Sunday, July 19, 2020

"रॉ" भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा



लेखक : रवी आमले

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


गुप्तचरसंस्था किंवा हेरखाते हा शब्द ऐकला तर माझ्यासारख्या मराठी माणसाच्या ओठांवर येेेणारेे पहिले नाव म्हणजे स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख म्हणून इतिहासात नोंद असलेले बहिर्जी नाईक - जाधव यांचे. पण खरे तर गुप्तचरसंस्था ही हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली संकल्पना आहे, अगदी महाभारतपासून त्याचे पुरावे मिळतील. कोणतेही साम्राज्य, देश राखायचे असेल तर हेरखात्याचे महत्व हे अनन्यसाधारण. इतिहासात डोकावून पाहिले तर अशी बरीच उदाहरणे मिळतील जिथे शत्रूशी समोरासमोर न लढता सुद्धा बरीच साम्राज्ये नष्ट झाली आहेत आणि त्याचे सगळे श्रेय शत्रूच्या मजबूत,प्रभावी गुप्तचरसंस्थेला तसेच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या त्यांच्या हेरांना. म्हणूनच गुप्तचरसंस्था किंवा हेरखाते जितके प्रभावी तितकी त्या देशाची सुरक्षितता अबाधित. कोणत्याही देशाची गुप्तचरसंस्था ही त्या देशाचे डोळे आणि कान असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. इतिहास लिहिणे एकवेळ सोपे पण एखाद्या देशाच्या गुप्तचरसंस्थेच्या कामांबद्दल, मोहिमांबद्दल लिहिणे अवघड कारण कोणत्याही गुप्तचरसंस्थेचे कामच हे इतके गुप्तपणे चालत असते की त्यांनी केलेल्या कामाचा कागदोपत्री पुरावा मिळणे महाकठीण. तरी झालेल्या किंवा होत असलेल्या घटनांची सांगड घालून अशा मोहिमांची सत्यता आणि वस्तुस्थिती यांच्या जवळ नक्कीच जाता येऊ शकते. रवि आमले यांच्या मेहनतीतून साकारलेले हे पुस्तक म्हणजे "रॉ"...रिसर्च अँड अनालिसिस विंग या संस्थेची बखरच.

"रॉ" हा प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात नेहमीच असलेला कुतूहलाचा शब्द. त्याच कुतूहलामुळे "रॉ" च्या थरारक मोहिमांवर आधारलेले बरेच थ्रिलर चित्रपट सुद्धा आपण अगदी आवडीने पाहतो. पण रवि आमलेंचं हे पुस्तक वाचल्यानंतर त्या आवडीच्या जागी "रॉ" बद्दल अभिमान नक्कीच जागृत होईल. "रॉ" ने केलेल्या अनेक खऱ्याखुऱ्या थरारक, अविश्वसनीय मोहिमांबद्दल फारच कमी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचत असते, त्यामुळे पडद्यामागे राहून देशासाठी काम करणाऱ्या अनेक वीर हेरांना जितका मिळाला पाहिजे तितका सन्मान नाही मिळत. रवि आमले यांनी लिहिलेली ही "रॉ" ची यशोगाथा म्हणजे "रॉ" ने केलेल्या अनेक पराक्रमी मोहिमांची अभिमानास्पद कहाणी. "रॉ" ची निर्मिती करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या काही घटना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण यांचे अगदी विस्तृत वर्णन या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल.  देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात २१ सप्टेंबर १९६८ मधे झालेला "रॉ" चा जन्म आणि तेव्हापासून आजअखेरपर्यंत "रॉ" ने केलेल्या अनेक कारवायांच्या कहाण्या या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. स्वातंत्र्यानंतर भारत हा एक देश म्हणून घडत असताना त्या वाटचालीमधे असणारे "रॉ" चे महत्त्व आणि पडद्यामागे  राहून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व - एकात्मता टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाया या पुस्तकात वाचताना उर अभिमानाने भरून येतो. 

"रॉ" चे पहिले प्रमुख रामेश्वरनाथ काव यांच्यापासून सुरू झालेला प्रवास आजही ५२ वर्षे अविरतपणे चालू आहे तो सध्याचे प्रमुख समंत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली. "रॉ" ने केलेल्या सगळ्याच मोहिमांची माहिती जरी या पुस्तकामध्ये नसली तरी जी २४ प्रकरणे लेखकाने मांडली आहेत ती वाचताना एक गोष्ट नक्कीच जाणवते, ती म्हणजे अमेरिकेच्या "सि.आय.ए" किंवा इस्रालायच्या "मोसाद" या अतिशय भक्कम, शक्तिशाली आणि प्रभावी मानल्या जाणाऱ्या गुप्तचरसंस्थांइतकी प्रसिद्धी जरी "रॉ" ला मिळाली नसली तरी "रॉ"ने केलेल्या धाडसी मोहिमा या दोघांहून सरस नक्कीच आहेत. जगाच्या पाठीवर "रॉ" ही अशी एकमेव गुप्तचरसंस्था आहे जिच्यामुळे स्वदेशाचा भौगोलिक नकाशा वाढला आहे आणि शत्रूराष्ट्राचा नकाशा बिघडून गेला आहे. याचे या पुस्तकामध्ये दिलेले उत्तम उदाहरण म्हणजे बांगलादेश मुक्तियुद्ध आणि त्यातून झालेली पाकिस्तानची फाळणी तसेच सिक्कीमचे भारतामध्ये झालेले सामिलीकरण. "रॉ" च्या गुप्तचरांनी केलेल्या अशा बऱ्याच थरारक, रोमांचक आणि धाडसी कारवायांचा उल्लेख रवि आमले यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. यासोबतच "रॉ" भोवती फिरणारे भारतीय राजकारण आणि काही राजकारणी मंडळींचा हस्तक्षेप यांचाही बऱ्याच ठिकाणी उल्लेख आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल.आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे सरकार जाऊन जनता सरकार सत्तेत आले, त्यानंतर पंतप्रधानपदी बसलेल्या मोरारजी देसाईंनी "रॉ" सोबतचे सूडबुद्धीने घेतलेले निर्णय वाचून थोडं वाईट नक्कीच वाटतं. तरीही अशा राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेऊन, फक्त आणि फक्त देशाच्या सुरक्षिततेचा विचार करून निरंतर काम करणाऱ्या "रॉ" च्या सर्व पडद्यामागच्या वीरांचे कौतुक करावे तेवढे कमीच.

जगाच्या पाठीवर दररोज कुठे ना कुठे गुप्तचारांच्या कारवाया या अखंडपणे चालूच असतात आणि त्यांना पार्श्वभूमी असते ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या राजकारणाची. ज्या देशाचे राजकारणी अधिक मुत्सद्दी तितक्याच त्या देशाच्या गुप्तचरसंस्थेच्या कारवाया धाडसी आणि थरारक असतात. "रॉ" सोबतसुध्दा असंच काहीसं घडलं इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात. इंदिरा गांधींनी घेतलेले मुत्सद्दी निर्णय आणि त्याला "रॉ" च्या मोहिमांची मिळालेली साथ हे या पुस्तकात एकत्रितपणे वाचताना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. "जसं दिसतं तसं नसतं" या वाक्याची प्रचिती पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचताना येत राहते. स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकापेक्षा जास्त काळात एक देश म्हणून आपण काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचावं.

भारतीय गुप्तचरसंस्था "रॉ" चा पडद्याआडचा इतिहास, त्यांची काम करण्याची पद्धत यांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचावे असे रवि आमले यांचे पुस्तक "रॉ"...भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा.



संदीप प्रकाश जाधव



 








No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये