Sunday, October 4, 2020

"बलुतं"


                                                       

लेखक : दया पवार

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मराठीतील लिहिले गेलेलं पहिलं दलित आत्मकथन म्हणजे  दया पवार यांचं हे पुस्तक "बलुतं". यानंतर बऱ्याच आत्मकथा लिहिल्या गेल्या पण १९७८ साली लिहिलेलं हे आत्मकथन दलित समाजाचे अतिशय खडतर जीवन आजही तितक्याच प्रखरपणे वाचकांसमोर घेऊन येते. पूर्वापार चालत आलेली जातीव्यवस्था, दारिद्र्य यांतून येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करत स्वतःचे असे वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या 'दगडू मारुती पवार' म्हणजेच 'दया पवार' यांची ही वाचकाला आतून-बाहेरून हलवून सोडणारी आत्मकथा "बलुतं". आज एक कवी, साहित्यिक,  विचारवंत म्हणून लोकांमध्ये ओळखले जाणाऱ्या लेखकाचा दगडू पासून दया पर्यंतचा प्रवास म्हणजेच हे आत्मकथन "बलुतं".

जातीव्यस्थेमुळे म्हणा किंवा हिंदू समाजव्यवस्थेमुळे म्हणा जन्मतःच लेखकाच्या पदरी बांधलं गेलेलं हे दुःखाचं "बलुतं". महार जातीच्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला हा दगडूचा मुख्य अपराध. आपल्या देशात जातीचा एकप्रकारचा अदृश्य शिक्का आपल्या जन्मतःच बसलेला असतो. पु. ल. देशपांडेंनी लिहिल्याप्रमाणे " हिंदू धर्मात हा शिक्का पुसून दुसऱ्या जातीचा शिक्का उठवून घेण्याची हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाचीही आज्ञा नाही. ब्राम्हणाला कायस्थ होता येत नाही आणि साळ्याला माळी. एकही वेद न येणाऱ्या ब्राम्हणाला सुद्धा कधी कधी ऋग्वेदी, यजुर्वेदी ब्राम्हण हा शिक्का बसला की तो मेल्यानंतरही कायम राहतो". हिंदू समाजात दलित वगळता इतर जातींचा शिक्का असलेल्या मुलाचे पूर्ण जीवन तितकेसे विद्रूप नाही होत पण जर अस्पृश्य जातीच्या आई-वडिलांच्यापोटी कोणी जन्माला आलाच तर सारे संपलेच असे समजावे. त्याचे किड्या-मुंगी सारखे जगावे लागणारे जीवन आणि वाचकाला पानापानावर अस्वस्थ करणाऱ्या घटना म्हणजे हे दया पवारांचे आत्मकथन "बलुतं".

अतिशय प्रखर अशा वास्तवाचे जवळून दर्शन घडवणारे हे दया पवारांचे आत्मकथन वाचताना मन सुन्न करून टाकणारी जाणीव म्हणजे दलित समाजाचे जीवन हे केवळ आर्थिक दारिद्र्यामुळे आलेले नसून आपली समाजव्यवस्थाच त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे. फक्त दारिद्र्यामुळे आलेले आयुष्य सगळेच मध्यमवर्गीय जगत, सोसत असतात पण भयानक दारिद्र्यासोबतच आपल्या समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर जे हीनत्व लादलेले आहे त्याचा या आत्मकथनामुळे येणारा प्रत्यय वाचकाला हादरवून टाकतो. अस्पृश्यांना त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि नंतर दहन असो वा दफन, पावलापावलावर दिली जाणारी जनावरापेक्षाही भयंकर वागणूक दयाच्या लेखणीतून वाचताना मन गलबलून जाते. स्पृश्य आणि अस्पृश्य जरी एकाच मानवजातीचा भाग असले तरी स्वतःला स्पृश्य समाजणाऱ्यांनी जातिव्यवस्थेच्या नावाखाली मारलेला अस्पृश्यतेचा शिक्का एखाद्याच्या आयुष्याच्या चिंध्या कसे करून टाकतो हे "दगडूच्या" या आत्मकथनातून "दयाने" आपल्याला दाखवून दिले आहे. अस्पृश्य हा शिक्का बसलेली व्यक्ती हा जणू काही माणूसच नाही असे समजून वागणाऱ्या "सुसंस्कृतपणाची" कीव करावी वाटते. खेड्यात आणि मुंबईत दोन्हीकडे लहानाचा मोठा झाल्यामुळे दोन्हीकडचे आयुष्य जगलेला हा दगडू, पण शहर असो वा खेडे दोन्हीकडे अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक कशी सारखीच आहे याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचत असताना वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे एक माणूस म्हणून खेड्यापासून-शहरापर्यंत आपण केलेली प्रगती किती तकलादू आहे.

आपल्याला काल्पनिक वाटणाऱ्या कितीतरी घटना दगडूने अनुभवल्या आहेत याची काही उदाहरणे म्हणजे दारूच्या पूर्ण आहारी गेलेल्या दगडूच्या रसिक वडिलांकडून त्याला चोरीचा माल विकायचे शिक्षण मिळत असताना त्याच वेळी दगडू शाळेत 'बरे सत्य बोला' शिकत असतो. आणखी एक उदाहरण दगडूच्या जमनामावशीचे. देवाधर्माच्या नावाखाली दरिद्री आई-वडीलांनी यल्लमा देवीला वाहिलेल्या पोरांची पुढे वेश्या बाजारात विक्री होत असते आणि हेच आयुष्य जगणारी, वेश्याव्यवसाय करणारी दगडूची ही मावशी. वेश्याबाजारात पिंजऱ्यात बांधून ठेवलेल्या जमनामावशीचे दगडू साठी खाऊ हातात धरून त्याची वाट पाहणे, त्याच्यासोबत वेळ घालवून आपली वात्सल्याची भूक भागवणे आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तीच मावशी जेव्हा दयाला दादरच्या पुलाखाली भिकाऱ्यांच्या घोळक्यात भिक मागताना दिसते तेव्हा तिच्याशी साधा संवादही न करू शकणारा दया या घटना कितीही फिल्मी वाटल्या तरी लेखकांनी स्वतः अनुभवलेल्या आहेत. शिक्षणाशिवाय दलित समाजाची या सर्व जाचातून मुक्ती नाही होणार हे ओळखून आंबेडकरांनी दलितांसाठी शिक्षणसंस्था उभारल्या. बरेच दलित संघर्ष करून त्यातून शिक्षण घेऊन पुढे आले पण नंतर एक नवीनच पांढरपेशा दलित तयार झाला. जो आपल्याच अशिक्षित आणि पूर्णपणे दलित असणाऱ्या बांधवांपासून दूर जात गेला या नवीन वास्तवाचं दर्शन सुद्धा आपल्याला "बलुतं" मध्ये पाहायला मिळेल.

आपल्या विचित्र समाजव्यवस्थेविरुद्ध अतिशय चीड निर्माण करणारी या आत्मकथेतील एक घटना म्हणजे दयाला व्हेटर्नरी कॉलेजमध्ये क्लार्क-कम-लॅब-असिस्टंट म्हणून मिळालेली नोकरी. पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या आजारी जनावरांच्या शेणाचे नमुने वेगळे ठेऊन तपासणे, मेल्यानंतर त्यांची कातडी सोलने अशी कामे करण्यास कोणी उच्चवर्णीय तयार नसल्यामुळे दयाला मिळालेली ही नोकरी. त्यावेळी दयाला पडलेला प्रश्न 'इतके शिकून पण आपल्या वाट्याला हे वडिलोपार्जित कामच का यावे?' या नोकरीसोबतच आपले शिक्षण चालू ठेऊन दया पवार घडत गेले. आपल्यावरील अस्पृश्यतेचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न म्हणून दलित चळवळीत भाग घेतला पण तिथेसुद्धा त्यांना थोड्याफार फरकाने वेगळ्या वागणुकीचे अनुभव येतच राहिले. पुढे १९९० साली पश्चिम रेल्वेतून सिनिअर ऑडितर या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

अत्यंत साध्या शब्दांत लिहिलेली आणि वाचकाला हादरवून टाकणाऱ्या बऱ्याच घटनांनी भरलेली ही आत्मकथा आपल्याला वास्तवाचे जवळून दर्शन घडवून आणते. लेखकाचा "दगडूपासून" सुरू झालेला आणि "दयापर्यंत" येऊन संपलेला या आत्मकथनातील प्रवास वाचल्यानंतर आपण माणुसकीच्या आणखी जवळ जाऊन जगायचा नक्कीच विचार करतो. एक माणूस म्हणून वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे दया पवारांचे आवर्जून वाचण्यासारखे हे आत्मकथन "बलुतं".




संदीप प्रकाश जाधव


No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये