रावण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा म्हणजे एक दहा तोंडी क्रूर राक्षस. रावणाबद्दल अगदी लहानपणापासून वेगवेगळ्या पुस्तकांमधून, गोष्टींमधून, सिनेमांमधून जे ऐकत-वाचत-पाहत आलो तीच त्याची प्रतिमा डोळ्यासमोर ठेऊन त्याला आपण खलनायक ठरवून टाकलं. सीता हरण आणि त्यामुळे रामाकडून मारला गेलेला एक क्रूर,अहंकारी राक्षस-असुर म्हणजे रावण इतकीच काय ती आपल्याला त्याच्याबद्दल असणारी माहिती. सीता हरण आणि त्यातून रावणाचा झालेला अंत हा कालावधी जवळपास १२ महिन्यांचा.सीता रावणाच्या लंकेत फक्त ११ महिने १४ दिवस राहिली आणि १३ दिवस चाललेल्या राम-रावण यांच्या युध्दात रावणाचा अंत झाला, परंतु या १२ महिन्यांव्यतिरिक्तचे रावणाचे आयुष्य नेहमी अंधारातच राहिले आणि आपणही कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. लंकेचा असुर राजा सुमालीची मुलगी कैकसी आणि पराक्रमी ऋषि महर्षि विश्रवा यांचा "रावण" हा संकरित पुत्र. बालपणी विश्रवा ऋषिंच्या आश्रमात राहून एक ऋषिपुत्र म्हणून अभिमानाने स्वतःची ओळख करून देणारा "दशग्रीव" म्हणजेच "रावण" पुढे जाऊन लंकाधिपती झाला आणि एक असुर राजा म्हणून रामाच्या हातून त्याचा अंत झाला.एका ऋषिपुत्रापासून ते असुरांचा राजा, लंकाधिश होण्यापर्यंतचा रावणाचा प्रवास नेहमीच दुर्लक्षित राहिला. रावणाच्या आपल्याला माहिती नसलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी आणि एक वेगळाच रावण आपल्यासमोर उभा करणारी शरद तांदळे यांनी लिहिलेली ही कादंबरी "रावण" राजा राक्षसांचा.
विश्रवा ऋषींच्या आश्रमात जन्मल्यामुळे स्वतःला आर्य कुळातील ऋषीपुत्र समजणाऱ्या रावण आणि त्याच्या इतर भावंडांना एक दिवस अचानकच आपण असुर कुळातील असल्याचे समजल्यानंतर मिळणाऱ्या धक्क्यातून सुरुवात होते या कादंबरीची. या धक्क्यामुळे त्यांच्या बालमनावर झालेल्या आघातातून पुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी रावणाचा चालू झालेला संघर्ष आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळेल. बालपणीच विश्रवा ऋषींचे आश्रम सोडल्यामुळे, इंद्र-विष्णुसोबतच्या युद्धानंतर लंकेतून परागंदा झालेले आपले आजोबा सुमाली आणि इतर असुरांसोबत भटकंतीचे जीवन जगत अतिशय कठीण संघर्षातून स्वतःला घडवणारा रावण, हेच सिद्ध करतो की जन्मजात मिळालेल्या कुळाने कोणीही श्रेष्ठ ठरत नाही. ज्ञान, कर्म आणि कर्तृत्वावर श्रेष्ठत्व ठरवलं जातं. हाच मंत्र जपत रावणाने स्वकर्तुत्वावर स्वतःला सिद्ध केलं. आपल्या भावंडांवर भरपूर प्रेम करणारा,आई,आजोबा आणि समस्त असुर जातीवर झालेल्या अत्याचाराने हळवा होणारा, सर्वप्रकारच्या ज्ञानार्जनासाठी नेहमीच भुकेला असणारा, महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासासोबतच धैर्य,सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता अशा गुणांनी संपन्न असा रावण आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळेल. वैदिक संस्कृतीसारखी नवी राक्षस संस्कृती निर्माण करण्याची महत्वकांक्षा असणारा रावण जरी बंडखोर वाटत असला तरी असा बंडखोरच आपल्याला प्राप्त असलेल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावून नवनिर्मिती करू शकतो हे रावणाच्या आयुष्याकडे पाहून लक्षात येते.
रावणाच्या अंतास कारणीभूत असे, सीता हरण हे प्रकरण जर आपण थोडंसं बाजूला ठेवलं तर उर्वरित आयुष्यातील त्याचा संघर्ष, पराक्रम आणि कठीण परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून, लंकाधिपती राक्षसांचा राजा म्हणून एक वेगळं साम्राज्य उभं करण्यापर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. दैवी किंवा काल्पनिक गोष्टींना बाजूला सारून, शरद तांदळे यांनी एक सामान्य राजा डोळ्यासमोर ठेऊन रावण लिहिल्यामुळे त्याचा संघर्ष वाचकाला जाणवत राहतो. इंद्र आणि विष्णुसोबतच्या युद्धात सुमालीने गमावलेली लंका कुबेराकडून परत मिळवणारा, समस्त विखुरलेल्या भटक्या जमाती,दैत्य,असुर, दानव यांना एका छताखाली आणून एका नवीन राक्षस संस्कृतीचा पाया रचनारा आणि स्वतःसोबतच आपल्या प्रजेलासुद्धा सोन्याच्या घरात ठेवणारा असा हा प्रजादक्ष राजा. २९ प्रकरणे आणि ४३२ पानांच्या या कादंबरीतून शरद तांदळे यांनी रावणाचे जे आयुष्य आपल्यासमोर मांडलं आहे ते वाचत असताना लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा पडणारे काही प्रश्न म्हणजे, आजपर्यंत आपण ज्या रावणाची दुर्गुणी,क्रूर,अहंकारी अशी विशेषणे लावून अवहेलना केली ती खरंच योग्य आहे का? महादेवाचा निस्सीम भक्त असणारा, शिवतांडवस्तोत्र, रावणसंहिता, कुमारतंत्र लिहिणारा, बुद्धिबळ व रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान रावण खलनायक कसा काय असू शकतो?आयुर्वेद, व्यापार, वेदशास्त्र, राज्यशास्त्र, दर्शनशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधे पांडित्य मिळवूनसुद्धा रावणाच्या वाट्याला अवहेलनाच कशी? हजारो वर्षांपासून आपण त्याचे दहन करत आलो तरी आजही न संपलेला रावण खरंच खलनायक असू शकतो का? यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या कादंबरीमध्ये आपल्याला मिळू शकतील आणि त्यानंतर एक वाचक म्हणून आपण ठरवू शकतो की रावण खरोखरच एक खलनायक होता की स्वतःच्या सामर्थ्यावर उभा राहिलेला एक महानायक.
कादंबरीतील काही आवडलेली वाक्ये -
"स्वाभिमान हा कर्तृत्वाने वाढतो आणि कर्तृत्वाला मर्यादा कुळानं नाही, तर न्यूनगंडानं येतात"
"शारीरिक संघर्षापेक्षा वैचारिक संघर्ष हा मोठं यश संपादन करून देतो"
"अहंकार हा अर्धवट ज्ञानाने तयार होत असतो, ज्ञान प्राप्त झाल्यावर मत व्यक्त केलं तर अहंकारी नाही तर बंडखोर तयार होतात"
"निसर्गानं निर्माण केलेल्या गोष्टी निषिद्ध आणि अपवित्र ठरवतो,तो नास्तिक. नास्तिकपणा हा मानवनिर्मित धर्म आणि वेदांना न माननं यावरून नाही ठरत"
"युद्धातील विजय आपल्याला सामर्थ्यशाली बनवतो, पण आपण शक्तिशाली तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला शस्त्र उचलण्याची गरज पडत नाही"
"ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौज तयार करत असतो"
"स्वकीयांवर दाखवलेला अविश्वास संकटाकडे घेऊन जातो"
"अति सुख उपभोगलं की संघर्षाची अभिलाषा कमी होते"
"स्वतःशी केलेला संवाद हा ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतो"
"धर्म, न्याय आणि भूमिका सगळं काही स्वार्थावर निर्भर असतं"
शरद तांदळे यांनी बऱ्याच अभ्यासाअंती आणि संशोधनात्मकदृष्ट्या संदर्भ शोधून, काल्पनिक घटनांना फाटा देऊन रावणाचे आयुष्य आपल्या समोर कादंबरी रुपात मांडले आहे. एक वेगळा रावण जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी "रावण" राजा राक्षसांचा.
संदीप प्रकाश जाधव