लेखक : गणेश महादेव
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
कोणत्याही प्रकारचे "रहस्य" हे प्रत्येक माणसासाठी एक कुतूहलाचा विषय असतो आणि त्यामुळेच अशा विषयांवर लिहिलेली पुस्तके नेहमीच वाचकांच्या पसंतीस उतरत असतात. गणेश महादेव यांची "रहस्य" ही कादंबरी अशा वाचकांसाठी जणू खजिनाच आहे. १० प्रकरणे आणि २५४ पानांमधून उलगडत जाणारी या कादंबरीची कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. निसर्ग - निसर्गाचे नियम, अध्यात्म - आधुनिक विज्ञान, सत्प्रवृत्ति - दुष्प्रवृत्ति या सर्वांना एका धाग्यात बांधून गणेश महादेव यांनी "रहस्य" ही अतिशय सुंदर कादंबरी साकारली आहे. आजपर्यंत जितक्या काही रहस्यकथा,कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या त्या प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे वाचकाला गुंतवून ठेऊन, अनपेक्षित धक्क्यातून पुढे सरकणारे कथानक आणि शेवटी होणारा अपेक्षित शेवट. पण गणेश महादेव यांची "रहस्य" कादंबरी याला अपवाद वाटली कारण कोणताही अनपेक्षित धक्का न देता अगदी सरळमार्गी जाणारी कथा, तरीही वाचक त्यामध्ये गुंतलेला राहून शेवटपर्यंत कथेसोबत जोडला राहतो, शेवटपर्यंत त्याची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा वाढतच राहते. कादंबरी वाचत असताना याचा शेवट काय होऊ शकतो किंवा काय होणार हा अंदाज सतत येत राहतो पण तरीही कथेची मांडणी जी गणेश महादेव यांनी केलेय, जी वातावरण निर्मिती त्यांच्या लिखाणातून झाली आहे त्यामुळे वाचक शेवटपर्यंत कथेत अडकून राहतो. इतिहास, अध्यात्म आणि तंत्रविद्या याभोवतीच जरी कादंबरीची कथा फिरत असली तरी आधुनिक म्हणजेच वर्तमान जगाचे संदर्भ कायम ठेऊन कथा लिहिली असल्याने ती वाचत असताना वाचक एका वेगळ्याच अनुभवातून जातो आणि कथेतील इतर पात्रांसोबतच आपल्याला देखील ते "रहस्य" खुणावत राहते.
ऐतिहासिक वारसा असणाऱ्या होळकर घराण्याचं शेंडेफळ हर्षवर्धन होळकर हा या रहस्यकथेचा नायक. हर्षवर्धन जरी या कथेचा नायक असला तरी आबासाहेब होळकर, राजराजेश्वर गोसावी, बाबसा जंगम, कृष्णा जंगम, आर्यभाती, संजीवननाथ, अघोरी कपाली, प्रा. गोरक्षनाथ जाधव, सर्जेराव होळकर आणि त्याचा मुलगा संपतराव होळकर या सर्वांचा कथेतील सहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे किंबहुना यांच्याशिवाय ही कथा पूर्णच नाही होऊ शकत. होळकरांचा ऐतिहासिक वाडा, मार्तंडगड, चंद्रगड, भैरवगड आणि या सर्वांच्या आसपासच्या प्रदेशात असणाऱ्या रहस्यांचा शोध म्हणजेच ही कादंबरी "रहस्य". मार्तंडगडचा राजा अधिरवर्मन याचा त्याच्याच सेनापती रुधिरवर्मनकडून धोक्याने झालेला खून आणि त्यानंतर अधिरवर्मनचा विश्वासू गुप्तहेर चंद्रगुप्ताने रुधिरवर्मनचा युद्धात केलेला पराभव अशी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी कथेला देऊन लेखकाने वाचकला इतिहास आणि वर्तमानकाळात गुंतवून ठेवलंय. भक्ती, शक्ती, तंत्रविद्या, मंत्रसामार्थ्य, तपश्चर्या, सिद्धी अशा अनेक संदर्भातून पुढे सरकरणारे हे कथानक आणखीनच रहस्यमय होऊन जाते. काही काही ठिकाणी अतिरेक वाटावा इतके रहस्यमय संदर्भ कथेत दिले गेले आहेत पण कादंबरीची कथाच रहस्यावर आधारित असल्यामुळे ते योग्यही वाटतात. वाड्यातील जुनी कागदपत्रे चाळत असताना हर्षवर्धनला सापडलेला अगम्य भाषेतील ग्रंथ आणि त्यानंतर हर्षवर्धनच्या स्वप्नात येणारा साधू, बारवेच्या तळातील गुपित, त्यामधील प्राचीन मायावी यंत्र, आबांसोबत पोहायला गेल्यानंतर हर्षवर्धनला बारवेच्या तळाशी दिसलेला प्रकाशझोत, वाड्यातील जिन्याखाली असणारा गुप्त मार्ग, गुप्त खोलीचा जीवघेणा शोध, सुक्ष्मदेह धारण करणारा गोसावी, अघोरी तंत्रसाधना आणि त्यात दिला गेलेला नरबळी, चुकलेल्या तंत्रसाधनेमुळे संपतरावाची झालेली भ्रमिष्ट अवस्था, मार्तंडगड आणि चंद्रगडाच्या गुप्त संरचना, गुप्त वाटा, अभिमंत्रित जलपंचायतन यंत्र, या सर्वांवर असणारा भैरवगडावरील संजीवन नाथांचा अदृश्य पहारा, पाड्यातील ओढ्याशेजारील स्मशानभूमीत अघोरीकडून होणारी तंत्रसाधना अशा एक ना अनेक गोष्टींमुळे या रहस्यकथेला एक वेगळंच वलंय प्राप्त होते. नकळत वाचक त्या वातावरणात ओढला जातो. गणेश महादेव यांनी त्यांच्या लेखनातून या सर्व गोष्टी वाचकाच्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. कादंबरीत उल्लेख झालेलं ३००० वर्षांपूर्वीचे शिवलिंग, नाथ संप्रदाय आणि त्याच्या स्थापनेचा इतिहास, ऋग्वेदातील १२ रुद्र, शिवाय होळकर घराण्याचा इतिहास आणि त्यांचं मार्तंडगड - चंद्रगड यांच्याशी असणारं नातं, हर्षवर्धनच्या काकांचं या रहास्याच्या शोधात अचानक नाहीसं होणं या सर्व गोष्टी कथेला आणखीनच गूढ बनवतात.
गणेश महादेव यांनी केलेला मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग आणि चाकोरीबाहेरील एक भन्नाट रहस्यमय कादंबरी म्हणून वाचण्यासारखे पुस्तक "रहस्य".
संदीप प्रकाश जाधव