लेखक : पु. ल. देशपांडे
प्रकाशक : मौज प्रकाशन
पु. ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाई. मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक असं रत्न ज्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. वाचनाची आवड असो वा नसो पु.लंच्या एखाद्या तरी पुस्तकाचे नाव प्रत्येक मराठी माणूस नक्कीच सांगू शकेल इतके ते आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहचले. पु.लंच्या लेखणीची ताकद न अनुभवणारे लोक अगदी अपवादानेच सापडतील. अगदी सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लेखनाची जादूच अशी आहे की आपण मनाच्या आनंदी अवस्थेत पु.लंचे एखादे पुस्तक जर वाचले तर आपला आनंद द्विगुणित होईल तसेच जर दु:खी अवस्थेत वाचले तर त्या दु:खाची तीव्रता खूप कमी होईल आणि या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वाचकांनी घेतलाही असेल. पु.लंनी त्यांच्या आयुष्यात अनेक लेख, कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या त्यांपैकीच एक अतिशय सुंदर आणि अजरामर पुस्तक म्हणजे "व्यक्ती आणि वल्ली". हे पुस्तक म्हणजे पु.लंनी लिहिलेल्या १८ काल्पनिक व्यक्तिरेखांचा एक संग्रहच आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक बहुरंगी, बहुढंगी माणसं भेटत असतात. अगदी सामान्य आयुष्य जगत असणाऱ्या अशा बऱ्याच व्यक्ती आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगून - शिकवून जातात पण सामान्यांच्या आयुष्यातील या असामान्य वल्लींना अजरामर केलं ते पु. ल देशपांडेंच्या "व्यक्ती आणि वल्ली" या पुस्तकाने. या पुस्तकातील व्यक्तीरेखा जरी पु.लंच्या कल्पनेतून अवतरल्या असल्या तरी हे पुस्तक आपल्याला अंतू बर्वा, सखाराम गटणे, नारायण, चितळे मास्तर, नंदा प्रधान अशा अनेक पात्रांशी साधर्म्य असणाऱ्या आपल्या आयुष्यातील अनेक लोकांना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते तसेच नकळतपणे आपण आपल्या आसपास वावरणाऱ्या अशा अवली पात्रांचा शोध घ्यायलासुद्धा नक्कीच सुरूवात करतो.
"व्यक्ती आणि वल्ली" या १८ विविध व्यक्तिचित्रांच्या संग्रहातून पु.लंनी सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या विसंगत आणि विचित्र अनुभवांना अतिशय विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून दिला आहे. पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. अतिशय मिश्किल अशी शैली आणि तितक्याच निर्मळ विनोदाच्या मांडणीमुळे वाचकाच्या मनाची मरगळ दूर होते. काही संवाद वाचत असताना नकळत चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित येते तर काही संवाद खदखदून हसवून जातात. प्रत्येक पात्राचे वर्णन इतकं जबरदस्त की त्यातून ते पात्रच वाचकाच्या समोर येऊन उभे रहावे. मन प्रसन्न करणारे हलकेफुलके संवाद वाचकाला त्या पात्राच्या आणखीनच जवळ घेऊन जातात. पुलंच्या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार या "व्यक्ती आणि वल्ली" पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. तसे पु.लंनी पुस्तकातील सर्वच्या सर्व १८ पात्रे अतिशय अफलातून रंगवली आहेत पण मला अंतूबर्वा ही वल्ली थोडी जास्तच आवडली. "वल्ली" म्हणजे "नमुना" असा पु.लंना अभिप्रेत असणारा अर्थ, पु.लंनी आपल्यासमोर आणलेला या पुस्तकातील प्रत्येक "नमुना" इतका प्रभावी आहे की १९६५ मधे संग्रहित झालेली ही व्यक्तिचित्रे आजही तितकीच ताजी - टवटवीत वाटतात.
प्रत्येकाने वाचावे आणि आवर्जून संग्रही ठेवावे असे हे पु. ल. देशपांडे यांचं पुस्तक "व्यक्ती आणि वल्ली".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment