लेखक : क्रिस्टोफर सी. डॉयल
प्रकाशक : मंजुळ पब्लिशिंग हाऊस
डॉयल यांची ही पहिलीच कादंबरी.
महर्षी व्यासांनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला एक काव्यग्रंथ, याच काव्यग्रंथावर आधारीत असलेलं कौरव-पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यांच्यामधे झालेलं महायुद्ध म्हणजे महाभारत. तर हे महाभारत घडलं असण्या-नसण्याबद्दल बऱ्याच लोकांची मते तशी वेगवेगळी आहेत.आजही जगभरात हा एक संशोधनाचा विषय आहे.अशा वेगवेगळ्या संशोधनातून पुढे आलेले प्रासंगिक पुरावे सिध्द करतात की महाभारत हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतामधे घडून गेलेली एक खरी घटना असण्याची दाट शक्यता आहे. महाभारतामधील बऱ्याच घटना आपण लहानपणापासून गोष्टींच्या रुपात ऐकत आलेलो आहोत. महाभारत म्हटले की श्रीकृष्ण, कौरव-पांडव, द्रौपदी, भीष्म, शकुनी मामा, कुंती, गांधारी, द्रोणाचार्य, अश्वत्थामा ही आणि अशा बऱ्याच पात्रांची नावे सहजपणे आपल्या बोलण्यात येतात. कुरुक्षेत्रावर १८ दिवस चाललेले कौरव-पांडवांमधील युद्ध आणि त्याच युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले, आजही लोकांना जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे गीतासार या गोष्टी माहीत नसणारा माणूस दुर्मिळच. याच महाभारतातील रहस्यावर आधारित अशी ही थरारक कादंबरी "महाभारताचे रहस्य".
ही एक रहस्यमय कादंबरी, शोधकथा आहे हे पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच लक्षात येते.कथा फिरते नायक विजय आणि त्याच्या साथीदारांभोवती. महाभारताचे युध्द संपल्यानंतर त्यातील रहस्ये २३०० वर्षांपूर्वी खोलवर गाडून टाकण्यात आली. याच प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध ख्रि.पू.२४४ मधे सम्राट अशोकाला लागला होता. त्या रहास्यमधे जगाचा विनाश करण्याची ताकद होती. ते रहस्य सम्राट अशोक आपला सेनापती सुरसेन मार्फत अतिशय गुप्त ठिकाणी लपवून ठेवतो जेणेकरून ते वाईट लोकांच्या नजरेपासून दूर रहावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी खास ९ लोकांना दिली जाते आणि ही जबाबदारी पिढ्यांन-पिढ्या हे लोक सांभाळत राहतात.आजही,म्हणजे वर्तमानकाळातसुध्दा त्या रहस्याचे संरक्षण करणारे हे लोक. यांपैकीच एक असणारे निवृत्त अनुशास्त्रज्ञ विक्रम सिंग. एक दिवस विक्रम सिंगांचा अचानक खून होतो आणि मरण्यापूर्वी ते आपल्या अमेरिकेत असणाऱ्या पुतण्याला, विजयला ई-मेल मार्फत सांकेतिक भाषेमधे एक पत्र पाठवतात. इथूनच सुरुवात होते या थरारक कादंबरीची.
गुप्त सांकेतिक लिपीतील संकेतानुसार तसेच २००० वर्षांपूर्वीच्या अवशेषांवरून विजय आपला मित्र कोलीन, राधा आणि काकांचे मित्र शुक्ला यांच्या मदतीने त्या ई-मेलची उकल करतो. आणि चालू होते एक थरारक शोधमोहिम महाभारतातील त्या रहस्याची. याच रहस्याच्या शोधावर असणाऱ्या अजूनही काही दुष्ट शक्ती आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली तालिबान्यांची मदत, रहस्य मिळवण्यासाठी करत असलेले त्यांचे वेगवेगळे प्रयत्न डॉयल यांनी अगदी रोमांचक, थरारक पद्धतीने या कादंबरीत रंगवले आहेत.जे वाचताना एक वेगळेच थ्रिल देऊन जाते. या शोधमोहीमेदरम्यान विजय आणि त्याच्या साथीदारांचा अतिशय ताकदवान अशा दुष्ट शक्तींकडून पावला पावलावर होणारा पाठलाग, त्यामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानकाळात होणारी कारस्थाने यांच्या कात्रीत त्यांचे सापडले जाणे हा सगळा थरार डॉयल यांनी या कादंबरीमधून आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. वर्तमानकाळात चालणाऱ्या या शोधमोहीमेत अधूनमधून भूतकाळात घडलेल्या घटनांची सांगड घालून हजारो वर्षांपूर्वीचे संदर्भ देत असताना वाचक मूळ कथेसोबतच जोडलेला राहील याची काळजी लेखकाने अगदी व्यवस्थित घेतली आहे.
अत्यंत वेगवान आणि थरारक पद्धतीने पुढे सरकणाऱ्या शोधमोहिमेसह प्रत्येक टप्प्यावर मिळणारे वेगवेगळे सांकेतिक संकेत आणि त्यांची उकल करत, दुष्ट शक्तींच्या कारस्थानांना मात देत विजयचे आपल्या साथीदारांसोबत त्या रहस्यापर्यंत पोहचणे आणि ते प्राचीन रहस्यमय गूढ उकलून काढण्यापर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचक पध्दतीने डॉयल यांनी त्यांच्या या कादंबरीमधे मांडलाय. पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक पानावरचा या थरारक शोधमोहिमेचा प्रवास वाचत असताना एखादा थ्रिलर चित्रपटच आपल्या डोळ्यासमोर चालू असल्याचा भास व्हावा अशी ही कादंबरी.
रहस्यकथा आणि शोधकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ख्रिस्टोफर सी. डॉयल यांची कादंबरी "महाभारताचे रहस्य".
संदीप प्रकाश जाधव
I need to purchase it.
ReplyDeletehttps://www.amazon.in/dp/B07MQTKWNN/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_VVZ79VA6VSBYREFA1G67
ReplyDeletepurchase karaychay he pustak, i need it
ReplyDeletehttps://www.cart91.com/mr/products/mahabharatache-rahasya
Delete