धर्म आणि रूढी-परंपरा यांचा नव्याने विचार करायला लावणारी कादंबरी
लेखक : अभिराम भडकमकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांची अतिशय वेगळ्या विषयावरची कादंबरी "इन्शाअल्लाह" वाचून पूर्ण झाली. भारतासारख्या देशात आजसुद्धा कोणताही धर्म आणि त्या धर्माच्या रूढी-परंपरांबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना हजार वेळा विचार करून बोलावं लागतं, खासकरून जर तो विषय हिंदू-मुस्लीम धर्मातील एखाद्या गोष्टीचा असेल तर बोलताना अधिकच काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या "इन्शाअल्लाह" या कादंबरीतून मुस्लिम धर्मातील जाचक रूढी-परंपरांना केंद्रस्थानी ठेवून जे विचार मांडले आहेत ते जितके धाडसाचे तितकेच कौतुकास्पद आहेत. आणि त्याहून अधिक एक समाज म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहेत. धर्म आणि रूढी-परंपरा यामधे असणारा फरक ओळखून त्याप्रमाणे वागणे जितके महत्वाचे असते तितकेच किंबहुना त्याहून जास्त आपल्या रूढी-परंपरांमधे कालानुरूप बदल करणेसुद्धा महत्वाचे असते. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी-परंपरा म्हणजेच आपला धर्म असं समजून आजचा मुस्लिम समाज ज्या जाचक रूढी-परंपरांना कवटाळून बसला आहे त्यामुळे त्यांच्या आजच्या तसेच भावी पिढ्यांचेसुद्धा कधीही न भरून निघणारे असे नुकसान होत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मुस्लिम व्यक्तीला आज एकाच नजरेने पाहिले जाते भले ती व्यक्ती कितीही उच्चशिक्षित असो, असं का? याचं एकच उत्तर देता येईल ते म्हणजे बदलत्या जगासोबत न बदललेल्या रूढी-परंपरा आणि जगासमोर केलेलं त्यांचं प्रदर्शन. या एकाच गोष्टीमुळे मुस्लिम समाजाची धर्मांध अशी एक छबी सामान्य माणसाच्या मनात जगभर तयार झाली आणि ती जर सुधारायची असेल तर मुस्लिम समाजाने या जाचक रूढी-परंपरा झुगारून स्वतःमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे, धर्माला रूढी-परंपरांपासून वेगळं करण्याची गरज आहे, हेच सांगायचा प्रयत्न भडकमकर यांनी त्यांच्या या ३२१ पानी कादंबरी "इन्शाअल्लाह" मधून केला आहे. सध्याच्या घडीला मुस्लिमांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बदलांचा फक्त विचारच केलेला बरा अशी परिस्थिती असताना अभिराम भडकमकरांचे लोकांपर्यंत पोहचलेलं हे साहित्य म्हणूनच त्याच्या वेगळेपणाची साक्ष देते. "इन्शाअल्लाह" मधे घडणारी कथा ही कोल्हापूर शरहातील रहिमनगर या मुस्लिम मोहल्ल्याभोवती फिरते त्यामुळे साहजिकच कादंबरीतले सर्व संवाद कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि आसपासच्या भागात बोलल्या जाणाऱ्या बागवानी हिंदीत आहेत जे वाचनाचा एक वेगळाच आनंद देऊन जातात. दारिद्र्यात पिचत असलेली रहिमनगरची मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव, अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी अचानक रहिमनगर मोहल्ला ढवळून निघतो, मोहल्ल्यातील काही मुलांची पोलिसांकडून धरपकड होते. आरोप असतो कोल्हापूर रेल्वेस्थानक स्फोटाने उडवून देण्याच्या कटात सहभाग असल्याचा. त्याच दरम्यान मोहल्ल्यातीलच एक तरुण जुनैद अचानक नाहीसा होतो. कॉलेजमध्ये शिकणारा साधा सरळ मुलगा अशी मोहल्ल्यात ओळख असणारा, अभ्यासू आणि कविताप्रेमी जुनैद घरी येतच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नसतो. या एका घटनेनंतर शहरातलं बदललेलं वातावरण, हिंदू-मुस्लीम राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला या घटनेचा वापर, शिवाय मोहल्ल्यातील इतर लोकांच्या जीवनावर त्या घटनेचा झालेला परिणाम, फतेह सारख्या ग्रुपच्या माध्यमातून मुस्लिम लोकांच्या विचारात बदल करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, त्या प्रयत्नांना मिळणाऱ्या चांगल्या वाईट प्रतिसादातून घडणारे छोटे-छोटे प्रसंग या सर्वांतून पुढे सरकणारी ही कादंबरी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वाचत असताना जणू काही एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डोळ्यासमोर चालू असावी इतक्या ताकदीने अभिराम भडकमकरांनी "इन्शाअल्लाह" वाचकांसमोर सादर केलीय.
"इन्शाअल्लाह" मधील कथानकाची सुरुवातच मुळी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. नजमाच्या लग्नासाठी तिच्या घरी असणाऱ्या आनंदी वातावरणात, लग्नकार्यासाठी एकत्र आलेल्या आणि लग्नाच्या धावपळीत असणाऱ्या साऱ्या मोहल्ल्याला पुसटशी कल्पनाही नसते की काही तासांतच त्यांच्या पुढ्यात किती मोठं अरिष्ट येऊ घातलंय. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मोहल्ल्यावर वादळासारख्या येऊन धडकणाऱ्या एका बातमीने ही कथा पुढे वेग पकडते. "कोल्हापूरचे रेल्वेस्थानक उडवून देण्याचा दहशतवादी कट पोलिसांनी उधळला" या बातमीमुळे रहिमनगर मोहल्ल्यासोबतच संपूर्ण कोल्हापूर शहर हादरून जाते. कटात सहभागी असण्याच्या आरोपावरून मग रहिमनगर मोहल्ल्यातील काही मुलांना पोलिस अटक करून घेऊन जातात आणि नेमके त्याच दरम्यान जुनैद नावाचा एक सुशिक्षित तरुणदेखील अचानक गायब होतो. पोलिसांनी पकडून घेऊन गेलेल्या मुलांमधेही तो नसल्याने आणि घरीदेखील परत न आल्याने त्याच्या भोवती संशयाचे ढग तयार होऊ लागतात. परंतु नोकरी करत आपले शिक्षण पूर्ण करणारा, नवऱ्याने टाकलेल्या आपल्या आईला घर चालवण्यात हातभार लावणारा, साधा सरळ मुलगा अशी मोहल्ल्यात ओळख असणारा, अभ्यासू आणि कविताप्रेमी जुनैद असं कृत्य करूच शकत नाही असं म्हणणारी त्याची आई जमिला त्याच्या शोधासाठी धडपड करायला चालू करते. मग सुरू झालेला हा जुनैदचा शोध समाजातील एक एक घटकांना स्पर्श करत पुढं सरकू लागतो. जुनैदच्या शोधा भोवती फिरणारं हे कथानक अनेक धार्मिक गोष्टींना, चर्चांना, माणसांना, राजकारणाला स्पर्श करत आपल्या समोर उलगडत जातं. इथून पुढे ज्या वैचारिक द्वंद्वासोबत कादंबरीचा प्रवास सुरु होतो तो वाचकाला सोबत घेऊनच पुढे सरकतो. वाचक अक्षरशः कथानकासोबत खेचला जातो. याचं सारं श्रेय लेखकाला द्यावे लागेल. हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन आताच्या काळातली सामाजिक समीकरणं बांधणं तसं कठीण आहे. मुळात जेव्हा ते धर्मग्रंथ लिहिले गेले त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे पण तरीही त्या जुन्या, जाचक रूढी-परंपरा जपत मुस्लिम समाज आजही तसाच खितपत पडला आहे. त्याच धर्मग्रंथांचा आधार घेऊन "आपला मुस्लिम धर्म या गोष्टीला मान्यता देत नाही", "आपल्या मुस्लिम धर्मात ही गोष्ट करणं म्हणजे पाप आहे", "ऐसा करोगे तो कयामत के दिन अल्लाह तुम्हारा इंसाफ करेंगा", "ऐसे रहोगे तो तुमको जन्नत नही मिलेगी" या आणि अशा बऱ्याच शिर्षकांखाली मुस्लिम समाजात नेहमीच चांगल्या गोष्टींची गळचेपी केली जाते. अशा अनेक मुद्द्यांवर जुनैदच्या शोधाबरोबर कादंबरीत होणारी सखोल चर्चा समाजाचा एक हिस्सा म्हणून आपल्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोगामी विचारसरणी, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य, कट्टरवाद, स्त्रियांचं आयुष्य यावर कादंबरीत बरीच उदाहरणे देऊन टाकलेला प्रकाश वाचकाला विचार करायला लावतो.
"इन्शाअल्लाह" मधील ही कथा जरी "इस्लाम" धर्माला केंद्रस्थानी ठेऊन लिहिली गेली असली तरी कादंबरीतील इतर बिगरमुस्लिम पात्रांचा या कथेत असणारा सहभाग लक्षात राहण्यासारखा आहे. शिवाय नसीमामॅम, सईदा, फिदाजी, रफिक आणि फतेहसारखी सुधारणावादी मुसलमानांची संस्था, त्यांच्याशी आपसूकपणे नाळ जोडली गेलेला झुल्फी या काही पात्रांमुळे कथेत मांडलेल्या विषयाला एक प्रकारची मजबुती मिळते. कथेत एकीकडे आपल्या धर्मात, लोकांमध्ये सुधारणावादी विचार रुजवण्यासाठी धडपडणारा "झुल्फि" आहे तर त्याच वेळी त्याला विरोध करणारे त्याच्याच धर्मातले कट्टरही आहेत. झुल्फिची त्याच्या हिंदू मित्रांबरोबरची चर्चादेखील खरंच सर्वांचे डोळे उघणारी आहे. हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मातील काही काही गोष्टींवर होणारी या कथेतील चर्चा "धर्म" या संकल्पनेवर नव्याने विचार करायला लावते. हिंदू म्हटलं की तो मुस्लिमविरोधी, मुसलमान म्हटलं की तो कट्टर अशी जी एक प्रतिमा आपल्या समाजात बनली आहे याला कुठे तरी लगाम घालणं आवश्यक आहेच परंतु ते करत असताना पुरोगामी असण्याच्या नावाखाली समाजात धार्मिक तेढ निर्माण न करता समतोल समाजिक जीवन कसं जगता येऊ शकतं याची शिकवण भडकमकरांनी "इन्शाअल्लाह" मधून दिली आहे. अभिराम भडकमकरांनी कादंबरीमधे जरी कथेचा शेवट केला असला तरी त्यानंतर वाचकाच्या डोक्यात चालू होणाऱ्या विचारचक्रांनी या कथेचा प्रवास पुढे चालूच राहतो. "इन्शाअल्लाह" मधून वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत.
एक वेगळ्या विषयावरचे आवर्जून वाचून संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक.
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment