Saturday, July 30, 2022

"खंडोबा"

 


लेखक : नितीन थोरात

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ३२७, मूूल्य- ३२० रुपये  


नितीन थोरात यांच्या "खंडोबा" या कादंबरीची सध्या सोशल मेडियावर बरीच चर्चा चालू आहे. रोज एकदा न एकदा कोणाकडूनतरी कादंबरीच्या मुखपृष्ठाचे दर्शन मला होतच होतं तरीही आधीच रांगेत असणाऱ्या 'To Read' च्या यादीमुळे सुरुवातीला या कादंबरीकडं मी थोडंसं दुर्लक्षच केलं पण जसा एक दिवस या कादंबरीचा विषय समजला तेव्हा न रहावून 'To Read' ची यादी बाजूला ठेवली आणि थोरातांचा हा "खंडोबा" वाचायला घेतला! एखाद्या कर्तृत्ववान आणि पराक्रमी माणसाला जेव्हा 'अवतारी' किंवा 'देवमाणूस' हे लेबल चिकटवलं जातं तेव्हा आपसूकच त्या व्यक्तीच्या पराक्रमाकडं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि रामापासून ते कृष्णापर्यंत याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतील. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवरायांचं देता येईल. शिवरायांसारख्या महापराक्रमी व्यक्तीला अवतारी पुरुषाच्या चौकटीत बसवून आपण खरं तर त्यांच्या कर्तृत्वार अन्यायच करतोय. या देवत्वाचा पगडाच आपल्या डोक्यावर असा आहे की त्यातून बाहेर पडून आपण कधी अशा महान लोकांकडे बघतच नाही. नितीन थोरात यांनी नेमकं हेच साधलं आहे त्यांच्या "खंडोबा" या कादंबरीतून. हजारो वर्षांपासून ज्याला आपण महादेवाचा अवतार म्हणून पूजत आलोय, अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणून लाखो भाविक आजही ज्याच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर रांगा लावतात त्या "खंडोबा"ला देवत्वाच्या चौकटीतून बाहेर काढून त्याच्या संपूर्ण आयुष्याचा मागोवा नितीन थोरात यांनी "खंडोबा" मधून घेतला आहे. मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला अशी महाराष्ट्राच्या या कुलदैवताची अख्यायिका आहे. पण, खंडोबाची कथा एवढीच होती का? खंडोबाचं खरं नाव काय होतं? मणी आणि मल्ल या राक्षसांचं खरं नाव काय होतं? खंडोबाचं आणि त्यांचं वैर काय होतं? खंडोबाचं मूळ गाव कोणतं? वंश कोणता? शिवाय राम, कृष्ण, हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल का? काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा? आपल्या सामर्थ्याचा अंदाज येईपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात? म्हाळसा ही पत्नी असतानाही खंडोबाने बाणूला आपलंसं करण्याचं कारण काय असावं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खंडोबा देव होता की देवत्त्व लाभलेला शूर योद्धा? अशा प्रश्नांची सविस्तर उत्तरं "खंडोबा" या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न थोरात यांनी केला आहे. खंडोबा, मल्हारी-मार्तंड, सदानंद, म्हाळसाकांत अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या या 'अवतारी' देवाची किर्ती अनेक मालिका, चित्रपट आणि कथांमधून आपण आजपर्यंत ऐकत-वाचत आलो आहोत पण यांपैकी कुठेच "खंडोबा"च्या बालपणावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. नितीन थोरात यांची "खंडोबा" मात्र याला अपवाद आहे. थोरातांच्या या कादंबरीतून आपल्याला "खंडोबा"च्या बालपणाचा नव्याने उलगडा होतो. "खंडोबा"च्या जन्मापासून त्याच्या आयुष्याचा संपूर्ण संघर्ष आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतो तोही त्याचं देवत्व बाजूला ठेऊन! खंडोबाचा जन्म, त्याचे आई-वडील, भावंडं, सवंगडी, त्याचं राज्य, युद्ध, त्याचा एक सामान्य माणूस म्हणून चालणारा मानसिक संघर्ष, प्रेम आणि विवाह, जेजुरीची निर्मिती अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत लेखक आपल्याला एका वेगळ्याच "खंडोबा"विश्वात घेऊन जातात. जरी ही कादंबरी काल्पनिक असली तरी पौराणिक संदर्भांच्या भोवताली गुंफलेल्या कथानकामुळे वाचक कथेत हरवून जातो. एक वीर योद्धा, अनभिषिक्त सम्राट या रुपात आपल्यासमोर येणाऱ्या "खंडोबा"च्या आयुष्यातदेखील सामान्य माणसाप्रमाणे अनेक चढउतार येतात आणि त्यामुळेच अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून देवपण मिळवणारा "खंडोबा" वाचकाच्या मनाला भिडतो. सामान्यांतून पुढे येऊन, असामान्य कर्तृत्व गाजवून अजरामर झालेल्या एका अनभिषिक्त सम्राटाची ही कथा नक्कीच वाचनीय आहे. "खंडोबा"!!

एखाद्या चित्रपटाला शोभेलशी कथेची सुरुवात!! कादंबरीची सुरुवात होते कादंबरीच्या नायकाला, आदित्यला पडलेल्या एका स्वप्नाने. मराठी चित्रपट दिग्दर्शक असणाऱ्या आदित्यचे आई-वडील खंडोबाचे निस्सीम भक्त! आदित्यच्या लहानपणीच त्याच्या आईचं निधन झाल्याने वडिलांनी त्याला आई-वडील दोघांच्या प्रेमाने मोठं केलं पण तरीही आपले वडील "खंडोबा" भक्तीत तल्लीन झाल्यानेच आपल्या आईचा मृत्यू झाला असं मनाच्या एका कोपऱ्यात आदित्यला सतत टोचत राहतं. एक दिवस अचानकच आदित्यला खंडोबाच्या आयुष्यावर एक भव्य चित्रपट बनवण्याची संधी चालून येते. या चित्रपटाच्या निमित्ताने खंडोबाचा अभ्यास करत असताना आदित्यला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आजपर्यंतच्या कथा, पुराणांमध्ये कधी खंडोबाचं बालपणच दाखवण्यात आलेलं नाही आणि ही गोष्ट त्याला खूप अस्वस्थ करते. दरम्यानच्या काळात एका महाशिवरात्रीला आपल्या वडिलांसोबत तो जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जातो. आदित्यच्या या जेजुरी भेटीत अशी एक घटना घडते ज्यामुळे तो थेट खंडोबाच्या काळात जातो आणि तिथून पुढे सुरू होतो खंडोबाच्या शोधाचा प्रवास. या प्रवासात लेखकाने आदित्यच्या नजरेतून दिसणारा "खंडोबा" या कादंबरीत उतरवला आहे. आदित्यच्या या टाईम ट्रॅव्हलनंतर कादंबरीची ही कथा खऱ्या अर्थाने वेग पकडते आणि वाचक त्यासोबत वाहवत जातो. खंडोबाच्या काळात आदित्यला खड्गवंशी राजकुमार रुद्रा आणि त्याचे मित्र भेटतात. त्यानंतर खंडोबाचा शोध, तिथल्या लोकांसोबत जुळवून घेण्याची त्याची कसरत, आदित्यची पुन्हा कलियुगात येण्याची धडपड, महालया आणि बाणूचा रुद्राच्या आयुष्यातील प्रवेश, रुद्राच्या जन्माची कहाणी, रुद्रा आणि कर्मस्थी-सुमनसेन यांच्यामध्ये ६ दिवस चाललेलं घनघोर युद्ध या सर्वांमधे वाचक अक्षरशः हरवून जातो. आदित्यला खंडोबा सापडतो का? रुद्रा आणि आदित्यचं नातं काय? रुद्रा आणि खंडोबाचं नातं काय? जेजुरी नगरीची स्थापना कशी झाली? कर्मस्थी-सुमनसेन हे कोण होते? या प्रश्नांसोबतच आदित्यचे पुढे काय होणार? तो परत वर्तमानात येणार की नाही? या प्रश्नांची उत्तरे वाचकांनी कादंबरीतच मिळवणे योग्य.

नितीन थोरात यांची एका वेगळ्या दृष्टीने "खंडोबा"चं दर्शन घडवून आणणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी "खंडोबा"!!





संदीप प्रकाश जाधव


Monday, July 25, 2022

"अत्रारचा फास"

 




लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे- १९२, मूूल्य- २२५ रुपये

 

Wednesday, July 20, 2022

"असूरवेद"

 


लेखक : संजय सोनवणी

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठे- २३८, मूूल्य- २८० रुपये 

मुरलीधर खैरनार यांच्या "शोध" या थरारक आणि उत्कंठावर्धक कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एक रोमांचक कादंबरी वाचायला मिळाली. "असूरवेद" ही संजय सोनवणी यांची वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवणारी एक काल्पनिक कादंबरी!! कादंबरीचा विषयच असा आहे की सुरुवातीलाच 'सांस्कृतिक उलथापालथ घडवणारी कादंबरी' असा उल्लेख लेखकांनी केलेला आहे. 'ऋग्वेद', 'यजुर्वेद', 'सामवेद' आणि 'अथर्ववेद' या चार वेदांचं सार म्हणजे हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म ही आजपर्यंत आपल्याला माहित असलेली गोष्ट. परंतु असं असलं तरीही हिंदू धर्माची स्थापना कधी, कुठे, कशी आणि कोणी केली यावर आजही काही विद्वानांमधे मतभेद आहेत. इतर धर्मांना असणाऱ्या संस्थापकांप्रमाणे हिंदू धर्माचा कोणीही संस्थापक नाही त्यामुळे अशा मतभेदांना अगदीच दुर्लक्षित करूनही चालणार नाही. भारतभूमीवर आर्य आले आणि आर्यांनी चार वेद निर्माण केले इथूनच हिंदू संस्कृतीची सुरुवात झाली असं आपण ऐकत, वाचत आलेला इतिहास सांगतो. एकूण वेद चारच आहेत अशीच आजपर्यंत एक समजूत असली तरीही जागतिक कीर्तीचे विद्वान प्रो. एफ. मॅक्सम्युलर यांच्या "हाइम्स ऑफ अथर्व वेद" या महाग्रंथात त्यांनी 'असूरवेद', 'सर्पवेद', 'गंधर्ववेद' आणि 'पिशाच्चवेद' असे आणखी चार वेद भारतात अस्तित्वात होते हे दाखवून दिलेले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास आज जसा सांगितला जातो तसा तो नाही आणि त्यात फार मोठी लपवाछपवी आहे हे आत्तापर्यंत अनेक संशोधकांनी सप्रमाण मांडलेलं आहे. आर्यांच्याही आधी अस्तित्वात असलेल्या आणि एक प्रगत समाजव्यवस्था असणाऱ्या अनार्यांचा आपण कधी विचारच नाही करत. आर्यांच्या आधीही आणखी काही संस्कृती भारतात होत्या आणि त्यांच्याकडून आर्यांनी लिहिलेल्या या चार वेदांपूर्वी आणखीही काही वेद खरंच लिहिले गेले नसतील कशावरून? अनार्यांच्या या सांस्कृतिक संहिता कालौघात नष्ट केल्याने किंवा दडपून टाकल्याने कदाचित आर्यांना आपलं सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करता आलं असेल का? असे प्रश्नच खरं तर अंगावर शहारे आणतात. संजय सोनवणी यांनी याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांची ही "असूरवेद" कादंबरी लिहिली आहे. आपलं सांस्कृतिक वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आजही अखंड सावध असणाऱ्या आर्यांच्याच हाती जर अचानकपणे अनार्यांचा एखादा वेद लागला तर काय होईल? त्या वेदात हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांना छेद देणाऱ्या काही गोष्टी असतील तर काय होईल? आपल्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या आड येणाऱ्या कोणाचीही गय न करणारे आर्य यावर कशी प्रतिक्रिया देतील? यांची उत्तरे देणारी संजय सोनवणी यांची "असूरवेद" ही काल्पनिक कादंबरी! सोनवणींच्या या "असूरवेद"मधून वाचकाच्या सर्व परंपरागत समजुतींना धक्के तर बसतातच परंतु वाचक विचारात देखील पडतो. पंढरपूर, पांडुरंग, पुंडलिक यांवरील कादंबरीतील चर्चा तर सर्वांत जास्त धक्कादायक!! धर्माच्या नावाखाली उभ्या केलेल्या जातियवादाच्या भिंतीही लेखकांनी "असूरवेद"मधून पाडायचा धाडसी प्रयत्न केला आहे. आपल्या सर्व सांस्कृतिक श्रद्धा उद्ध्वस्त करणारी, अतिशय स्फोटक तितकीच थरारक आणि रोमांचकारी, वाचकाला खिळवून ठेवणारी एक काल्पनिक कहाणी म्हणजे ही संजय सोनवणी यांची कादंबरी "असूरवेद"!!

एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशी कथेची सुरुवात!!सुरेश जोशी या भारतातील एका प्रसिद्ध इतिहास संशोधकाला अगदी अनपेक्षितपणे लागलेल्या एका शोधाने या कादंबरीची सुरुवात होते. आपल्या आयुष्यातील ४० वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्राच्या खेडोपाडी हिंडून प्राचीन शिलालेख, प्राचीन मानवी वस्त्यांचे अवशेष, पाषाण युगापासून ते लोह युगापर्यंत सापडणारी हत्यारे शोधण्यासाठी जीवाचे रान करणारे हे सुरेश जोशी. आपल्या कारकिर्दीत लावलेल्या अनेक शोधांमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली असली तरीही सनातन वैदिक धर्माचे समाजावरील वर्चस्व कायम रहावे यासाठी काम करणाऱ्या एका संस्थेसाठी ते गुप्तपणे काम करत असतात आणि वैदिक धर्माचे महत्व कमी होईल असे संशोधन जगापुढे येऊच नये असे काही प्रयत्नही त्यांनी वेळोवेळी केलेले असतात. परंतु एके दिवशी त्यांच्या हाती एक धक्कादायक गोष्ट लागते, एक अतिशय प्राचीन 'बाड' म्हणजेच 'हस्तलिखित'! ते अतिप्राचीन हस्तलिखित वाचून तेही हादरून जातात. हिंदू संस्कृतीचा अर्थ बदलणारा पुरावा त्यांच्या हाती सापडला आहे याची जाणीव त्यांना होते आणि इथून सुरू झालेल्या थरारक घटनाक्रमात वाचक अडकत जातो. जोशींना सापडलेला तो ऐतिहासिक दस्तावेज जनतेपुढे येण्याआधीच त्यांचा राहत्या घरीच रहस्यमय पध्दतीने खून होतो. पोलिसांकडून जोशींना मूर्तीतस्कर ठरवलं जातं आणि याच हस्तलिखितापाई अमेरिकेत राहणाऱ्या जोशींच्या मोठ्या मुलावर प्राणघातक हल्ला होतो. कथेतील इथून पुढे घडणाऱ्या घटना अतिशय वेगवान आहेत. ज्यामधे नंतर कादंबरीतील इतर पात्रांचा समावेश होतो. जोशींची मुलगी सायली आणि तरुण इतिहास संशोधक गौतम कांबळे ही त्यातील मुख्य पात्रे. मृत्यूपूर्वी जोशी 'असूर वरूण' या नावाने एक दुवा मागे ठेऊन जातात ज्यावरून सायली आणि गौतमचा एक थरारक प्रवास चालू होतो. हे 'असूर वरुण' काय आहे? जोशींचा खून का व कोणी केला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चालू झालेला सायली आणि गौतमचा शोध वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतो. याचं सारं श्रेय संजय सोनवणी यांनाच!! ब्राह्मणी समाजाचं प्रतिनिधीत्व करत असणारी सायली आणि मागास समाजातील गौतम, धर्माविषयीची दोन विरुध्द टोकाची मते असणाऱ्या या दोन व्यक्ती एका अज्ञात रहस्याच्या मागावर निघतात. या प्रवासात सायली आणि गौतम यांच्यात होणारी बौद्धिक चर्चाही आपल्यासमोर अनेक प्रश्न घेऊन येते. हिंदू आणि सनातन वैदिक धर्म एकच आहेत का? आर्य कुठून आले? ते जेते होते की शरणार्थी? शैव नक्की कोण होते? सुर आणि असुर म्हणजे नेमके काय? हा 'असूर वरुण' कोण होता? रामायण, महाभारत यांमध्ये लिहिलेल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणत्या नंतर घुसवलेल्या? पंढरपूर हे नाव विठ्ठलामुळे मिळालं की पुंडलिकामुळे? मग पुंडलिक कोण होता? विठ्ठल लोकजनांचा देव होता की आणखी कोणी? पौन्ड्रिक, पुंडरीक, पांडुरंग ही नावे नेमके काय सुचवतात? यांचा परस्पर काय संबंध? पुंडलिकाची समाधी म्हणजे शिवालय आहे का? हरी-हर ऐक्य साधण्यासाठी पांडुरंग महात्म्य तयार करण्यात आले काय? अशा काही प्रश्नांवरील चर्चा वाचकाला सुन्न करतात. शेवटी सायली आणि गौतमचा हा शोध पूर्ण होतो का? जोशींना समजलेलं रहस्य जगापुढे आणण्यात ते दोघे यशस्वी होतात का? या प्रश्नांच्या उत्तराने या थरारक आणि रोमहर्षक कादंबरीचा शेवट होतो. कादंबरीतील सर्वच गोष्टी जरी आपल्याला पटत नसल्या तरी एक अतिशय रहस्यमय, रोमांचक आणि थरारक कादंबरी वाचल्याचं समाधान नक्कीच मिळतं.

काल्पनिक-थ्रिलर कथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी कादंबरी "असूरवेद"!!






संदीप प्रकाश जाधव


Sunday, July 10, 2022

"वंशवृक्ष"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- ३२२, मूूल्य- ३०० रुपये


साधारणपणे १.५ वर्षांपूर्वी कोणीतरी एस. एल. भैरप्पांची "साक्षी" ही कादंबरी मला वाचायला सुचवली होती. 'साक्षी' नंतर भैरप्पा असं काही माझ्या डोक्यात बसले की त्यांची मिळतील ती पुस्तके संग्रही घेण्यास मी सुरुवात केली. आज भैरप्पांची जवळपास १०-१२ पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि ही यादी अशी वाढतच जाईल यात शंकाच नाही. 'साक्षी' नंतर 'आवरण', 'उत्तरकांड', 'पारखा', 'परिशोध', 'तडा' आणि 'सार्थ' हे माझ्या वाचनात आलेलं भैरप्पांचं इतर साहित्य! या प्रत्येक पुस्तकातील कथांचा, विषयांचा आवाकाच इतका मोठा आहे की तो वाचण्याच्या अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा आणि प्रत्येक वाचकाने तो स्वतः अनुभवला पाहिजे असाच! माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर भैरप्पांचं यातील प्रत्येक पुस्तक एक वाचक म्हणून मला त्यांच्या साहित्याच्या आणखीनच प्रेमात पाडत गेलं. भैरप्पांच्या अशाच दर्जेदार पुस्तकांच्या पंक्तीतील "वंशवृक्ष" ही कादंबरी मी आज वाचून पूर्ण केली. धर्म आणि नात्यांची गुंतागुंत दाखवणारी या कादंबरीची कथा. सुरुवातीला थोडीशी कंटाळवाणी वाटणारी या कादंबरीची कथा काही पानांनातर मात्र वाचकाला असं काही घेरून टाकते की पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही. धर्मानुसार आचरण करणारे श्रीनिवास श्रोत्री आणि इतिहास संशोधनात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे सदाशिवराव ही या कथेतील मुख्य पात्रे. एका बाजूला अखंड वेदाभ्यासात बुडालेले आणि गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी"च आहे, पती-पत्नी नातेसंबंध हे पुत्रप्राप्ती आणि पर्यायाने वंशवेल वाढविण्यासाठी तसेच धार्मिक विधीला जोडीदार मिळावा यासाठीच असते असं मानणारे हे श्रीनीवास श्रोत्री. तर दुसऱ्या बाजूला फक्त वंशवेलीच्या माध्यमातूनच या जगात आपण शिल्लक राहतो, आपली ओळख राहते या संकल्पनेवर विश्वास नसणारे, सतत पुस्तकांमधे रममाण होणारे, संशोधन करून लहिलेली पुस्तके हीच आपली खरी वंशवेल आहे असं मानणारे सदाशिवराव. अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा? या दोन प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात चालू झालेल्या कादंबरीच्या या कथेला श्रीनिवास श्रोत्री यांची पत्नी भागीरथम्मा, घरकाम करणारी लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिरावांची पत्नी नागलक्ष्मी, सदाशिवरावांच्या संशोधनात त्यांना मदत करणारी करुणारत्ने, परदेशात शिक्षण घेऊन आलेला साहित्याचा प्राध्यापक सदाशिवरावांचा भाऊ राज, श्रीनिवास श्रोत्री यांचा मुलगा नंजुंड आणि सून कात्यायनी या सर्वांच्या नातेसंबंधाची पार्श्वभूमी आहे. श्रीनीवास श्रोत्री आणि त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या चढ उतारात वाचक ओढला जाऊन त्या कथेसोबतच नकळत त्याचाही प्रवास चालू होतो. कथेच्या एका टप्प्यावर तर वाचक अक्षरशः सुन्न होऊन जातो आणि नेहमीप्रमाणेच वाचकाला विचारात पाडून भैरप्पा या कथेचा शेवट करतात. सनातन धर्म पद्धती विरुद्ध बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व आपल्या कथेतून रेखाटत असताना या द्वंद्वात विजयी कोण झाले याचा निर्णय भैरप्पांनी वाचकांवर सोडला आहे. भैरप्पांच्या या कादंबरीच्या कथेचा काळ आहे पहिल्या महायुद्धानंतरचा. कपिला नदीला आलेल्या पुरात श्रीनिवास श्रोत्रींचा तरुण मुलगा नंजुंड वाहून जातो जिथून या कथेची सुरुवात होते. नंजुंडच्या पश्चात त्याच्या तरुण पत्नीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करणाऱ्या श्रोत्रींच्या एका निर्णयामुळे कथानकाला वेगळे वळण लागायला सुरुवात होते. अनपेक्षित झालेल्या मृत्यूने नंजुंडचं शिक्षणही थांबून जातं त्यामुळे आपल्या पतीचं अपूर्ण राहिलेलं काम मला पुढचं शिक्षण घेऊन पूर्ण करायचं आहे या कात्यायनीच्या इच्छेला श्रीनिवास श्रोत्रींनी दिलेला होकार या कथेत पुढे येऊ घातलेल्या वादळाची पहिली पायरी आहे. म्हैसूरच्या कॉलेजमधे शिकायला जाणारी श्रोत्रींची विधवा सून कात्यायनी त्याच कॉलेजमधे प्राध्यापक असणाऱ्या सदाशिवरावांचा भाऊ राजच्या प्रेमात पडते. तर दुसरीकडे सदाशिवरावांच्या संशोधनात त्यांना मदत करणाऱ्या करुणारत्ने आणि सदाशिवरावांमधे वाढलेली जवळीक. या दोन गोष्टींमुळे या कथेत जो धर्म-अधर्म, निती-अनिती आणि भावनिक गुंतागुंतींचा धुरळा उडतो तो वाचकाला सुन्न करून जातो. राजच्या प्रेमाखातर स्वतःच्या मुलाचा त्याग करणारी कात्यायनी आणि आपल्या संशोधनावरील प्रेमाखातर आपल्या पत्नीचा त्याग करणारे सदाशिवरावांचं वागणं चुकीचं वाटत असूनही आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतच राहते ज्याचं श्रेय जातं सर्वस्वी भैरप्पांना, त्यांनी कथेतून उभ्या केलेल्या वातावरणाला! हे जरी खरं असलं तरीही कात्यायनीचा मुलगा चिनी आणि सदाशिवरावांची पत्नी नागलक्ष्मी यांच्याबद्दल वाचकाला शेवटपर्यंत वाईट वाटतच राहतं. असंच वाचकाला सोबत घेऊन थोडं फ्लॅशबॅक आणि थोडं वर्तमान अशी ही कथा पुढे सरकत राहते. सुन्न मनाने कथेसोबत जोडला गेलेला वाचक दोन्ही कुटुंबातील कोण व्यक्ती चुकीची आणि कोण बरोबर या विचारात हरवलेला असताना कथेच्या एका वळणावर भैरप्पा एका जबरदस्त धक्क्याने त्याला विचारांच्या खाईत लोटून देतात जिथून तो अनुत्तरितच परत येतो. भैरप्पांनी ज्या पद्धतीने कथेचा शेवट केला आहे त्याला खरोखरच तोड नाही. या मूळ कन्नड कादंबरीतील कथेचा सौ उमा कुलकर्णी यांनी केलेला हा अनुवाद पुस्तकात वाचनेच योग्य!

वंश सातत्त्याच्या कल्पनेला छेद देणारी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "वंशवृक्ष"!






संदीप प्रकाश जाधव


Friday, July 8, 2022

"बँको"

 



लेखक : हेन्री शॅरीयर

प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी

मराठी अनुवाद : रवींद्र गुर्जर

पृष्ठे- १७५, मूूल्य- १५० रुपये

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये