Wednesday, September 15, 2021

"मुकद्दर"

 



 

लेखक : स्वप्निल कोलते

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

                                                                           पृष्ठे- २११, मूूल्य- ३०० रुपये.


औरंगजेब तसा ना.सं.इनामदार यांच्या "शहेनशहा" या कादंबरीत वाचला होता. ते चरित्र जरी बादशाह औरंगजेबाचं असलं तरी मराठ्यांच्या पराक्रमाची उंची सांगणारं होतं. जवळपास ५० वर्षें दिल्लीच्या तख्तावर बसून राज्य केलेल्या या शहेनशहाची अर्ध्याहून अधिक कारकीर्द मराठ्यांशी लढण्यात गेली आणि पूर्ण ताकदीनिशी, मोठमोठ्या पराक्रमी सरदारांची सोबत असताना शिवाय बऱ्याच मराठा सरदारांना फितवूनही शेवटी त्याच्या पदरी पराभवच आला. तरीही स्वराज्याचा इतिहास हा खरेतर औरंगजेबाशिवाय पूर्णच नाही होऊ शकत! भोसले घराण्याच्या तीन पिढ्या पाहिलेला आणि त्यांच्याशी रणभूमीवर लढणारा हा शहेनशहा क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता ह्या सोबतच भयंकर महत्वाकांक्षी होता! थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा होता. लोभी होता पण फकीराप्रमाणे राहायचा. धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या ह्या सर्व गुणांचा वापर करून त्याच्या इतक्याच ताकदीच्या सगळ्या शत्रूंना संपवून तो मुघल तख्तावर बसला खरा, पण स्वतःला नियती म्हणजेच "मुकद्दर" समजणारा हा सुलतान अखेर स्वतःचेच "मुकद्दर" लिहू शकला नाही. दख्खनच्या पहाडांनीच त्याचं "मुक़द्दर" लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दख्खनचा घास गिळून, संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करायची स्वप्ने बघत, आपल्या विशाल सागर सेनेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिला सुरुंग लावला तो छत्रपती संभाजी महाराजांनी! तब्बल ९ वर्षें, लाखो सैन्य आणि एकाहून एक मातब्बर सरदार सोबत असूनदेखील हा दिल्लीश्वर स्वराज्यापुढे हतबल झाला. शेवटी स्वकीयांच्या फंदफितुरीनेच घात केला आणि संभाजी महाराज पकडले गेले. त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर आता मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात राहणाऱ्या औरंगजेबाचं "मुकद्दर" खरं तर त्याच दिवशी मराठ्यांच्या हातात गेलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चवताळून उठलेले मराठे सुरुवातीला राजाराम महाराज आणि नंतर ताराबाई महाराणी यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य वाचवण्यासाठी लढत राहिले. आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर २७ वर्षें मराठयांनी औरंगजेबाला लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. फक्त स्वराज्य वाचवलंच नाही तर शंभूपुत्र थोरल्या शाहू महाराजांच्या कारकिर्दीत दिल्लीचेही तख्त राखलं आणि मुघलांना नाममात्र बादशाह केलं. मराठ्यांकडून झालेला हा अफाट पराक्रम एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. आशिया खंडातील सर्वांत सामर्थ्यवान सुलताना विरुद्धचा मराठ्यांचा हा संघर्ष किती मोठा आणि प्रेरणादायी आहे याची जाणीव औरंगजेब वाचल्याशिवाय नाही येत. स्वप्नील कोलते यांनी त्यांच्या या "मुकद्दर" मधून औरंगजेबाच्या दक्षिणेतील शेवटच्या दिवसांचे वर्णन आणि मराठ्यांसोबत चाललेला संघर्ष रेखाटला आहे. हे चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी पानापानावर दिसत राहतो तो मराठ्यांचा पराक्रम! आपल्या शेवटच्या दिवसांत औरंगजेबाला त्याने केलेल्या दख्खन स्वारीचा पावला-पावलावर होणारा पश्चात्तापच खूप काही सांगून जातो. औरंगजेब जितक्या कट्टरतेने मराठ्यांशी लढला, तेवढीच मराठ्यांची स्वराज्यासाठी लढण्याची तळमळ वाढली आणि तेवढाच कडवा प्रतिकार मराठ्यांनी केला. रायगडावर बत्तीस मण तख्तावर पेटलेली क्रांतीची ही ठिणगी शहेनशहा औरंगजेबाला नेस्तनाबूत करूनच शांत झाली. मृत्यू शय्येवर असताना, आपल्या मुलीसोबत बोलताना औरंगजेबाच्या तोंडून बाहेर पडलेली शेवटची वाक्ये मराठ्यांच्या या अफाट पराक्रमाची साक्षच देतात. "हमारी जिंदगी की सबसे बडी गलती यह है की हमनें सिवा को आगरा से भागने दिया! इस्लाम में पुनर्जन्म नहीं मानते, पर फिर भी कभी खुदा के करम से हम वापिस इंसान की जात में पैदा हुए तो हम इन पहाडों से और मराठो से लडने नही आऐंगे, कभी नही..."

स्वप्नील कोलते यांनी एका वेगळ्या पद्धतीने लिहिलेली, आवर्जून वाचण्यासारखी मराठ्यांच्या पराक्रमाची ही गाथा "मुकद्दर".




संदीप प्रकाश जाधव

1 comment:

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये