लेखक : साने गुरुजी
प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स
काही पुस्तके अशी असतात ज्यांचा विचार आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतो पण ती वाचायचा योग काही लवकर येत नाही. त्याच्याव्यतिरिक्त इतर बरीच पुस्तके आपल्याकडून वाचली देखील जातात पण समोर असूनही असं एखादं तरी पुस्तक असतंच जे आपल्याकडून वाचलं जात नाही. माझ्याबाबतीत सांगायचं तर ते पुस्तक "श्यामची आई". अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून "श्यामची आई" या पुस्तकाबद्दल भरभरून ऐकत आलो पण ते वाचायचा योग आज इतक्या वर्षांनी आला. साधारणपणे ८० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या मनामध्ये आपल्या आईबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती, कृतज्ञता या भावनांना ४२ कथांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली आहे. मराठी साहित्यात अजरामर ठरलेल्या साहित्यांपैकी एक असं हे पुस्तक. जानेवारी १९३२ ते ऑक्टोबर १९३३ या २१ महिन्यांच्या काळात नाशिकच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी आपल्या सहकार्यांना दररोज रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. नंतर त्यांनी आपल्या सहकार्यांच्या आग्रहावरून त्या गोष्टी लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजेच "श्यामची आई". अगदी कोणतंही पान उघडावं आणि कोणतीही कथा वाचायला सुरूवात करावी. प्रत्येक कथेतून अगदी सहज, सुंदर भाषेत मिळणारा बोध आणि आईचा जिव्हाळा वाचून डोळे पाणावले नाहीत तरच नवल. प्रत्येक घरात घडणारे अगदी साधे साधे प्रसंग पण तरीही ते कथेच्या रुपात वाचत असताना "आई-मुलाच्या" नात्याला एकप्रकारचा उजाळा मिळतो. प्रत्येक आईला आपलं मूल सुसंस्कारित व्हावं असं नेहमी वाटत असतं आणि त्यासाठी नेहमीच तिचा प्रयत्न चालू असतो परंतु आईकडून मिळणारे संस्कार मुलाने कसे अंगीकारायचे हे आजूबाजूच्या परिस्थितीवर देखील तितकंच अवलंबून असतं. या दोन्ही गोष्टींसाठी श्याम आणि त्याची आई हे दोघेही एक आदर्श उदाहरण आहेत. पुस्तकातील ४२ कथांमधून कोणतेही उपदेशाचे डोस न देता आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात आपण प्रेमाने कसं वागलं पाहिजे हेच सांगायचा गुरुजींचा प्रयत्न जाणवतो. भूतदया, श्यामचे पोहणे, बंधुप्रेमाची शिकवण, सांब सदाशिव पाऊस पडू दे, आईचा शेवटचा आजार, सात्त्विक प्रेमाची भूक, तेल आहे तर मीठ नाही, अब्रूचे धिंडवडे अशा कथांमधून सर्वसामान्य घरातले प्रसंगच वर्णन केलेले असले तरी त्या प्रसंगांकडे पाहण्याची सात्त्विक दृष्टी, लबाडपणा आणि खोटेपणा नसलेलं निर्मळ मन यामुळे ते प्रसंग आपल्या मनावर कोरले जातात. आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाला "मातृप्रेमाचं स्तोत्र" असं म्हटलं होतं. आजपर्यंत आईवर असंख्य लेखक, कवींनी जगातल्या सर्व भाषांत लेख-कविता केल्या आहेत. परंतु अतिशय मांगल्यानं आणि माधुर्यानं ओथंबलेलं असं महाकाव्य दुसऱ्या कोणत्या भाषेत असेल असं वाटत नाही असंही अत्रे यांनी लिहून ठेवलं आहे.
"श्यामची आई" ही कोकणातील सर्वसामान्य कुटुंबातील एक साधी आई; परंतु श्याममुळे त्या माऊलीला जी प्रसिद्धी मिळाली त्याचे कारण साने गुरुजींनी त्यांचे हे पुस्तक जणूकाही आपल्या अश्रूंनीच लिहिले आहे असे वाटावे इतके वाचकाच्या मनाला भिडते. खरेतर त्यामुळेच गुरुजींनी लिहिलेली प्रत्येक कथा वाचकाला आई-मुलाच्या नात्याची नव्याने ओळख करून देते. गरिबीतही आपली नीतीमूल्ये जपून स्वाभिमानाने व सुखाने कसे जगावे हे आई आपल्या मुलाला कशाप्रकारे शिकविते आणि त्यामुळे एक लहान मुलगा भावी आयुष्यात एक संवेदनशील आणि आदर्श माणूस म्हणून कसा घडला हे "श्यामची आई" वाचत असताना पानापानावर जाणवत राहते. श्याम आणि त्याच्या आईमध्ये घडलेल्या बऱ्याच प्रसंगांमधून त्यांच्या नात्यातील विश्वास आणि एकमेकांवर असलेले प्रेम दिसून येते. आपल्या मुलाचे वर्तन नेहमी कसे सदाचारपूर्णच असले पाहिजे हे श्यामची आई त्याला दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्याछोट्या प्रसंगांतून समजावते. जसे की जेव्हा श्याम पूजेसाठी झाडावरून कळ्या तोडून आणतो, तेव्हा घरी आल्यावर आई त्याला प्रेमाने सांगते “पूर्ण उमललेलेच फूल झाडावरून तोडावे आणि कळ्या कधीच तोडू नयेत, कारण जसे लहान बाळांना आईची गरज असते तसेच कळ्यांना झाडाची गरज असते.” आणखी एका प्रसंगात श्यामला पुस्तके हवी असतात तेव्हा तो त्याच्या काकांचे पैसे चोरतो, त्याबाबत त्याला जाब विचारला असता तो घाबरून “मी पैसे चोरले नाही” असे खोटंच सांगतो. आईला जेव्हा खरी गोष्ट समजते, तेव्हा कठोर होत खोटं बोलल्याबद्दल ती श्यामला मारते. नंतर जवळ घेत समजावते की “नेहमी खरे बोलावे, जर काही चूक आपल्या हातून झाली असेल तर ती निर्भयपणे व प्रामाणिकतेने मान्य करावी.” आणखी एका प्रसंगात दारावरून लाकडाची मोळी घेऊन जाणारी अस्पृश्य जातीची एक अशक्त वृद्ध बाई तोल जाऊन खाली पडते, तेव्हा तिला कुणीच स्पर्श करायला तयार होत नाही हे पाहून श्यामची आई श्यामला तिची मदत करण्यास सांगून मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे शिकवते. श्यामच्या मनातील पोहण्याबद्दलची भीती घालवण्यासाठी, त्याला शिस्त लावण्यासाठी, त्याने इंग्रजी शाळेत शिकावे म्हणून किंवा तिच्यापासून दूर पाठवण्यासाठी तिला प्रसंगी श्यामसोबत कठोर व्हावे लागते. श्यामच्या आईनं आपल्या वागण्यातून त्याला गाईगुरांवर, झाडांवर प्रेम करायला शिकवलं, कोंडय़ाचा मांडा करून खायला शिकवलं, गरिबीतही आपलं स्वत्व आणि सत्त्व टिकवून राहायला शिकवलं. यातूनच पुढे घडलेले "साने गुरुजी" आपल्याला खूप काही सांगून जातात. आज जरी साने गुरुजींच्या रूपातील श्याम पडद्याआड गेला असला तरी प्रत्येक घरी नवीन श्याम तयार करण्याची ताकद असणारं, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून वाचून दाखवावं असं हे पुस्तक "श्यामची आई".
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी वाचावं असं पुस्तक "श्यामची आई".
संदीप प्रकाश जाधव