Monday, September 27, 2021

"काळाचा संक्षिप्त इतिहास"

 


लेखक : स्टीफन हॉकिंग

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

मराठी अनुवाद : डॉ. सुभाष के. देसाई

पृष्ठे- २२६, मूूल्य- ३०० रुपये


शास्त्रज्ञ म्हणजे काय किंवा हे शास्त्रज्ञ म्हणवणारे लोक नेमकं करतात काय हेदेखील जेव्हा कळत नव्हतं त्या वयापासून ते आजतागायत मला दोन लोकांविषयी कमालीचं कुतूहल होतं, आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग. दोघांनीही आपापल्या देशांत राहून जागतिक संशोधन क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. इतर क्षेत्रात मिळते तशी लोकप्रियता शक्यतो शास्त्रज्ञांच्या वाट्याला येत नाही कारण त्यांचं काम नेहमीच पडद्यामागे राहून अविरतपणे चाललेलं असतं. माणसाचे वयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सुखकर करणाऱ्या अशा हजारो गोष्टी पडद्यामागे अपार मेहनत करून "शास्त्रज्ञ" बनवत असतात पण लोकप्रियता ही नेहमी त्यांच्यापासून चार हात दूरच राहते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग हे सध्याच्या घडीला याला अपवाद मानता येतील. एखाद्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्यादेखील वाट्याला येणार नाही अशी लोकप्रियता मिळवणारे हे दोन महान शास्त्रज्ञ! डॉ. हॉकिंग यांच्याबद्दल बोलायचं झालं ते आजच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय शास्त्रज्ञ होते. 'मोटार न्यूरॉन डिसीज' या दुर्धर रोगाशी आयुष्यभर झटत, शरीराच्या सर्व प्रतिकूलतेवर मात करीत, मृत्यूशी झुंज देत देशाच्याच नाही तर भाषेच्याही सीमा ओलांडून सामान्य माणसांपर्यंत पोहचलेल्या डॉ. हॉकिंग यांनी केलेल्या कामाला तोड नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी ही व्याधी जडल्यानंतर अवघ्या दोन वर्षांचे आयुष्य डॉक्टरांनी दिलेले असताना, मृत्यूवर मात करीत ते पुढे अर्ध्या शतकाहून अधिक काळ कार्यरत राहिले. त्यांची हालचाल मंदावली, जवळजवळ थांबली, वाचा गेली, परंतु ते हरले नाहीत! आपले काम करीत राहिले. त्यांना विश्व जाणून घ्यायचे होते, ते का अस्तित्वात आले आणि ते जसे आहे तसे का आहे, याचा शोध घ्यायचा होता! आपले पाऊणशे वर्षांचे सारे आयुष्य हॉकिंग यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात खर्ची केली आणि त्यातून जे हाती आले ते त्यांनी शास्त्रीय चौकटीत मांडले. भौतिकशास्त्राच्या, खगोलशास्त्राच्या रूढ सिद्धान्तांना धक्का देणारं संशोधन त्यांनी केलं. ज्यावर इतर शास्त्रज्ञांसोबत त्यांचे मतभेदही झाले पण त्यामुळे पुढील संशोधनास एक दिशा मिळाली. विश्वनिर्मिती आणि कृष्णविवर यांवरील त्यांच्या संशोधनावरदेखील नेहमी शास्त्रीय वाद होत असले तरी भावी संशोधनासाठी अनेक द्वारे त्यांनी खुली केली. अशाच पद्धतीने काळाबद्दल संशोधन करून ऐंशीच्या दशकात त्यांनी "काळाचा संक्षिप्त इतिहास" लिहिला ज्याने पुढे इतिहास घडवला. भयकथा, गूढकथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांवर वाचकांच्या जशा उड्या पडतात, तशा त्या शास्त्रीय पुस्तकांवर पडणं कठीणच! मात्र, डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी ही कठीण गोष्ट अगदी सहज साध्य करून दाखविली. त्यांनी लिहिलेल्या "काळाचा संक्षिप्त इतिहास". पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाने इतिहास घडविला. जगभरातील ४० भाषांत अनुवादित झालेले हे पुस्तक तब्बल २३७ आठवडे 'बेस्ट सेलर' ठरले होते. त्यामुळे या पुस्तकाची नोंद 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नेही घेतली. सामान्य लोकांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत महास्फोटापासून कृष्णविवरापर्यंतच्या "काळाचा संक्षिप्त इतिहास" डॉ. हॉकिंग यांनी या पुस्तकातून मांडला आहे. हे जग कसे आहे ते समजून न घेताच आपण आपले रोजचे आयुष्य जगत असतो. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? सूर्यप्रकाश कसा तयार होतो? त्यांचं आपल्या जगण्यासाठी असणारं महत्व काय? हा निसर्ग असा का आहे? हे विश्व कुठून निर्माण झाले? काळाची दिशा उलट फिरली तर काय होईल? मानवी ज्ञानाला मर्यादा आहेत का?कृष्णविवर म्हणजे काय? आपल्याला भूतकाळ आठवतो पण भविष्यकाळ माहीत नसतो, असे का? या विश्वाचा आरंभ कसा झाला? या विश्वाला अंत आहे की अंतहीन आहे? या विश्वाला सीमा आहे की नाही? अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत? काळाच्या प्रवाहाला एकच दिशा आहे का? लहान मुलांचा अपवाद सोडला तर असे प्रश्न पडणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने त्यांच्या या "काळाचा संक्षिप्त इतिहास" मधून दिलेली आहेत.

आपल्याला हे एकमेव आयुष्य लाभले असून, याच आयुष्यात विश्वाला समजून घ्यायचे आहे आणि मी तेच करतो आहे, असे म्हणणाऱ्या डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी संपूर्ण आयुष्यभर विश्वाच्या रहस्याचा शोध घेतला. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची साक्ष देणारं आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "काळाचा संक्षिप्त इतिहास".









संदीप प्रकाश जाधव



Wednesday, September 15, 2021

"मुकद्दर"

 



 

लेखक : स्वप्निल कोलते

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

                                                                           पृष्ठे- २११, मूूल्य- ३०० रुपये.


औरंगजेब तसा ना.सं.इनामदार यांच्या "शहेनशहा" या कादंबरीत वाचला होता. ते चरित्र जरी बादशाह औरंगजेबाचं असलं तरी मराठ्यांच्या पराक्रमाची उंची सांगणारं होतं. जवळपास ५० वर्षें दिल्लीच्या तख्तावर बसून राज्य केलेल्या या शहेनशहाची अर्ध्याहून अधिक कारकीर्द मराठ्यांशी लढण्यात गेली आणि पूर्ण ताकदीनिशी, मोठमोठ्या पराक्रमी सरदारांची सोबत असताना शिवाय बऱ्याच मराठा सरदारांना फितवूनही शेवटी त्याच्या पदरी पराभवच आला. तरीही स्वराज्याचा इतिहास हा खरेतर औरंगजेबाशिवाय पूर्णच नाही होऊ शकत! भोसले घराण्याच्या तीन पिढ्या पाहिलेला आणि त्यांच्याशी रणभूमीवर लढणारा हा शहेनशहा क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता ह्या सोबतच भयंकर महत्वाकांक्षी होता! थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा होता. लोभी होता पण फकीराप्रमाणे राहायचा. धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या ह्या सर्व गुणांचा वापर करून त्याच्या इतक्याच ताकदीच्या सगळ्या शत्रूंना संपवून तो मुघल तख्तावर बसला खरा, पण स्वतःला नियती म्हणजेच "मुकद्दर" समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचेच "मुकद्दर" लिहू शकला नाही. दख्खनच्या पहाडांनीच त्याचं "मुक़द्दर" लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दख्खनचा घास गिळून, संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करायची स्वप्ने बघत, आपल्या विशाल सागर सेनेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिला सुरुंग लावला तो छत्रपती संभाजी महाराजांनी! तब्बल ९ वर्षें, लाखो सैन्य आणि एकाहून एक मातब्बर सरदार सोबत असूनदेखील हा दिल्लीश्वर स्वराज्यापुढे हतबल झाला. शेवटी स्वकीयांच्या फंदफितुरीनेच घात केला आणि संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर आता मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात राहणाऱ्या औरंगजेबाचं "मुकद्दर" खरं तर त्याच दिवशी मराठ्यांच्या हातात गेलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चवताळून उठलेले मराठे सुरुवातीला राजाराम महाराज आणि नंतर ताराबाई महाराणी यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य वाचवण्यासाठी लढत राहिले. आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर २७ वर्षें मराठयांनी औरंगजेबाला लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. फक्त स्वराज्य वाचवलंच नाही तर शंभूपुत्र थोरल्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीत दिल्लीचेही तख्त राखलं आणि मुघलांना नाममात्र बादशाह केलं. मराठ्यांकडून झालेला हा अफाट पराक्रम एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. आशिया खंडातील सर्वांत सामर्थ्यवान सुलताना विरुद्धचा मराठ्यांचा हा संघर्ष किती मोठा आणि प्रेरणादायी आहे याची जाणीव औरंगजेब वाचल्याशिवाय नाही येत. स्वप्नील कोलते यांनी त्यांच्या या "मुकद्दर" मधून औरंगजेबाच्या दक्षिणेतील शेवटच्या दिवसांचे वर्णन आणि मराठ्यांसोबत चाललेला संघर्ष रेखाटला आहे. हे चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी पानापानावर दिसत राहतो तो मराठ्यांचा पराक्रम! आपल्या शेवटच्या दिवसांत औरंगजेबाला त्याने केलेल्या दख्खन स्वारीचा पावला-पावलावर होणारा पश्चात्तापच खूप काही सांगून जातो. औरंगजेब जितक्या कट्टरतेने मराठ्यांशी लढला, तेवढीच मराठ्यांची स्वराज्यासाठी लढण्याची तळमळ वाढली आणि तेवढाच कडवा प्रतिकार मराठ्यांनी केला. रायगडावर बत्तीस मण तख्तावर पेटलेली क्रांतीची ही ठिणगी शहेनशहा औरंगजेबाला नेस्तनाबूत करूनच शांत झाली. मृत्यू शय्येवर असताना, आपल्या मुलीसोबत बोलताना औरंगजेबाच्या तोंडून बाहेर पडलेली शेवटची वाक्ये मराठ्यांच्या या अफाट पराक्रमाची साक्षच देतात. "हमारी जिंदगी की सबसे बडी गलती यह है की हमनें सिवा को आगरा से भागने दिया! इस्लाम में पुनर्जन्म नहीं मानते, पर फिर भी कभी खुदा के करम से हम वापिस इंसान की जात में पैदा हुए तो हम इन पहाडों से और मराठो से लडने नही आऐंगे, कभी नही..."

स्वप्नील कोलते यांनी एका वेगळ्या पद्धतीने लिहिलेली, आवर्जून वाचण्यासारखी मराठ्यांच्या पराक्रमाची ही गाथा "मुकद्दर".




संदीप प्रकाश जाधव

Tuesday, September 7, 2021

"कबंध"

 


 

लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

                                                                           पृष्ठे- १५३, मूूल्य- १८० रुपये.


गूढकथा किंवा रहास्यकथांचा उल्लेख आल्यानंतर सर्वात प्रथम डोळ्यासमोर येणारी नावे नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी! गूढ आणि रहास्यकथांचा मराठीतील साहित्यप्रकार या दोन नावांशिवाय पूर्णच नाही होऊ शकत! मराठी साहित्यविश्वात गूढ आणि रहास्यकथांचं दालन समृद्ध करण्यात या दोन व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे. ६०-७० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या यांच्या कथा आजही लोक तितक्याच आवडीने वाचतात यातच त्यांच्या लेखनाचं वेगळेपण लक्षात येतं. नेहमीच्या पाहण्यात नसलेलं, ज्याची कदाचित भीती वाटू शकेल पण ते भीतिदायक नाही ते म्हणजे गूढ. एखाद्याला भीती का वाटते हे शोधणे म्हणजे सुद्धा एकप्रकारचे गूढच. गूढकथा म्हणजे आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच एक गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का? याचे समाधानकारक उत्तर अजून मिळालेले नाही. अशा सर्व गूढ गोष्टींचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. याच आकर्षणाला केंद्रस्थानी ठेवून, आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर या दोन्ही लेखकांचे बरेच कथासंग्रह प्रकाशित झाले. अशाच दर्जेदार कथासंग्रहातील रत्नाकर मतकरी यांचा एक गूढकथासंग्रह "कबंध". भेदक रहस्यांची गुंफण करत लिहिला गेलेला रत्नाकर मतकरींचा प्रत्येक कथासंग्रह खासच आहे आणि "कबंध" देखील त्याला अपवाद नाही. रहस्यकथेतील रहस्य हे त्या कथेसोबतच संपून जाते पण गूढकथांचं वैशिष्ट म्हणजे कथा संपल्यानंतरसुद्धा वाचकाच्या मनात राहून जाणारी त्या गूढतेची एक अदृश्य किनार! "कबंध" मधील प्रत्येक कथा वाचकाला त्या गूढ वातावरणात घेऊन जाते. "कबंध" चा अर्थ शिरावेगळे धड! यावरच बेतलेल्या या कथासंग्रहातील पहिल्या गूढकथेचे नावच या संग्रहाला दिलेलं आहे, "कबंध". अशाच इतर ११ गूढकथांमधून, कथेच्या नायकाला येणाऱ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील गूढ अनुभव व तर्कापलीकडील घटना यांची सांगड घालून रत्नाकर मतकरींनी अतिशय प्रभावी शैलीने या कथा पेश केल्या आहेत ज्या वाचत असताना त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय वाचक राहूच शकत नाही. १५३ पाने आणि १२ कथांचा एका बैठकीत वाचून पूर्ण होण्यासारखा, गूढतेने खचाखच भरलेला असा हा कथासंग्रह "कबंध".

"कबंध" या पहिल्याच कथेत मतकरींनी अतिशय भन्नाट वातावरणनिर्मिती केली आहे. नायकाचा भूतकाळ अचानक त्याच्या समोर उभा राहिल्यानंतर हळूहळू त्या रहस्यमय घटनांचा फ्लॅशबॅकमधे होणारा उलगडा म्हणजे ही कथा. मधुरा आणि रवी हे नवविवाहित दांपत्य लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदाच एका लांबच्या बंगल्यात, निसर्गरम्य वातावरणात येतात त्याच रात्री सुरुवात होते या गूढ प्रकरणाची. पहिल्याच रात्री रवीला एका स्त्रीचं शीर नसलेलं फक्त धड दिसतं. तिचा आणि रवीचा काय संबंध? ती त्याचा पाठलाग का करते? या पाठलागाचा शेवट काय होतो? या गोष्टी रत्नाकर मतकरी यांनी अतिशय ताकदीने रंगवल्या आहेत. दुसरी कथा "श्रीमंत"! अत्यंत गरिबीत जगणारा रमाकांत व त्याची पत्नी रजनी यांच्याभोवती फिरणारी ही कथा. कामधंदा नसल्यामुळे होणारी आर्थिक ओढाताण, औषध न मिळाल्याने त्याच्या लहान मुलीचं झालेलं निधन आणि हताश झालेली पत्नी रजनी. अशा वातावरणात, झटपट श्रीमंत होण्यासाठी रमाकांत अघोरी मार्गाला लागतो. हा मार्ग त्याला श्रीमंतीकडे कसा घेऊन जातो? त्याचे काय परिणाम होतात? या सर्वांत त्याला काय अनुभव येतात? याचं थरारक चित्रण या कथेत वाचायला मिळेल. "दृष्टा" अशीच वेगळ्या पद्धतीची कथा! लहानपणापासून बुद्धी नसलेल्या, पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असणाऱ्या मुलाची, पंडितची ही कथा. बुद्धीने कमी असला तरी एक असाधारण अशी शक्ती लाभलेला हा पंडीत. म्हणूनच स्वत:च्या आईचं मरण, साने वकिलांनी केलेला आपल्या सुंदर पत्नीचा खून अशा गोष्टी त्याला आधीच दिसतात आणि या अतिशय वेगळ्या धाटणीच्या कथेचा शेवटही अगदी तसाच धक्का देणारा असा आहे. "लपा-छपी" ही लहानपणीच जन्म देऊन आई वारल्याने वडिलांचा रोष निर्माण झालेल्या विल्कूची कथा. वडील त्याला मुंबईला घेऊन जात नसल्याने आजीकडे शहाड या छोट्याशा गावी राहणाऱ्या विल्कूची खुनशी वृत्ती कशी उफाळते आणि शेवटी तो आपल्या आजीलाच कसा ठार मारतो याचं अतिशय परिणामकारक चित्रण कथेत वाचायला मिळेल. प्रेम, माया न मिळाल्याने एकाच शरीरात वावरणारे दोन विल्कू कसे वागतात हे अतिशय रोमांचक पद्धतीने मतकरींनी या कथेत रंगवले आहे. "म्हणे कोण मागे आले"! एकाच सुंदर नर्सवर प्रेम करणाऱ्या दोन डॉक्टर मित्रांभोवती फिरणारी ही कथा. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठी डॉ. दिवेकर यांनी निवडलेला, कोणाच्याही लक्षात न आलेला एक अफलातून मार्ग! पण आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारल्यानंतर खरेच ते सुखी होऊ शकले का? त्यांना त्यांची प्रेयसी नीलिमा मिळाली का? हे वाचनीय आहे. स्वत:पासून स्वतंत्र होऊन कुठेही संचार करू शकणाऱ्या माणसाच्या इच्छा–देहाची कल्पना "इच्छा-देह" या कथेतून मतकरींनी मांडली आहे त्याचप्रमाणे अपघातात मृत्यू आला असताना फक्त आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर त्याला दूर ठेवून इष्ट कार्यसिद्धीसाठी देहरूपाने जगणाऱ्या नानांची कथा "लांबणीवर". नानांना आपल्या मुलीचे लग्न जमविण्यासाठी लागलेला ध्यास आणि त्याच ध्यासापायी मृत्यूलाही "लांबणीवर" टाकून काही दिवसांसाठी वाट पहायला लावणारे नाना यांच्याभोवती फिरणारी ही कथा. कथेचा शेवटही धक्कादायक! अंधश्रद्धेवर आधारित असणारी पुढची कथा "बाबल्या रावळाचा पेटारा". मुलबाळ नसलेलं दांपत्य बाबल्या आणि त्याची पत्नी गोकुळा! मुलबाळ नसणारी गोकुळा करणी करते या संशयातून होळीच्या आगीत होणारा गोकुळाचा शेवट! हा शेवट वाचकाच्या मनाला आणखीच चटका लावून जातो कारण बाबल्याने होळीला अर्पण केलेल्या पेटाऱ्यात काय आहे हे बाबल्याच माहित नसते. वाद्यं जोरजोरात वाजवली जातात. होळीची बोंब सुरू होते आणि होळीच्या आगीत पेटारा टाकला जातो. नंतर गोकुळा गावकऱ्यांना परत कधीच दिसत नाही. "असाही एक कलावंत" आणि "ट्रिंग-ट्रिंग-हॅलो क्लिक" या कथा खून, व्यभिचार, फसवणूक या माध्यमातून आपला गुढपणा टिकवून असल्या तरी यांचं वेगळेपण म्हणजे गूढ असूनही विनोदी अंगाने केलेली या कथांची मांडणी. यानंतर थोडीशी चमत्कारिक वाटणारी कथा "एक माणूस आणि एक पशू"! एका डॉक्टरने दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा ठेवून, इंजेक्शन देऊन त्याला माणसाचा पशू केल्यानंतर घडणारी ही कथा. शेवटी त्याच पशू झालेल्या माणसाकडून डॉक्टरचाच जीव घेतला जातो आणि त्यानंतर पशूच्या धक्कादायक शेवटाने संपणारी ही कथा. रहस्यमय गूढ निर्माण करणाऱ्या या कथासंग्रहातील सगळ्याच कथा वाचनीय आहेत.

आवर्जून वाचण्यासारखा गूढकथासंग्रह "कबंध".





संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये