Sunday, June 21, 2020

"जुगाड"


लेखक : किरण गुरव

प्रकाशक : दर्या प्रकाशन


मराठी साहित्यातील एक सशक्त कथाकार किरण गुरव यांची "जुगाड" ही पहिलीच कादंबरी.

आपल्यापैकी प्रत्येकाच्याच अगदी ओळखीचा शब्द "जुगाड" आणि प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे, कशासाठी तरी नक्कीच केला असेल असा हा "जुगाड". पण पुस्तक वाचत असताना मला जाणवलेला लेखकांना याठिकाणी अभिप्रेत असणारा "जुगाड" म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी केलेली धडपड. हिच धडपड किरण गुरव यांनी अतिशय साध्या आणि शैलीदार भाषेत मांडली आहे त्यांच्या पहिल्याच कादंबरी "जुगाड" मधे.

अभियांत्रिकी शिक्षणाचे पेव फुटल्यानंतर जो तो हेच शिक्षण घेऊन जेव्हा बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करतो आणि मग स्वप्नांचा पाठलाग करताना असणारी जीवघेणी स्पर्धा, त्यातून होणारी घुसमट सहन करत करत बेकारीच्या खाईमधे होरपळून जाणारी एक पिढी यांचं किरण गुरव यांनी या कादंबरीमधे केलेलं वर्णन विचार तर करायलाच लावतं पण मनसुद्धा अक्षरशः हेलावून टाकतं. जरी कादंबरीची कथा एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली असली तरी ती कथा अशा सर्वांची आहे जे गावा-गावातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन महानगरांमधे अशाश्वत अशा रोजगारासोबत जगण्याची आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची कसरत करत आहेत.

या कादंबरीचे कथानक फिरते कथेचा नायक शशा भोवती. शशा जो आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून पुण्यासारख्या महानगरामधे नोकरीनिमित्त आलेला तरुण.या कादंबरीचे विश्लेषण करायचं झाल्यास ते दोन भागात करावे लागेल, पहिला भाग म्हणजे शशाचे पुण्यातील दिवस तर दुसरा भाग म्हणजे नोकरी गेल्यामुळे त्याच नोकरीसाठी पुण्यातून परत गावाकडे येऊन सुरु केलेली नवीन नोकरी आणि तिचा पुन्हा तसाच शेवट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण पूर्ण करून महानगरांमध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या प्रत्येक तरुणाचे पहिले काम म्हणजे राहण्यासाठी स्वस्त-कामचलाऊ जागा शोधणं आणि या कथेपुरती ही जागा आहे "श्री" लॉज. कथेची सुरुवात होते खोली नंबर ५७, "श्री" लॉज पासून जिथे राहतो कथेचा नायक शशा त्याच्यासारख्या अशा अनेक तरुणांसोबत. लॉजचे मालक शितोळे हे एक अवली पात्र, भाडेकरूने कितीही टांगा मारायचा प्रयत्न केला तरी शितोळेची त्यांच्याकडून भाडे वसूल करण्याची पद्धत आणि लॉजच्या एखाद्या गोष्टीबद्दल कोणी तक्रार घेऊन आलाच तरी लॉजची खरी गरज मालकाला नसून इथे राहणाऱ्यालाच आहे हे पटवून सांगणारा शितोळे लेखकाने अगदी मस्त रंगवलाय.सुरवातीला कडक आणि व्यवहारी वाटणारा शितोळे इतकाही भावनाशून्य नाही हे पहिल्या भागाच्या शेवटी जाणवते. लॉजमधे राहणारे सर्वचजण वेगवेगळ्या क्षेत्रात - वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे, सगळ्यांच्या कामाच्या वेळा वेगळ्या आणि त्यामुळेच सकाळी सकाळी ऑफिससाठी आवरताना सगळ्यांची जी कसरत चालू असते ती सांगताना लेखकांनी जे वर्णन केलंय भले ते संडास-बाथरूम च्या लाईनचे असो वा पावसात गळणाऱ्या खोलीच्या भिंतीचे असो वाचताना वाटत राहतं की आपणही तिथेच त्यांच्यासोबतच आहोत.फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टमधे काम करणारा प्रत्येकजण इथे धडपडतोय छोट्याश्या कंपनीत का असेना पण पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी. कारण कंत्राटी कामगार भरतीचे जे पेव महानगरांमध्ये फुटलेय त्यामुळे वाढीस लागलेली नोकरीची अशाश्वतता. प्रत्येक कंपनीमध्ये असलेले प्रोडक्शन आणि कॉलिटी मधिल विळा-हातोड्याचे नाते लेखकाने इथेही मस्त रंगवलंय. कंत्राटी कामगार आणि पर्मनंट कामगार यांच्यातील शीतयुद्ध सुद्धा वाचताना सतत जाणवत राहते.याच कंत्राटी कामगारांच्या गर्दीमधला नोकरी गेलेला शशा आणि त्याचा परममित्र पुषप्या. नोकरी गेल्यानंतर नोकरीच्या शेवटच्या दिवशी शशाची होणारी घालमेल आपल्यालाही अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही.नोकरी गेल्यामुळे क्षणा क्षणाला शशाला घरच्यांची काळजीने येणारी आठवण वाचणाऱ्या प्रत्येक नोकरदाराला आपले कुटुंब डोळ्यासमोर डोळ्यासमोर घेऊन येते. कंत्राटी कामगाराला किती तारेवरची कसरत करावी लागते हे वाचताना समजते. नवीन नोकरीच्या शोधासाठी रोज सकाळी उठून तयार होऊन शशा आणि पुष्प्याचे पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरणे, नोकरीच्या शोधात नकळत अगदी भंगार वाल्यापर्यंत जाऊन पोहोचणं मनाला चटका लावून जाते. शशाचे नोकरीसाठी सासवडच्या एका कंपनी पर्यंत जाणे आणि त्याच्या तिथेपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन अप्रतिम. तिथून परतत असताना तयार झालेले पावसाळी वातावरण, त्यानंतर पडलेला तुफान पाऊस, शश्याच्या अगदी जवळच आकाशातून पडलेला तो विजेचा लोळ, त्यातून अक्षरशः मरणाला शिवून आलेला शशा आणि त्याही परिस्थितीत शशाचे "श्री" लॉज वर येऊन पोहचणे सगळे कसे लेखक आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. पुण्यात येऊन नोकरी करण्यापूर्वी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात शशा कोल्हापूरच्या उद्यमनगर सारख्या ठिकाणी काम करायचा. याठिकाणी उद्यमनगरमधे काम करणाऱ्या जुन्या मेस्त्री लोकांचे लेखकांनी केलेल्या वर्णनामुळे लेखकांचे बारिक निरीक्षण दिसून येतं. तर अशा उद्यमनगर सारख्या ठिकाणी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे शशाला सासवडच्या कंपनीमधे नोकरीची ऑफर मिळते खरी पण नियतीला ते मान्य नसल्यामुळे किंवा कदाचित शशालासुद्धा मनातून सासवडला जायचंच नसलेल्या इच्छेमुळे त्याचं अचानक आजारी पडणं आणि हे आजारपण गावी समजल्यामुळे गावाकडून मामाने त्याला घरी परत घेऊन जाण्यासाठी येणं या सगळ्यात शशाच्या मनाची अस्वस्थता लेखकाने अगदि बारकाईने मांडली आहे.इतके दिवस राहिलेला "श्री" लॉज सोडताना झालेली शशाची मानसिक अवस्था आणि स्वारगेट स्टँड मधून कोल्हापूरला गाडी निघताना आपला परममित्र पुष्प्याला जड अंतःकरणाने दिलेला अखेरचा निरोप यांचं वर्णन वाचताना थोडंसं वाईट नक्कीच वाटतं. पुण्याला अखेरचा रामराम करून गावाकडे परत जाणं हा झाला कथेचा एक भाग जो कादंबरी रुपात वाचताना एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

शशाच्या मामाने केलेल्या खटपटीमुळे शशाला गावाकडे जी दुसरी नोकरी मिळते ती एका नवीन चालू होणार असणाऱ्या बॉक्साइट कॅल्सीनेशन फॅक्टरीत मेकॅनिकल इंजिनिर/साईट इंजिनिर म्हणून आणि तेही अगदी त्याच्या गावशेजारच्या पाटगाव तालुक्यातील कोकणात. गावापासून, घरच्यांपासून जवळ शिवाय नवीनच चालू होणारी फॅक्टरी आल्यामुळे लवकर पर्मनंट होण्याची शक्यता या सगळ्यामुळे खुश होऊन नोकरीवर लागलेला शशा पुढे परत कसा बेरोजगार होतो याची कथा आहे दुसऱ्या भागामध्ये. गावाकडची एक प्रतिष्ठित व्यक्ती, राधामाई मिनरल प्रॉडक्ट चे चेअरमनसाहेब श्रीयुत शेळनोलीकर चव्हाण यांनी घातलेला घाट म्हणजे ही नवीन फॅक्टरी.इथे शशाची भेट होते साईटवरच्या फिटर लोकांसोबत युसूफ, साजी आणि जय ज्यांना अगदी देशभर फिरून अशा नवीन चालू होणाऱ्या फॅक्टरिंमध्ये मोठ मोठ्या मशनरी फिटिंगचा दांडगा अनुभव.कोणत्याही प्रकारचे आणि कितीही मोठे मशीन "जुगाड" करून का होईना फिट करण्यात ही मंडळी पटाईत. साईटवर आलेल्या मोठ मोठ्या मशनरिंचं युसूफने आपल्या खास अंदाजात आणि काही ठिकाणी "जुगाड"करून केलेल्या फिटिंगचे लेखकाने केलेलं वर्णन वाचताना आपल्याला हे सर्व त्या साईटवरच उभे राहून पाहत असल्याचा भास होतो.गावाकडे डोंगर उतारावर उभ्या राहत असलेल्या या फॅक्टरीच्या आसपासच्या निसर्गाचे उत्तम असे वर्णन करायला लेखक नाही विसरला. याच ठिकाणी शशाची भेट होते त्याच्या थोडे आधी या फॅक्टरीत जॉईन केलेल्या सिव्हिल इंजिनिर सीमा मॅडम सोबत.सुरवातीला खडूसपणे आणि शशापासून अंतर ठेवून राहणारी सीमा मॅडम नंतर शशाची चांगली मैत्रीण बनते ती शशाने अगदी कठीण समयी तिला केलेल्या कामातील मदतीमुळे. नंतर चेअरमन साहेबांच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा मी पणामुळे मटेरियल सप्लायर सोबत झालेला वाद आणि त्यामुळे हळूहळू बंद पडत गेलेलं फॅक्टरीचं काम याचं वर्णन वाचताना नायकाची दया आल्याशिवाय राहत नाही.याच वेळी शशाचं गावी जाऊन येणं, तिथल्या मित्रांना भेटल्यावर झालेली जाणीव जी की अभियांत्रिकीशिवाय इतर पर्याय ज्यांनी निवडले त्यांचं आयुष्यात स्थिरस्थावर होणं आणि आपण अजूनही नोकरीसाठी धडपड करत राहणं. तरीही शशा परत साईटवर जातो हा विचार करून की टिकून राहणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यातच पुढच्या उज्वल यशाची शक्यताही दडलेली आहे.पण बंद पडत जाणाऱ्या फॅक्टरी मधून एक एक करून सर्व कामगारांचं निघून जाणं, सीमा मॅडमचं अचानक कामावर यायचं बंद होणं आणि नोकरीत लागल्यापासून न मिळालेल्या पगारासाठी शशाने चेअरमन साहेबांना सतत आठवण करून देऊनसुद्धा पगार न देताच त्याला नोकरीवरून काढून टाकणे या सर्वांमुळे खचून गेलेला शशा आणि त्याचं पुन्हा बेरोजगार होणं हा दुसऱ्या भागाचा शेवट.


प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही मनाला भिडणारी, वाचल्यानंतर आयुष्याचा नव्याने विचार करायला लावणारी,कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ऊर्जा देणारी किरण गुरव यांची कादंबरी "जुगाड".





संदीप प्रकाश जाधव

















3 comments:

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये