Tuesday, January 26, 2021

"गांधी का मरत नाही"

 


लेखक : चंद्रकांत वानखडे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


चंद्रकांत वानखडे यांचं सध्या बरंच चर्चेत असणारं पुस्तक "गांधी का मरत नाही" हे आज वाचून पूर्ण केलं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला माहित असणारे गांधीजी म्हणजे शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात शिकले किंवा शिकवले गेले इतकाच काय तो परिचय. याच्याव्यतिरिक्त गांधीजी ऐकत आलो ते लहानपणापासून मित्रांमध्ये होणाऱ्या त्यांच्या टिंगलटवाळीतून आणि त्यांच्यावर केलेल्या विनोदांमधून, भले स्वतः कधी त्यांच्याबद्दल वाईट बोललो नसेन पण त्या होणाऱ्या टिंगलटवाळीचा आणि विनोदांचा मी आनंद नक्कीच घेतला होता. पण तसं करणं ही चूक कमी आणि माझा मूर्खपणाच जास्त होता हे चंद्रकांत वानखडेंचे "गांधी का मरत नाही" या पुस्तक वाचनानंतर मला प्रकर्षाने जाणवले. पूर्वीपासूनच आवर्जून असे गांधींविषयी जाणून घेण्याची ना कधी इच्छा झाली ना कधी तसा प्रयत्न केला, फक्त ऐकीव गोष्टींवरून स्वतःच्या डोळ्यांसमोर गांधीजींची एक खलनायकी प्रतिमा बनवून टाकली. आजपर्यंत गांधीजींवर लाखो पुस्तके लिहिली गेली पण सध्या वाचनात आलेल्या चंद्रकांत वानखडेंच्या "गांधी का मरत नाही" या पुस्तकाने माझ्या मनात बनलेल्या गांधीजींच्या त्या खलनायकी प्रतिमेवरील पडदा अक्षरशः फाडून टाकला आणि एक वेगळेच गांधीजी डोळ्यासमोर उभे राहिले. आज गांधी जन्माला १५१ वर्षें होऊनसुद्धा सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अजूनही बऱ्याच अफवा, बरेच गैरसमज आहेत. काही लोकांच्या मते गांधीजी मुस्लिमधार्जिणे होते तर काहींच्या मते ते हिंदुधार्जिणे होते, काहींना वाटते गांधी जातीयवाद मानणारे होते, सर्वांवर कळस म्हणजे काहींना गांधी स्त्रीलंपट होते असं वाटतं, गांधी वर्णभेदी होते, त्यांच्यामुळेच देशाची फाळणी झाली, त्यांनीच पाकिस्तनाला ५५ कोटी देण्यास भाग पाडले, त्यांच्यामुळेच भगतसिंग फासावर गेले असं म्हणणाऱ्यांचीही काहीच कमी नाही पण या आणि अशा बऱ्याच गोष्टी चंद्रकांत वानखडे यांनी त्यांच्या "गांधी का मरत नाही" या पुस्तकातील १५ प्रकरणांमधून खोडून काढल्या आहेत. शिवाय गांधी-सावरकर, गांधी-टिळक, गांधी-सुभाषचंद्र बोस यांच्या नात्यांमधे असणाऱ्या समज-गैरसमजांवरसुद्धा वानखडेंनी "गांधी का मरत नाही" मधून प्रकाश टाकला आहे. भलेही या एका पुस्तकातून पूर्ण गांधीजी समजणार नाहीत पण त्यांच्याविषयी असणारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल असं हे चंद्रकांत वानखडेंचे पुस्तक "गांधी का मरत नाही".

"मोहनदास करमचंद गांधी" अर्थातच "महात्मा गांधी" जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात या नावाचा उल्लेख जरी झाला तर डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा म्हणजे धोतर नेसलेला, हातामध्ये काठी घेतलेला, डोळ्यावर गोल चष्मा चढवून आणि चेहऱ्यावर लहान मुलासारखे निर्मळ, मन प्रसन्न करणारे हसू घेऊन उभा असणारा एक वृध्द. आज पूर्ण जगाने ज्यांची दखल घेतली त्या गांधीजींना खरंच आपण ओळखलंय का? खरंच आपल्याला ते समजलेत का? असा प्रश्न पडावा इतके ते आणि त्यांचे विचार आज दुर्लक्षिले जातात. चलनी नोटांवर किंवा प्रत्येक चौकात असणाऱ्या त्यांच्या पुतळ्याच्या रुपात रोज दर्शन देणाऱ्या गांधीजींना पाहून वाटतं की सध्याच्या घडीला ते फक्त यापुरतेच मर्यादित असावेत. कोणत्याही जाती आणि धर्मापलीकडचा हा माणूस नेहमीच फक्त टिंगलटवाळीचा विषय राहिला. त्यांची बदनामी, द्वेष तर इतका पराकोटीचा की खरं काय नी खोटं काय हा प्रश्न पडावा. सातत्याने कोणते ना कोणते आरोप झेलणारे गांधीजी समजायला तसे कठीणच, कोणत्याही प्रकारचे आरोप करायलाही गांधी गरीबच कारण त्यांच्या पाठीशी कोणतीही जात नाही. तर्काबाहेरचे आरोप आणि अतिशय खालच्या पातळीवरची केलेली निंदा मग कालांतराने तीच खरी मानली गेली, पण प्रश्न पडतो त्यांच्या मागे एखाद्या "जातीची" भिंत असती तर असे आरोप त्यांच्यावर त्या जातीच्या भिंतीने लावू दिले असते का? जातीय अस्मितेचा भडका उडेल या भीतीने त्यांच्यावर आरोप करताना जरा जपून केले गेले नसते का? तरीही कधी कधी वाटते गांधींमागे एखादी जात भिंतीसारखी उभी नाही हे खरंतर त्यांचं सर्वात मोठं वैभव आहे कारण आजही लोकमान्य असणाऱ्या टिळकांवर ब्राम्हण मक्तेदारी गाजवतात, महात्मा फुल्यांना माळ्यांचे नेते म्हटले जाते, बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते इतकेच मर्यादित ठेवलं गेलं. परंतु गांधीजींच्या नशिबी हे भाग्य आलेच नाही, ते ना कोणत्या एका धर्माचे राहिले ना कोणत्या एका जातीचे, खरे तर ते एका देशापुरतेही राहिले नाहीत, ते वैश्विक झाले आणि त्यामुळेच त्यांच्यावर बेछूट आरोप करायलाही सोपे होऊन गेले. गांधींच्या बाबतीत दुर्दैव एवढंच की ज्यांच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं, त्यांना त्याची तेवढी जाणीव नाही. त्यामुळेच संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या या महापुरुषाबद्दल सध्या समाजात जो द्वेष, तिरस्कार वाढलेला आहे, वाढत आहे तो खरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. लाखो अनुयायी असणाऱ्या गांधीजींचे मूठभर का होईनात विरोधकही आहेतच. त्यांपैकी कोणीही त्यांच्यावर काहीही बोलू शकतो, शिव्या देऊन तोंडसुख घेऊ शकतो कारण या विरोधात बोलायला गांधींच्या मागे कोणताही एक विशेष समाज किंवा जात उभी राहत नाही. गांधीजींवर सतत आरोपांच्या फैरी उडवल्या गेल्या, हिंदूनीं त्यांना मुस्लिमधार्जिणा ठरवून टाकले तर मुस्लिमांनी त्यांना हिंदूधार्जिणा, पण मग प्रश्न पडतो की गांधी नक्की होते तरी कोण आणि कोणाचे? तर गांधी फक्त आणि फक्त माणूसधार्जिणा होते. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश यांपैकी कोणत्याही चौकटीत न बसणारे, कोणत्याही बंधनात न अडकणारे, या सर्वांपलीकडे जाऊन केवळ माणसांवर प्रेम करणारा एक महात्मा म्हणजे गांधीजी. मग प्रश्न असा पडतो की ज्या गांधींना संपूर्ण विश्व मानतो त्यांना त्यांच्याच देशात काही लोकांच्या एवढ्या द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना कशामुळे करावा लागतो? याच द्वेषापायी त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात आले आणि तरीही आज त्यांचे  पुतळे का तोडले जातात? त्यांचा पुतळा बनवून त्यावर गोळ्या का चालवल्या जातात?अहिंसेची शपथ घेतलेल्या निःशस्त्र गांधींची ३ गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचे आजही या ना त्या मार्गाने समर्थन केलं जातं ते कशासाठी? एकाचवेळी गांधीजी हिंदू हिताचे मारेकरीही असतात आणि मुस्लिमविरोधीही, हे कसे? गांधीजी खरेच इतके वाईट होते तर त्यांच्याच नावाने आजही आपला देश का ओळखला जातो? आज गांधींचा इतका विरोध का होतोय? या सर्व गोष्टींचा विचार केला तर लक्षात येते याला कारणीभूत आहे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्याबद्दल पसरवले गेलेले गैरसमज. चंद्रकांत वानखडे यांनी त्यांच्या पुस्तकातून याच वर्षानुवर्षे पसरत आलेल्या गैरसमजांना तडा दिला आहे.

बॅरिस्टर होऊन सुटाबुटात वावरणाऱ्या मोहनदास करमचंद गांधींचा, राष्ट्रपिता महात्मा गांधी होण्यापर्यंतचा प्रवास १६६ पाने आणि १५ प्रकरणांमधून थोडक्यात पण त्यांच्याबद्दलच्या तमाम गैरसमजांना फाटा देऊन तितक्याच ताकदीने चंद्रकांत वानखडे यांनी लोकांसमोर आणला आहे. आजपर्यंत ऐकत आलो "मजबुरी का नाम महात्मा गांधी" पण चंद्रकांत वानखडे यांनी या पुस्तकातून समोर आणलेले गांधीजी वाचत असताना लक्षात येते की "सामर्थ्याचेच नाव महात्मा गांधी होते, आहे आणि पुढेही राहील". अत्यंत पराकोटीचा द्वेष आणि तेवढेच भरभरून प्रेम या दोहोंच्या मधे मिश्कीलपणे हसत उभा असणारा हा चेहरा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. कारण "गांधी मरत नाही".

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे पुस्तक "गांधी का मरत नाही".





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, January 19, 2021

"खेकडा"

 


लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे रत्नाकर मतकरी. रंगभूमी आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला पण दुर्दैवाने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मराठी साहित्यविश्वातील "रत्नाकर" नावाचं हे "रत्न" कायमचं निखळून पडलं. रत्नाकर मतकरी यांनी मराठी साहित्यामधे गूढकथा हा प्रकार आणला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके, एकांकिका, नाटके लिहिली पण ते खास लक्षात राहतात ते त्यांनी लिहिलेल्या गूढकथांमुळे. जवळपास २०० पेक्षा जास्त गूढकथा त्यांनी लिहिल्या आणि कथासंग्रहाच्या रूपाने वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहचल्या. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके गहिरे पाणी, बकासुर, कबंध, रंगांधळा, अ‍ॅडम, रंगयात्री, अंतर्बाह्य आणि इतरही बरीच. "अंतर्बाह्य" हा मी वाचलेला त्यांचा पहिला गूढकथासंग्रह, ज्यामधील कथांचा गूढपणा वाचत असतानाच त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीची जाणीव झाली आणि त्यांच्या इतर पुस्तकांबद्दलसुद्धा एक उत्सुकता जागी झाली. त्या उत्सुकतेतूनच वाचनात आलेला, त्यांच्या पुस्तकांच्या पंक्तीतील आणखी एक दर्जेदार गूढकथा संग्रह म्हणजे "खेकडा".

१० कथांच्या या संग्रहातील पहिलीच कथा म्हणजे "खेकडा" जी फिरते एका छोट्याशा अपंग मुलगीभोवती. आईविना जगणाऱ्या त्या मुलीचे तिच्या पित्याच्या प्रेयसीने उपहासाने आणि अपंगत्वातून झालेल्या तिच्या शरीराच्या अवस्थेमुळे तिला ठेवलेलं नाव "खेकडा". या पहिल्या कथेपासूनच रत्नाकर मतकरींच्या कथा वाचकाला घेरायला चालू करतात आणि आपल्याला गूढकथांच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात, ज्या वाचत असताना त्यांच्या सर्वच कथांमध्ये दाटून राहिलेलं भय वाचकाला पानापानावर जाणवत राहतं. प्रत्येक कथेमधील भय हे वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे तर आहेच शिवाय बऱ्याच ठिकाणी या गूढकथा ज्या पात्राभोवती फिरतात त्या पात्राबद्दल नकळत वाचकाच्या मनात सहानुभूतीसुद्धा निर्माण करतात. हे मतकरींच्या गूढकथांचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य. पुस्तकातील प्रत्येक गूढकथा वाचकाला एकप्रकारे आपल्या प्रवासात सोबत घेऊनच पुढे सरकते. त्यामुळेच वाचकाचे मन झपाटून टाकण्याची शक्ति असणाऱ्या या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो. "खेकडा" या पहिल्या कथेपासून सुरू होऊन "तुमची गोष्ट" या कथेने या पुस्तकाचा शेवट होतो. तो शेवटसुद्धा इतका विलक्षण की जो वाचत असताना वाचक शहारून जावा. "तुमची गोष्ट" या कथेच्या सुरुवातीलाच मतकरी सांगतात की ही "तुमची गोष्ट आहे, म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी गोष्ट" आणि शेवटीही निक्षून सांगतात, "तुमची म्हणून सांगीतलेली  ही गोष्ट तुमची नव्हेच, मी आपली एक शक्यता सांगितली एवढेच ", पण तरीही या शेवटच्या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन मतकरींनी दिलेलं आहे त्याचा प्रभावच इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श वाचकाच्या मनाला नसूनही आपल्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना वाचक अनुभवतो. प्रत्येक कथेला एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या वळणावर घेऊन जाऊन वाचकाला मिळणाऱ्या अनपेक्षित धक्क्यातून होणारा शेवट हे मतकरींच्या कथांचे वैशिष्ट्य इथेही प्रकर्षाने जाणवते. या दोन कथांव्यतिरिक्त इतरही कथा जशा "कुणास्तव कुणीतरी", "अंतराय", "कळकीचे बाळ", "पावसातला पाहुणा", "शाळेचा रस्ता", "ती, मी आणि तो", "निमाची निमा", "एक विलक्षण आरसा", आणि "आल्बम" या एकाहून एक गूढ कथा वाचकाला स्तब्ध करून टाकतात. यातील प्रत्येक कथेचा शेवटसुद्धा वाचकाच्या विचारा पलीकडचा, अनपेक्षित धक्का देणारा आणि बराच वेळ डोक्यात घोळत राहणारा असा.

गूढकथांची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं पण त्याचबरोबर इतरांनीसुद्धा आवर्जून वाचण्यासारखं असं हे रत्नाकर मतकरी यांचं पुस्तक "खेकडा".






संदीप प्रकाश जाधव

Tuesday, January 12, 2021

"व्यक्ती आणि वल्ली"

 


लेखक : पु. ल. देशपांडे

प्रकाशक : मौज प्रकाशन


पु. ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाई. मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक असं रत्न ज्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. वाचनाची आवड असो वा नसो पु.लंच्या एखाद्या तरी पुस्तकाचे नाव प्रत्येक मराठी माणूस नक्कीच सांगू शकेल इतके ते आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहचले. पु.लंच्या लेखणीची ताकद न अनुभवणारे लोक अगदी अपवादानेच सापडतील. अगदी सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लेखनाची जादूच अशी आहे की आपण मनाच्या आनंदी अवस्थेत पु.लंचे एखादे पुस्तक जर वाचले तर आपला आनंद द्विगुणित होईल तसेच जर दु:खी अवस्थेत वाचले तर त्या दु:खाची तीव्रता खूप कमी होईल आणि या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वाचकांनी घेतलाही असेल. पु.लंनी त्यांच्या आयुष्यात अनेक लेख, कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या त्यांपैकीच एक अतिशय सुंदर आणि अजरामर पुस्तक म्हणजे "व्यक्ती आणि वल्ली". हे पुस्तक म्हणजे पु.लंनी लिहिलेल्या १८ काल्पनिक व्यक्तिरेखांचा एक संग्रहच आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक बहुरंगी, बहुढंगी माणसं भेटत असतात. अगदी सामान्य आयुष्य जगत असणाऱ्या अशा बऱ्याच व्यक्ती आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगून - शिकवून जातात पण सामान्यांच्या आयुष्यातील या असामान्य वल्लींना अजरामर केलं ते पु. ल देशपांडेंच्या "व्यक्ती आणि वल्ली" या पुस्तकाने. या पुस्तकातील व्यक्तीरेखा जरी पु.लंच्या कल्पनेतून अवतरल्या असल्या तरी हे पुस्तक आपल्याला अंतू बर्वा, सखाराम गटणे, नारायण, चितळे मास्तर, नंदा प्रधान अशा अनेक पात्रांशी साधर्म्य असणाऱ्या आपल्या आयुष्यातील अनेक लोकांना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते तसेच नकळतपणे आपण आपल्या आसपास वावरणाऱ्या अशा अवली पात्रांचा शोध घ्यायलासुद्धा नक्कीच सुरूवात करतो.

"व्यक्ती आणि वल्ली" या १८ विविध व्यक्तिचित्रांच्या संग्रहातून पु.लंनी सामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या विसंगत आणि विचित्र अनुभवांना अतिशय विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून दिला आहे. पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. अतिशय मिश्किल अशी शैली आणि तितक्याच निर्मळ विनोदाच्या मांडणीमुळे वाचकाच्या मनाची मरगळ दूर होते. काही संवाद वाचत असताना नकळत चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित येते तर काही संवाद खदखदून हसवून जातात. प्रत्येक पात्राचे वर्णन इतकं जबरदस्त की त्यातून ते पात्रच वाचकाच्या समोर येऊन उभे रहावे. मन प्रसन्न करणारे हलकेफुलके संवाद वाचकाला त्या पात्राच्या आणखीनच जवळ घेऊन जातात. पुलंच्या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार या "व्यक्ती आणि वल्ली" पुस्तकात आपल्याला पाहायला मिळेल. तसे पु.लंनी पुस्तकातील सर्वच्या सर्व १८ पात्रे अतिशय अफलातून रंगवली आहेत पण मला अंतूबर्वा ही वल्ली थोडी जास्तच आवडली. "वल्ली" म्हणजे "नमुना" असा पु.लंना अभिप्रेत असणारा अर्थ, पु.लंनी आपल्यासमोर आणलेला या पुस्तकातील प्रत्येक "नमुना" इतका प्रभावी आहे की १९६५ मधे संग्रहित झालेली ही व्यक्तिचित्रे आजही तितकीच ताजी - टवटवीत वाटतात.

प्रत्येकाने वाचावे आणि आवर्जून संग्रही ठेवावे असे हे पु. ल. देशपांडे यांचं पुस्तक "व्यक्ती आणि वल्ली".





संदीप प्रकाश जाधव

Monday, January 4, 2021

"विश्वस्त"



लेखक : वसंत वसंत लिमये

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


रहस्यकथा किंवा रहस्य कादंबरी वाचकाला नेहमीच एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि ती रहस्य कादंबरी जर एखाद्या ऐतिहासिक घटनेला, स्थानाला किंवा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेली असेल तर त्याचं एक वेगळंच वलय वाचकाभोवती तयार होतं जे नेहमीच शब्दांत वर्णन न करता येण्यासारखं असतं. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या इतिहासाबद्दल असणारं एक कुतूहलमिश्रित आकर्षण. मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही मी वाचलेली पहिली "ऐतिहासिक रहस्यमय कादंबरी" आजही ज्याचा विचार जरी मनात आला तरी त्यातील घटनांचे संदर्भ आठवून डोक्यात एक विचारचक्र सुरू होते. असाच काहीसा अनुभव "प्रतिपश्चंद्र" आणि "महाभारताचे रहस्य" या दोन ऐतिहासिक रहस्यमय कादंबऱ्या वाचनानंतरही आला. भारतासारख्या देशाचा अगदी रामायण-महाभारतापासून ते पेशवाई पर्यंतचा इतिहास हा नेहमीच एक स्वतंत्र संशोधनाचा विषय राहिला आहे आणि सामान्य लोकांसाठी तो कुतूहलाचा. अशाच एका महाभारतकालीन घटनेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी "विश्वस्त". महाभारत काळातील सर्वांच्या परिचयाचं किंबहुना अनेकांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या बालपणातील, तरुणपणातील अनेक पराक्रम आपण कथांच्या रुपात अगदी लहानपणापासून ऐकत-वाचत आलो आहोत. मात्र "विश्वस्त"च्या निमित्ताने कृष्णाचा वृद्धापकाळ आपल्यासमोर येतो. कृष्णाला मिळालेल्या शापामुळे आपल्या वारसदारांचा, यादवांचा आपापसांत लढून स्वतःच्या डोळ्यादेखत होणारा शेवट पाहत असतानादेखील पुढच्या अनादि-अनंत काळातील आपल्या पिढ्यांसाठी कृष्णाने करून ठेवलेली तजवीज म्हणजेच ही कादंबरी "विश्वस्त". श्रीकृष्णाच्या असीम दूरदृष्टीची कथा म्हणजेच वसंत वसंत लिमये यांची ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी लिहिलेल्या या कथानाकाचा पाया आहे महाभारतकालीन अतिशय वैभवसंपन्न असं साम्राज्य असणारी श्रीकृष्णाची द्वारका. परंतु द्वारका बुडत असताना द्वारकेचे प्रचंड वैभव देखील बुडाले असेल का? आणि जर ते वैभव बुडाले असेल तर ते सध्या कुठे आहे? द्वारका बुडण्यापूर्वी "विश्वस्त" म्हणजेच श्रीकृष्णाने द्वारकेचे ते अफाट वैभव वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले असतील का? आणि तसे प्रयत्न जर केले गेले असतील तर ते पूर्ण झाले असतील का? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ऐतिहासिक संदर्भाना कल्पनेची जोड देऊन आज वर्तमानकाळात केले गेलेले प्रयत्न म्हणजेच ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी "विश्वस्त".

पुण्यातील एका कॉफीशॉपमधे जमणारा, इतिहासाची आवड असणारा आणि त्या आवडीतूनच ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा एक ग्रुप "जे एफ के" म्हणजेच 'जस्ट फॉर किक'. या ग्रुपमधील जोआन, अनिरुद्ध, प्रसाद, शब्बीर (शॅबी), मकरंद (मॅक) ही महत्त्वाची पात्रे तसेच अनेक ऐतिहासिक संदर्भ, वर्तमानकाळातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय-सामाजिक चालू घडामोडी या सर्वांतून साकार झालेली अत्यंत थरारक, रोमांचक अशी ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी या कादंबरीत भारतीय प्राचीन काळ, त्याकाळातील घडलेल्या काही घटना, त्यांचे समकालीन संदर्भ आणि पुरातत्वीय संदर्भ यांची सांगड घालून वाचकाची रंजकता अगदी शेवटच्या पानापर्यंत टिकून राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काळाची चौकट मोडून ऐतिहासिक संदर्भ आणि कल्पना यांचा मिलाफ कांदबरीत अतिशय उत्तमरित्या जमवून आणला आहे. श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका आणि द्वारकेचं प्रचंड वैभव यासोबत अनेक महाभारतकालीन गूढ रहस्ये नेमकेपणाने, कौशल्याने उलगडण्यात आली आहेत. जेएफके ग्रुपला ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडारच्या भटकंतीत एक वस्तू सापडल्यानंतर सुरू होतो या कादंबरीचा एक भन्नाट, रोमांचक प्रवास. द्वारकेचे वैभव शोधण्याच्या या प्रवासात जेएफके टिमने केलेल्या इतरही मोहिमा जसे विजयदुर्गची मोहिम, मुंबईतील जमिनीखालील भुयारे शोधण्यासाठी केलेली धडपड यांचेही अगदी विस्तृत आणि रोमांचक वर्णन कादंबरीत वाचायला मिळेल. ‘विश्वस्त’ व ‘वारसदार’ या दोन संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन कृष्णाच्या काळापासून ते आज वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांचा सांधा जोडण्याचा प्रयत्न वसंत लिमये यांनी "विश्वस्त"मध्ये केला आहे. हे करत असताना लिमये यांनी यादवीनंतर द्वारकेमध्ये माजलेले अराजक, प्रलयंकारी वादळानंतर बुडालेली द्वारका, चाणक्य, चंद्रगुप्त, भारतावर झालेले महमद गझनीचे आक्रमण, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा केलेला जिर्णोद्धार, २०१४ ची मोदींची लोकसभा निवडणूक, संघाची भूमिका या सर्वांना एका काल्पनिक साखळीत बांधले आहे. मोदी आणि संघ यांच्यासाठी कादंबरीमध्ये नावे भलेही वेगळी घेतली असली तरी वाचकाला त्यांचा संदर्भ सहज लक्षात येतो.

एखाद्या ऐतिहासिक रहस्यमय कादंबरीला शोभेल अशीच या कादंबरीची सुरुवात अतिशय संथ आहे. बऱ्याच ठिकाणी ती विनाकारण ताणलेलीसुद्धा वाटते, परंतु तरीही वाचक कथेसोबत जोडलेला राहतो. विविध पात्रांचा परिचय करून देत असताना महाराष्ट्रातील ट्रेकिंगची स्थाने, कोकण, शिवाजी महाराजांचा इतिहास अशी वेगवेगळी वळणे घेत अमेरिका, इंग्लंड, गुजरात अशा अनेक ठिकाणी घडणाऱ्या थरारक घाटनांतून कादंबरी पुढे सरकत राहते. भारतीय नौदलापासून ते इतिहास संशोधनातील चोरी, आध्यात्मिक संप्रदायातील गुन्हेगारी अशा अनेक प्रसंगांतून वेगवेगळ्या मानवी स्वभावांचे दर्शन  लिमये यांनी या कादंबरीतून करून दिले आहे. हळूहळू कादंबरीचा हा प्रवास इतका वेग पकडतो की, वाचक त्या कथेसोबत ओढला जातो. वाचकाला धक्क्यामागून धक्के बसत असताना एक उत्कंठावर्धक कादंबरी एवढेच त्याचे स्वरूप न राहता आपला इतिहास जिवंत रूपात पुढे येत राहतो. महाभारतातील काळ आपल्यासमोर जिवंत होऊन पुढे उभा राहतो. चाणक्याचा काळ हा आपण आपला इतिहास मानतो परंतु महाभारताचा काळ म्हणजे एक पौराणिक कथा असंच आपण आजपर्यंत ऐकत-वाचत आलो आहोत. पण चाणक्याच्या काळापूर्वी आपल्या देशाला इतिहास नव्हता का हा विचार सहसा केला जात नाही? जर तो इतिहास असेल तर तो काय होता? याचा विचार करायला लावणारी अशी ही कादंबरी "विश्वस्त". वसंत लिमये यांनी या कादंबरीमध्ये भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक ठिकाणांची ऐतिहासिक आणि पौराणिक दाखले देत एक गुंफण केली आहे जीला कल्पनेची जोड असली तरी त्याची अतिशयोक्ती कुठेच जाणवत नाही. एकदा हातात घेतलेली ही कादंबरी संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटतच नाही इतका वाचक या प्रवासात हरवून जातो. 

अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी वसंत लिमये यांची एकदा आवर्जून वाचावी अशी कादंबरी "विश्वस्त".




संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये