लेखक : व. पु. काळे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु.काळे. मराठी साहित्यविश्वात वपु या नावाने ओळखले जाणारे अजरामर लेखक व.पु. काळे. वपु हे नाव ऐकले नसणारा किंवा वपुंचे लेखन माहीत नसणारा मराठी साहित्यविश्वातील माणूस मिळणे तसा दुर्मिळच. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीने लोकांना सांगणारे थोर साहित्यिक म्हणून व.पु.काळे यांचे असे एक वेगळे स्थान मराठी साहित्यविश्वात आहे. पेशाने आर्किटेक्ट असल्याने त्यांना शब्दांचे महाल बांधणारा लेखक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ४० वर्षांमध्ये ६० हून अधिक पुस्तके लिहिलेल्या वपुंच्या पुस्तकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लिखाण हे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य दाखवणारे असते त्यामुळे वाचक त्यामध्ये हरवून जातो. बऱ्याच कथा कादंबऱ्या लिहिलेल्या वपुंची मी वाचलेली इतर पुस्तके "पार्टनर" आणि "वपुर्झा". ही दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनुभवसुद्धा शब्दांत न सांगता येण्यासारखा. वाचता वाचता लाईफची फिलॉसॉफी शिकवणारे "पार्टनर" आणि कोणत्याही पानावरचे अगदी कोणतेही वाक्य वाचले तरी पुनःपुन्हा वाचण्याचा मोह न टाळता येणारे "वपुर्झा". वपुंच्या या आणि अशा अनेक पुस्तकांच्या पंगतीमधील आणखी एक सुंदर लेखन म्हणजे "घर हरवलेली माणसं". वपुंचे हे पुस्तक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा एक कथासंग्रहच.
वपुंची कथा सांगण्याची पद्धत अतिशय भन्नाट आहे. आपण वाचन करता करता त्या कथांमध्ये अडकत जातो आणि आपले विचारचक्र सुरु होतच असते तोपर्यंतच ते आपल्याला कथेच्या शेवटी घेऊन येऊन ओपन एण्डेड, ओपन माईंडेड सोडून देतात आणि वाचक म्हणून आपण विचार करत राहतो की हे 'असे झाले असते तर' किंवा हे 'तसे झाले असते तर'. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच कथेत उतरल्यामुळे आपण नकळत त्या कथा रिलेट करत राहतो. "घर हरवलेली माणसं" या पुस्तकातील प्रत्येक कथासुद्धा याला अपवाद नाही. आपल्या आसपास राहणारे संसारी लोक आणि त्या संसारी स्त्री-पुरुषांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या किंवा एक वाचक म्हणून आपल्याला ते शोधायला भाग पडणाऱ्या अशा या पुस्तकातील कथा. रोजच्या जगण्यात दु:खाशिवाय काहीच नाही आणि पावलापावलावर ज्यांच्या स्वप्नांना तडे जाताहेत पण तरीसुध्दा जीवनातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारी माणसं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. त्याचप्रमाणे जगणं हे फार शुल्लक मानून स्वतःच्या जगण्याची मनमानी करून इतरांच्या जगण्याला चरे पाडणारी माणसंसुद्धा या पुस्तकात आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक आयुष्य असतं आणि हे ज्याला समजतं तो ते जगायचा, जपायचा प्रयत्न करत असतो. अशाच लोकांच्या कथा म्हणजे हे पुस्तक. पुस्तकातील प्रत्येक कथेतील नायक किंवा नायिका दोन प्रकारच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतील. एक ज्यामध्ये ते आपल्या जगण्यासाठी जिवंत घर शोधताना दिसतात तर दुसरे ज्यामध्ये ते आपल्या संसाराची, घराची विण उसवू नये याकरिता जीवाचं रान करताना दिसतात. आपल्याला किती आयुष्य मिळेल हे जरी कोणी सांगू शकत नसले तरी प्रत्येक व्यक्तीची असणारी इच्छा म्हणजे जे काही आयुष्य वाट्याला आले आहे ते आनंदात जगता यावे अशाच लोकांना समोर ठेऊन लिहिलेल्या या पुस्तकातील कथा. पण असं आयुष्य जगायला घरपण असणारं घर असणं महत्वाचं आहे. जरी प्रत्येकाच्या वाट्याला असं घर येत नसलं तरी नियती त्याला ते शोधण्याचे बळ नक्कीच देत असते. काहींचा शोध पूर्ण होतो तर काही वपुंच्या या पुस्तकातील "घर हरवलेली माणसं" होऊन जातात.
पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये :-
- 'उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नही'
- 'ज्यांना शब्दातली शक्ती नाही समजली, त्यांच्या कहाण्या कारुण्याने भरल्या आहेत'
- 'काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं'
- 'माणसाला बळ देतं ते दुसरं माणूसच'
- 'कागदाच्या आहारी गेलेली यंत्रणा, दारूच्या आहारी गेलेल्या माणसांपेक्षा भयाण. फार म्हणजे फार जपावं लागतं'
- 'कायम दुःखाच्या सावटाखाली असणारी आपल्यापेक्षाही अधिक सुखी असतात'
- 'माणसं अकारण घोळ माजवतात आणि मुळातच वेगानं संपणारं आयुष्य आणखी कमी करतात'
- 'स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो'
- 'पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून टाकते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते'
शेवटी पुस्तकातील सर्व कथा वाचून होणारी जाणीव, घर कितीही मोठं असो ते घर तेव्हाच बनतं जेव्हा त्या घराला घरपण देणारी माणसं त्या घरामध्ये राहत असतात. खास वपुंच्या लेखनासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक "घर हरवलेली माणसं".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment