लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन
उत्तम कांबळे, संपादक-पत्रकार-साहित्यिक अशा वेगवेगळ्या रुपात लोकांपर्यंत पोहचलेलं एक नाव. सकाळ वर्तमानपत्रामधील सप्तरंग या पुरवणीच्या माध्यमातून त्यांचे बरेच लेख वाचकांपर्यंत पोहचले आणि जे वाचकांच्या पसंतीसदेखिल उतरले. सकाळमध्ये पत्रकार म्हणून सुरुवात केल्यानंतर पुढच्या प्रवासात मराठी साहित्यविश्वात वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सकाळमधील संपादकीय लेख असोत किंवा त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथासंग्रह, चरित्र आणि संशोधन ग्रंथ किंबहुना त्यांचे कवितासंग्रह या सर्वांचंच एक वेगळंपण त्यांच्या लिखाणातून जाणवते. त्यांच्या "फिरस्ती" या लेखसंग्रहातील ५ पुस्तकांमधील एक सुंदर पुस्तक "काळजात धावतोय ससा". अतिशय साध्या, शेतकरी कुटुंबातून पुढे आल्यामुळे ते साधेपण त्यांच्या लेखनातही पुरेपूर उतरलंय ज्यामुळे वाचकाला त्यांचं साहित्य अधिक जवळचं वाटतं. उत्तम कांबळे यांचे हे १११ पानांचे "काळजात धावतोय ससा" सजलंय २७ प्रकरणांनी आणि प्रत्येक प्रकरण वाचकाला विचार करायला लावणारं.
माणूस म्हणून जगत असताना प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या अनेक वळणांवर विविध प्रकारची, विविध स्वभावाची बरीच माणसे भेटत असतात. त्या भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे अनेक अनामिक गोष्टी, किस्से, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष दडलेला असतो आणि प्रत्येकवेळी तो आपल्याला दिसतोच किंवा जाणवतोच असं नसतं. पण उत्तम कांबळे यांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध लोकांना बोलतं करून त्यांचा अनुभव टिपण्याचे कसब चांगलंच आत्मसात केलंय हे त्यांच्या "फिरस्ती" या लेखसंग्रहावरून सहज लक्षात येते. उत्तम कांबळे यांच्या फिरस्तीत त्यांना अशी अनेक माणसे भेटली आणि या प्रवासात वास्तव आयुष्याचे अनेक पदर त्यांच्यासमोर उलगडत गेले. फिरस्तीत भेटलेल्या याच अशा माणसांच्या जगण्याच्या, संघर्षाच्या कथा उत्तम कांबळे यांनी २७ प्रकरणांमधून त्यांच्या "काळजात धावतोय ससा" या पुस्तकात शब्दबद्ध केलेल्या आहेत. "काळजात धावतोय ससा" या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून-बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन उत्तम कांबळे यांनी करून दिलं आहे. आजच्या युगात स्वतःला अतिशय प्रगत म्हणवणाऱ्या माणसाची स्वत:च्या सावलीलासुद्धा भिणाऱ्या सशासारखी मानसिकता नेमकी कशामुळे झाली असावी, याचा धांडोळा उत्तम कांबळे यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे. आज आपल्या भोवतालची व्यवस्था, पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या वाटा हे सगळंच जसं माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागले आहेत. उत्तम कांबळे यांनी शब्दबद्ध केलेलं प्रत्येक प्रकरण वाचकाला खडबडून जागं करतं. पुस्तकातील काही लेखांमधून उत्तम कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व अगतिकता अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे जी वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पडते.
एक वेगळं वाचन म्हणून आवर्जून वाचण्याआरखं उत्तम कांबळे यांच्या फिरस्ती या लेखसंग्रहातील एक सुंदर पुस्तक "काळजात धावतोय ससा".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment