Monday, February 22, 2021

"रहस्य"

 


लेखक : गणेश महादेव

प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स


कोणत्याही प्रकारचे "रहस्य" हे प्रत्येक माणसासाठी एक कुतूहलाचा विषय असतो आणि त्यामुळेच अशा विषयांवर लिहिलेली पुस्तके नेहमीच वाचकांच्या पसंतीस उतरत असतात. गणेश महादेव यांची "रहस्य" ही कादंबरी अशा वाचकांसाठी जणू खजिनाच आहे. १० प्रकरणे आणि २५४ पानांमधून उलगडत जाणारी या कादंबरीची कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. निसर्ग - निसर्गाचे नियम, अध्यात्म - आधुनिक विज्ञान, सत्प्रवृत्ति - दुष्प्रवृत्ति या सर्वांना एका धाग्यात बांधून गणेश महादेव यांनी "रहस्य" ही अतिशय सुंदर कादंबरी साकारली आहे. आजपर्यंत जितक्या काही रहस्यकथा,कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या त्या प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे वाचकाला गुंतवून ठेऊन, अनपेक्षित धक्क्यातून पुढे सरकणारे कथानक आणि शेवटी होणारा अपेक्षित शेवट. पण गणेश महादेव यांची "रहस्य" कादंबरी याला अपवाद वाटली कारण कोणताही अनपेक्षित धक्का न देता अगदी सरळमार्गी जाणारी कथा, तरीही वाचक त्यामध्ये गुंतलेला राहून शेवटपर्यंत कथेसोबत जोडला राहतो, शेवटपर्यंत त्याची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा वाढतच राहते. कादंबरी वाचत असताना याचा शेवट काय होऊ शकतो किंवा काय होणार हा अंदाज सतत येत राहतो पण तरीही कथेची मांडणी जी गणेश महादेव यांनी केलेय, जी वातावरण निर्मिती त्यांच्या लिखाणातून झाली आहे त्यामुळे वाचक शेवटपर्यंत कथेत अडकून राहतो. इतिहास, अध्यात्म आणि तंत्रविद्या याभोवतीच जरी कादंबरीची कथा फिरत असली तरी आधुनिक म्हणजेच वर्तमान जगाचे संदर्भ कायम ठेऊन कथा लिहिली असल्याने ती वाचत असताना वाचक एका वेगळ्याच अनुभवातून जातो आणि कथेतील इतर पात्रांसोबतच आपल्याला देखील ते "रहस्य" खुणावत राहते. 

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या होळकर घराण्याचं शेंडेफळ हर्षवर्धन होळकर हा या रहस्यकथेचा नायक. हर्षवर्धन जरी या कथेचा नायक असला तरी आबासाहेब होळकर, राजराजेश्वर गोसावी, बाबसा जंगम, कृष्णा जंगम, आर्यभाती, संजीवननाथ, अघोरी कपाली, प्रा. गोरक्षनाथ जाधव, सर्जेराव होळकर आणि त्याचा मुलगा संपतराव होळकर या सर्वांचा कथेतील सहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे किंबहुना यांच्याशिवाय ही कथा पूर्णच नाही होऊ शकत. होळकरांचा ऐतिहासिक वाडा, मार्तंडगड, चंद्रगड, भैरवगड आणि या सर्वांच्या आसपासच्या प्रदेशात असणाऱ्या रहस्यांचा शोध म्हणजेच ही कादंबरी "रहस्य". मार्तंडगडचा राजा अधिरवर्मन याचा त्याच्याच सेनापती रुधिरवर्मनकडून धोक्याने झालेला खून आणि त्यानंतर अधिरवर्मनचा विश्वासू गुप्तहेर चंद्रगुप्ताने रुधिरवर्मनचा युद्धात केलेला पराभव अशी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी कथेला देऊन लेखकाने वाचकला इतिहास आणि वर्तमानकाळात गुंतवून ठेवलंय. भक्ती, शक्ती, तंत्रविद्या, मंत्रसामार्थ्य, तपश्चर्या, सिद्धी अशा अनेक संदर्भातून पुढे सरकरणारे हे कथानक आणखीनच रहस्यमय होऊन जाते. काही काही ठिकाणी अतिरेक वाटावा इतके रहस्यमय संदर्भ कथेत दिले गेले आहेत पण कादंबरीची कथाच रहस्यावर आधारित असल्यामुळे ते योग्यही वाटतात. वाड्यातील जुनी कागदपत्रे चाळत असताना हर्षवर्धनला सापडलेला अगम्य भाषेतील ग्रंथ आणि त्यानंतर हर्षवर्धनच्या स्वप्नात येणारा साधू, बारवेच्या तळातील गुपित, त्यामधील प्राचीन मायावी यंत्र, आबांसोबत पोहायला गेल्यानंतर हर्षवर्धनला बारवेच्या तळाशी दिसलेला प्रकाशझोत, वाड्यातील जिन्याखाली असणारा गुप्त मार्ग, गुप्त खोलीचा जीवघेणा शोध, सुक्ष्मदेह धारण करणारा गोसावी, अघोरी तंत्रसाधना आणि त्यात दिला गेलेला नरबळी, चुकलेल्या तंत्रसाधनेमुळे संपतरावाची झालेली भ्रमिष्ट अवस्था, मार्तंडगड आणि चंद्रगडाच्या गुप्त संरचना, गुप्त वाटा, अभिमंत्रित जलपंचायतन यंत्र, या सर्वांवर असणारा भैरवगडावरील संजीवन नाथांचा अदृश्य पहारा, पाड्यातील ओढ्याशेजारील स्मशानभूमीत अघोरीकडून होणारी तंत्रसाधना अशा एक ना अनेक गोष्टींमुळे या रहस्यकथेला एक वेगळंच वलंय प्राप्त होते. नकळत वाचक त्या वातावरणात ओढला जातो. गणेश महादेव यांनी त्यांच्या लेखनातून या सर्व गोष्टी वाचकाच्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. कादंबरीत उल्लेख झालेलं ३००० वर्षांपूर्वीचे शिवलिंग, नाथ संप्रदाय आणि त्याच्या स्थापनेचा इतिहास, ऋग्वेदातील १२ रुद्र, शिवाय होळकर घराण्याचा इतिहास आणि त्यांचं मार्तंडगड - चंद्रगड यांच्याशी असणारं नातं, हर्षवर्धनच्या काकांचं या रहास्याच्या शोधात अचानक नाहीसं होणं या सर्व गोष्टी कथेला आणखीनच गूढ बनवतात.

गणेश महादेव यांनी केलेला मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग आणि चाकोरीबाहेरील एक भन्नाट रहस्यमय कादंबरी म्हणून वाचण्यासारखे पुस्तक "रहस्य".




संदीप प्रकाश जाधव

Monday, February 15, 2021

"बेरड"


लेखक : भीमराव गस्ती

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


दया पवारांचं "बलुतं" हे दलित आत्मचरित्र मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. मनाला अतिशय अस्वस्थ करणारं आणि आतून बाहेरून अक्षरशः हलवून टाकणारं असं हे आत्मचरित्र पण तितकंच प्रेरणादायी सुद्धा. जातीव्यवस्थेच्या नावावर होणारा भेदभाव आपल्या समाजात किती घट्ट रुतून बसलाय याची जाणीव दया पवारांचं "बलुतं" वाचताना झाली. आजही अशा भेदभावाची बरीच उदाहरणे आपल्याला "प्रगतशील भारतात" सहज  सापडतील. पण जेव्हा अशा कर्मठ, जाचक रूढी-परंपरा आणि समाजव्यवस्था यांना झुगारून, प्रचंड मेहनतीने स्वतःला सिद्ध करणारा एखादा दलित त्याच जातीव्यवस्थेसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनतो तेव्हा याच समाजव्यवस्थेतील विरोधाभास लक्षात येतो. दया पवारांच्या "बलुतं" नंतर माझ्या वाचनात आलेलं "बेरड" हे भीमराव गस्ती यांचं आणखी एक दलित आत्मचरित्र, तितक्याच तोडीचं आणि तितकंच प्रेरणादायी. दोन्हीही जरी दलित आत्मचरित्रे असली तरीही दोघांची तुलना करणं तसं चुकीचंच ठरेल कारण दोघांना आलेले अनुभव, दोघांचा संघर्ष हा पूर्णपणे भिन्न पातळीवरचे आहेत. भीमराव गस्ती यांनी बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण त्यांच्या '"बेरड" या आत्मचरित्राच्या रुपात आपल्यासमोर आणले आहे. "रामोशी" हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते चोरी, दरोडा, लूटमार करणारे लोक. आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरदेखील याच एका गोष्टीसाठी त्यांची असणारी ओळख आपल्याला समजण्यास पुरेशी आहे की हे लोक समाजापासून आजही किती तुटलेले राहिलेत. "रामोशी" ही महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. जंगलाच्या आसऱ्याने राहणारे हे लोक. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आढळून येणाऱ्या या "रामोशी" समाजाचे कर्नाटकच्या सीमावर्ती भागातदेखील तुरळक प्रमाणात अस्तित्व आहे आणि तिथे कर्नाटकात यांना ओळखलं जातं ते "बेरड" या नावाने. "बेरड" हे पुस्तक आत्मचरित्रापेक्षा एका संपूर्ण समाजाचे जीवन आणि ते जीवन सुसह्य होण्यासाठी गस्ती यांनी उभ्या केलेल्या चळवळीचीच कहाणी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. ज्या समाजात जन्माला येणारा प्रत्येकजण भले तो स्त्री असो वा पुरुष आपल्या माथी गुन्हेगाराचा शिक्का घेऊनच जगायला सुरुवात करतो. पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या यादीत आपोआपच ज्यांचे नाव जाते. गुन्हा केला असो व नसो "रामोशी", "बेरड" म्हणजे गुन्हेगारच! अशा समाजातून पुढे येऊन गस्ती यांनी स्वतःला सिद्ध तर केलंच शिवाय आपल्या समाज बांधवांच्या वाट्याला पिढ्यांपिढ्यापासून येणारा त्रास कमी होण्यासाठी आणि त्यांना इतर समाजांच्या प्रवाहासोबत आणण्यासाठी चळवळीच्या रुपात आयुष्यभर जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. या समाजाच्या वाट्याला आलेल्या, अंगावर शहारे आणणाऱ्या जळजळीत अत्याचाराच्या कहाण्या गस्ती यांच्या आत्मचरित्राच्या रुपात वाचत असताना आपल्याला पडणारा प्रश्न, एखाद्याच्या आयुष्यात असं आणि इतकं कसं घडू शकतं? आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे स्वतः इतके सहन करूनही एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांचे जीवन कसे सुसह्य होईल याचाच विचार कसा करू शकतो? बेरड जातीच्या लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या, जेष्ठ साहित्यिक, समाजसेवक अशी समाजात ओळख असणाऱ्या डॉ. भीमराव गस्ती यांच्या संघर्षाची कहाणी म्हणजेच हे पुस्तक "बेरड", त्याचबरोबर "रामोशी" किंवा "बेरड"  यांसारख्या शोषित, दुर्बल जातीच्या लोकांवर होणारे अन्याय कमी होऊन त्यांनाही प्रतिष्ठा मिळावी आणि इतर समाजातील  लोकांप्रमाणेच त्यांनाही माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा, उभारलेली चळवळ म्हणजेच हे आत्मचरित्र "बेरड".

मुळातच हुशार असणाऱ्या भीमराव गस्ती यांनी वडिलांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या भक्कम पाठिंब्यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यावर असणाऱ्या "बेरड" या जातीच्या शिक्क्यामुळे पावलापावलावर त्यांना संघर्ष करतच शिक्षण घ्यावे लागले, काही वेळा तर न केलेल्या गुन्ह्यांसाठी देखील शिक्षा सहन करावी लागली. तरीही ते शिकत राहिले. इलेक्ट्रॉनिक्ससारख्या विषयातील त्यांनी  मिळवलेली पदव्युत्तर पदवी आणि याच विषयातील रशियन विद्यापीठातील डॉक्टरेट मिळवलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीला कुठेही बक्कळ पगाराची नोकरी करून सामान्य माणसासारखे सरळ आयुष्य जगणे सहज शक्य होते. पण या सर्व सुखाचा त्याग करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बेरड समाजासाठी वाहून घेतलं. बेरड लोकांचे जीवन सुधारावं म्हणून स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता रात्रंदिवस कष्ट घेतले. कोणताही पाठिंबा नसताना चळवळ उभी केली. देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि अंधश्रद्धा, रूढी-परंपरांनी जखडलेल्या "बेरड-रामोशी" समाजाच्या विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रसंगी स्वतःच्याच लोकांचा विरोध सहन केला. लहानपणापासूनच बेरडांवर होणारा अन्याय, अत्याचार त्यांनी स्वतः अनुभवला होता, पोलिसांकडून सतत होणारे अत्याचार, त्यांची बेरडांवर असणारी प्रचंड दहशत त्यांनी खूप जवळून पहिली होती त्यामुळे या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं पण खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढील कार्याचा पाया रचला गेला तो त्यांच्या मोठ्या भावाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर. पुढे शिक्षण पूर्ण करून ते पूर्णवेळ या सामाजिक कार्यात उतरले. बेरडांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले, बऱ्याच पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या, वेगवेगळ्या दलित नेत्यांना मंचावर आणून परिषदा घेतल्या, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना सतत पत्रे लिहिली, प्रसंगी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतः भेटी घेतल्या. बेरडांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ते वेगवेगळ्या मार्गांनी सतत वाचा फोडत राहिले. काही स्वार्थी लोकांचा त्यांच्या या कार्याला असणाऱ्या विरोधातून त्यांच्यावर जीवघेणे हल्लेसुद्धा झाले पण तरीही न डगमगता ते या समाजाच्या विकासासाठी झटतच राहिले. बेरड लोकांची संघटना उभी करून त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संघर्ष करत असताना गस्ती यांना आलेले अनुभव पुस्तकात वाचताना मन सुन्न होऊन जाते. पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना तर वाचकाच्या डोळ्यात पाणी घेऊन येतात. आपल्या या निस्वार्थी कार्याला आतून आणि बाहेरून असणारा प्रचंड विरोध सहन करत, येणाऱ्या प्रत्येक संकटाला न डगमगता धैर्याने सामोरे जाताना गस्ती यांनी दिलेल्या लढ्याची व्याप्ती पुस्तकात वाचताना अंगावर शहारे येतात.

"बेरड" ही भीमराव गस्ती यांच्या संघर्षाची, एकाकी लढ्याची कहाणी जितकी प्रेरणादायी तितकीच वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणारी अशी आहे. आवर्जून वाचण्यासारखे आणि संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक.







संदीप प्रकाश जाधव

Monday, February 8, 2021

"आवरण"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" या अतिशय सुंदर कादंबरीनंतर माझ्या वाचनात आलेली "आवरण" ही त्यांची दुसरी कादंबरी. त्यांच्या लिखाणाचं वेगळेपण "साक्षी" या कादंबरी वाचनावेळीच जाणवलं होतं आणि त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली "आवरण" ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना. भैरप्पांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पुस्तक मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. भारतासारख्या अतिशय प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असणाऱ्या देशावर शेकडो वर्षांपूर्वी बऱ्याच परकीय मुस्लिम राजांनी आक्रमणे केली, सत्ता काबीज करून राज्य केलं. त्यांपैकी क्वचितच एखादा अपवाद वगळता सर्वच मुस्लिम राजांनी भारतातील हिंदूंवर इस्लाम लादून त्यांचे जबरदस्तीने इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. तरीही वेगवेगळ्या मुस्लिम बादशहांनी शेकडो वर्षें प्रयत्न करूनही हजारो वर्षांचा वारसा असणारी हिंदू संस्कृती, परंपरा, हिंदू धर्म टिकून राहिले. हिंदू धर्मातील लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सर्वच मुस्लिम राजांनी एकच पद्धत वापरली आणि ती म्हणजे हिंदूंची प्रार्थनास्थळे नष्ट करणे, मंदिरे उध्वस्त करणे. यातूनच पुढे औरंजेबाने कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाचे मंदीर जमीनदोस्त करून त्याजागी त्याच मंदिराचे खांब वापरून "ग्याणवापी मस्जिद" उभारली. यातून दुखावला गेलेला हिंदू हळूहळू एकवटू लागला आणि शेवटी इस्लामी सत्ता उलथवून टाकली. हे सत्तांतर होत असताना आणि झाल्यानंतरदेखील इतिहासात असं एकही उदाहरण नाही सापडणार जिथे हिंदू राजाने मुस्लिम लोकांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलंय किंवा त्यांची प्रार्थनास्थळे नष्ट केलीत. एस. एल. भैरप्पांनी याच मुस्लिम आक्रमणाला आणि काशी विश्वनाथ मंदिराच्या विध्वंसाला केंद्रस्थानी ठेवून, बरेच ऐतिहासिक संदर्भ देऊन अगदी तटस्थपणे लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी "आवरण". काही सेक्युलर लोकांना हे वाटणं साहजिक आहे की भैरप्पांनी या कादंबरीतून मांडलेले ऐतिहासिक मुद्दे, ऐतिहासिक घटना आज वर्तमानकाळात वावरताना भारतातील हिंदू-मुस्लिम सलोख्याला घातक ठरू शकतात पण त्यांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागे इतिहासात कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे लोक जबाबदार नाहीत हे जरी खरं असलं, तरी "आपण त्यांचे वारसदार" आहोत अशा भावनेत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या कर्माची जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे हेही तितकेच खरे आहे. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हेसुद्धा परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी अशी ही गोष्ट भैरप्पांनी त्यांच्या या कादंबरी "आवरण" मधून लोकांपुढे आणली आहे. "आवरणचे" आणखी एक वेगळेपण म्हणजे या कादंबरी मधेच जन्म घेणारी आणखी एक कादंबरी.

"आवरण" ची नायिका आहे पूर्वाश्रमीची लक्ष्मी, धर्मपरिवर्तन करून मुस्लिम झालेली रझिया. १९९२ ला बाबरी मशिद पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत असते आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट बनवण्याचे काम आमिर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपवण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी जेव्हा ते दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात तेव्हा तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया म्हणजेच लक्ष्मी अंतर्मुख होऊन जाते आणि इथूनच फ्लॅशबॅक मधे सुरुवात होते या कादंबरीची. वर्तमानासोबतच इतिहासामध्ये डोकावत चालू झालेला या कादंबरीचा प्रवास वाचकाला अक्षरशः घेरून टाकतो, त्या फ्लॅशबॅक मधील प्रवासात वाचक कधी ओढला जातो हे त्याला लक्ष्यात येईपर्यंत एक विचारचक्र वाचकाच्या डोक्यात चालू होऊन जाते आणि प्रस्तावानेपासूनच चालू झालेले हे विचारचक्र पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ तसेच राहते. पूर्वाश्रमीची हिंदू असणारी रझिया, आमीरच्या प्रेमात पडल्यानंतर घरातून असणारा वडिलांचा विरोध झुगारून, पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे धर्मांतर करून मुस्लिम बनते आणि आमीरसोबत लग्न करते. आमीरच्या आधुनिक विचारांमुळे  आपले धर्मस्वातंत्र्य अबाधित राहिल हा तिचा विश्वास लग्नानंतर काहीच दिवसात फोल ठरतो. मुस्लिम धर्मातील जाचक चालिरिती आणि रुढी, खास करून स्त्रियांची केली जाणारी मुस्कटदाबी आणि आमीरने दिलेली तलाकची धमकी यामुळे ती हादरून जाते. अशा वातावरणात विजयनगरमधील हिंदू मंदिरांचा विध्वंस बघून दुखावलेली लक्ष्मी आमीरसोबत माहितीपट बनवण्यास नकार देते. याचदरम्यान गावाकडे एकटेच राहणाऱ्या लक्ष्मीच्या गांधीवादी विचारांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी येते. इथून खऱ्या अर्थाने कादंबरीला कलाटणी मिळते आणि कादंबरी वेग पकडते. एका वेगळ्याच मार्गाने, लक्ष्मीच्या मनात सुरू झालेल्या वैचारिक द्वंद्वाने कादंबरीचा प्रवास सुरु होतो. लक्ष्मीने मुस्लिम धर्मात जाऊन विवाह केल्यानंतर तिच्या वडिलांनी म्हणजेच आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची भारतावर झालेली आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर केलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचादेखील त्यांचा विचार असतो, पण त्यांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूने ते काम अपूर्ण राहून जाते. आपल्या वडिलांनी, अप्पांनी जमवलेली ग्रंथसंपदा आणि त्यांचा अभ्यास करून त्यांनी काढून ठेवलेली टिपणे पाहून लक्ष्मी आश्चर्यचकित होते. वडिलांनी जमविलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून आणि त्यांनी काढलेल्या टिपणांच्या सहाय्याने वडिलांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. इथे जन्म होतो या कादंबरीतील कादंबरीचा.

लक्ष्मीने लिहायला घेतलेल्या या कादंबरीचा नायक आहे एक किशोरवयीन रजपूत राजपुत्र. देवगढच्या युद्धात झालेल्या पराभवानंतर गुलाम बनून राहत असताना त्याला खोजा बनवून बादशहाच्या जनानखान्यात ठेवलं जातं आणि या कादंबरीच्या प्रवासात तो हळूहळू इस्लाम धर्माच्या प्रभावाखाली जायला लागतो. इस्लाम धर्मात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी, इस्लाम राजांची आक्रमणे, त्यांनी केलेले अत्याचार, हिंदूंसाठी असणारे त्यांचे जाचक कायदे या आणि अशा बऱ्याच गोष्टी खोजा झालेल्या राजपुत्राच्या माध्यमातून लक्ष्मी तिच्या या कादंबरीमधे उलगडत जाते. अत्याचारी मुस्लिम राजवटीत खोजा म्हणून, मुस्लिम चालीरीतींचे पालन करत बरीच वर्षें राहिल्यानंतर युद्धात आपण घेतलेल्या शरणागतीचा पश्चात्ताप करणारा राजपुत्र इतका ताकतीने कादंबरीमध्ये मांडलाय की नकळतपणे वाचकाचे डोळे त्याच्यासाठी पाणावतात. मुस्लिम झाल्यानंतर या राजपुत्राच्या वाट्याला वाट्याला आलेलं अत्याचारी आयुष्य, एका उमद्या राजपुत्राला जबरदस्तीने खोजा बनवण्याची घटना, विश्वनाथाचे मंदिर स्वतःच्या डोळ्यादेखत उद्‌ध्वस्त होताना झालेली त्या राजपुत्राची अवस्था या सर्व गोष्टी लक्ष्मीच्या कादंबरीमधून वाचत असताना अंगावर शहारे येतात. त्यानंतर त्या राजपुत्राचा गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी झालेला संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीत वाचतानाचा अनुभव जितका अप्रतिम तितकाच तो वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणारा असा. त्यानंतर खोजा झालेला राजपुत्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो. लक्ष्मीने / रझियाने लिहिलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला कल्लोळ आणि त्यातून पुढे वेगाने घडणाऱ्या घडामोडी याचं वर्णन "आवरण" च्या शेवटच्या भागात वाचायला मिळेल. स्वत:ला निधर्मी, पुरोगामी म्हणवणाऱ्या विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय परखड आणि वास्तवादीपणे शेवटच्या भागात रेखाटले गेले आहे. "आवरण" मधे मांडलेल्या सर्व मुद्द्यांसाठी, लेखकांनी लक्ष्मीच्या कादंबरीत 136 संदर्भग्रंथांची यादीच दिल्यामुळे पुरोगाम्यांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही यातून भैरप्पांचे चातुर्य लक्ष्यात येते. 

"कुणाचा तिरस्कार करणं, हेटाळणी करणं, मनं कलुषीत करणं हा इतिहासाचा उद्देश कधीच नसतो. असता कामा नये. आपल्या आधी होऊन गेलेल्यांच्या चुका डोळसपणे समजून घेऊन आपण आजचं जीवन शक्यतो निदान त्या दोषांपासून तरी मुक्त करून घेतलं पाहिजे. म्हणूनच ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता थेट त्याकडे पाहण्याचा प्रामाणीकपणा हवा."

इतिहासात होऊन गेलेल्या हिंदू-मुस्लिम राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यातून झालेल्या परिणामांवर एस. एल. भैरप्पांनी अतिशय परखडपणे, उत्कटतेने आणि तितक्याच तटस्थपणे आपले विचार त्यांच्या "आवरण" या कादंबरीतून मांडले आहेत. अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "आवरण".





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, February 2, 2021

"काळजात धावतोय ससा"

 


लेखक : उत्तम कांबळे

प्रकाशक : सकाळ प्रकाशन


उत्तम कांबळे, संपादक-पत्रकार-साहित्यिक अशा वेगवेगळ्या रुपात लोकांपर्यंत पोहचलेलं एक नाव. सकाळ वर्तमानपत्रामधील सप्तरंग या पुरवणीच्या माध्यमातून त्यांचे बरेच लेख वाचकांपर्यंत पोहचले आणि जे वाचकांच्या पसंतीसदेखिल उतरले. सकाळमध्ये पत्रकार म्हणून सुरुवात केल्यानंतर पुढच्या प्रवासात मराठी साहित्यविश्वात वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सकाळमधील संपादकीय लेख असोत किंवा त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथासंग्रह, चरित्र आणि संशोधन ग्रंथ किंबहुना त्यांचे कवितासंग्रह या सर्वांचंच एक वेगळंपण त्यांच्या लिखाणातून जाणवते. त्यांच्या "फिरस्ती" या लेखसंग्रहातील ५ पुस्तकांमधील एक सुंदर पुस्तक "काळजात धावतोय ससा". अतिशय साध्या, शेतकरी कुटुंबातून पुढे आल्यामुळे ते साधेपण त्यांच्या लेखनातही पुरेपूर उतरलंय ज्यामुळे वाचकाला त्यांचं साहित्य अधिक जवळचं वाटतं. उत्तम कांबळे यांचे हे १११ पानांचे "काळजात धावतोय ससा" सजलंय २७ प्रकरणांनी आणि प्रत्येक प्रकरण वाचकाला विचार करायला लावणारं.

माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या अनेक वळणांवर विविध प्रकारची, विविध स्वभावाची बरीच माणसे भेटत असतात. त्या भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे अनेक अनामिक गोष्टी, किस्से, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष दडलेला असतो आणि प्रत्येकवेळी तो आपल्याला दिसतोच किंवा जाणवतोच असं नसतं. पण उत्तम कांबळे यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध लोकांना बोलतं करून त्यांचा अनुभव टिपण्याचे कसब चांगलंच आत्मसात केलंय हे त्यांच्या "फिरस्ती" या लेखसंग्रहावरून सहज लक्षात येते. उत्तम कांबळे यांच्या फिरस्तीत त्यांना अशी अनेक माणसे भेटली आणि या प्रवासात वास्तव आयुष्याचे अनेक पदर त्यांच्यासमोर उलगडत गेले. फिरस्तीत भेटलेल्या याच अशा माणसांच्या जगण्याच्या, संघर्षाच्या कथा उत्तम कांबळे यांनी २७ प्रकरणांमधून त्यांच्या "काळजात धावतोय ससा" या पुस्तकात शब्दबद्ध केलेल्या आहेत. "काळजात धावतोय ससा" या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून-बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन उत्तम कांबळे यांनी करून दिलं आहे. आजच्या युगात स्वतःला अतिशय प्रगत म्हणवणाऱ्या माणसाची स्वत:च्या सावलीलासुद्धा भिणाऱ्या सशासारखी मानसिकता नेमकी कशामुळे झाली असावी, याचा धांडोळा उत्तम कांबळे यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे. आज आपल्या भोवतालची व्यवस्था, पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या वाटा हे सगळंच जसं माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागले आहेत. उत्तम कांबळे यांनी शब्दबद्ध केलेलं प्रत्येक प्रकरण वाचकाला खडबडून जागं करतं. पुस्तकातील काही लेखांमधून उत्तम कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व अगतिकता अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे जी वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पडते.

एक वेगळं वाचन म्हणून आवर्जून वाचण्याआरखं उत्तम कांबळे यांच्या फिरस्ती या लेखसंग्रहातील एक सुंदर पुस्तक "काळजात धावतोय ससा".





संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये