Sunday, July 5, 2020

"अद्भुत शक्तींचे मायाजाल"


लेखक : बाळ भागवत

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


आज माणसाने कितीही प्रगती केली असली तरी काही प्रश्नांची उत्तरे आजही त्याच्यापाशी नाहीत आणि भविष्यातपण ती मिळण्याची शक्यताही तशी कमीच. जसे की मृत्यूनंतर माणसाचे काय होते? भविष्यात होणारी एखादी घटना काही लोकांना आधिच कशी काय समजते? स्वतःच्याच मृत्यूची चाहूल एखाद्याला कशी काय लागू शकते? सतत आपल्यासोबत कोणीतरी अदृश्यपणे असल्याचा भास का होतो? अगदी धडधाकट असणाऱ्या व्यक्तीचा अचानक कसा काय मृत्यू होतो?माझा पुनर्जन्म झालाय असं जेव्हा एखादा पुराव्यानिशी सांगत असतो तेव्हा खरंच त्याचा पुनर्जन्म झालेला असतो का?आत्मा किंवा भूत नावाची गोष्ट असणे व तिचे लोकांसोबत वावरणे, बोलणे हे खरे का? अतिशय साधे आयुष्य जगत असणाऱ्या काही लोकांसोबत अचानकच विचित्र घटना का घडू लागतात? या आणि अशा अनेक प्रश्नांसोबतच आपल्या या सृष्टीमधे आपल्यासोबत असल्याची जाणीव होणाऱ्या अद्भुत, अदृश्य, अमानवीय, अविश्वसनीय शक्तींचा असण्याचा ठोस पुरावा जरी नसला तरी त्यांचे अस्तित्व आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत जाणवत राहते.आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटनांची उत्तरे आपल्याकडे नसल्यामुळे अशा शक्तींचे अस्तित्व नाकारताही येत नाही.या अद्भुत, अदृश्य शक्तींबद्दल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणारी उत्सुकता, भीती ही एकाच प्रकारची आहे.आजही अनेक ठिकाणी करणी झाली,शाप दिला असे कळल्यावरच त्या धक्क्याने माणसे अन्न-पाणी सोडून देतात आणि मृत्यूचे खरे कारण अंधारातच राहते. अशा घटना सतत विज्ञानाला आव्हान देत राहतात. बाळ भागवतांनी अशा जगभरात घडलेल्या घटनांचे वर्णन त्यांच्या या "अद्भुत शक्तींचे मायाजाल" पुस्तकामध्ये केले आहे.

या गूढ शक्तींविषयी सांगताना भागवतांनी जगभरात घडलेल्या अशा अविश्वासनिय,अदृश्य घटनांची जंत्रीच या पुस्तकामध्ये दिली आहे आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतला आहे तो  Arthur C. Clarke यांच्या ' The World Of Strange Powers'  या पुस्तकाचा. यामधे दिलेल्या घटना आणि त्यांचे संदर्भ वाचले की आपण एवढेच म्हणू शकतो की आपल्याला जे दिसतं,समजतं तेच फक्त खरं आहे असे म्हणणे साफ चुकीचे आहे. शिवाय या पुस्तकातील  घटना वाचताना आणखी एक गोष्ट जी सतत मनाला जाणवत राहते ती म्हणजे आपल्याला न दिसणारे, स्पर्श न करता येणारे अपल्यासोबतच असलेले अजून एक जग अस्तित्वातच नाही असे म्हणणेसुद्धा धाडसाचेच ठरेल. अशा शक्तींचा खरोखरच विचार केला पाहिजे जोपर्यंत त्यांचं असणं किंवा नसणं पुराव्यानिशी सिद्ध होत नाही.

बाळ भागवतांनी या पुस्तकामध्ये ज्या घटनांचा उल्लेख केला आहे त्या खरेच विचार करायला लावणाऱ्या आहेत.पुस्तक वाचताना त्या आपली उत्कंठा वाढवल्याशिवाय राहणार  नाहीत. १३६ पानांचे हे छोटेखानी पुस्तक वाचताना जगातील विविध देशांमध्ये या अमानवी, अदृश्य शक्तींनी आपले "मायाजाल" कसे पसरवले आहे याची जाणीव होते.पुस्तकामध्ये दिलेल्या काही काही घटना तर अशा आहेत जिथे या अदृश्य, अनाकलनीय शक्तींसामोर मोठ मोठया डॉक्टरांनी आणि मानसोपचारतज्ञांनी सुद्धा हात टेकलेत.जगभरातील अनेक थोर संशोधकांना सुद्धा बुचकळ्यात टाकणाऱ्या घटनांची नोंद बाळ भागवत यांनी या पुस्तकामध्ये केली आहे, विज्ञानाला आव्हान देत राहणाऱ्या या अदृश्य शक्ती आपण कितीही नाकारत राहिलो तरी जगभरात घडलेल्या ज्या घटनांचा उल्लेख लेखकाने इथे केला आहे त्या आपले कुतूहल वाढवण्यासाठी पुरेशा आहेत. 

पुस्तकामध्ये दिल्या गेलेल्या बऱ्याचश्या घटना वाचताना समजते की मानवी मनाची शक्ती खरंच किती आश्चर्यकारक आहे.मानवी मन हे वर्तमानकाळात राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ यांसोबत नेहमीच जोडले गेलेले असते. केवळ आपल्यामध्ये असणाऱ्या मनःशक्तीचा वापर करून बऱ्याच अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी घडवून आणणारे लोक नेहमीच विज्ञानाला आव्हान देत राहतात,त्यांच्यामध्ये असणारी अदृश्य शक्ती एक कोडेच बनून राहते.हे सांगताना बाळ भागवत यांनी बऱ्याच घटनांचे संदर्भ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बाळ भगवतांचे हे पुस्तक वाचल्यानंतर, कुतूहल आणि आश्चर्य सोडून आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून या शक्तींचा विचार करायला हवा असे वाटून जाते.मृत्यूनंतर सुद्धा माणसाचे आयुष्य असू शकतं हे दाखवणाऱ्या किंवा तसा विचार करायला लावणाऱ्या बऱ्याच घटनांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे.अदृश्य शक्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे टेलिपथी, त्याचीही बरीच उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतील. या उदाहरणांची सत्यता पडताळण्यासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगातून ठोस काही हाती आले नसले तरी त्या शक्ती असण्याची शक्यताही नाकारता आलेली नाही. दैवी शक्ती असणारी किंवा दैवी देणगी असणारी व्यक्ती, असे आपण जेव्हा एखाद्यबद्दल ऐकतो तेव्हा खरेच अशी शक्ती असू शकते का? असा प्रश्न आपल्याला पडतो.अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेल्या घटनांमधून आपल्याला शोधता येतील.

पुस्तकामध्ये दिलेल्या घटनांवरून निष्कर्ष हा शेवटी वाचकालाच काढायचा आहे.जरी अशा अनाकलनीय, अदृश्य, गूढ शक्तींच्या असण्याबद्दल लोकांची वेगवेगळी मते असली तरी आजही बऱ्याच प्रगत देशांमध्ये हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊन गेला आहे. त्यामुळेच एका रोमांचकारी अनुभवासाठी आणि आपल्या कुतुहलामध्ये आणखी भर घालण्यासाठी आपण आवर्जून वाचावे असे हे बाळ भागवत यांचे "अद्भुत शक्तींचे मायाजाल".




संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये