Sunday, August 30, 2020

"अमृतवेल"


लेखक : वि. स. खांडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस



ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स.खांडेकर यांची "ययाती" ही अजरामर कादंबरी खूप आधी वाचली होती, त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग आला तो त्यांनी लिहिलेल्या "अमृतवेल" या कादंबरीमुळे. १९६७ साली प्रकाशीत झालेली १५० पानांची ही छोटेखानी कादंबरी आजही वाचायला घेेतली तरी वाचताना त्यामध्ये आपण हरवून जावे असे कथानक. मानवी मन किती विचित्र आहे आणि त्याच्या विविध छटा ही कादंबरी वाचत असताना आपल्याला जाणवत राहतात. मानवी मन हे एकाचवेळी वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ असे फिरत असते, पण त्याला कधीच भूतकाळाच्या आठवणींनी जखडून ठेवता येत नाही. ते नेहमीच झेपावत असते भविष्यातील स्वप्नांकडे आणि हे करत असताना ते वर्तमानकाळात समोर आलेल्या परिस्थितीचा, प्रसंगांचा आपल्या सोयीने चांगले-वाईट अर्थ लावत असते. माणसाच्या आयुष्यात काही प्रसंग अगदी विचित्र असतात, अशा वेळी आपले मन अगदी जवळच्या माणसाशीसुद्धा बोलायला धजावत नाही आणि काहीवेळा हेच मन अनोळखी व्यक्तींकडेसुद्धा ओढले जाते. मानवी मनाचा अचूक वेध घेणारी वि. स.खांडेकरांनी लिहिलेली ही कादंबरी "अमृतवेल".

कादंबरीची कथा फिरते नंदाभोवती. कादंबरीच्या कथेचे मुख्य पात्र जरी नंदा ही एक उच्चशिक्षित तरुणी असली तरी इतर पात्रे जसे दादा, माई, मिलिंद, दासबाबू, वसुंधरा, देवदत्त, मधुरा, बापू, मोहन, पार्वती आणि गंगाराम यांच्याशिवाय कथा अपूर्णच ठरेल. सोबतच चंचल हे हरणाचे  पाडससुद्धा तितकेच महत्वाचे आहे या कथेमध्ये. दुःख हा मानवजातीला लागलेला शापच आहे असे म्हटले तरी चालेल पण कधी कधी हेच दुःख माणसाला अंतर्मुख करते, दुसऱ्यांशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ आणि स्पष्ट करते. कथेची सुरुवात दादा, माई आणि नंदाच्या आयुष्यात आलेल्या अशाच दुःखाने होते. आपला वैमानिक प्रियकर शेखरसोबत सुखी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानकच विमान अपघातात झालेला शेखरचा मृत्यू नंदाला दुःखाच्या खाईत घेऊन जातो. याच दुःखातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या करायला गेलेली नंदा तिला आलेल्या दादा, माई आणि छोट्या मिलिंदच्या आठवणीने परत फिरते. त्यानंतर दादांसोबतच्या पत्रातून झालेल्या संवादामध्ये तिला तिच्यापेक्षाही जास्त दुःख सहन करून खंबीरपणे आयुष्याला सामोरे जाणारे दादा समजतात. या पत्राच्या माध्यमातून दोघांमध्ये झालेला संवाद आणि त्यांद्वारे दोघांचे एकमेकांजवळ व्यक्त होण्यातून प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, दुःख कितीही मोठे असले तरी जवळच्या माणसाशी बोलल्याने त्यातून बाहेर पडण्याचे बळ नक्कीच मिळते. याच पत्रात दादांनी नंदाला दिलेला सल्ला म्हणजे स्वप्नभंग हा माणसाचा कायमच सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख सहन करून नवीन स्वप्नं पाहण्यात आहे. दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. नंदासोबतच आपण सर्वांनीसुद्धा अनुसरण करावे असे हे विचार. दादांच्या बोलांनी मनोबल उंचावलेल्या नंदाने स्वत:ला सावरत, प्रीतीचा, आयुष्याचा खरा अर्थ नेमका काय असतो याचा घेतलेला शोध म्हणजेच ही कादंबरी "अमृतवेल".

दादांच्या सल्ल्यानुसार आपली पी. एच. डी. पूर्ण करण्यासाठी दासबाबूंकडे गेलेल्या नंदाला अगदी अनपेक्षितपणे तिची जुनी मैत्रीण वसुंधरा हिची कंपॅनिअन बनून फिट्स येणारी तिची मुलगी मधुरा हिला सांभाळण्याचा प्रस्ताव येतो. वसुंधरा एक अनाथ मुलगी, नंदाची कॉलेजमधील मैत्रीण, जी शिक्षण अर्धवट सोडावे लागून देवदत्त सोबत झालेल्या लग्नानंतर विलासपूरची जहागिरदारीण झाली. जरी विलासपूर हे मुंबईपासून दूर असले तरी दादा आणि माई हा एकच विचार करून परवानगी देतात की यानिमित्ताने नंदा आपले शेखरचे दुःख विसरून जाईल. पुढे वसुंधरासोबत विलासपूरला आल्यानंतर तिच्या ऐश्वर्याने चकित झालेल्या नंदाचे मधुरासोबत एक भावनिक नाते तयार होते. पण इतके ऐश्वर्य असूनसुद्धा नेहमी दुःखात असणारी वसुंधरा नंदाला जाणवते. सतत देवदत्तचा तिरस्कार करणारी, मधुराला त्याच्यापासून नेहमी दूर ठेवणारी वसुंधरा नेमक्या कोणत्या दुःखात आहे याचा नंदाने घेतलेला शोध आपल्याला कादंबरीत वाचायला  मिळेल. हा शोध घेत असताना नंदाला वसुच्या कुटुंबातील अनेक रहस्ये समजतात, जसे देवदत्तचा त्याच्या आई- वडिलांसोबतच्या नात्याचा इतिहास, वयाच्या १०व्याच वर्षी देवदत्तचं व्यसनी बनण्याचं नेमकं कारण, वसुच्या आत्मकेंद्री होण्यासाठी जबाबदार गोष्टी आणि मधुराला फिट्स येण्यास कारणीभूत घटना. देवदत्त-वसुच्या नात्यात निर्माण झालेल्या दरीचे नेमके कारण समजल्यानंतर नंदाला स्वतःचे दुःखसुद्धा लहान वाटू लागते.  देवदत्तसोबत झालेल्या नंदाच्या ओळखीनंतर त्याच्या वाचनाच्या आवडीने प्रभावित होऊन, नकळत त्याच्यावर प्रेम करू लागणारी नंदा स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन  देवदत्त आणि वसुंधरा यांच्या नात्याला पुन्हा जोडणारा पूल कसा बनते, दुःखाच्या डोहात तुटून गेलेली त्यांची नात्याची दोर कशी जोडते याचं अतिशय सुंदर आणि वाचकाला अंतर्मुख करायला लावणारे वर्णन वि. स. खांडेकरांनी "अमृतवेल"मधे केलेलं आहे.

मानवी मनाचा वेध घेणारी आणि जीवनाचा अर्थ समजावत असताना आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी, सर्वांनी आवर्जून वाचावी अशी वि. स. खांडेकरांची अप्रतिम कादंबरी "अमृतवेल"






संदीप प्रकाश जाधव

Sunday, August 23, 2020

"अंतर्बाह्य"



लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन



‌मराठी साहित्यामधे गूढकथा हा प्रकार ज्या लेखकांनी लोकप्रिय केला त्यांमध्ये सर्वात प्रथम ज्यांचे नाव घ्यावं लागेल ते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे. यावर्षीच १७ मे २०२० रोजी त्यांचा वयाच्या ८१ व्या वर्षी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. रंगभूमी आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात मोठं नाव असलेल्या काही मोजक्याच लोकांपैकी ते एक होते. रत्नाकर मतकरी यांनी वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके, एकांकिका, नाटके लिहिली पण त्यांनी हटके अंदाजात लिहिलेल्या गूढकथा थोड्या खासच. जवळपास २०० पेक्षा जास्त गूढकथा त्यांनी लिहिल्या आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहचल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके खेकडा, गहिरे पाणी, बकासुर, कबंध, रंगांधळा, अ‍ॅडम, रंगयात्री आणि बरीच. रत्नाकर मतकरींनी जवळपास २३ कथासंग्रह लिहिले त्यांपैकीच एक गूढकथासंग्रह म्हणजे "अंतर्बाह्य".

गूढकथा आणि भयकथा यांमधील नेमका फरक जो एक वाचक म्हणून माहीत असणं महत्त्वाचं आहे, तो रत्नाकर मतकरी यांनी अगदी सहज, सोप्या भाषेत त्यांच्या या "अंतर्बाह्य" पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितला आहे. नेहमीच्या पाहण्यात नसलेलं, ज्याची कदाचित भीती वाटू शकेल पण ते भीतिदायक नाही ते म्हणजे गूढ. एखाद्याला भीती का वाटते हे शोधणे म्हणजे सुद्धा एकप्रकारचे गूढच. नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळ्या आणि अतर्क्य गोष्टींची कथेत मांडणी केली तर गूढकथा बनतात, मतकरींनी लिहिलेल्या अशाच १० अतर्क्य गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अंतर्बाह्य". रोजचे आयुष्य जगणाऱ्या मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कधी कधी अचानकच गूढ वाटू लागते, अशा "अंतर्बाह्य" बदलणाऱ्या व्यक्तिमत्वाला केंद्रस्थानी ठेवून लिहील्या गेलेल्या १० गूढकथा आपल्याला या पुस्तकामधे वाचायला मिळतील. १८० पाने आणि १० गूढकथांचे हे पुस्तक वाचत असताना आपणही नकळत त्या कथांमधे हरवून जातो. गूढकथा या तेव्हाच पटण्यासारख्या किंवा परिपूर्ण वाटतात जेव्हा कथेतील पात्रे, घटना, वातावरण आणि आशय यांची योग्य भाषेत मांडणी केली जाते. रत्नाकर मतकरींच्या इतर पुस्तकांप्रमाणे "अंतर्बाह्य" मधेसुद्धा आपल्याला परिपूर्ण अशा गूढकथा वाचायला मिळतील.

"अंतर्बाह्य" या नावाप्रमाणेच रत्नाकर मतकरींची या पुस्तकातील प्रत्येक गूढकथा मानवी मनाच्या विविध भावनांतून जन्म घेते. जसे प्रेमातून गूढतेकडे जाणारी पहिली कथा "अंतर्बाह्य", सूडातून जन्माला येणारी "सावळी", कौटुंबिक अत्याचारतून येणारा एकटेपणा आणि त्यातूनच पूढचे गूढ घेऊन येणारी "कोळसा", दुर्बलतेमुळे आलेली अगतिकता त्यावर आधारित "हे सारे...पूर्वी कधीतरी", तीव्र मानसिक धक्क्याने एखाद्याचे बिघडणारे संतुलन आणि त्याचा गुढकतेतून सुखद शेवट करणारी "ती गेली", जवळच्या प्रिय व्यक्तीकडून दिला जाणारा धोका आणि सतत दुसऱ्याशी केली जाणारी तुलना यातूनच स्वतःला सिध्द करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून घडलेली "दुसऱ्यासारखा एखादा", स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरदार सोडून मुंबईत आल्यानंतर घडणारी "पत्ता", पुनर्जन्मावर आधारित आठवणींतून घडणारी "जन्मोजन्मी", झपाटलेल्या पुरातन वास्तूत एका रिऍलिटी शोमध्ये भीतीदायक वातावरणात घडलेली "हॉंटेड हाउस" आणि जातीय दंगलीतून समोर आलेली शेवटची कथा "शेला". प्रत्येक कथेचे वेगळेपण आणि वेगळ्या प्रकारचे गूढ हीच रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या गूढकथांची खासियत जी आपल्याला "अंतर्बाह्य" वाचत असताना जाणवत राहील.

गूढकथांची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं पण त्याचबरोबर काहीतरी वेगळं वाचन करावं म्हणून इतरांनीसुद्धा आवर्जून वाचावं असं हे रत्नाकर मतकरी यांचे पुस्तक "अंतर्बाह्य".






संदीप प्रकाश जाधव

Sunday, August 16, 2020

"महाभारताचे रहस्य"


लेखक : क्रिस्टोफर सी. डॉयल

प्रकाशक : मंजुळ पब्लिशिंग हाऊस



ख्रिस्टोफर सी. डॉयल यांच्या "The Mahabharata Secret" या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ही कादंबरी "महाभारताचे रहस्य".
 
डॉयल यांची ही पहिलीच कादंबरी.

महर्षी व्यासांनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला एक काव्यग्रंथ, याच काव्यग्रंथावर आधारीत असलेलं कौरव-पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यांच्यामधे झालेलं महायुद्ध म्हणजे महाभारत. तर हे महाभारत घडलं असण्या-नसण्याबद्दल बऱ्याच लोकांची मते तशी वेगवेगळी आहेत.आजही जगभरात हा एक संशोधनाचा विषय आहे.अशा वेगवेगळ्या संशोधनातून पुढे आलेले प्रासंगिक पुरावे सिध्द करतात की महाभारत हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतामधे घडून गेलेली एक खरी घटना असण्याची दाट शक्यता आहे. महाभारतामधील बऱ्याच घटना आपण लहानपणापासून गोष्टींच्या रुपात ऐकत आलेलो आहोत. महाभारत म्हटले की श्रीकृष्ण, कौरव-पांडव, द्रौपदी, भीष्म, शकुनी मामा, कुंती, गांधारी, द्रोणाचार्य, अश्वत्थामा ही आणि अशा बऱ्याच पात्रांची नावे सहजपणे आपल्या बोलण्यात येतात. कुरुक्षेत्रावर १८ दिवस चाललेले कौरव-पांडवांमधील युद्ध आणि त्याच युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले, आजही लोकांना जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे गीतासार या गोष्टी माहीत नसणारा माणूस दुर्मिळच. याच महाभारतातील रहस्यावर आधारित अशी ही थरारक कादंबरी "महाभारताचे रहस्य".

ही एक रहस्यमय कादंबरी, शोधकथा आहे हे पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच लक्षात येते.कथा फिरते नायक विजय आणि त्याच्या साथीदारांभोवती. महाभारताचे युध्द संपल्यानंतर त्यातील रहस्ये २३०० वर्षांपूर्वी खोलवर गाडून टाकण्यात आली. याच प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध ख्रि.पू.२४४ मधे सम्राट अशोकाला लागला होता. त्या रहास्यमधे जगाचा विनाश करण्याची ताकद होती. ते रहस्य सम्राट अशोक आपला सेनापती सुरसेन मार्फत अतिशय गुप्त ठिकाणी  लपवून ठेवतो जेणेकरून ते वाईट लोकांच्या नजरेपासून दूर रहावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी खास ९ लोकांना दिली जाते आणि ही जबाबदारी पिढ्यांन-पिढ्या हे लोक सांभाळत राहतात.आजही,म्हणजे वर्तमानकाळातसुध्दा त्या रहस्याचे संरक्षण करणारे हे लोक. यांपैकीच एक असणारे निवृत्त अनुशास्त्रज्ञ विक्रम सिंग. एक दिवस विक्रम सिंगांचा अचानक खून होतो आणि मरण्यापूर्वी ते आपल्या अमेरिकेत असणाऱ्या पुतण्याला, विजयला ई-मेल मार्फत सांकेतिक भाषेमधे एक पत्र पाठवतात. इथूनच सुरुवात होते या थरारक कादंबरीची. 

गुप्त सांकेतिक लिपीतील संकेतानुसार तसेच २००० वर्षांपूर्वीच्या अवशेषांवरून विजय आपला मित्र कोलीन, राधा आणि काकांचे मित्र शुक्ला यांच्या मदतीने त्या ई-मेलची उकल करतो. आणि चालू होते एक थरारक शोधमोहिम महाभारतातील त्या रहस्याची. याच रहस्याच्या शोधावर असणाऱ्या अजूनही काही दुष्ट शक्ती आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली तालिबान्यांची मदत, रहस्य मिळवण्यासाठी करत असलेले त्यांचे वेगवेगळे प्रयत्न डॉयल यांनी अगदी रोमांचक, थरारक पद्धतीने या कादंबरीत रंगवले आहेत.जे वाचताना एक वेगळेच थ्रिल देऊन जाते. या शोधमोहीमेदरम्यान विजय आणि त्याच्या साथीदारांचा अतिशय ताकदवान अशा दुष्ट शक्तींकडून पावला पावलावर होणारा पाठलाग, त्यामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानकाळात होणारी कारस्थाने यांच्या कात्रीत त्यांचे सापडले जाणे हा सगळा थरार डॉयल यांनी या कादंबरीमधून आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. वर्तमानकाळात चालणाऱ्या या शोधमोहीमेत अधूनमधून भूतकाळात घडलेल्या घटनांची सांगड घालून हजारो वर्षांपूर्वीचे संदर्भ देत असताना वाचक मूळ कथेसोबतच जोडलेला राहील याची काळजी लेखकाने अगदी व्यवस्थित घेतली आहे.

अत्यंत वेगवान आणि थरारक पद्धतीने पुढे सरकणाऱ्या शोधमोहिमेसह प्रत्येक टप्प्यावर मिळणारे वेगवेगळे सांकेतिक संकेत आणि त्यांची उकल करत, दुष्ट शक्तींच्या कारस्थानांना मात देत विजयचे आपल्या साथीदारांसोबत त्या रहस्यापर्यंत पोहचणे आणि ते प्राचीन रहस्यमय गूढ उकलून काढण्यापर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचक पध्दतीने डॉयल यांनी त्यांच्या या कादंबरीमधे मांडलाय. पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक पानावरचा या थरारक शोधमोहिमेचा प्रवास वाचत असताना एखादा थ्रिलर चित्रपटच आपल्या डोळ्यासमोर चालू असल्याचा भास व्हावा अशी ही कादंबरी.

रहस्यकथा आणि शोधकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी ख्रिस्टोफर सी. डॉयल यांची कादंबरी "महाभारताचे रहस्य".




संदीप प्रकाश जाधव


Sunday, August 9, 2020

"पावनखिंड"



लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


ज्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आवर्जून वाचाव्यात अशा मोजक्याच कादंबरीकरांपैकी एक म्हणजे रणजित देसाई.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र श्रीमानयोगी सारख्या अजरामर कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले. त्यांनीच लिहिलेल्या आणखीन ही काही कादंबऱ्या स्वामी,राधेय,मेख मोगरी,लक्ष्यवेध. रणजित देसाईंच्या प्रत्येक कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती वाचत असताना त्यातील घटना, पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ज्यामुळे वाचनाचा एक वेगळाच अनुभव येतो. मूळ विषयाला जराही धक्का न लावता कादंबरीच्या माध्यमातून तो वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची खासियत. त्यांच्या "लक्ष्यवेध" या शिवाजी महाराज - अफजलखान ऐतिहासिक भेटीवर आधारित कादंबरीचा पुस्तक परिचय मी इथे आधी दिला होता आणि तेव्हा लिहिल्याप्रमाणेच शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही एक स्वतंत्र कादंबरीचा विषय आणि अशा घटनांवर लिहावे - बोलावे तेवढे कमीच. शिवचरित्रातील अशाच एका ऐतिहासिक घटनेवर आधारीत आणि एका पराक्रमी व्यक्तीवर लिहिली गेलेली रणजित देसाई यांची ही कादंबरी "पावनखिंड". रणजित देसाई यांनी लिहिलेली "पावनखिंड" ही त्यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. 

शिवचरित्रातील अशा बऱ्याच घटना आहेत ज्या आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत, अगदी त्यांचे पारायण झाले म्हटले तरी ते चुकीचे नाही ठरणार. पण कितीही वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी एक नवीन ऊर्जा देणाऱ्या अशा या घटना. या कादंबरीचा विषयसुद्धा असाच. शिवचरित्रातील एक मानाचे पान म्हणजे  बाजीप्रभू देशपांडेंचा घोडखिंड म्हणजेच पावनखिंड याठिकाणी केलेला पराक्रम. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक अशी ही घटना. याच बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमावर लिहिलेली ही कादंबरी. जरी ही घटना सर्वांना माहीत असली तरी रणजित देसाईंनी लिहिलेल्या कादंबरी रुपात ती वाचत असताना एक वेगळाच अनुभव देऊन जाते. बाजीप्रभू देशपांडेंना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या कादंबरीमधे, रणजित देसाईंनी बाजीप्रभूंच्या शिवाजी महाराजांना भेटण्यापूर्वीच्या आयुष्यावरसुध्दा प्रकाश टाकला आहे. १२ मावळातील लोकांना स्वराज्यात जोडत असताना बांदल-देशमुखांसोबत झालेल्या एका लढाईत शत्रू म्हणून समोर आलेल्या बाजीप्रभूंना शिवरायांनी कसे आपलेसे केले? सोबतच बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे सुद्धा महाराजांकडे कसे आले? याचे वर्णन रणजित देसाईंनी या कादंबरीच्या सुरुवातीला केलेलं आहे. आधी विरोध करणारे आणि नंतर महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्याने प्रभावित होऊन, स्वराज्यात येऊन अतुल्य पराक्रम गाजवणारे बाजी आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळतील. स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा आणि पराक्रम म्हणजे काय असतो हे बाजी आणि ३०० मावळ्यांनी घोडखिंडीत जगाला दाखवून दिले. या अचाट पराक्रमात घोडखिंडीची "पावनखिंड" कशी झाली याचे थरारक वर्णन कादंबरीत करत असताना, पन्हाळा किल्ल्याचा दिलेला परिचय, सिद्दीच्या वेढ्याबद्दलचे वर्णन, तो वेढा फोडण्यासाठी वेळोवेळी केले गेलेले प्रयत्न आणि नाइलाजास्तव वेढ्यातून निसटून पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेताना महाराजांच्या काळजीने सर्वांची झालेली मानसिक अवस्था, तसेच या ऐतिहासिक घटनेपूर्वीच्या इतर गोष्टींची पार्श्वभूमी जसे अफझलखान वध आणि त्यानंतर एकामागून एक महाराजांनी जिंकलेले किल्ले या सर्व गोष्टींमधून रणजित देसाईंनी तो काळ आपल्यासमोर उभा केला आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज हे  फक्त पावनखिंडी पुरते मर्यादित नाहीत. अफजलखान भेटीच्या वेळीसुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी बाजींनी पार पडली होती त्याचेही सविस्तर वर्णन आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. रणजित देसाईंनी बाजींचे केलेले या कादंबरीतील वर्णन धिप्पाड शरीरयष्टीचा एक शूर मावळा आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. असा धिप्पाड शरीरयष्टीचा शूर माणूससुद्धा किती हळवा असू शकतो हे महाराज पन्हाळ्यातून विशाळगडाकडे निघण्यापूर्वी भावनिक झालेला बाजी वाचताना समजते. भर पावसात, काटे, चिखल तुडवत, पाठलाग करणाऱ्या जवळपास २००० पेक्ष्या जास्त असणाऱ्या सिद्दीच्या सैन्याचा मागोवा घेत, १२-१३ तासांच्या अथक वाटचालीनंतर पन्हाळा ते घोडखिंड हे जवळपास ६० किलोमीटरचे अंतर पार करून राजांसह बाजी आणि ६०० मावळे जेव्हा घोडखिंडीत पोहचतात तेव्हा पन्हाळ्यावर हळवे झालेले हेच बाजी कठोर होऊन राजांना विशाळगड जवळ करण्याचा आग्रह करताना दिसतात. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हे एकच वाक्य डोक्यात ठेऊन बाजीप्रभू, फुलाजी आणि त्यांच्यासोबतच्या ३०० मावळ्यांनी स्वराज्यासाठी महाराजांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली, मरतानासुद्धा महाराजांना मुजरा करुनच प्राण सोडले. बाजींच्या आधी धारातीर्थी पडलेला आपला मोठा भाऊ फुलाजींच्या देहाकडे पाहत, "भाऊ जगण्याचं सार्थक केलंस.. गेलास.. म्हणजे जातोस कुठं.. तू मोठा ना.. तुझा मान पहिला... मी मागून आलोच" असे बोलणारे बाजी कादंबरीमध्ये वाचताना डोळ्यात नकळत पाणी आणतात. अंगावर झालेल्या अगणित जखमा, त्यातून वाहणारे रक्त घेऊन त्वेषाने लढणाऱ्या, "तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला" असे ठणकावून सांगत मावळ्यांचा लढण्याचा उत्साह वाढवणाऱ्या बाजींनी महाराज विशाळगाडी सुखरूप पोहचल्यानंतरच आपला देह ठेवला. बाजीप्रभू आणि इतर अनेक मावळ्यांच्या बलिदानाने, स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, "पावनखिंड" झाली.

जरी अगदी लहानपणापासून सर्वांना माहीत असलेली अशी ही ऐतिहासिक घटना असली तरीही रणजित देसाईंनी लिहिलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी आणि एका नरवीराच्या पराक्रमाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखे कादंबरीरूपातील पुस्तक "पावनखिंड".





संदीप प्रकाश जाधव


Sunday, August 2, 2020

"वादळ"





लेखक : दिलीप बर्वे

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


"वादळ" म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे अतिशय वेगाने घोंगावत येणारा वारा, त्या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे उन्मळून पडणारे मोठ-मोठाले वृक्ष, उडून जाणारी घरांची छपरे, उघड्यावर पडलेले संसार, घाबरून भांबावून गेलेले प्राणी-पक्षी आणि त्या प्रचंड वाऱ्यामुळे झालेला विध्वंस. "वादळ" तशी एक अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती पण अशा वादळाची विध्वंसकता ते शांत झाल्यानंतर त्याने केलेली उलथापालथ पाहूनच समजते.माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडत असतात किंवा घडून जातात ज्यामुळे आयुष्याची बरीच उलथापालथ होते आणि त्यामुळे होऊन गेलेलं नुकसान आपल्या मनावर खोलवर आघात देऊन जाते. अशा घटनांमुळे एखाद्याचे होणारे मानसिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान नैसर्गिक वादळांमुळे होणाऱ्या विध्वंसापेक्षा नक्कीच कमी नसते. म्हणूनच मग लोक या घटनांचा उल्लेख आपल्या आयुष्यात आलेलं "वादळ" असं करतात. तीन मध्यमवर्गीय कुटुंबांवर ओढवलेल्या अशाच वादळी घटनांवर आधारीत, दिलीप बर्वे यांनी आपल्या खास शैलीत, सहज, सुंदर शब्दांत लिहिलेली  कादंबरी म्हणजे "वादळ". अशा वादळी घटनांबरोबरच लेखकाने अजून एका चिंताजनक विषयाला इथे हात घातला आहे तो म्हणजे तरुण पिढीमध्ये अगदी कमी वयात फोफावत चाललेली व्यसनाधीनता.

कादंबरीची कथा फिरते जोशी, प्रधान, वैद्य या तीन मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय आणि एक अरोरा नामक पंजाबी कुटुंबाभोवती. सातारा बस स्टॉपवरील एका पेपर विक्रेत्याचा मुलगा म्हणजेच माधवराव जोशी. जो आपल्या मेहनतीवर शिकून शिक्षक बनतो आणि सांगली सारख्या शहरामधून आपल्या नोकरीचा श्रीगणेशा करतो. इथूनच होते या कथेची सुरुवात. सांगलीतील नोकरी करत असतानाच माधवच्या आयुष्यात अतिशय रूपवान अशी माधवी येते आणि त्यानंतर अगदी अनपेक्षितरित्या त्याला पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून आलेल्या नोकरीच्या ऑफरमुळे तो आपला संसार हलवतो पुण्यमधील नारायण पेठेतील देशपांडे वाडयात. इथून पुढे अगदी एखाद्या चित्रपटाला शोभावे असे या कादंबरीचे कथानक पुढे सरकत जाते. इथे देशपांडे वाड्यातच झालेली जोशी आणि प्रधान कुटुंबाची भेट, माधवराव-माधवीच्या जुळ्या मुली ज्योती-स्मृती यांची प्रधान कुटुंबातील दिपक-स्वाती सोबत झालेली घट्ट मैत्री, दोन्ही कुटुंबांमधे निर्माण झालेले एक भावनिक नाते, अगदी लहानपणापासून एकत्र असलेले दिपक आणि स्मृती यांच्यामध्ये जुळलेले प्रेम, त्यांनी एकत्र बघितलेली स्वप्ने,त्यांच्या प्रेमाला असलेला घरच्यांचा अबोल पाठिंबा, दिपकचे एम.बी.बी.एस. पूर्ण करून डॉक्टर होणे, ज्योतीचा प्रकाश वैद्य या केमिकल इंजिनिअर सोबत साखरपुडा होऊन जोशी-वैद्य कुटुंबांचे जोडले जाणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी लेखकाने इतक्या सहज,सुंदर भाषेत लिहिल्या आहेत की वाटते जणू आपल्या आसपासच्याच कुटुंबांमधे हे सर्व घडत असावे. इथेपर्यंत अगदी सरळमार्गी आयुष्य चालणाऱ्या या तिनही कुटुंबांना पुढे येऊ घातलेल्या "वादळाची" पुसटशीही कल्पना नसते.

ज्योतीच्या साखरपुड्यानंतर स्मृतीचे अचानक तेजा अरोरा या पंजाबी मुलासोबत पळून जाणे आणि त्यामुळे जोशी कुटुंबावर झालेला मानसिक आघात म्हणजे या वादळाची सुरुवात. त्यानंतर एकामागून एक घडत जाणाऱ्या घटना जसे स्मृतीच्या जाण्याने डॉक्टर दिपकचे दिल्लीतील मेडिकल कॉन्फरन्सच्या निमित्ताने कायमचे घर सोडून आत्महत्या करण्यासाठी निघून जाणे, केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटामधे ज्योतीचा पती प्रकाश वैद्य याची दृष्टी गेल्यामुळे माधवरावांचा प्रकाश-ज्योतीच्या लग्नाला विरोध करणे या आणि अशा अनेक धक्कादायक घटनांमुळे या तीनही कुटुंबांच्या आयुष्यात झालेली उलथापालथ कादंबरी रुपात वाचत असताना लक्षात येते की दिलिप बर्वे यांनी दिलेलं "वादळ" हे या कादंबरीचे नाव किती सार्थ आहे.

डॉक्टर दिपक प्रधानचा स्वामी दिव्यानंद होण्यापर्यंतचा प्रवास वाचून जाणवते की काही वादळी घटनांचा आघात एखाद्याच्या मनावर किती खोलवर होऊ शकतो. आत्महत्येपासून परावृत्त होऊन दिपकचे स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेणे अशा लोकांसाठी आदर्श आहे  जे आयुष्यात आलेल्या वादळांनी खचून जातात.

भरपूर आणि फटाफट पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी तेजाचा ब्राउन शुगर स्मगलिंग पर्यंतचा प्रवास आणि त्यामुळे होणारी अरोरा कुटुंबाची वाताहत विचार करायला लावतेच पण त्याचबरोबर हेच ब्राउन शुगरचे व्यसन तेजा-स्मृतीचा किशोरवयीन मुलगा अमरला सुद्धा आहे हे समजल्यानंतर वाईट वाटते. स्वातीचा पती ए.सि.पि. धनंजय जाधव याच्याकडे आलेली ब्राउन शुगर स्मगलिंगची केस, एका पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी धनंजयने केलेले प्रयत्न आणि हे सर्व करत असताना त्याचे तेजा पर्यंत जाऊन पोहचणे कादंबरीरुपात वाचताना एक वेगळाच अनुभव येतो. सुरवातीपासून शेवटपर्यंत घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीचे लेखकांनी अगदी साध्या भाषेत केलेले वर्णन त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते.

कितीही वाईट, धक्कादायक घटनांनी भरलेल्या एखाद्या चित्रपटाचा शेवट जसा नेहमी आनंदीच होतो तसाच काहीसा या कादंबरीचा शेवट. स्मृतीचे जोशी कुटुंबात परत येणे, दिपकचे स्वामी दिव्यानंद म्हणून प्रधान कुटुंबाला २०-२२ वर्षांनी भेटणे, तेजाला आपण केलेल्या कृत्याचा झालेला पश्चात्ताप, दिव्यानंद स्वामींच्या आश्रमात अमरची ब्राउन शुगरसारख्या व्यसनातून झालेली मुक्ती आणि निपुत्रिक प्रकाश-ज्योतीच्या आयुष्यात झालेला अमरचा प्रवेश असा या "वादळाचा" दिलिप बर्वे यांनी केलेला अगदी सहज,सुंदर,आनंदी शेवट.

काहीतरी वेगळे वाचन म्हणून आवर्जून वाचावी अशी दिलिप बर्वे यांची कादंबरी "वादळ".




संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये