लेखक : वि. स. खांडेकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स.खांडेकर यांची "ययाती" ही अजरामर कादंबरी खूप आधी वाचली होती, त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग आला तो त्यांनी लिहिलेल्या "अमृतवेल" या कादंबरीमुळे. १९६७ साली प्रकाशीत झालेली १५० पानांची ही छोटेखानी कादंबरी आजही वाचायला घेेतली तरी वाचताना त्यामध्ये आपण हरवून जावे असे कथानक. मानवी मन किती विचित्र आहे आणि त्याच्या विविध छटा ही कादंबरी वाचत असताना आपल्याला जाणवत राहतात. मानवी मन हे एकाचवेळी वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ असे फिरत असते, पण त्याला कधीच भूतकाळाच्या आठवणींनी जखडून ठेवता येत नाही. ते नेहमीच झेपावत असते भविष्यातील स्वप्नांकडे आणि हे करत असताना ते वर्तमानकाळात समोर आलेल्या परिस्थितीचा, प्रसंगांचा आपल्या सोयीने चांगले-वाईट अर्थ लावत असते. माणसाच्या आयुष्यात काही प्रसंग अगदी विचित्र असतात, अशा वेळी आपले मन अगदी जवळच्या माणसाशीसुद्धा बोलायला धजावत नाही आणि काहीवेळा हेच मन अनोळखी व्यक्तींकडेसुद्धा ओढले जाते. मानवी मनाचा अचूक वेध घेणारी वि. स.खांडेकरांनी लिहिलेली ही कादंबरी "अमृतवेल".
कादंबरीची कथा फिरते नंदाभोवती. कादंबरीच्या कथेचे मुख्य पात्र जरी नंदा ही एक उच्चशिक्षित तरुणी असली तरी इतर पात्रे जसे दादा, माई, मिलिंद, दासबाबू, वसुंधरा, देवदत्त, मधुरा, बापू, मोहन, पार्वती आणि गंगाराम यांच्याशिवाय कथा अपूर्णच ठरेल. सोबतच चंचल हे हरणाचे पाडससुद्धा तितकेच महत्वाचे आहे या कथेमध्ये. दुःख हा मानवजातीला लागलेला शापच आहे असे म्हटले तरी चालेल पण कधी कधी हेच दुःख माणसाला अंतर्मुख करते, दुसऱ्यांशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ आणि स्पष्ट करते. कथेची सुरुवात दादा, माई आणि नंदाच्या आयुष्यात आलेल्या अशाच दुःखाने होते. आपला वैमानिक प्रियकर शेखरसोबत सुखी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकच विमान अपघातात झालेला शेखरचा मृत्यू नंदाला दुःखाच्या खाईत घेऊन जातो. याच दुःखातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या करायला गेलेली नंदा तिला आलेल्या दादा, माई आणि छोट्या मिलिंदच्या आठवणीने परत फिरते. त्यानंतर दादांसोबतच्या पत्रातून झालेल्या संवादामध्ये तिला तिच्यापेक्षाही जास्त दुःख सहन करून खंबीरपणे आयुष्याला सामोरे जाणारे दादा समजतात. या पत्राच्या माध्यमातून दोघांमध्ये झालेला संवाद आणि त्यांद्वारे दोघांचे एकमेकांजवळ व्यक्त होण्यातून प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, दुःख कितीही मोठे असले तरी जवळच्या माणसाशी बोलल्याने त्यातून बाहेर पडण्याचे बळ नक्कीच मिळते. याच पत्रात दादांनी नंदाला दिलेला सल्ला म्हणजे स्वप्नभंग हा माणसाचा कायमच सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख सहन करून नवीन स्वप्नं पाहण्यात आहे. दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. नंदासोबतच आपण सर्वांनीसुद्धा अनुसरण करावे असे हे विचार. दादांच्या बोलांनी मनोबल उंचावलेल्या नंदाने स्वत:ला सावरत, प्रीतीचा, आयुष्याचा खरा अर्थ नेमका काय असतो याचा घेतलेला शोध म्हणजेच ही कादंबरी "अमृतवेल".
दादांच्या सल्ल्यानुसार आपली पी. एच. डी. पूर्ण करण्यासाठी दासबाबूंकडे गेलेल्या नंदाला अगदी अनपेक्षितपणे तिची जुनी मैत्रीण वसुंधरा हिची कंपॅनिअन बनून फिट्स येणारी तिची मुलगी मधुरा हिला सांभाळण्याचा प्रस्ताव येतो. वसुंधरा एक अनाथ मुलगी, नंदाची कॉलेजमधील मैत्रीण, जी शिक्षण अर्धवट सोडावे लागून देवदत्त सोबत झालेल्या लग्नानंतर विलासपूरची जहागिरदारीण झाली. जरी विलासपूर हे मुंबईपासून दूर असले तरी दादा आणि माई हा एकच विचार करून परवानगी देतात की यानिमित्ताने नंदा आपले शेखरचे दुःख विसरून जाईल. पुढे वसुंधरासोबत विलासपूरला आल्यानंतर तिच्या ऐश्वर्याने चकित झालेल्या नंदाचे मधुरासोबत एक भावनिक नाते तयार होते. पण इतके ऐश्वर्य असूनसुद्धा नेहमी दुःखात असणारी वसुंधरा नंदाला जाणवते. सतत देवदत्तचा तिरस्कार करणारी, मधुराला त्याच्यापासून नेहमी दूर ठेवणारी वसुंधरा नेमक्या कोणत्या दुःखात आहे याचा नंदाने घेतलेला शोध आपल्याला कादंबरीत वाचायला मिळेल. हा शोध घेत असताना नंदाला वसुच्या कुटुंबातील अनेक रहस्ये समजतात, जसे देवदत्तचा त्याच्या आई- वडिलांसोबतच्या नात्याचा इतिहास, वयाच्या १०व्याच वर्षी देवदत्तचं व्यसनी बनण्याचं नेमकं कारण, वसुच्या आत्मकेंद्री होण्यासाठी जबाबदार गोष्टी आणि मधुराला फिट्स येण्यास कारणीभूत घटना. देवदत्त-वसुच्या नात्यात निर्माण झालेल्या दरीचे नेमके कारण समजल्यानंतर नंदाला स्वतःचे दुःखसुद्धा लहान वाटू लागते. देवदत्तसोबत झालेल्या नंदाच्या ओळखीनंतर त्याच्या वाचनाच्या आवडीने प्रभावित होऊन, नकळत त्याच्यावर प्रेम करू लागणारी नंदा स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन देवदत्त आणि वसुंधरा यांच्या नात्याला पुन्हा जोडणारा पूल कसा बनते, दुःखाच्या डोहात तुटून गेलेली त्यांची नात्याची दोर कशी जोडते याचं अतिशय सुंदर आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावणारे वर्णन वि. स. खांडेकरांनी "अमृतवेल"मधे केलेलं आहे.
मानवी मनाचा वेध घेणारी आणि जीवनाचा अर्थ समजावत असताना आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी, सर्वांनी आवर्जून वाचावी अशी वि. स. खांडेकरांची अप्रतिम कादंबरी "अमृतवेल"
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment