लेखक : नितीन थोरात
प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे- ३२७, मूूल्य- ३२० रुपये
नितीन थोरात यांच्या "खंडोबा" या कादंबरीची सध्या सोशल मेडियावर बरीच चर्चा चालू आहे. रोज एकदा न एकदा कोणाकडूनतरी कादंबरीच्या मुखपृष्ठाचे दर्शन मला होतच होतं तरीही आधीच रांगेत असणाऱ्या 'To Read' च्या यादीमुळे सुरुवातीला या कादंबरीकडं मी थोडंसं दुर्लक्षच केलं पण जसा एक दिवस या कादंबरीचा विषय समजला तेव्हा न रहावून 'To Read' ची यादी बाजूला ठेवली आणि थोरातांचा हा "खंडोबा" वाचायला घेतला! एखाद्या कर्तृत्ववान आणि पराक्रमी माणसाला जेव्हा 'अवतारी' किंवा 'देवमाणूस' हे लेबल चिकटवलं जातं तेव्हा आपसूकच त्या व्यक्तीच्या पराक्रमाकडं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि रामापासून ते कृष्णापर्यंत याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवरायांचं देता येईल. शिवरायांसारख्या महापराक्रमी व्यक्तीला अवतारी पुरुषाच्या चौकटीत बसवून आपण खरं तर त्यांच्या कर्तृत्वार अन्यायच करतोय. या देवत्वाचा पगडाच आपल्या डोक्यावर असा आहे की त्यातून बाहेर पडून आपण कधी अशा महान लोकांकडे बघतच नाही. नितीन थोरात यांनी नेमकं हेच साधलं आहे त्यांच्या "खंडोबा" या कादंबरीतून. हजारो वर्षांपासून ज्याला आपण महादेवाचा अवतार म्हणून पूजत आलोय, अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून लाखो भाविक आजही ज्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर रांगा लावतात त्या "खंडोबा"ला देवत्वाच्या चौकटीतून बाहेर काढून त्याच्या संपूर्ण आयुष्याचा मागोवा नितीन थोरात यांनी "खंडोबा" मधून घेतला आहे. मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला अशी महाराष्ट्राच्या या कुलदैवताची अख्यायिका आहे. पण, खंडोबाची कथा एवढीच होती का? खंडोबाचं खरं नाव काय होतं? मणी आणि मल्ल या राक्षसांचं खरं नाव काय होतं? खंडोबाचं आणि त्यांचं वैर काय होतं? खंडोबाचं मूळ गाव कोणतं? वंश कोणता? शिवाय राम, कृष्ण, हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल का? काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा? आपल्या सामर्थ्याचा अंदाज येईपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात? म्हाळसा ही पत्नी असतानाही खंडोबाने बाणूला आपलंसं करण्याचं कारण काय असावं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खंडोबा देव होता की देवत्त्व लाभलेला शूर योद्धा? अशा प्रश्नांची सविस्तर उत्तरं "खंडोबा" या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न थोरात यांनी केला आहे. खंडोबा, मल्हारी-मार्तंड, सदानंद, म्हाळसाकांत अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या या 'अवतारी' देवाची किर्ती अनेक मालिका, चित्रपट आणि कथांमधून आपण आजपर्यंत ऐकत-वाचत आलो आहोत पण यांपैकी कुठेच "खंडोबा"च्या बालपणावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. नितीन थोरात यांची "खंडोबा" मात्र याला अपवाद आहे. थोरातांच्या या कादंबरीतून आपल्याला "खंडोबा"च्या बालपणाचा नव्याने उलगडा होतो. "खंडोबा"च्या जन्मापासून त्याच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतो तोही त्याचं देवत्व बाजूला ठेऊन! खंडोबाचा जन्म, त्याचे आई-वडील, भावंडं, सवंगडी, त्याचं राज्य, युद्ध, त्याचा एक सामान्य माणूस म्हणून चालणारा मानसिक संघर्ष, प्रेम आणि विवाह, जेजुरीची निर्मिती अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत लेखक आपल्याला एका वेगळ्याच "खंडोबा"विश्वात घेऊन जातात. जरी ही कादंबरी काल्पनिक असली तरी पौराणिक संदर्भांच्या भोवताली गुंफलेल्या कथानकामुळे वाचक कथेत हरवून जातो. एक वीर योद्धा, अनभिषिक्त सम्राट या रुपात आपल्यासमोर येणाऱ्या "खंडोबा"च्या आयुष्यातदेखील सामान्य माणसाप्रमाणे अनेक चढउतार येतात आणि त्यामुळेच अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून देवपण मिळवणारा "खंडोबा" वाचकाच्या मनाला भिडतो. सामान्यांतून पुढे येऊन, असामान्य कर्तृत्व गाजवून अजरामर झालेल्या एका अनभिषिक्त सम्राटाची ही कथा नक्कीच वाचनीय आहे. "खंडोबा"!!
एखाद्या चित्रपटाला शोभेलशी कथेची सुरुवात!! कादंबरीची सुरुवात होते कादंबरीच्या नायकाला, आदित्यला पडलेल्या एका स्वप्नाने. मराठी चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या आदित्यचे आई-वडील खंडोबाचे निस्सीम भक्त! आदित्यच्या लहानपणीच त्याच्या आईचं निधन झाल्याने वडिलांनी त्याला आई-वडील दोघांच्या प्रेमाने मोठं केलं पण तरीही आपले वडील "खंडोबा" भक्तीत तल्लीन झाल्यानेच आपल्या आईचा मृत्यू झाला असं मनाच्या एका कोपऱ्यात आदित्यला सतत टोचत राहतं. एक दिवस अचानकच आदित्यला खंडोबाच्या आयुष्यावर एक भव्य चित्रपट बनवण्याची संधी चालून येते. या चित्रपटाच्या निमित्ताने खंडोबाचा अभ्यास करत असताना आदित्यला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आजपर्यंतच्या कथा, पुराणांमध्ये कधी खंडोबाचं बालपणच दाखवण्यात आलेलं नाही आणि ही गोष्ट त्याला खूप अस्वस्थ करते. दरम्यानच्या काळात एका महाशिवरात्रीला आपल्या वडिलांसोबत तो जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जातो. आदित्यच्या या जेजुरी भेटीत अशी एक घटना घडते ज्यामुळे तो थेट खंडोबाच्या काळात जातो आणि तिथून पुढे सुरू होतो खंडोबाच्या शोधाचा प्रवास. या प्रवासात लेखकाने आदित्यच्या नजरेतून दिसणारा "खंडोबा" या कादंबरीत उतरवला आहे. आदित्यच्या या टाईम ट्रॅव्हलनंतर कादंबरीची ही कथा खऱ्या अर्थाने वेग पकडते आणि वाचक त्यासोबत वाहवत जातो. खंडोबाच्या काळात आदित्यला खड्गवंशी राजकुमार रुद्रा आणि त्याचे मित्र भेटतात. त्यानंतर खंडोबाचा शोध, तिथल्या लोकांसोबत जुळवून घेण्याची त्याची कसरत, आदित्यची पुन्हा कलियुगात येण्याची धडपड, महालया आणि बाणूचा रुद्राच्या आयुष्यातील प्रवेश, रुद्राच्या जन्माची कहाणी, रुद्रा आणि कर्मस्थी-सुमनसेन यांच्यामध्ये ६ दिवस चाललेलं घनघोर युद्ध या सर्वांमधे वाचक अक्षरशः हरवून जातो. आदित्यला खंडोबा सापडतो का? रुद्रा आणि आदित्यचं नातं काय? रुद्रा आणि खंडोबाचं नातं काय? जेजुरी नगरीची स्थापना कशी झाली? कर्मस्थी-सुमनसेन हे कोण होते? या प्रश्नांसोबतच आदित्यचे पुढे काय होणार? तो परत वर्तमानात येणार की नाही? या प्रश्नांची उत्तरे वाचकांनी कादंबरीतच मिळवणे योग्य.
नितीन थोरात यांची एका वेगळ्या दृष्टीने "खंडोबा"चं दर्शन घडवून आणणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी "खंडोबा"!!
संदीप प्रकाश जाधव