Sunday, June 14, 2020

"दंशकाल"


लेखक : हृषीकेश गुप्ते

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


हृषीकेश गुप्ते....माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक...जे मला आवडतात त्यांच्या गूढकथा आणि रहस्य कथांसाठी....हा परिचय त्यांच्याच एका कादंबरी विषयी "दंशकाल"....

तसे कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ पाहून अंदाज आलाच असेल की ही एक रहस्यकथा आहे.कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने अशा विषयाला हात घातला आहे जो आजही इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्या समाजमनाने घट्ट पकडून ठेवला आहे आणि त्याची जाणीव वाचताना प्रत्येकवेळी होत राहते, तो म्हणजे 'अंधश्रद्धा'. त्याचबरोबर ज्या कुटुंबासोबत हे कथानक जोडलं गेलंय त्या कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत ज्या पद्धतीने मांडली आहे ते अगदिच अप्रतिम.रहस्यमय पद्धतीने पुढे सरकणाऱ्या कथानकाचा आश्चर्याच्या धक्क्याने केलेला शेवट हा सर्वांवर कळस.

कथानकाची सुरुवात होते आजसुद्धा रहस्य आणि गुढकथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून.कोकणातील भूगाव मध्ये देशमुखांच्या वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरणारी ही रहस्यमय कादंबरी - कथा. कथेच्या मध्यभागी आहे कथेचा नायक अनिरुद्ध. नायकाच्या लहान काकाला, भानूकाकाला अचानक लागलेले वेड ही या रहस्यमय कथेची पहिली पायरी. भानूकाकाला लागलेल्या वेडानंतर वाड्यामध्ये  ज्या एका अनामिक शक्तीची चाहूल नायकाला सतत लागत राहते तिचे अगदि अफलातून वर्णन हृषीकेश गुप्ते यांनी केलंय जे वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहिल्याशिवाय राहत नाही.जसे की मध्यरात्री अंधारात बाईच्या वेषात प्राण्यासारखे चार पायांवर चालत वाड्यात फिरणारी एखादी आकृती असो किंवा विहिरीमध्ये पडलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी नायकाने केलेले प्रयत्न असोत किंवा भानू काकाला वेडाचा झटका आल्यानंतर त्याचं केलेलं वर्णन सगळेच अगदि थरारक. हे वर्णन करताना त्याला आवश्यक अशी जी वातावरण निर्मिती लेखकाने आपल्या शब्दांमध्ये केलेय त्याला तोड नाही.

देशमुख कुटुंबातील इतर सदस्य आण्णा,आई,नंदाकाका,रेवती काकू, गारगी,आत्या, आत्यांचे यजमान,नायकाची पत्नी अनु या प्रत्येकाचं भानूकाका आणि नायकाभोवतीचं आयुष्य गुप्तेनीं अगदी अशा पध्दतीने मांडलंय की ते वाचताना वाटावे आपल्याच आजूबाजूला हे सर्व कुठे तरी घडत असावे.अण्णांचा नायकाबरोबरच संपूर्ण गावाला असणारा धाक,आईची भानुकाकासाठी असणारी काळजी, पैलवानी ताकद असलेल्या नंदाकाकाची समलैंगिकता तसेच नायकाचे रेवा काकू आणि अनु सोबतचे नाजूक नाते कादंबरीच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता अगदि सहजपणे मांडलंय लेखकाने.

नंतर नायकाला येणाऱ्या गूढ अनुभवांसोबतच देशमुख कुटुंबाने भानूकाकाला दिलेला दत्ताचा अवतार आणि त्याच्या नावाने बांधलेल्या मठातून वाढीस लागणारी अंधश्रद्धा, आजही समाजात वावरताना आपल्याला जी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रुपात दिसते.याचबरोबरच ज्या विहिरीमध्ये पडून नायकाच्या आईचा मृत्यू होतो त्या विहिरीला देवपण देऊन तिथे चालू केलेली लोकांना कौल देण्याची पद्धत यांचे अगदि बारकाईने वर्णन लेखकानेे केले आहे. पुढे हीच लोकांच्या भावनांशी केलेली खेळी देशमुख कुटुंबाला कशी देशोधडीला लावते हे कादंबरीमधे ज्या रितीने लेखकाने मांडलंय ते खरंच विचार करण्यासारखं आहे.मठामध्ये चालणारा गैरप्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांकडून देशमुख वाड्याची होणारी जाळपोळ आणि सोबतच देशमुख कुटुंबाची होणारी फरफट हे वाचून मनाला कुठेतरी सतत वाटत राहतं, नक्की चूक कोणाची होती?वेड लागलेल्या भानूची? की त्याच्या वेडाचा बाजार मांडून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या आईची? की मठामध्ये येणाऱ्या लोकांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन वेगळेच धंदे चालवणाऱ्या यजमानांची?

शेवटी देशोधडीला लागलेले देशमुख कुटुंब जेव्हा नायकाच्या घरी मुंबईला राहायला येते तेव्हा तिथे अनुला, नायक व रेवती काकूच्या नाजूक नात्याबद्दल समजणे आणि नायकाला भूगावच्या वाड्यामध्ये मध्ये जाणवलेल्या गूढ-अनामिक शक्ती नेमक्या काय होत्या हे लक्ष्यात येणे म्हणजे या रहस्यमय कथेची शेवटची पायरी.

रहस्य व गूढकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ही एक थरारक आणि वाचताना नक्कीच अंगावर काटा आणणारी हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेली कादंबरी  "दंशकाल'.




संदीप प्रकाश जाधव




1 comment:

  1. मस्त पुस्तकाची कथा तुम्हा पुर्ण समजली आहे हे या परिचयातून दिसून येते

    ReplyDelete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये सह्याद्रीचा श्वास आणि पेशवाईचा रक्तरंजित इतिहास: ना...