पारखा झाल्यामुळे आपल्या जन्माचे रहस्य माहीत नसल्याने त्याच्या मनाची होणारी अवस्था अशा अनेक गोष्टी वाचताना नकळतपणे आपणसुध्दा कर्णाच्या भूमिकेत जातो. आपण ज्येष्ठ कौंतेय आहोत हे कळल्यानंतर फक्त दुर्योधनासोबतच्या मैत्रिखातर, त्याच्याशी असलेल्या निष्ठेसाठी राधेय राहण्यात समाधान मानणाऱ्या, आपल्या दातृत्वाला धर्म मानून आपली कवच कुंडले देखील इंद्राला बहाल करणाऱ्या, कौरवांचा पराजय निश्चित आहे आणि होणाऱ्या युद्धात आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असुनसुद्धा खऱ्या अर्थाने वीर योध्यासारखा लढणारा कर्ण आपल्याला महाभारतातील सर्व पात्रांहून खूप मोठा, महान वाटायला लागतो. धर्म आणि अधर्मातील फरक बऱ्याच घटनांमधून उदाहरणासहित आपल्याला कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. कादंबरीचा शेवट जसा जवळ येतो तसं नकळतपणे आपलं मन कर्णासाठी हळवे होते, काही काही घटना कादंबरीमध्ये वाचताना नकळतपणे डोळे भरून येतात.

कादंबरी वाचून झाल्यानंतर कितीतरी वेळ आपल्या डोक्यातून न जाणारी एक गोष्ट, कौरव-पांडवांचे युद्ध टाळण्यासाठी नात्यांची जी आठवण कृष्णाने, कुंतीने, भीष्माने कर्णाला करून दिली तीच आठवण तितक्याच सहजपणे पांडवांना का नाही करून दिली आणि जर ती करून दिली असती तर हे विनाशकारी युद्ध झाले असते का? कादंबरी वाचल्यानंतर आपले मन कर्णासाठी हळवे झाले नाही तर नवल. जन्मजात कुळाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणारा कर्ण शेवटी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो.

कादंबरीतील काही आवडलेली वाक्ये :

  • '‌या जगात अचानक असं काही घडत नाही. आपल्याला मागचा पुढचा संदर्भ माहीत नसतो, म्हणून ते अचानक भासतं'.
  • 'जिंकण्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो'.
  • 'ढळलेली मनःशांती, हरवलेलं स्वप्न आणि गेलेला जीव प्रयत्नसाध्य नसतो'.
  • 'बसल्या जागी न्यायनीतीच्या वल्गना करून न्यायनीतीचा विस्तार होत नसतो. कैकवेळा त्याच बुरख्याखाली अनीती नांदत असते'.
  • 'जुगार आणि चारित्र्य या दोन अशा गोष्टी आहेत की यांत पाय टाकण्याआधी विचार करावा. नंतर पाय माघारी घेता येत नाही'.
  • 'कीर्तीचा अहंकार जिवंत असेपर्यंतच भोगता येतो'.
  • 'माणसं जातात, माघारी राहतं ते त्यांचं आसन. माणसानं एवढं कीर्तिवंत व्हावं की त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं'.
  • 'मर्यादेनं ज्ञात असलेलं ज्ञान माणसाला वरदायी ठरतं, पण अमर्यादेतून अवतरलेलं ज्ञान माणसाला विनाशाकडेच नेतं'.
  • 'मरणापेक्षा वृद्ध होत जाणं कठीण. मृत्यूबरोबर सारं संपून जातं. पण वृद्ध होत जाणं म्हणजे रोज काही ना काही त्याग करणं'.
  • 'धर्म, पांडित्य हे दुसऱ्यांना सांगायला सोपं, पण ते स्वतः आचरणात आणणं भारी क्लेशकारक'.
  • 'सारेच घाव लेपणानं बरे होत नसतात, काही घाव आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहतात'.
  • 'जीवनाचे बंध तोडता येतात तसे नियतीचे बंध तोडता येत नाहीत'.

कर्ण जाणून घेण्यासाठी, स्वतःतील कर्णाचा शोध घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी रणजित देसाईंची कादंबरी "राधेय".





संदीप प्रकाश जाधव


1 comment:

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये