Monday, July 26, 2021

"पारखा"

 


लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २७६, मूूल्य- २९५ रुपये.


एस. एल. भैरप्पा म्हटलं की हमखास एका वेगळ्या साहित्याची सफर वाचकाला होणार हे नक्की! "साक्षी" ही भैरप्पांची मी वाचलेली पहिली कादंबरी आणि त्यातील भावलेल्या विषयाच्या वेगळेपणामुळेच त्यांच्या "आवरण", "उत्तरकांड" आणि आता "पारखा" या कादंबऱ्या देखील वाचून काढल्या. प्रत्येक पुस्तक वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं. मानसिक पातळीवर वाचून ते संपतच नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. पण एक गोष्ट नक्की की कोणताही पूर्वग्रह न ठेवता, अलिप्तपणे जर त्यांचं साहित्य वाचलं तरच त्याचा वेगळेपणा वाचकाच्या मनाचा ठाव घेतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. "पारखा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घायचा झाला तर तो एखाद्या गोष्टीला परके होणे! प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आणि पाश्चात्य संस्कृतीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षांची कथा म्हणजे ही कादंबरी "पारखा". १९६८ साली कानडी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा विषय आजच्या घडीला देशात गायीवरून होणारं, चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर घेऊन येतो. वाघाच्या तावडीत सापडणाऱ्या पुण्यकोटी गायीची कथा बऱ्याच लोकांना परिचयाची आहे. वाघाला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या वासरांना दूध पाजून परत खरोखरच त्याच्या पुढ्यात त्याचं भक्ष म्हणून उभी राहणारी पुण्यकोटी, सत्यवचनी गाय आणि तिच्या याच गुणामुळे प्रभावित होऊन तिला न खाता स्वतःचा प्राण त्याग करणारा वाघ अशी ती कथा! याच कथेचा वापर करून भैरप्पांनी त्यांच्या या "पारखा" चा पाया रचला आहे. या पुण्यकोटी गायीचा वंश ज्याच्या गोठयात आहे असा काळेनहळी गावचा काळींगगौडा जो गायीमध्ये ३३ कोटी देव-देवतांचा वास असतो असे मानून भक्तिभावाने गायीची पूजा करून तिचा सांभाळ करतो आणि तिला केवळ दूध - मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांच्यामधील संघर्षाची ही कथा. पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर, अमेरिकन मुलीशी लग्न करून आपल्या शिक्षणाच्या जोरावर आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत भारतात परतल्यानंतर काळींगाला इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातली मूळची भारतीय संस्कृती जागी होते, तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा तो "पारखा" झालेला असतो अशी अगदी साधी कथा घेऊन भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली आहे. परंतु भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर होणारा दोन संस्कृतींमधील संघर्ष कादंबरीत ज्यापद्धतीने भैरप्पांनी दाखवला आहे त्याला खरोखरच तोड नाही. संस्कृती, श्रद्धा आणि व्यवहार यांच्या संघर्षाचं चित्रण भैरप्पा यांनी त्यांच्या या २७६ पानी कादंबरी "पारखा" मधून केलेलं आहे.

कादंबरीतील काळिंगगौडा म्हणजे गोपाळसंस्कृतीचे पालन करणारी, गायीला स्वतःच्या आईच्या ठिकाणी मानणारी, तीची अगदी मनापासून देखभाल करणारी एक हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आहे. या प्राचीन संस्कृतीत तो इतका मुरलेला आहे की गायीचा होणारा व्यावहारीक पातळीवरचा वापर त्याच्या आकलनापलिकडचा आहे. गायीच्या वासराने पिऊन जे काही दूध शिल्लक राहील तेवढेच दूध आपले, तेवढ्याच दुधावर आपला हक्क असं मानणारा हा काळींगगौडा! गायीच्या बाबतीत अतिशय भावनिक असणाऱ्या या काळींगगौडाचं एक उदाहरण भैरप्पांनी कादंबरीत दिलं आहे, जेव्हा गावातील कोंडवाडय़ातल्या एका गाभण गायीचा मालक तिला दिवसभर शोधायलाच येत नाही हे काळींगगौडाला समजतं तेव्हा तो तिचं ‘लेकमाणसासारखी आली’ म्हणून स्वतःच्या गाईंच्या गोठ्यात यथासांग बाळंतपण करतो. तो मालक आपल्या गायीला शोधत आल्यावर त्याला दोन दिवसांनी यायला सांगतो, कारण ओल्या बाळंतिणीला त्याने चालवत घरी न्यायला नको हे म्हणून. नंतरही कोवळ्या वासराला चालायला न लावता त्याला हातात घेऊन जायला काळिंगगौडा सांगतो, इतका तो गायीच्या बाबतीत हळवा आहे. आपल्या शिकलेल्या नातवाचे बोलणे त्याला समजत नाही. ‘ज्यानं घरातलं ज्ञानच समजावून घेतलेलं नाही, तो परदेशातून काय आणि किती शिकणार आहे?’ असं म्हणणारा हा काळींगगौडा! माळरानावर चरायला गेलेल्या गायींना तरसाच्या हल्ल्यातून वाचवताना काळींगगौडाच्या मुलाचा मृत्यू होतो. त्यानंतर आपला नातूच आपला गायीचा गोठा सांभाळेल, गाईंची काळजी घेईल या भोळ्या आशेवर असणाऱ्या काळींगगौडाचा आपल्या नातवाकडून इतका भ्रमनिरास होतो की तो परदेशातून परत येईल की नाही आणि आल्यावर घरात राहील की नाही याचीदेखील त्याला शाश्वती राहत नाही. आपल्या नातवाची आशा सोडून देऊन स्वतःला जमेल तसे गाईंची सेवा करणाऱ्या काळींगगौडाच्या समोर गाईंना सांभाळताना बऱ्याच समस्या येत राहतात आणि त्यातून मार्ग काढत भैरप्पांची ही कादंबरी पुढे सरकत राहते. विकासाच्या नावाखाली कमी होणारी चारायोग्य जमीन आणि त्यामुळे गाईंचे होणारे भविष्यातील नुकसान ओळखून काळींगगौडाची चाललेली धडपड काहीवेळा वाचकालाही भावूक करते. नातवाच्या अमेरिकेहून परत येण्यापूर्वीच काळींगगौडाचा मृत्यू होतो तेव्हा नकळत आता गाईंचे काय होणार हा प्रश्न वाचकाच्यादेखील मनात येतो. काळिंगगौडाच्या मरणाचे वर्णन म्हणजे जणूकाही भैरप्पांची कविताच आहे. आपण त्याच्यासमोर गोठ्यात उभे राहून जणूकाही त्याचं समाधानी मरणच बघत आहोत असा भास वाचकाला होतो. मरण्यापूर्वी तो यंग्टाकडे आपल्या गोठय़ाची जबाबदारी सुपूर्द करतो. गायींचे रोग, त्यावरची औषधे, निगा घेण्याची पद्धत वगैरे सगळं त्याला सांगतो. गायीच्या औषधाचे पैसे घेतलेस तर तुझा वंश टिकणार नाही, असेही वर बजावतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म गाढ श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पित भावाने करणाऱ्या काळिंगज्जाला शांत सुंदर मरण येतं आणि तेही त्याच्या गाईंच्या गोठयातच. इथून पुढे कादंबरीचा उत्तरार्ध सुरू होतो म्हटलं तरी चालेल. काळींगगौडाच्या मृत्यूनंतर अमेरिकेतून परतलेला त्याचा नातू आधुनिक शेतीच्या नावाखाली गावाबाहेर फार्महाऊस बांधून सर्व गाईंना तिकडे घेऊन जातो आणि सुरू होते त्याच्या मनातील भावनिक संघर्षाला! त्याच्या पत्नीकडून रागाच्या भरात पुण्यकोटी गायीला मारून तिचं मांस खाल्ल्यानंतर गावाकडून झालेला प्रखर विरोध आणि त्यातून उठलेल्या वादळात त्याला मनोमन होणाऱ्या पश्चात्तापामुळे पुन्हा त्याला आपल्याला बालपणी मिळालेल्या संस्करांची, शिकलेल्या संस्कृतीची ओढ निर्माण होते. अमेरिकन पत्नीसोबत गावाबाहेर राहत असताना सतत होणारी एकटेपणाची जाणीव त्याला नकळत पुन्हा त्याच्या जुन्या संस्कृतीशी जोडायला सुरुवात करते. परंतु तोपर्यंत खूप उशीर होतो आणि तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा "पारखा" होतो! विविध वळणे घेत कादंबरी शेवटाकडे जात असताना काळींगगौडाच्या नातवाला येणाऱ्या विविध अनुभवांतून, दोन संस्कृतीमधला संघर्ष भैरप्पांनी अतिशय उत्कृष्टपणे कादंबरीत उतरवला आहे. 

काळानुरूप संस्कृतीचा ऱ्हास होणे हे अपरिहार्यच आहे आणि ही एक अविरत चालणारी प्रक्रियाच आहे परंतु तिच्या जागी येणाऱ्या यंत्रसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार करणे पाश्चात्त्य जीवनशैली स्वीकारून आधुनिक झालेल्या काळिंगगौडाच्या नातवाला नाही जमत. शेवटी तो म्हणतो, ‘‘विद्युतशक्ती, वैज्ञानिक खतं यासारखं विज्ञान मलाही हवंय. पशूंना आजार झाले तर त्यांना बरं करणारं विज्ञानदेखील मला पाहिजे. पण हे पशू केवळ माणसाच्या उपयोगासाठीच आहेत असं मानणारा दृष्टिकोन मला अजिबात नकोय! आपणा भारतीयांची गोष्ट वेगळी आहे. आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे आणि गोपूजाही पाहिजे.’’ या वाक्यातून भैरप्पांनी कादंबरीतल्या समस्येचा गाभा मांडला आहे. शेवटी श्रद्धा आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय व्हायला हवा असेही ते सुचवतात. भैरप्पा यांच्या लेखनशैलीमुळे कादंबरीच्या पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचक कथेसोबत चिकटून राहतो.

आवर्जून वाचावी अशी कादंबरी "पारखा".





संदीप प्रकाश जाधव



Monday, July 19, 2021

"स्वाहा"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

भयकथा वाचाव्यात तर त्या धारपांच्याच असं कोणाकडून तरी एकदा ऐकलं होतं आणि त्यामध्ये खरंच किती तथ्य आहे याची जाणीव त्यांचं कोणतंही पुस्तक वाचताना येते. "अघटित", "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ" आणि आता "स्वाहा" हे धारपांचं माझ्या वाचनात आलेलं ५वं पुस्तक! त्यांचा कथासंग्रह असो की कादंबरी प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे एक थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारा, दचकवणारा आणि शेवटी वाईटावर चांगल्याच्या विजय होऊन सर्वकाही ठीकठाक झाल्यानंतर होणारा कथेचा शेवट! जरी या समान धाग्याला पकडून त्यांची सर्व पुस्तके लिहिली गेली असली तरीही सर्व पुस्तकांत एक वेगळेपणा आहे जो वाचकाला प्रत्येकवेळी खिळवून ठेवतो! याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे नारायण धारप यांची प्रचंड कल्पनाशक्ती! नारायण धारप यांच्या भयकथा म्हणजे कल्पनाशक्तीचा कळसच म्हणावं लागेल. त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक! मानवी मन हे नेहमीच रहस्याकडे आकर्षित होते, त्याला नेहमीच कोणतंही रहस्य जाणून घेण्याची आणि उलगडण्याची उत्सुकता असते. कोणत्याही प्रकारचं रहस्य जाणून घेण्याची माणसाला असणारी हीच उत्कंठा लक्षात घेऊन लिहिलेल्या नारायण धारपांच्या कथा पहिल्या पानापासून नव्हे तर त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासूनच वाचकाला घेरायला चालू करतात. त्यांच्या उत्कंठावर्धक रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून पडतो आणि एका वेगळ्याच जगात गेल्याचा रोमांचक अनुभव घेत राहतो. भीतीने अंगावर शहारे येणे म्हणजे काय याची जाणीव धारपांच्या भयकथा वाचताना होते. एखादा अतिशय हॉरर चित्रपट पाहताना जितकी भीती आपल्याला वाटू शकते तितकीच किंबहुना त्याच्याहून थोडी जास्तच भीती धारपांच्या कथांमधून जाणवते. भीतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नारायण धारप यांच्या भयकथा वाचन हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल. त्यांच्या ५०हून अधिक पुस्तकांच्या पंक्तीमधील ही भय कादंबरी "स्वाहा"! अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणाऱ्या, २४० पानांच्या "स्वाहा" मधून धारपांनी वाचकाला भीतीचा अगदी जवळून अनुभव करून दिला आहे. 

शहरालगतच्या, स्टेशन रोडवरील विरळ वस्तीतील एक तीन मजली इमारत आणि तिच्या आसपासच्या परिसरामध्ये घडणारी ही थरारक कादंबरी "स्वाहा"! एखाद्या भयपटाला साजेशी सुरुवात. या तीन मजली जुन्या वास्तूचा रहस्यमय तिसरा मजला आणि दर ३ वर्षांनी त्या वास्तूमध्ये जागृत होणारी एक दुष्ट शक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कादंबरी! श्रीधरची अमेरिका रिटर्न बहीण तिच्या कुटुंबासोबत भारतात स्थायिक होण्यासाठी आल्यानंतर तात्पुरत्या वास्तव्यासाठी नेमकी हीच इमारत भाड्याने घेतात आणि मग सुरुवात होते या थरारक प्रवासाला! त्या वास्तूत रहायला गेल्यानंतर श्रीधरची बहीण विनिता आणि भाचा सुनील यांना येणारे विचित्र अनुभव वाचताना अंगावर शहारे येतात. तिसरा मजला आणि तिथे वावरणाऱ्या अनामिक शक्तीचे धारपांनी केलेलं वर्णन तर खासच! नंतर अचानकच त्या संपूर्ण कुटुंबाच्या गायब होण्याने कथेमध्ये एका गूढ रहस्याचा प्रवेश होतो. बाहेरगावी जाऊन परत आल्यानंतर श्रीधर जेव्हा त्यांच्या या अचानक गायब होण्याच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा त्याला त्या वास्तूबाबत येणाऱ्या विविध अनुभवांतून या कादंबरीची कथा उलगडत जाते. या शोधादरम्यान पुढे ३ वर्षें ही वास्तू सुप्तावस्थेत राहते आणि पुन्हा त्याच घटनांची पुनरावृत्ती होते जेव्हा श्रीधरच्या बहिणीप्रमाणेच अरुणाचे कुटुंब त्या वास्तूत रहायला येते. कथेतील सर्व घटना धारपांनी इतक्या ताकदीने रंगवल्या आहेत की वाचकाला स्वतःच त्या वास्तूत असण्याचा भास काही क्षण व्हावा आणि याच धारपांच्या जादूमुळे आजही वाचक त्यांच्या कथांचा चाहता आहे. दर ३ वर्षांनी घडणाऱ्या या घटनांचा नेमका अर्थ काय? श्रीधर आणि अरुणा यांच्याशिवाय आणखी कोणा-कोणाला या दुष्ट चक्रातून जावं लागलं? त्या दुष्ट शक्तीला दर ३ वर्षांनी द्याव्या लागणाऱ्या मनुष्याच्या प्राणांच्या आहुतीसाठी माणसांची निवड कोण, कशी आणि कधी करते? ही आहुती का द्यावी लागते? त्याचे नेमके कारण काय? या दुष्टचक्राचा शेवट कसा होतो? त्यासाठी श्रीधर कोणकोणते मार्ग वापरतो? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आणि धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी "स्वाहा" वाचावीच लागेल.

भयकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "स्वाहा".




संदीप प्रकाश जाधव






Monday, July 12, 2021

"मी माणूस शोधतोय"

 



लेखक : व. पु. काळे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


वसंत पुरुषोत्तम काळे अर्थातच "वपु" यांच्या नावाचं एक वेगळंच वलय मराठी साहित्यविश्वात आहे. वाचनाची आवड असो वा नसो "वपु" हे नाव माहीत नसणारी व्यक्ती सापडणे कठीणच! सध्याच्या "सोशल मिडिया"च्या जमान्यात तर वपुंनी लिहिलेल्या त्यांच्या बऱ्याच पुस्तकांतील वाक्यांची खूपच "चलती" आहे. "वपुं" सारख्या अगदी बोटांवर मोजता येण्यासारख्या लेखकांचं वैशिष्ट्य म्हणा किंवा सर्वांत मोठं यश म्हणा, ते प्रत्येक पिढीतील वाचकांना आपलेसे वाटतात. त्यामुळेच ६०-७० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या त्यांच्या बऱ्याच पुस्तकांची जादू आजही कायम आहे. वपु म्हटलं की चटकन डोक्यात विचार येणारी पुस्तके "पार्टनर" आणि "वपुर्झा". परंतु याखेरीज ४० वर्षांमध्ये त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीने लोकांना सांगणारे वपु पेशाने आर्किटेक्ट असल्याने त्यांना शब्दांचे महाल बांधणारा लेखक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. वपुंच्या पुस्तकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लिखाण हे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य दाखवणारे असते त्यामुळे वाचक त्यामध्ये हरवून जातो. "मी माणूस शोधतोय" हे माझ्या वाचनात आलेलं वपुंच्या दर्जेदार पुस्तकांमधील आणखी एक पुस्तक. वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर - "मी माणूस शोधतोय", माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या तर कधी संपूर्ण स्वरूपात; पुष्कळदा तो निसटलाही. या माणसानं मला कधी हसवलं, कधी रडवलं, कधी भुलवलं, कधी हरवलं, कधी फुलवलं, कधी थकवलं, कधी बैचेन केलं, तर कधी अंतर्मुख! तरीही माझा शोध चालूच आहे आणि चालूच राहणार; माझा 'पेशन्स' दांडगा आहे. याचं श्रेयही पुन्हा माणसांनाच! वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली. वपुंचा हा निरंतर शोधाचा प्रवास पूर्ण झालेला नसला तरी त्यांनी निष्कर्ष मात्र काढला आहे आणि तो म्हणजे - "जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे"... "मी माणूस शोधतोय" हा कथासंग्रह आहे वपुंना भेटलेल्या अशाच चांगल्या माणसांचा! प्रत्येक कथेला साजेसं असं शीर्षक आणि अगदी सहज - सुंदर मांडणीतून त्यांना भेटलेल्या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपु स्टाईलने "मी माणूस शोधतोय" मधे वपुंनी उतरवल्या आहेत.

"मी माणूस शोधतोय" या कथा संग्रहातील प्रत्येक कथेत वपुंना भेटलेल्या अशा लोकांच्या कथा आहेत ज्यांचं आयुष्य कोणत्या ना कोणत्या छंदाने किंवा वेडाने व्यापून गेलं आहे आणि आपला छंद किंवा वेड जोपासण्यासाठी चालू असणाऱ्या त्यांच्या विविध गोष्टींनी या सर्व कथा सजलेल्या आहेत. चांगल्या माणसांच्या शोधात असणाऱ्या वपुंची पहिली कथा "मी माणूस शोधतोय" ही फिरते कौतुक सप्तर्षी या अवलिया भोवती. वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना तब्बल २ तपे कौतुकास्पर पत्रे लिहिणारा, नकळत त्यांच्यासोबत फोटो काढून घेणारा आणि तेही आपली कोणतीही ओळख त्या लोकांपर्यंत न पोहचवणारा असा हा कौतुक सप्तर्षी! पत्तादेखील माहीत नसताना वपुंची कौतुक सप्तर्षींसोबत होणारी भेट, प्रत्यक्ष लोकांपर्यंत न पोहचता देखील त्यांनी अनेकांची जिंकलेली मने, त्यातून त्यांना प्राप्त झालेली नोकरी, त्यांचा जीवन प्रवास, हळूहळू त्यांच्या छंदाचा वाढत जाणारा परीघ, हे सर्व होत असतानाही त्यांनी आपल्या अंगी जोपासलेला विनम्र भाव आणि शेवटी या अवलियाचे अपघाताने दुर्दैवी निघून जाणे हे वपुंनी अगदी सहज साध्या शब्दांत मांडले आहे. अनेक माणसं जन्माला येतात, जगतात आणि निघून जातात पण कौतुक सप्तर्षी यांच्यासारखी छंद वेडी माणसं मरून सुद्धा त्या छंदाने कायम जिवंत राहतात आणि हेच माणसाच्या जगण्यातील मोठेपण आहे हे सांगणारी ही पहिली कथा "मी माणूस शोधतोय". या कथासंग्रहातील आणखी एक मनाचा ठाव घेणारी कथा "नालायक". शाळेतील खोडकर मुलांना सतत "नालायक" म्हणून ओरडणारे शिक्षक आणि त्यांच्या या अशा ओरडण्यातून मुलांच्या मनावर होणारा परिणाम, आपण कोणतीच गोष्ट करण्यासाठी लायक नाही असा त्यांच्या मनात निर्माण होणारा न्यूनगंड यामुळे वाहवत जाणारी काही मुले तर याच ओरडण्यातून काही मुलांच्या मनावर होणारा सकारात्मक परिणाम या दोन्हींच्यामधे वाचकाला गुंतवून ठेवणारी ही कथा. या कथासंग्रहातील इतर कथा हप्ता, अंतर, हुतात्मा, रमी, मुहूर्त, टाहो, टेरीलिन, शोध, ऋतू बसंती रुठ गयी समाजातील चांगुलपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये जगत असताना आपल्याला अनेक माणसं भेटत असतात, आपल्या वेगवेगळ्या गुणवैशिष्टांनी ते आपलं व्यक्तित्व सिद्ध करतात आणि अशा चांगुलपणा असणाऱ्या माणसांची संख्या समाजामध्ये जास्त आहे हाच निष्कर्ष वपुंनी या कथासंग्रहातून काढलेला आहे तोही खास वपुंच्या शैलीतून!

वपुंच्या दर्जेदार लिखाणासाठी आवर्जून वाचावा असा कथासंग्रह.





संदीप प्रकाश जाधव

 

Monday, July 5, 2021

"स्वामी"

 


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


मराठी साहित्यात रणजित देसाई या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. साहित्यविश्वात "स्वामीकार" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईंची "स्वामी" ही पहिली ऐतिहासिक कादंबरी! "स्वामी" कादंबरी म्हणजे थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथाच! मराठ्यांच्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर स्वराज्य निर्मितीपासून ते पेशवाईच्या अंतापर्यंत अशा बऱ्याच व्यक्ती आपल्यासमोर येतील ज्यांच्या कारकिर्दीला एकाचवेळी आपलं सौभाग्य आणि दुर्भाग्य अशा दोन टोकाच्या दृष्टिकोनांतून पहावं लागेल, अगदी शिवरायांनासुद्धा! सौभाग्याचं कारण सांगायची गरज नसली तरी दुर्भाग्य एवढ्यासाठी म्हणावं लागेल की अशा महान लोकांच्या वाट्याला आलेलं अल्पायुषी जीवन! ऐतिहासिक कादंबरी वाचत असताना माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या मनाला एकदा तरी नक्कीच असं वाटलं असणार की छत्रपती शिवजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव, पेशवा माधवराव आणि असे बरेच थोर लोक ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, आपल्या छोट्याशाच पण देदीप्यमान कारकिर्दीने जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं ते जर इतर मुघल किंवा आदिलशाही बादशहांप्रमाणे दीर्घायुषी असते तर आज आपला इतिहास काय असता? इतिहासाला "जर-तर" हे शब्द वर्ज्य असले तरी फक्त असा विचारच आपल्या अंगावर अभिमानाने शहारे घेऊन येतो. अल्पायुषी जरी असल्या तरी इतिहासात अशा काही कारकिर्दी आहेत ज्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेल्या आहेत. आजही त्या सामान्य लोकांना जगण्याची, लढण्याची उमेद देतात! अशाच कारकिर्दीपैकी एक झळाळती कारकीर्द श्रीमंत माधवराव पेशवे यांची! अवघ्या १६-१७ व्या वर्षी अंगावर पडलेली भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्याची मोठी जबाबदारी, पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली राज्यकारभाराची घडी, राघोबादादांसारख्या अटकेपार झेंडे लावणाऱ्या पराक्रमी काकांची घरातूनच त्यांच्याविरुद्ध चाललेली कट-कारस्थाने या सर्वांवर मात करून माधवरावांनी त्यांच्या फक्त ११ वर्षांच्या कारकिर्दीत राज्य तर सावरलेच शिवाय त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली चाललेल्या राजकारणामुळे पानिपतातील पराभवाने सरदार, सैन्य आणि प्रजेच्या मनावर झालेल्या जखमांवर फुंकर घालून एक नवी ऊर्जा निर्माण झाली. रणजित देसाईंची "स्वामी" ही ऐतिहासिक कादंबरी माधवराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. ४१३ पानांच्या या कादंबरीतून रणजित देसाईंनी माधवराव पेशव्यांची जी कारकीर्द लिहिली आहे ती जणूकाही आपल्या समोरच घडत असावी इतक्या ताकदीने मांडली आहे. त्यामुळेच १९६२ साली लिहिल्या गेलेल्या या कादंबरीची जादू साहित्यविश्वात आजही टिकून आहे. "स्वामी" नंतर शिवरायांवरील "श्रीमानयोगी" ही अजरामर कादंबरी त्यांनी लिहिली परंतु "रणजित देसाई" म्हटलं की आजही पहिला डोक्यात विचार येतो तो "स्वामी"चाच! रणजित देसाईंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ विषयाला जराही धक्का न लावता वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी मांडणी आणि संवाद! कादंबरी वाचत असताना वाचकाला त्या काळात घेऊन जाण्याची हातोटी असणाऱ्या मोजक्याच लेखकांपैकी एक "रणजित देसाई"! त्यांची "स्वामी" ही कादंबरीदेखील याला अपवाद नाही.

पानिपतचा पराभव ही समस्त मराठ्यांच्या जिव्हारी लागलेली, कधीही भरून न निघणारी जखम! पानिपतच्या संग्रामात भाऊंसोबतच विश्वासराव देखील कामी आले. ज्यांच्याकडे भावी पेशवा म्हणून पाहिलं जात होतं असा आपला मुलगा विश्वासराव आणि बंधू सदाशिवराव भाऊ यांचा मृत्यू शिवाय पानिपतचा पराभव अशा तिहेरी धक्क्याने लढाईनंतरच्या अवघ्या ५ महिन्यांत नानासाहेब पेशव्यांचे निधन झाले. त्यानंतर आपसूकच पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांना मिळाली तीही वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी! पानिपतावर झालेला मोठा पराभव आणि नानासाहेब पेशव्यांच्या अकस्मात जाण्याने मराठा साम्राज्याची घडी विस्कळीत व्हायला सुरुवात झाली होती. दख्खनमधे निजाम तर कर्नाटकात हैदर अली यांना जोर चढला होता, मराठा मुलुखावर हल्ले होऊ लागले होते! त्यामधे भर पडली ती स्वकीयांच्यामुळे, नागपूरकर भोसल्यांना सातारा गादीची स्वप्ने पडू लागली आणि त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला. शिवाय सर्वांत वाईट गोष्ट जर कोणती असेल तर ती पेशव्यांच्या घरात चालू झालेलं गृहयुद्ध! पेशवे पदासाठी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नानासाहेब पेशव्यांचे धाकले भाऊ राघोबादादा यांच्याकडून माधवरावांविरुद्ध वारंवार होणाऱ्या कट-कारस्थानांना ऊत आला. माधवरावांची ११ वर्षांची कारकीर्द या सर्वाचा निकाल लावण्यातच गुंतून जाते. हैदरचा बिमोड करण्यासाठी कर्नाटकवर ४, निजामाला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर २ आणि नागपूरकर भोसल्यांवर २ अश्या एकूण आठ स्वाऱ्या माधवरावांनी केल्या. माधवरावांचा सर्वात जास्त काळ हा घरभेद्यांवर लक्ष देण्यातच गेला. कारण राघोबादादा कितीही पराक्रमी असले तरी ते हलक्या कानाचे आणि अविचारी असा त्यांचा लौकिक होता शिवाय सतत त्यांचा पेशवाईवर असणारा डोळा! माधवरावांनी राघोबादादांना अनेक वेळा समजावून सांगितलं, तरीही सखारामबापूंच्या सल्ल्याने ते आळेगावत माधवरावांविरुद्ध युद्धास उभे राहिले. मराठा दौलतीच्या हितासाठी आळेगावच्या लढाईनंतर माधवरावांनी स्वतः नमते घेऊन राज्याची सूत्रे राघोबादादांना देऊ केली परंतु राघोबादादांच्या कारवायांना पूर्णपणे पायबंद होत नसल्याचे पाहून शेवटी त्यांना शनिवार वाड्यातील बदामी महालात नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय माधवरावांना घ्यावा लागला. राजकारणाच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसलेले परंतु पेशव्यांच्या घरातील शांततेला बाधा आणणारे "तोतया सदाशिवराव भाऊ" प्रकरण माधवरावांनी ज्यापद्धतीने हातावेगळं केलं ते त्यांच्या हुशारी, धीरोदात्तपणाची साक्ष देते. 

राज्यकर्त्यांची खरी कसोटी लागते ती भावनिक पातळीवरच्या प्रकरणांचा निवाडा करताना. याठिकाणीही इतक्या कमी वयात माधवरावांकडे असणारी प्रगल्भता थक्क करून जाते. याचे उदाहरण म्हणजे निजाम पुण्यात येऊन सर्व शहर लुटून पर्वतीवरच्या श्रींची मूर्ती भंग करत असताना पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते निजामाला मदत करत होते. हे समजल्यानंतर या गुन्ह्यासाठी माधवरावांनी त्यांना दंड ठोठावला. तोही आपल्या मातोश्री, गोपिकाबाईंचा रोष पत्करून! कर्तव्यदक्ष माधवरावांनी दंड मागे न घेतल्याने रागावून गोपिकाबाई कायमच्या गंगापूरला निघून गेल्यानंतर माधवराव मातृप्रेमास पारखे होतात. यानंतर परत माधवराव आणि गोपिकाबाई यांच्या भेटीचा उल्लेख नाही. एकाकी पडलेल्या माधवरावांना पत्नी रमाबाई सोडल्यास जवळचे असे कोणीच रहात नाही. त्यातच त्यांना जडलेला राजयक्ष्मासारखा जीवघेणा आजार! तरीही ते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त मराठी दौलतीचाच विचार करत राहिले. हे सर्व घटनाक्रम ज्या पद्धतीने रणजित देसाईंनी कादंबरीत दिले आहेत ते वाचत असताना बऱ्याच वेळा वाचकाचे भान हरवून जाते. रणजित देसाईंच्या "स्वामी"ची शेवटची २० पाने तर खूपच भावनिक आहेत. माधवरावांचे थेऊर मधील अखेरचे दिवस आणि मृत्यू समोर दिसत असतानादेखील त्यांची तडफ वाचकाला कमालीचं अस्वस्थ करते, नकळत डोळ्यांत पाणी येते. रमाबाईंचा सती जाण्याचा प्रसंग सुद्धा असाच वाचकाला भावूक करतो. माधवरावांच्या अवघ्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर विस्कटलेली राज्याची घडी पुन्हा बसवली. हैदर अली, निजाम यांच्यासारखे दौलतीचे शत्रू आणि राघोबादादांसारखे सख्खे काका यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. माधवरावांच्या अकस्मात मृत्यूनंतर मराठा साम्राज्य उतरणीला लागले असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. म्हणूनच पेशवाईच्या काळात साताऱ्यात वास्तव्याला असणारा ब्रिटिश इतिहासकार, ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला तो ग्रॅंट डफ म्हणतो मराठा साम्राज्याची पानिपतापेक्षाही मोठी हानी म्हणजे माधवराव पेशवे यांचा अकाली मृत्यू! 

आवर्जून वाचावी अशी कादंबरी!!



संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये