लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
पृष्ठे- २३८, मूूल्य- २८० रुपये
मुरलीधर खैरनार यांच्या "शोध" या थरारक आणि उत्कंठावर्धक कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एक रोमांचक कादंबरी वाचायला मिळाली. "असूरवेद" ही संजय सोनवणी यांची वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवणारी एक काल्पनिक कादंबरी!! कादंबरीचा विषयच असा आहे की सुरुवातीलाच 'सांस्कृतिक उलथापालथ घडवणारी कादंबरी' असा उल्लेख लेखकांनी केलेला आहे. 'ऋग्वेद', 'यजुर्वेद', 'सामवेद' आणि 'अथर्ववेद' या चार वेदांचं सार म्हणजे हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म ही आजपर्यंत आपल्याला माहित असलेली गोष्ट. परंतु असं असलं तरीही हिंदू धर्माची स्थापना कधी, कुठे, कशी आणि कोणी केली यावर आजही काही विद्वानांमधे मतभेद आहेत. इतर धर्मांना असणाऱ्या संस्थापकांप्रमाणे हिंदू धर्माचा कोणीही संस्थापक नाही त्यामुळे अशा मतभेदांना अगदीच दुर्लक्षित करूनही चालणार नाही. भारतभूमीवर आर्य आले आणि आर्यांनी चार वेद निर्माण केले इथूनच हिंदू संस्कृतीची सुरुवात झाली असं आपण ऐकत, वाचत आलेला इतिहास सांगतो. एकूण वेद चारच आहेत अशीच आजपर्यंत एक समजूत असली तरीही जागतिक कीर्तीचे विद्वान प्रो. एफ. मॅक्सम्युलर यांच्या "हाइम्स ऑफ अथर्व वेद" या महाग्रंथात त्यांनी 'असूरवेद', 'सर्पवेद', 'गंधर्ववेद' आणि 'पिशाच्चवेद' असे आणखी चार वेद भारतात अस्तित्वात होते हे दाखवून दिलेले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास आज जसा सांगितला जातो तसा तो नाही आणि त्यात फार मोठी लपवाछपवी आहे हे आत्तापर्यंत अनेक संशोधकांनी सप्रमाण मांडलेलं आहे. आर्यांच्याही आधी अस्तित्वात असलेल्या आणि एक प्रगत समाजव्यवस्था असणाऱ्या अनार्यांचा आपण कधी विचारच नाही करत. आर्यांच्या आधीही आणखी काही संस्कृती भारतात होत्या आणि त्यांच्याकडून आर्यांनी लिहिलेल्या या चार वेदांपूर्वी आणखीही काही वेद खरंच लिहिले गेले नसतील कशावरून? अनार्यांच्या या सांस्कृतिक संहिता कालौघात नष्ट केल्याने किंवा दडपून टाकल्याने कदाचित आर्यांना आपलं सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करता आलं असेल का? असे प्रश्नच खरं तर अंगावर शहारे आणतात. संजय सोनवणी यांनी याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांची ही "असूरवेद" कादंबरी लिहिली आहे. आपलं सांस्कृतिक वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आजही अखंड सावध असणाऱ्या आर्यांच्याच हाती जर अचानकपणे अनार्यांचा एखादा वेद लागला तर काय होईल? त्या वेदात हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांना छेद देणाऱ्या काही गोष्टी असतील तर काय होईल? आपल्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या आड येणाऱ्या कोणाचीही गय न करणारे आर्य यावर कशी प्रतिक्रिया देतील? यांची उत्तरे देणारी संजय सोनवणी यांची "असूरवेद" ही काल्पनिक कादंबरी! सोनवणींच्या या "असूरवेद"मधून वाचकाच्या सर्व परंपरागत समजुतींना धक्के तर बसतातच परंतु वाचक विचारात देखील पडतो. पंढरपूर, पांडुरंग, पुंडलिक यांवरील कादंबरीतील चर्चा तर सर्वांत जास्त धक्कादायक!! धर्माच्या नावाखाली उभ्या केलेल्या जातियवादाच्या भिंतीही लेखकांनी "असूरवेद"मधून पाडायचा धाडसी प्रयत्न केला आहे. आपल्या सर्व सांस्कृतिक श्रद्धा उद्ध्वस्त करणारी, अतिशय स्फोटक तितकीच थरारक आणि रोमांचकारी, वाचकाला खिळवून ठेवणारी एक काल्पनिक कहाणी म्हणजे ही संजय सोनवणी यांची कादंबरी "असूरवेद"!!
एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशी कथेची सुरुवात!!सुरेश जोशी या भारतातील एका प्रसिद्ध इतिहास संशोधकाला अगदी अनपेक्षितपणे लागलेल्या एका शोधाने या कादंबरीची सुरुवात होते. आपल्या आयुष्यातील ४० वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्राच्या खेडोपाडी हिंडून प्राचीन शिलालेख, प्राचीन मानवी वस्त्यांचे अवशेष, पाषाण युगापासून ते लोह युगापर्यंत सापडणारी हत्यारे शोधण्यासाठी जीवाचे रान करणारे हे सुरेश जोशी. आपल्या कारकिर्दीत लावलेल्या अनेक शोधांमुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली असली तरीही सनातन वैदिक धर्माचे समाजावरील वर्चस्व कायम रहावे यासाठी काम करणाऱ्या एका संस्थेसाठी ते गुप्तपणे काम करत असतात आणि वैदिक धर्माचे महत्व कमी होईल असे संशोधन जगापुढे येऊच नये असे काही प्रयत्नही त्यांनी वेळोवेळी केलेले असतात. परंतु एके दिवशी त्यांच्या हाती एक धक्कादायक गोष्ट लागते, एक अतिशय प्राचीन 'बाड' म्हणजेच 'हस्तलिखित'! ते अतिप्राचीन हस्तलिखित वाचून तेही हादरून जातात. हिंदू संस्कृतीचा अर्थ बदलणारा पुरावा त्यांच्या हाती सापडला आहे याची जाणीव त्यांना होते आणि इथून सुरू झालेल्या थरारक घटनाक्रमात वाचक अडकत जातो. जोशींना सापडलेला तो ऐतिहासिक दस्तावेज जनतेपुढे येण्याआधीच त्यांचा राहत्या घरीच रहस्यमय पध्दतीने खून होतो. पोलिसांकडून जोशींना मूर्तीतस्कर ठरवलं जातं आणि याच हस्तलिखितापाई अमेरिकेत राहणाऱ्या जोशींच्या मोठ्या मुलावर प्राणघातक हल्ला होतो. कथेतील इथून पुढे घडणाऱ्या घटना अतिशय वेगवान आहेत. ज्यामधे नंतर कादंबरीतील इतर पात्रांचा समावेश होतो. जोशींची मुलगी सायली आणि तरुण इतिहास संशोधक गौतम कांबळे ही त्यातील मुख्य पात्रे. मृत्यूपूर्वी जोशी 'असूर वरूण' या नावाने एक दुवा मागे ठेऊन जातात ज्यावरून सायली आणि गौतमचा एक थरारक प्रवास चालू होतो. हे 'असूर वरुण' काय आहे? जोशींचा खून का व कोणी केला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चालू झालेला सायली आणि गौतमचा शोध वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतो. याचं सारं श्रेय संजय सोनवणी यांनाच!! ब्राह्मणी समाजाचं प्रतिनिधीत्व करत असणारी सायली आणि मागास समाजातील गौतम, धर्माविषयीची दोन विरुध्द टोकाची मते असणाऱ्या या दोन व्यक्ती एका अज्ञात रहस्याच्या मागावर निघतात. या प्रवासात सायली आणि गौतम यांच्यात होणारी बौद्धिक चर्चाही आपल्यासमोर अनेक प्रश्न घेऊन येते. हिंदू आणि सनातन वैदिक धर्म एकच आहेत का? आर्य कुठून आले? ते जेते होते की शरणार्थी? शैव नक्की कोण होते? सुर आणि असुर म्हणजे नेमके काय? हा 'असूर वरुण' कोण होता? रामायण, महाभारत यांमध्ये लिहिलेल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणत्या नंतर घुसवलेल्या? पंढरपूर हे नाव विठ्ठलामुळे मिळालं की पुंडलिकामुळे? मग पुंडलिक कोण होता? विठ्ठल लोकजनांचा देव होता की आणखी कोणी? पौन्ड्रिक, पुंडरीक, पांडुरंग ही नावे नेमके काय सुचवतात? यांचा परस्पर काय संबंध? पुंडलिकाची समाधी म्हणजे शिवालय आहे का? हरी-हर ऐक्य साधण्यासाठी पांडुरंग महात्म्य तयार करण्यात आले काय? अशा काही प्रश्नांवरील चर्चा वाचकाला सुन्न करतात. शेवटी सायली आणि गौतमचा हा शोध पूर्ण होतो का? जोशींना समजलेलं रहस्य जगापुढे आणण्यात ते दोघे यशस्वी होतात का? या प्रश्नांच्या उत्तराने या थरारक आणि रोमहर्षक कादंबरीचा शेवट होतो. कादंबरीतील सर्वच गोष्टी जरी आपल्याला पटत नसल्या तरी एक अतिशय रहस्यमय, रोमांचक आणि थरारक कादंबरी वाचल्याचं समाधान नक्कीच मिळतं.
काल्पनिक-थ्रिलर कथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचावी अशी कादंबरी "असूरवेद"!!
No comments:
Post a Comment