Monday, December 7, 2020

"नदीष्ट"

 


लेखक : मनोज बोरगावकर

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मनोज बोरगावकरांच्या "नदीष्ट" या कादंबरीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि आज ती वाचायचा योग आला. कादंबरीचे नाव वाचून आणि मुखपृष्ठ पाहूनच आपण एक अंदाज बांधू शकतो की कादंबरीचा विषय हा नदीशी निगडीत असणार. नदीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली, अतिशय वेगळा आणि चाकोरीबाहेरचा विषय अगदी सहज, सुंदर भाषेत आपल्यासमोर घेऊन येणारी ही मनोज बोरगावकरांची कादंबरी. पूर्णपणे नदीच्या काठावर घडलेली, वेगवेगळ्या घटनांमधून, लोकांमधून उलगडत जाणारी "नदीष्ट" ही कादंबरी नदीची  विविध रूपे आणि नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदी यांचं आदिम नातं लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केलं आहे. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजेच "नदीष्ट".

सतत १० वर्षे, दररोज न चुकता नदीला पोहायला जाणारा या कादंबरीचा नायक. आणि नायकाच्या याच दैनंदिन आयुष्यात त्याला नदीवर आणि नदीच्या आसपासच्या परिसरात भेटणारे लोक, त्यामधून त्याला येणारे नवनवीन अनुभव शिवाय नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेण्याचा नायकाचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे नायकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पात्राला नाव आहे पण नायकाला नाव नाही. आज आपण बर्‍याचदा आत्मकेंद्री आयुष्य जगत असतो आणि आपल्या आजुबाजुला काय घडतंय याचंही आपल्याला कधी-कधी भान नसते. आसपासच्या लोकांशी आपल्याला काहीच देणे घेणे नसते. बऱ्याचदा हेच आत्मकेंद्री वागणं आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचा स्वभावच नाही तर जीवनशैलीच होऊन जाते. मात्र या कादंबरीचा नायक, आयुष्य जगत असताना नेहमीच एक माणूसपण सोबतीला ठेऊन राहतो त्यामुळे तो त्याला नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेतो. समाजाने ज्यांचे माणूसपण नाकारले अशा लोकांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची ही गोष्ट आहे. या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभैय्या, नदीवरील मंदिराचा पुजारी, बामनवाड, सगुणा, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रसाद, भिकाजी ही पात्रे भेटतात.  या सगळ्यांची प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे.  या सगळ्यांचं जगणं - त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा नायकाने प्रयत्न केला आहे. कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना ह्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात.  ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टीकोन आणि जगण्याचं भान देऊन, संवेदनशील बनवते. नायकाला नदी किनाऱ्यावर भेटलेले सगुणा हे तृतीयपंथी पात्र आणि भिकाजी हा भिकारी या दोघांचा संवेदनशील भूतकाळ नायकापुढे उलगडत जाताना मधेमधे मिळालेल्या इतर पात्रांच्या कथा आपल्याला बऱ्याच वेळा सुन्न करून जातात. सगुणाची कहाणी तर आपल्याला खूपच संवेदनशील बनवते. सगुणा ही  प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली एक तृतीयपंथी व्यक्ती. सुरुवातीला जेव्हा ट्रेनमध्ये सगुणा भेटते तेव्हा तिच्याकडे तुच्छ नजरेने बघणाऱ्या, सगुणापासून दूर पळणाऱ्या नायकाला जेव्हा सगुणाचा भूतकाळ समजतो तेव्हा नकळत त्याला ती आणि तिच्या समाजाबद्दल आदर वाटायला लागतो. सगुणा आपली भळभळणारी जखम नायकापुढे धरत आपला भूतकाळ त्याच्या पुढ्यात ठेवते. जो वाचत असताना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओलावतील. तृतीय पंथातील अनेक बारकावे लेखकाने अचूक टिपले आहेत. त्यांची जीवनशैली- भाषाशैली याचं अगदी यथार्थ दर्शन कादंबरीत होते. तृतीयपंथीयांचे  दैनंदिन शब्द लेखकाने कादंबरीत वापरले आहेत त्यामुळे लेखकाची संशोधन वृत्तीसुद्धा आपल्याला दिसून येते. या तृतीयपंथी लोकांविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याची उत्तरे आपल्याला या कादंबरीत नक्कीच मिळतात. तृतीयपंथीयामधील दीक्षा देण्याची प्रथा वाचताना तर अंगावर काटा येतो. तृतीयपंथीयांच्या व्यथा - वेदना यांचं दाहक आणि वास्तव चित्रण या कादंबरीत आहे.

सगुणाप्रमाणेच आणखीन एक संवेदनशील पात्र म्हणजे नायकाला रोज भेटणारा भिकारी "भिकाजी". भिकाजीच्या वागण्याबोलण्यातून तो जन्मजात भिकारी नाही हे लक्ष्यात आल्यानंतर नायकसोबतच वाचकालाही त्याच्या भूतकाळाबादद्दल कुतूहल निर्माण होते. कादंबरीतील भिकारी असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारून टाकतो, त्यामुळे कादंबरी वाचताना सुरुवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटत राहतो. त्याच्या हातून अनवधानाने झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला पंधरा वर्षाचा तुरुंगवास देखील होतो.  मात्र तो कायम स्वतःला अपराधी समजत राहतो. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याचं भिकारी बनून गावोगावी फिरणं मनाला चटका लावून जाते. बाळाच्या मृत्युनंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं दुःख, अबोलवृत्ती, त्याला झालेला मांजराचा फोबिया या गोष्टी त्याच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतात. नायकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव जेव्हा त्यांच्या आईच्या मरणाचा प्रसंग नायकाला सांगतात तेव्हा त्याच्यासोबतच आपणही भावूक होऊन जातो. तान्ह्या दादारावांनी मेलेल्या आईचे दूध पिण्याचा हा प्रसंग आपण वाचतो तेव्हा सुन्न व्हायला होतं. कादंबरीतील इतर पात्रे जसे नदीवर मासे पकडायला येणारा बामनवाड, त्याची नदीच्या व्हर्जिन जागेतील वाळूची कहाणी, मंदिराचा पुजारी, दररोज आपल्या म्हैशीना नदीवर घेऊन येणारे कालूभैय्या आणि त्याची प्रेयसी, पहाटे-पहाटे नदीवर अंघोळीसाठी येणारी भिकारीण सकिनाबी, नदीवर नायकाला अचानकच भेटलेला अगदी तरुण वयातला सर्पमित्र प्रसाद आणि त्याने तो लहान असताना पहिल्यांदाच नाग कसा पकडला याची सांगितलेली कहाणी  या सर्व गोष्टी आपल्यालाही नदी किनाऱ्यावर घेऊन जातात. कादंबरीत निसर्गातील अनेक सूक्ष्म बारकावे आले आहेत. माकडांच्या टोळी पासून ते मोरांच्या थव्यापर्यंत आणि आकाशाकडे एक डोळा करून नदीत पोहणाऱ्या माशांपासून ते खेकड्यापर्यंत सर्वच गोष्टींतील बारकावे लेखकाने अगदी अचूक टिपले आहेत. रोजच्या नदीवर येण्याने निसर्ग आणि निसर्गातील अनेक गोष्टी नायकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केलं. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असं कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येतं. शिवाय परिसरातील अनेक गोष्टींचे प्रचंड ताकतीने वर्णन केलं आहे, त्यामुळे ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब चित्र येतं, जणूकाही आपणच प्रत्यक्षच त्या घटनांचे साक्षीदार आहोत. 

वेगवेगळे लोक नदीकिनारी नायकाच्या आयुष्यात येत राहतात आणि ठराविक अंतराने आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण या छोट्याशा भेटीमध्ये स्वतःच्या भूतकाळातून नायकाला खूप काही शिकवून जातात, साध्या साध्या घटनांमधून जगण्याचं मोठं तत्वज्ञान शिकवून जातात. नायकाला भेटलेली सर्व पात्रे, नायकाने अनुभवलेले सर्व प्रसंग त्याच्याप्रमाणेच वाचकाच्या मनावरसुद्धा कोरली जातात.  कादंबरी वाचताना संपुच नये, असं वाटत राहतं. एक एक करून सर्व पात्रे निघून गेल्यानंतर शेवटी सगुणा जेव्हा निघून जाते तेव्हा कादंबरी संपली असं वाटतं पण नायक घाटाच्या पायऱ्या चढून वर येत असताना त्याला पायऱ्या उतरून नदीवर येणारा फकीर भेटतो आणि कादंबरीचा ओपन एंडेड शेवट होतो जो वाचकाला पुन्हा नव्याने जन्माला येणाऱ्या कथेचा विचार करायला भाग पाडतो.

चाकोरीबाहेरचा आणि वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा विषय अनुभवण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "नदीष्ट".





संदीप प्रकाश जाधव




No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये