Sunday, October 25, 2020

"प्रतिपश्चंद्र"

 





लेखक : डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे

प्रकाशक : New Era Publishing House


फक्त "शिवाजी" हे नाव कधीही, कुठेही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा एकच, आपल्या मनात येणारे पहिले विचार एकच ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज" यांचे. या नावात जादूच अशी आहे की आजही अगदी ३५० वर्षांनंतरसुद्धा त्यांच्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी ते आपल्याला वाचण्याचा मोह होतोच, अगदी लहानपणापासून आपण त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या गोष्टी ऐकत आलो असलो तरी आजही प्रत्येकवेळी त्या ऐकताना, वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. शिवरायांच्या नंतर आणि त्यांच्या आधीही अनेक राजे होऊन गेले पण त्यांपैकी किती राजे लोकांच्या आठवणीत आहेत हा एक प्रश्नच आहे. शिवरायांचं एक महान राजा म्हणून असणारं स्थान जितकं त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वामुळे आहे तितकंच किंवा त्याहून थोडं जास्तच ते त्यांच्या चारित्र्यामुळे आहे. अशा या चारित्र्यसंपन्न, पराक्रमी, कर्तृत्ववान राजाच्या आयुष्यावर आजवर अनेक पुस्तके लिहीली गेली, अनेक रहस्यकथा, चित्रपट, कादंबऱ्या लोकांपर्यंत पोहचल्या आणि तरीही समुद्रातून कितीही काढून घेतले तरी कमी न होणाऱ्या पाण्यासारख्या त्यांच्या आयुष्यातील एक एक घटना, पराक्रम आजही लोकांसमोर येतच असतात. शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ घेऊन डॉ. प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेली ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". जरी शिवरायांच्या आयुष्यातील घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी या पुस्तकाला असली तरी "प्रतिपश्चंद्र" हा काही इतिहास नाही तर इतिहासातील काही दुवे घेऊन रचलेली एक काल्पनिक रहस्यकथा आहे. इतिहासाला थोडाही धक्का न लावता लेखकाचा हा एक कल्पना अविष्कार आहे. "प्रतिपश्चंद्र" जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारीत आहे तशीच ती १३ व्या शतकापासून ते २१ व्या शतकाच्या कालखंडात आपल्या भारत भूमीवर घडलेल्या इतिहासाचे धागे पकडून त्याला कल्पनेची जोड देऊन  तयार झालेली एक रहस्यमय कादंबरी आहे. ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे  छत्रपती  शिवरायांच्या ३२ मणी सुवर्ण सिंहासनाच्या थरारक, रोमांचक शोधाची आणि त्याबरोबरच  दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना जो शिवाजी महाराजांनी संरक्षणाची हमी देऊन बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत ३५० वर्षें वाईट लोकांपासून सुरक्षित ठेवला त्या खजिन्यापर्यंत पोहचण्याचा थरारक, रोमांचक  प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र".

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे ३५० वर्षांपासून बाहेर येण्याची वाट पाहत आहे आणि ते रहस्य उलगडण्यासाठी केलेला थरारक प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना शोधण्यासाठी सुरू झालेला या कादंबरीचा प्रवास ४ दिवसानंतर त्या खजिन्यासोबतच शिवरायांच्या ३२ मण सुवर्णसिंहासनाच्या शोधाने संपतो. कोणत्याही रहस्यकादंबरीमध्ये वाचकाने हरवून जाण्यासाठी लेखकाकडून लिहिल्या जाणाऱ्या कथेला एक असं व्यासपीठ लागतं जिथे वाचत असताना वाचकांच्या मनामध्ये पानापानावर प्रश्नचिन्हांची एक साखळी उभी रहावी, वाचक त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच एक भांबावून सोडणारा धक्का बसावा आणि त्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच त्याच्यासमोर होणारा रहस्याचा उलगडा. डॉ. कोयाडे यांची अतिशय थरारक घटनांच्या मालिकेतून पुढे सरकणारी "प्रतिपश्चंद्र" ही कादंबरी म्हणजे अशी बरीच प्रशचिन्हे, रहस्ये आणि एकामागून एक बसणारे धक्के यांनी खचाखच भरलेलं एक व्यासपीठच आहे जिथे वाचक थक्क होऊन हरवून जातो.

डॉ. रवीकुमार हा या कथेचा नायक. कथेचा नायक एक हुशार तरुण, डॉक्टर, अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला, अगदी मजेत आयुष्य जगणारा एक तरुण. नागपूरहून एका डॉक्टर परिषदेसाठी औरंगाबादला आपला मित्र आदित्यला सोबत घेऊन आलेला रवी एक दिवस अनपेक्षितपणे एका भोवऱ्यात अडकतो, कादंबरीच्या सुरुवातीलाच तो एका रहस्यात अडकतो पण एकटा नाही तर एक वाचक म्हणून आपल्याला सोबत घेऊनच. पुढे पानापानावर मिळणाऱ्या सांकेतिक संकेतांचे अर्थ शोधत रवीचा आदित्यसोबत एक थरारक प्रवास सुरु होतो आणि पुढच्या ४ दिवसांच्या या सर्व प्रवासात आपण एक वाचक म्हणून त्यांच्यासोबतच प्रवास करत राहतो, अगदी शेवटच्या पानापर्यंत. कारण अनपेक्षितपणे सुरू झालेल्या या प्रवासाचे रहस्य उलगडने जेवढी नायकाची गरज आहे तेवढीच एक वाचक म्हणून आपलीही होऊन जाते. या सर्व थरारक प्रवासासोबत पुढे सरकणाऱ्या या कथेमध्ये अधून मधून इतिहासात डोकावून तिथले संदर्भ देत असताना कोयाडे यांनी वाचक कुठेही न हरवता, त्याचा कुठेही गोंधळ न उडता तो कथेसोबतच जोडला राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. या थरारक घटनांना असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी इतिहासात डोकावत असताना बऱ्याच गोष्टींची अगदी सविस्तर माहितीसुद्धा लेखकाने कादंबरीमध्ये दिलेली आहे जसे भारतातील प्राचीन वैभव, विजयनगर साम्राज्य आणि त्यांचा इतिहास, हम्पी आणि त्याठिकाणची प्रसिद्ध स्थळे, प्राचीन गडकिल्ले, वेरुळच्या लेण्या, जगप्रसिद्ध कैलास मंदिर, चिंदबरम येथील नटराजाची मुर्ती, मुंबई - औरंगाबाद शहर, निळावंती ग्रंथ, ऐतिहासिक सांकेतिक भाषा, गौतम बुद्ध, प्राचीन शिल्पकला, घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिणदिग्विजय मोहीम, महाराजांचे सुवर्णसिंहासन, बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता आणि बरंच काही. फक्त इतिहास व रहस्य या मध्ये अडकून न राहता एक सुंदर प्रवास वर्णनसुद्धा कादंबरीमध्ये आहे. यासोबतच नायकाला या थरारक प्रवासात साथ देणारे आदित्य, प्रियल, प्रशिक, ज्योती आणि सुर्यकांतराव यांची श्रद्धा, देव,भक्ती, आस्तिक - नास्तिक, ग्रह, तारे, ते अगदी विष्णूचा दशावतार आणि डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतापर्यंत अगदी सोप्या भाषेत रवीसोबत होणारी चर्चा वाचकाच्या ज्ञानात नक्कीच भर घालते. नायकाला शेवटपर्यंत साथ देणारा त्याचा मित्र आदित्य आणि त्यांचे सवांद लाजवाब आहेत. कादंबरी वाचायला चालू केल्यानंतर पुढे काय होणार या उत्सुकतेमुळे ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवणे अवघड आहे.

शेवटी सापडलेल्या त्या अफाट खजिन्यात रवीला जेव्हा जरीकापडात गुंडाळलेली महाराजांची कवड्यांची माळ आणि भगवा नजरेस पडतो तेव्हा रवीसोबतच एक वाचक म्हणून अभिमानाने आपलाही ऊर भरून नाही आला तरच नवल. खजिन्यापाठोपाठ सापडलेल्या महाराजांच्या सुवर्णसिंहासनावर कवड्यांची माळ अर्पण करून होणारा या कथेचा शेवट. हातात पडलेल्या कवड्यांच्या माळेसमोर त्या अफाट खजिन्यालासुद्धा तुच्छ माननारा रवी हेच सिद्ध करतो की आज ३५० वर्षें होऊनपण महाराजांबद्दल असणारा अभिमान, आदर थोडाही कमी झालेला नाही. आणि याचे कारण म्हणजे, शिवनेरीहून सुरू होऊन रायगडावर शेवट झालेला तो केवळ शरीराचा प्रवास कधीच नव्हता. शिवराय हा एक विचारांचा प्रवास आहे ज्याचा शेवट कधीच नाही होऊ शकत.

मुरलीधर खैरनार यांच्या "शोध" या रहस्यमय कादंबरीनंतर वाचनात आलेली ही आणखी एक उत्कृष्ट कादंबरी. अतिशय उत्कंठावर्धक, रोमांचक, थरारक आणि वाचत असताना लागलेल्या आपल्या तंद्रीला धक्क्या मागून धक्के देत एक एक रहस्य उलगडत जाणारी आवर्जून वाचण्यासारखी डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची ही रहस्यमय कादंबरी "प्रतिपश्चंद्र".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 18, 2020

"राधेय"


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


शिवाजी सावंत यांच्या "मृत्युंजय" या कादंबरीत मी कर्ण वाचला होता पण तरीही खूप लोकांकडून रणजित देसाईंच्या "राधेय" या कादंबरीबद्दल ऐकत-वाचत आल्याने आणि खासकरून pustakexpress.com मधे कादंबरीबद्दल वाचल्यानंतर "राधेय" वाचण्याचा मोह टाळता नाही आला आणि त्यामुळेच एक अतिशय दर्जेदार पुस्तक संग्रही आले.

मराठी साहित्यातील सर्वांना परिचित नाव रणजित देसाई. श्रीमानयोगी, लक्ष्यवेध, मेखमोगरी या पुस्तकांनंतर रणजित देसाईंच्या राधेय या कादंबरी वाचनाचा अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा. त्यांचं कोणतंही पुस्तक वाचताना नकळतपणे वाचकाचे त्या काळात जाणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. कादंबरीकार रणजित देसाईंची अशीच एक सुंदर कादंबरी "राधेय". दानशूर, शूरवीर अशी ख्याती असणाऱ्या कर्णाच्या आयुष्याचे अतिशय उत्कृष्ट वर्णन म्हणजे ही कादंबरी. कर्णाचे आचरण करायचं असेल तर कर्ण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कर्णाला समजून घेणं जितकं कठीण आहे तितकंच ते सोपंसुद्धा आहे. त्याचं कारण म्हणजे कर्णाची कथा जितकी ती कर्णाची तितकीच ती आपलीही, प्रत्येकाच्या मनात एक कर्ण दडलेला असतो. आणि तो समजून घेण्यासाठी महाभारताची पाने वाचण्याची गरज नाही. आपल्या मनाचीच चार पाने पालटली तर प्रत्येकाला स्वतःमध्ये एक कर्ण दिसेल. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन रणजित देसाईंनी लिहिलेली ही एक अजरामर कादंबरी "राधेय". महाभारतातील उपेक्षित पात्रांपैकी एक पात्र म्हणजे कर्ण. ज्येष्ठ कौंतेय असूनही ज्याला आपले आयुष्य राधेय म्हणून जगावे लागले असा महारथी कर्ण. क्षत्रिय कुळातील असूनसुद्धा नियतीमुळे ज्याला नीच कुळातील वागणूक सहन करावी लागली असा हा कर्ण. साक्षात सुर्यपुत्र असूनही जो सूतपुत्र म्हणून लहानाचा मोठा झाला असा कर्ण . ज्याच्या कर्तुत्वापुढे साक्षात इंद्रालासुद्धा याचकांच्या रांगेत उभं राहावं लागलं असा श्रेष्ठ दानवीर. पांडवांसोबतच्या युद्धात मृत्यू डोळ्यासमोर असूनही ज्याने मैत्रीसाठी, निष्ठेसाठी मृत्यूला कवटाळले असा मित्र . कर्तृत्व आणि दातृत्व ज्याच्या ठायी ठायी वसलं आहे असा महापराक्रमी, दिग्विजयी राजा. अशा कर्णाची कथा म्हणा अथवा व्यथा म्हणजेच रणजित देसाईंची ही कादंबरी "राधेय".

कादंबरीची सुरुवात चंपानगरीत झालेल्या कृष्ण आणि कर्ण यांच्या भेटीपासून होते. नंतर पुढे महाभारतातील एक एक घटनांमधून उलगडत जाणारे कर्णाचे आयुष्य. द्रौपदी स्वयंवर , इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना, राजसूय यज्ञ, कौरव-पांडवांचा द्यूत, द्रौपदी वस्त्रहरण, पांडवांचा वनवास अशा घटनांचा उल्लेख करत पुढे सरकणारे कथानक. कादंबरी कर्णाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली असल्याने या सर्व घटनांचा कर्णाच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे आपल्याला समजण्यापुरताच त्यांचा पसारा रणजित देसाईंनी मर्यादित ठेवला आहे. पण तरीही लेखक वाचकाला त्या काळात घेऊन जाण्यात कमालीचे यशस्वी झालेत. आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या कर्णाचा दातृत्व गुण जरी सर्वांना माहित असला तरी एक सुतपुत्र म्हणून जगताना त्याचा जीवन प्रवास किती खडतर, वेदनामय होता हे या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. सर्वश्रेष्ठ योद्धा असूनसुध्दा सुतपुत्र म्हणून पावला पावलावर सहन करावा लागणारा अपमान, जन्मतःच मातृप्रेमाला पारखा झाल्यामुळे आपल्या जन्माचे रहस्य माहीत नसल्याने त्याच्या मनाची होणारी अवस्था अशा अनेक गोष्टी वाचताना नकळतपणे आपणसुध्दा कर्णाच्या भूमिकेत जातो. आपण ज्येष्ठ कौंतेय आहोत हे कळल्यानंतर फक्त दुर्योधनासोबतच्या मैत्रिखातर, त्याच्याशी असलेल्या निष्ठेसाठी राधेय राहण्यात समाधान मानणाऱ्या, आपल्या दातृत्वाला धर्म मानून आपली कवच कुंडले देखील इंद्राला बहाल करणाऱ्या, कौरवांचा पराजय निश्चित आहे आणि होणाऱ्या युद्धात आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असुनसुद्धा खऱ्या अर्थाने वीर योध्यासारखा लढणारा कर्ण आपल्याला महाभारतातील सर्व पात्रांहून खूप मोठा, महान वाटायला लागतो. धर्म आणि अधर्मातील फरक बऱ्याच घटनांमधून उदाहरणासहित आपल्याला कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. कादंबरीचा शेवट जसा जवळ येतो तसं नकळतपणे आपलं मन कर्णासाठी हळवे होते, काही काही घटना कादंबरीमध्ये वाचताना नकळतपणे डोळे भरून येतात.

कादंबरी वाचून झाल्यानंतर कितीतरी वेळ आपल्या डोक्यातून न जाणारी एक गोष्ट, कौरव-पांडवांचे युद्ध टाळण्यासाठी नात्यांची जी आठवण कृष्णाने, कुंतीने, भीष्माने कर्णाला करून दिली तीच आठवण तितक्याच सहजपणे पांडवांना का नाही करून दिली आणि जर ती करून दिली असती तर हे विनाशकारी युद्ध झाले असते का? कादंबरी वाचल्यानंतर आपले मन कर्णासाठी हळवे झाले नाही तर नवल. जन्मजात कुळाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणारा कर्ण शेवटी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो.

कादंबरीतील काही आवडलेली वाक्ये :

  • '‌या जगात अचानक असं काही घडत नाही. आपल्याला मागचा पुढचा संदर्भ माहीत नसतो, म्हणून ते अचानक भासतं'.
  • 'जिंकण्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो'.
  • 'ढळलेली मनःशांती, हरवलेलं स्वप्न आणि गेलेला जीव प्रयत्नसाध्य नसतो'.
  • 'बसल्या जागी न्यायनीतीच्या वल्गना करून न्यायनीतीचा विस्तार होत नसतो. कैकवेळा त्याच बुरख्याखाली अनीती नांदत असते'.
  • 'जुगार आणि चारित्र्य या दोन अशा गोष्टी आहेत की यांत पाय टाकण्याआधी विचार करावा. नंतर पाय माघारी घेता येत नाही'.
  • 'कीर्तीचा अहंकार जिवंत असेपर्यंतच भोगता येतो'.
  • 'माणसं जातात, माघारी राहतं ते त्यांचं आसन. माणसानं एवढं कीर्तिवंत व्हावं की त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं'.
  • 'मर्यादेनं ज्ञात असलेलं ज्ञान माणसाला वरदायी ठरतं, पण अमर्यादेतून अवतरलेलं ज्ञान माणसाला विनाशाकडेच नेतं'.
  • 'मरणापेक्षा वृद्ध होत जाणं कठीण. मृत्यूबरोबर सारं संपून जातं. पण वृद्ध होत जाणं म्हणजे रोज काही ना काही त्याग करणं'.
  • 'धर्म, पांडित्य हे दुसऱ्यांना सांगायला सोपं, पण ते स्वतः आचरणात आणणं भारी क्लेशकारक'.
  • 'सारेच घाव लेपणानं बरे होत नसतात, काही घाव आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहतात'.
  • 'जीवनाचे बंध तोडता येतात तसे नियतीचे बंध तोडता येत नाहीत'.

कर्ण जाणून घेण्यासाठी, स्वतःतील कर्णाचा शोध घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी रणजित देसाईंची कादंबरी "राधेय".





संदीप प्रकाश जाधव


Sunday, October 11, 2020

"घर हरवलेली माणसं"

 



लेखक : व. पु. काळे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु.काळे. मराठी साहित्यविश्वात वपु या नावाने ओळखले जाणारे अजरामर लेखक व.पु. काळे. वपु हे नाव ऐकले नसणारा किंवा वपुंचे लेखन माहीत नसणारा मराठी साहित्यविश्वातील माणूस मिळणे तसा दुर्मिळच. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीने लोकांना सांगणारे थोर साहित्यिक म्हणून व.पु.काळे यांचे असे एक वेगळे स्थान मराठी साहित्यविश्वात आहे. पेशाने आर्किटेक्ट असल्याने त्यांना शब्दांचे महाल बांधणारा लेखक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ४० वर्षांमध्ये ६० हून अधिक पुस्तके लिहिलेल्या वपुंच्या  पुस्तकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लिखाण हे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य दाखवणारे असते त्यामुळे वाचक त्यामध्ये हरवून जातो. बऱ्याच कथा कादंबऱ्या लिहिलेल्या वपुंची मी वाचलेली इतर पुस्तके "पार्टनर" आणि "वपुर्झा". ही दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनुभवसुद्धा शब्दांत न सांगता येण्यासारखा. वाचता वाचता लाईफची फिलॉसॉफी शिकवणारे "पार्टनर" आणि कोणत्याही पानावरचे अगदी कोणतेही वाक्य वाचले तरी पुनःपुन्हा वाचण्याचा मोह न टाळता येणारे "वपुर्झा". वपुंच्या या आणि अशा अनेक पुस्तकांच्या पंगतीमधील आणखी एक सुंदर लेखन म्हणजे "घर हरवलेली माणसं". वपुंचे हे पुस्तक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा एक कथासंग्रहच.

वपुंची कथा सांगण्याची पद्धत अतिशय भन्नाट आहे. आपण वाचन करता करता त्या कथांमध्ये अडकत जातो आणि आपले विचारचक्र सुरु होतच असते तोपर्यंतच ते आपल्याला कथेच्या शेवटी घेऊन येऊन ओपन एण्डेड, ओपन माईंडेड सोडून देतात आणि वाचक म्हणून आपण विचार करत राहतो की हे 'असे झाले असते तर' किंवा हे 'तसे झाले असते तर'. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच कथेत उतरल्यामुळे आपण नकळत त्या कथा रिलेट करत राहतो. "घर हरवलेली माणसं" या पुस्तकातील प्रत्येक कथासुद्धा याला अपवाद नाही. आपल्या आसपास राहणारे संसारी लोक आणि त्या संसारी स्त्री-पुरुषांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या किंवा एक वाचक म्हणून आपल्याला ते शोधायला भाग पडणाऱ्या अशा या पुस्तकातील कथा. रोजच्या जगण्यात दु:खाशिवाय काहीच नाही आणि पावलापावलावर ज्यांच्या स्वप्नांना तडे जाताहेत पण तरीसुध्दा जीवनातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारी माणसं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. त्याचप्रमाणे जगणं हे फार शुल्लक मानून स्वतःच्या जगण्याची मनमानी करून इतरांच्या जगण्याला चरे पाडणारी माणसंसुद्धा या पुस्तकात आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक आयुष्य असतं आणि हे ज्याला समजतं तो ते जगायचा, जपायचा प्रयत्न करत असतो. अशाच लोकांच्या कथा म्हणजे हे पुस्तक.  पुस्तकातील प्रत्येक कथेतील नायक किंवा नायिका दोन प्रकारच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतील. एक ज्यामध्ये  ते आपल्या जगण्यासाठी जिवंत घर शोधताना दिसतात तर दुसरे ज्यामध्ये ते आपल्या संसाराची, घराची विण उसवू नये याकरिता जीवाचं रान करताना दिसतात. आपल्याला किती आयुष्य मिळेल हे जरी कोणी सांगू शकत नसले तरी प्रत्येक व्यक्तीची असणारी इच्छा म्हणजे जे काही आयुष्य वाट्याला आले आहे ते आनंदात जगता यावे अशाच लोकांना समोर ठेऊन लिहिलेल्या या पुस्तकातील कथा. पण असं आयुष्य जगायला घरपण असणारं घर असणं महत्वाचं आहे. जरी प्रत्येकाच्या वाट्याला असं घर येत नसलं तरी नियती त्याला ते शोधण्याचे बळ नक्कीच देत असते. काहींचा शोध पूर्ण होतो तर काही वपुंच्या या पुस्तकातील "घर हरवलेली माणसं" होऊन जातात.

पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये :-

  • ‌'उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नही'
  • ‌'ज्यांना शब्दातली शक्ती नाही समजली, त्यांच्या कहाण्या कारुण्याने भरल्या आहेत'
  • ‌'काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं'
  • ‌'माणसाला बळ देतं ते दुसरं माणूसच'
  • ‌'कागदाच्या आहारी गेलेली यंत्रणा, दारूच्या आहारी गेलेल्या माणसांपेक्षा भयाण. फार म्हणजे फार जपावं लागतं'
  • ‌'कायम दुःखाच्या सावटाखाली असणारी आपल्यापेक्षाही अधिक सुखी असतात'
  • 'माणसं अकारण घोळ माजवतात आणि मुळातच वेगानं संपणारं आयुष्य आणखी कमी करतात'
  • 'स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो'
  • 'पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून टाकते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते'

शेवटी पुस्तकातील सर्व कथा वाचून होणारी जाणीव, घर कितीही मोठं असो ते घर तेव्हाच बनतं जेव्हा त्या घराला घरपण देणारी माणसं त्या घरामध्ये राहत असतात. खास वपुंच्या लेखनासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक "घर हरवलेली माणसं".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 4, 2020

"बलुतं"


                                                       

लेखक : दया पवार

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मराठीतील लिहिले गेलेलं पहिलं दलित आत्मकथन म्हणजे  दया पवार यांचं हे पुस्तक "बलुतं". यानंतर बऱ्याच आत्मकथा लिहिल्या गेल्या पण १९७८ साली लिहिलेलं हे आत्मकथन दलित समाजाचे अतिशय खडतर जीवन आजही तितक्याच प्रखरपणे वाचकांसमोर घेऊन येते. पूर्वापार चालत आलेली जातीव्यवस्था, दारिद्र्य यांतून येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करत स्वतःचे असे वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या 'दगडू मारुती पवार' म्हणजेच 'दया पवार' यांची ही वाचकाला आतून-बाहेरून हलवून सोडणारी आत्मकथा "बलुतं". आज एक कवी, साहित्यिक,  विचारवंत म्हणून लोकांमध्ये ओळखले जाणाऱ्या लेखकाचा दगडू पासून दया पर्यंतचा प्रवास म्हणजेच हे आत्मकथन "बलुतं".

जातीव्यस्थेमुळे म्हणा किंवा हिंदू समाजव्यवस्थेमुळे म्हणा जन्मतःच लेखकाच्या पदरी बांधलं गेलेलं हे दुःखाचं "बलुतं". महार जातीच्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला हा दगडूचा मुख्य अपराध. आपल्या देशात जातीचा एकप्रकारचा अदृश्य शिक्का आपल्या जन्मतःच बसलेला असतो. पु. ल. देशपांडेंनी लिहिल्याप्रमाणे " हिंदू धर्मात हा शिक्का पुसून दुसऱ्या जातीचा शिक्का उठवून घेण्याची हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाचीही आज्ञा नाही. ब्राम्हणाला कायस्थ होता येत नाही आणि साळ्याला माळी. एकही वेद न येणाऱ्या ब्राम्हणाला सुद्धा कधी कधी ऋग्वेदी, यजुर्वेदी ब्राम्हण हा शिक्का बसला की तो मेल्यानंतरही कायम राहतो". हिंदू समाजात दलित वगळता इतर जातींचा शिक्का असलेल्या मुलाचे पूर्ण जीवन तितकेसे विद्रूप नाही होत पण जर अस्पृश्य जातीच्या आई-वडिलांच्यापोटी कोणी जन्माला आलाच तर सारे संपलेच असे समजावे. त्याचे किड्या-मुंगी सारखे जगावे लागणारे जीवन आणि वाचकाला पानापानावर अस्वस्थ करणाऱ्या घटना म्हणजे हे दया पवारांचे आत्मकथन "बलुतं".

अतिशय प्रखर अशा वास्तवाचे जवळून दर्शन घडवणारे हे दया पवारांचे आत्मकथन वाचताना मन सुन्न करून टाकणारी जाणीव म्हणजे दलित समाजाचे जीवन हे केवळ आर्थिक दारिद्र्यामुळे आलेले नसून आपली समाजव्यवस्थाच त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे. फक्त दारिद्र्यामुळे आलेले आयुष्य सगळेच मध्यमवर्गीय जगत, सोसत असतात पण भयानक दारिद्र्यासोबतच आपल्या समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर जे हीनत्व लादलेले आहे त्याचा या आत्मकथनामुळे येणारा प्रत्यय वाचकाला हादरवून टाकतो. अस्पृश्यांना त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि नंतर दहन असो वा दफन, पावलापावलावर दिली जाणारी जनावरापेक्षाही भयंकर वागणूक दयाच्या लेखणीतून वाचताना मन गलबलून जाते. स्पृश्य आणि अस्पृश्य जरी एकाच मानवजातीचा भाग असले तरी स्वतःला स्पृश्य समाजणाऱ्यांनी जातिव्यवस्थेच्या नावाखाली मारलेला अस्पृश्यतेचा शिक्का एखाद्याच्या आयुष्याच्या चिंध्या कसे करून टाकतो हे "दगडूच्या" या आत्मकथनातून "दयाने" आपल्याला दाखवून दिले आहे. अस्पृश्य हा शिक्का बसलेली व्यक्ती हा जणू काही माणूसच नाही असे समजून वागणाऱ्या "सुसंस्कृतपणाची" कीव करावी वाटते. खेड्यात आणि मुंबईत दोन्हीकडे लहानाचा मोठा झाल्यामुळे दोन्हीकडचे आयुष्य जगलेला हा दगडू, पण शहर असो वा खेडे दोन्हीकडे अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक कशी सारखीच आहे याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचत असताना वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे एक माणूस म्हणून खेड्यापासून-शहरापर्यंत आपण केलेली प्रगती किती तकलादू आहे.

आपल्याला काल्पनिक वाटणाऱ्या कितीतरी घटना दगडूने अनुभवल्या आहेत याची काही उदाहरणे म्हणजे दारूच्या पूर्ण आहारी गेलेल्या दगडूच्या रसिक वडिलांकडून त्याला चोरीचा माल विकायचे शिक्षण मिळत असताना त्याच वेळी दगडू शाळेत 'बरे सत्य बोला' शिकत असतो. आणखी एक उदाहरण दगडूच्या जमनामावशीचे. देवाधर्माच्या नावाखाली दरिद्री आई-वडीलांनी यल्लमा देवीला वाहिलेल्या पोरांची पुढे वेश्या बाजारात विक्री होत असते आणि हेच आयुष्य जगणारी, वेश्याव्यवसाय करणारी दगडूची ही मावशी. वेश्याबाजारात पिंजऱ्यात बांधून ठेवलेल्या जमनामावशीचे दगडू साठी खाऊ हातात धरून त्याची वाट पाहणे, त्याच्यासोबत वेळ घालवून आपली वात्सल्याची भूक भागवणे आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तीच मावशी जेव्हा दयाला दादरच्या पुलाखाली भिकाऱ्यांच्या घोळक्यात भिक मागताना दिसते तेव्हा तिच्याशी साधा संवादही न करू शकणारा दया या घटना कितीही फिल्मी वाटल्या तरी लेखकांनी स्वतः अनुभवलेल्या आहेत. शिक्षणाशिवाय दलित समाजाची या सर्व जाचातून मुक्ती नाही होणार हे ओळखून आंबेडकरांनी दलितांसाठी शिक्षणसंस्था उभारल्या. बरेच दलित संघर्ष करून त्यातून शिक्षण घेऊन पुढे आले पण नंतर एक नवीनच पांढरपेशा दलित तयार झाला. जो आपल्याच अशिक्षित आणि पूर्णपणे दलित असणाऱ्या बांधवांपासून दूर जात गेला या नवीन वास्तवाचं दर्शन सुद्धा आपल्याला "बलुतं" मध्ये पाहायला मिळेल.

आपल्या विचित्र समाजव्यवस्थेविरुद्ध अतिशय चीड निर्माण करणारी या आत्मकथेतील एक घटना म्हणजे दयाला व्हेटर्नरी कॉलेजमध्ये क्लार्क-कम-लॅब-असिस्टंट म्हणून मिळालेली नोकरी. पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या आजारी जनावरांच्या शेणाचे नमुने वेगळे ठेऊन तपासणे, मेल्यानंतर त्यांची कातडी सोलने अशी कामे करण्यास कोणी उच्चवर्णीय तयार नसल्यामुळे दयाला मिळालेली ही नोकरी. त्यावेळी दयाला पडलेला प्रश्न 'इतके शिकून पण आपल्या वाट्याला हे वडिलोपार्जित कामच का यावे?' या नोकरीसोबतच आपले शिक्षण चालू ठेऊन दया पवार घडत गेले. आपल्यावरील अस्पृश्यतेचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न म्हणून दलित चळवळीत भाग घेतला पण तिथेसुद्धा त्यांना थोड्याफार फरकाने वेगळ्या वागणुकीचे अनुभव येतच राहिले. पुढे १९९० साली पश्चिम रेल्वेतून सिनिअर ऑडितर या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

अत्यंत साध्या शब्दांत लिहिलेली आणि वाचकाला हादरवून टाकणाऱ्या बऱ्याच घटनांनी भरलेली ही आत्मकथा आपल्याला वास्तवाचे जवळून दर्शन घडवून आणते. लेखकाचा "दगडूपासून" सुरू झालेला आणि "दयापर्यंत" येऊन संपलेला या आत्मकथनातील प्रवास वाचल्यानंतर आपण माणुसकीच्या आणखी जवळ जाऊन जगायचा नक्कीच विचार करतो. एक माणूस म्हणून वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे दया पवारांचे आवर्जून वाचण्यासारखे हे आत्मकथन "बलुतं".




संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये