लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी
पृष्ठे- ३२२, मूूल्य- ३०० रुपये
साधारणपणे १.५ वर्षांपूर्वी कोणीतरी एस. एल. भैरप्पांची "साक्षी" ही कादंबरी मला वाचायला सुचवली होती. 'साक्षी' नंतर भैरप्पा असं काही माझ्या डोक्यात बसले की त्यांची मिळतील ती पुस्तके संग्रही घेण्यास मी सुरुवात केली. आज भैरप्पांची जवळपास १०-१२ पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि ही यादी अशी वाढतच जाईल यात शंकाच नाही. 'साक्षी' नंतर 'आवरण', 'उत्तरकांड', 'पारखा', 'परिशोध', 'तडा' आणि 'सार्थ' हे माझ्या वाचनात आलेलं भैरप्पांचं इतर साहित्य! या प्रत्येक पुस्तकातील कथांचा, विषयांचा आवाकाच इतका मोठा आहे की तो वाचण्याच्या अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा आणि प्रत्येक वाचकाने तो स्वतः अनुभवला पाहिजे असाच! माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर भैरप्पांचं यातील प्रत्येक पुस्तक एक वाचक म्हणून मला त्यांच्या साहित्याच्या आणखीनच प्रेमात पाडत गेलं. भैरप्पांच्या अशाच दर्जेदार पुस्तकांच्या पंक्तीतील "वंशवृक्ष" ही कादंबरी मी आज वाचून पूर्ण केली. धर्म आणि नात्यांची गुंतागुंत दाखवणारी या कादंबरीची कथा. सुरुवातीला थोडीशी कंटाळवाणी वाटणारी या कादंबरीची कथा काही पानांनातर मात्र वाचकाला असं काही घेरून टाकते की पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही. धर्मानुसार आचरण करणारे श्रीनिवास श्रोत्री आणि इतिहास संशोधनात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे सदाशिवराव ही या कथेतील मुख्य पात्रे. एका बाजूला अखंड वेदाभ्यासात बुडालेले आणि गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी"च आहे, पती-पत्नी नातेसंबंध हे पुत्रप्राप्ती आणि पर्यायाने वंशवेल वाढविण्यासाठी तसेच धार्मिक विधीला जोडीदार मिळावा यासाठीच असते असं मानणारे हे श्रीनीवास श्रोत्री. तर दुसऱ्या बाजूला फक्त वंशवेलीच्या माध्यमातूनच या जगात आपण शिल्लक राहतो, आपली ओळख राहते या संकल्पनेवर विश्वास नसणारे, सतत पुस्तकांमधे रममाण होणारे, संशोधन करून लहिलेली पुस्तके हीच आपली खरी वंशवेल आहे असं मानणारे सदाशिवराव. अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा? या दोन प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात चालू झालेल्या कादंबरीच्या या कथेला श्रीनिवास श्रोत्री यांची पत्नी भागीरथम्मा, घरकाम करणारी लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिरावांची पत्नी नागलक्ष्मी, सदाशिवरावांच्या संशोधनात त्यांना मदत करणारी करुणारत्ने, परदेशात शिक्षण घेऊन आलेला साहित्याचा प्राध्यापक सदाशिवरावांचा भाऊ राज, श्रीनिवास श्रोत्री यांचा मुलगा नंजुंड आणि सून कात्यायनी या सर्वांच्या नातेसंबंधाची पार्श्वभूमी आहे. श्रीनीवास श्रोत्री आणि त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या चढ उतारात वाचक ओढला जाऊन त्या कथेसोबतच नकळत त्याचाही प्रवास चालू होतो. कथेच्या एका टप्प्यावर तर वाचक अक्षरशः सुन्न होऊन जातो आणि नेहमीप्रमाणेच वाचकाला विचारात पाडून भैरप्पा या कथेचा शेवट करतात. सनातन धर्म पद्धती विरुद्ध बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व आपल्या कथेतून रेखाटत असताना या द्वंद्वात विजयी कोण झाले याचा निर्णय भैरप्पांनी वाचकांवर सोडला आहे. भैरप्पांच्या या कादंबरीच्या कथेचा काळ आहे पहिल्या महायुद्धानंतरचा. कपिला नदीला आलेल्या पुरात श्रीनिवास श्रोत्रींचा तरुण मुलगा नंजुंड वाहून जातो जिथून या कथेची सुरुवात होते. नंजुंडच्या पश्चात त्याच्या तरुण पत्नीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करणाऱ्या श्रोत्रींच्या एका निर्णयामुळे कथानकाला वेगळे वळण लागायला सुरुवात होते. अनपेक्षित झालेल्या मृत्यूने नंजुंडचं शिक्षणही थांबून जातं त्यामुळे आपल्या पतीचं अपूर्ण राहिलेलं काम मला पुढचं शिक्षण घेऊन पूर्ण करायचं आहे या कात्यायनीच्या इच्छेला श्रीनिवास श्रोत्रींनी दिलेला होकार या कथेत पुढे येऊ घातलेल्या वादळाची पहिली पायरी आहे. म्हैसूरच्या कॉलेजमधे शिकायला जाणारी श्रोत्रींची विधवा सून कात्यायनी त्याच कॉलेजमधे प्राध्यापक असणाऱ्या सदाशिवरावांचा भाऊ राजच्या प्रेमात पडते. तर दुसरीकडे सदाशिवरावांच्या संशोधनात त्यांना मदत करणाऱ्या करुणारत्ने आणि सदाशिवरावांमधे वाढलेली जवळीक. या दोन गोष्टींमुळे या कथेत जो धर्म-अधर्म, निती-अनिती आणि भावनिक गुंतागुंतींचा धुरळा उडतो तो वाचकाला सुन्न करून जातो. राजच्या प्रेमाखातर स्वतःच्या मुलाचा त्याग करणारी कात्यायनी आणि आपल्या संशोधनावरील प्रेमाखातर आपल्या पत्नीचा त्याग करणारे सदाशिवरावांचं वागणं चुकीचं वाटत असूनही आपल्याला मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतच राहते ज्याचं श्रेय जातं सर्वस्वी भैरप्पांना, त्यांनी कथेतून उभ्या केलेल्या वातावरणाला! हे जरी खरं असलं तरीही कात्यायनीचा मुलगा चिनी आणि सदाशिवरावांची पत्नी नागलक्ष्मी यांच्याबद्दल वाचकाला शेवटपर्यंत वाईट वाटतच राहतं. असंच वाचकाला सोबत घेऊन थोडं फ्लॅशबॅक आणि थोडं वर्तमान अशी ही कथा पुढे सरकत राहते. सुन्न मनाने कथेसोबत जोडला गेलेला वाचक दोन्ही कुटुंबातील कोण व्यक्ती चुकीची आणि कोण बरोबर या विचारात हरवलेला असताना कथेच्या एका वळणावर भैरप्पा एका जबरदस्त धक्क्याने त्याला विचारांच्या खाईत लोटून देतात जिथून तो अनुत्तरितच परत येतो. भैरप्पांनी ज्या पद्धतीने कथेचा शेवट केला आहे त्याला खरोखरच तोड नाही. या मूळ कन्नड कादंबरीतील कथेचा सौ उमा कुलकर्णी यांनी केलेला हा अनुवाद पुस्तकात वाचनेच योग्य!
वंश सातत्त्याच्या कल्पनेला छेद देणारी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "वंशवृक्ष"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment