लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी
पृष्ठे- २७६, मूूल्य- २९५ रुपये.
एस. एल. भैरप्पा म्हटलं की हमखास एका वेगळ्या साहित्याची सफर वाचकाला होणार हे नक्की! "साक्षी" ही भैरप्पांची मी वाचलेली पहिली कादंबरी आणि त्यातील भावलेल्या विषयाच्या वेगळेपणामुळेच त्यांच्या "आवरण", "उत्तरकांड" आणि आता "पारखा" या कादंबऱ्या देखील वाचून काढल्या. प्रत्येक पुस्तक वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं. मानसिक पातळीवर वाचून ते संपतच नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. पण एक गोष्ट नक्की की कोणताही पूर्वग्रह न ठेवता, अलिप्तपणे जर त्यांचं साहित्य वाचलं तरच त्याचा वेगळेपणा वाचकाच्या मनाचा ठाव घेतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. "पारखा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घायचा झाला तर तो एखाद्या गोष्टीला परके होणे! प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आणि पाश्चात्य संस्कृतीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षांची कथा म्हणजे ही कादंबरी "पारखा". १९६८ साली कानडी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा विषय आजच्या घडीला देशात गायीवरून होणारं, चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर घेऊन येतो. वाघाच्या तावडीत सापडणाऱ्या पुण्यकोटी गायीची कथा बऱ्याच लोकांना परिचयाची आहे. वाघाला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या वासरांना दूध पाजून परत खरोखरच त्याच्या पुढ्यात त्याचं भक्ष म्हणून उभी राहणारी पुण्यकोटी, सत्यवचनी गाय आणि तिच्या याच गुणामुळे प्रभावित होऊन तिला न खाता स्वतःचा प्राण त्याग करणारा वाघ अशी ती कथा! याच कथेचा वापर करून भैरप्पांनी त्यांच्या या "पारखा" चा पाया रचला आहे. या पुण्यकोटी गायीचा वंश ज्याच्या गोठयात आहे असा काळेनहळी गावचा काळींगगौडा जो गायीमध्ये ३३ कोटी देव-देवतांचा वास असतो असे मानून भक्तिभावाने गायीची पूजा करून तिचा सांभाळ करतो आणि तिला केवळ दूध - मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांच्यामधील संघर्षाची ही कथा. पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर, अमेरिकन मुलीशी लग्न करून आपल्या शिक्षणाच्या जोरावर आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत भारतात परतल्यानंतर काळींगाला इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातली मूळची भारतीय संस्कृती जागी होते, तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा तो "पारखा" झालेला असतो अशी अगदी साधी कथा घेऊन भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली आहे. परंतु भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर होणारा दोन संस्कृतींमधील संघर्ष कादंबरीत ज्यापद्धतीने भैरप्पांनी दाखवला आहे त्याला खरोखरच तोड नाही. संस्कृती, श्रद्धा आणि व्यवहार यांच्या संघर्षाचं चित्रण भैरप्पा यांनी त्यांच्या या २७६ पानी कादंबरी "पारखा" मधून केलेलं आहे.
कादंबरीतील काळिंगगौडा म्हणजे गोपाळसंस्कृतीचे पालन करणारी, गायीला स्वतःच्या आईच्या ठिकाणी मानणारी, तीची अगदी मनापासून देखभाल करणारी एक हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आहे. या प्राचीन संस्कृतीत तो इतका मुरलेला आहे की गायीचा होणारा व्यावहारीक पातळीवरचा वापर त्याच्या आकलनापलिकडचा आहे. गायीच्या वासराने पिऊन जे काही दूध शिल्लक राहील तेवढेच दूध आपले, तेवढ्याच दुधावर आपला हक्क असं मानणारा हा काळींगगौडा! गायीच्या बाबतीत अतिशय भावनिक असणाऱ्या या काळींगगौडाचं एक उदाहरण भैरप्पांनी कादंबरीत दिलं आहे, जेव्हा गावातील कोंडवाडय़ातल्या एका गाभण गायीचा मालक तिला दिवसभर शोधायलाच येत नाही हे काळींगगौडाला समजतं तेव्हा तो तिचं ‘लेकमाणसासारखी आली’ म्हणून स्वतःच्या गाईंच्या गोठ्यात यथासांग बाळंतपण करतो. तो मालक आपल्या गायीला शोधत आल्यावर त्याला दोन दिवसांनी यायला सांगतो, कारण ओल्या बाळंतिणीला त्याने चालवत घरी न्यायला नको हे म्हणून. नंतरही कोवळ्या वासराला चालायला न लावता त्याला हातात घेऊन जायला काळिंगगौडा सांगतो, इतका तो गायीच्या बाबतीत हळवा आहे. आपल्या शिकलेल्या नातवाचे बोलणे त्याला समजत नाही. ‘ज्यानं घरातलं ज्ञानच समजावून घेतलेलं नाही, तो परदेशातून काय आणि किती शिकणार आहे?’ असं म्हणणारा हा काळींगगौडा! माळरानावर चरायला गेलेल्या गायींना तरसाच्या हल्ल्यातून वाचवताना काळींगगौडाच्या मुलाचा मृत्यू होतो. त्यानंतर आपला नातूच आपला गायीचा गोठा सांभाळेल, गाईंची काळजी घेईल या भोळ्या आशेवर असणाऱ्या काळींगगौडाचा आपल्या नातवाकडून इतका भ्रमनिरास होतो की तो परदेशातून परत येईल की नाही आणि आल्यावर घरात राहील की नाही याचीदेखील त्याला शाश्वती राहत नाही. आपल्या नातवाची आशा सोडून देऊन स्वतःला जमेल तसे गाईंची सेवा करणाऱ्या काळींगगौडाच्या समोर गाईंना सांभाळताना बऱ्याच समस्या येत राहतात आणि त्यातून मार्ग काढत भैरप्पांची ही कादंबरी पुढे सरकत राहते. विकासाच्या नावाखाली कमी होणारी चारायोग्य जमीन आणि त्यामुळे गाईंचे होणारे भविष्यातील नुकसान ओळखून काळींगगौडाची चाललेली धडपड काहीवेळा वाचकालाही भावूक करते. नातवाच्या अमेरिकेहून परत येण्यापूर्वीच काळींगगौडाचा मृत्यू होतो तेव्हा नकळत आता गाईंचे काय होणार हा प्रश्न वाचकाच्यादेखील मनात येतो. काळिंगगौडाच्या मरणाचे वर्णन म्हणजे जणूकाही भैरप्पांची कविताच आहे. आपण त्याच्यासमोर गोठ्यात उभे राहून जणूकाही त्याचं समाधानी मरणच बघत आहोत असा भास वाचकाला होतो. मरण्यापूर्वी तो यंग्टाकडे आपल्या गोठय़ाची जबाबदारी सुपूर्द करतो. गायींचे रोग, त्यावरची औषधे, निगा घेण्याची पद्धत वगैरे सगळं त्याला सांगतो. गायीच्या औषधाचे पैसे घेतलेस तर तुझा वंश टिकणार नाही, असेही वर बजावतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म गाढ श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पित भावाने करणाऱ्या काळिंगज्जाला शांत सुंदर मरण येतं आणि तेही त्याच्या गाईंच्या गोठयातच. इथून पुढे कादंबरीचा उत्तरार्ध सुरू होतो म्हटलं तरी चालेल. काळींगगौडाच्या मृत्यूनंतर अमेरिकेतून परतलेला त्याचा नातू आधुनिक शेतीच्या नावाखाली गावाबाहेर फार्महाऊस बांधून सर्व गाईंना तिकडे घेऊन जातो आणि सुरू होते त्याच्या मनातील भावनिक संघर्षाला! त्याच्या पत्नीकडून रागाच्या भरात पुण्यकोटी गायीला मारून तिचं मांस खाल्ल्यानंतर गावाकडून झालेला प्रखर विरोध आणि त्यातून उठलेल्या वादळात त्याला मनोमन होणाऱ्या पश्चात्तापामुळे पुन्हा त्याला आपल्याला बालपणी मिळालेल्या संस्करांची, शिकलेल्या संस्कृतीची ओढ निर्माण होते. अमेरिकन पत्नीसोबत गावाबाहेर राहत असताना सतत होणारी एकटेपणाची जाणीव त्याला नकळत पुन्हा त्याच्या जुन्या संस्कृतीशी जोडायला सुरुवात करते. परंतु तोपर्यंत खूप उशीर होतो आणि तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा "पारखा" होतो! विविध वळणे घेत कादंबरी शेवटाकडे जात असताना काळींगगौडाच्या नातवाला येणाऱ्या विविध अनुभवांतून, दोन संस्कृतीमधला संघर्ष भैरप्पांनी अतिशय उत्कृष्टपणे कादंबरीत उतरवला आहे.
काळानुरूप संस्कृतीचा ऱ्हास होणे हे अपरिहार्यच आहे आणि ही एक अविरत चालणारी प्रक्रियाच आहे परंतु तिच्या जागी येणाऱ्या यंत्रसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार करणे पाश्चात्त्य जीवनशैली स्वीकारून आधुनिक झालेल्या काळिंगगौडाच्या नातवाला नाही जमत. शेवटी तो म्हणतो, ‘‘विद्युतशक्ती, वैज्ञानिक खतं यासारखं विज्ञान मलाही हवंय. पशूंना आजार झाले तर त्यांना बरं करणारं विज्ञानदेखील मला पाहिजे. पण हे पशू केवळ माणसाच्या उपयोगासाठीच आहेत असं मानणारा दृष्टिकोन मला अजिबात नकोय! आपणा भारतीयांची गोष्ट वेगळी आहे. आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे आणि गोपूजाही पाहिजे.’’ या वाक्यातून भैरप्पांनी कादंबरीतल्या समस्येचा गाभा मांडला आहे. शेवटी श्रद्धा आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय व्हायला हवा असेही ते सुचवतात. भैरप्पा यांच्या लेखनशैलीमुळे कादंबरीच्या पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचक कथेसोबत चिकटून राहतो.
आवर्जून वाचावी अशी कादंबरी "पारखा".
संदीप प्रकाश जाधव