Sunday, August 9, 2020

"पावनखिंड"



लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


ज्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आवर्जून वाचाव्यात अशा मोजक्याच कादंबरीकरांपैकी एक म्हणजे रणजित देसाई.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र श्रीमानयोगी सारख्या अजरामर कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसमोर आणले. त्यांनीच लिहिलेल्या आणखीन ही काही कादंबऱ्या स्वामी,राधेय,मेख मोगरी,लक्ष्यवेध. रणजित देसाईंच्या प्रत्येक कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती वाचत असताना त्यातील घटना, पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ज्यामुळे वाचनाचा एक वेगळाच अनुभव येतो. मूळ विषयाला जराही धक्का न लावता कादंबरीच्या माध्यमातून तो वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची खासियत. त्यांच्या "लक्ष्यवेध" या शिवाजी महाराज - अफजलखान ऐतिहासिक भेटीवर आधारित कादंबरीचा पुस्तक परिचय मी इथे आधी दिला होता आणि तेव्हा लिहिल्याप्रमाणेच शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही एक स्वतंत्र कादंबरीचा विषय आणि अशा घटनांवर लिहावे - बोलावे तेवढे कमीच. शिवचरित्रातील अशाच एका ऐतिहासिक घटनेवर आधारीत आणि एका पराक्रमी व्यक्तीवर लिहिली गेलेली रणजित देसाई यांची ही कादंबरी "पावनखिंड". रणजित देसाई यांनी लिहिलेली "पावनखिंड" ही त्यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. 

शिवचरित्रातील अशा बऱ्याच घटना आहेत ज्या आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत, अगदी त्यांचे पारायण झाले म्हटले तरी ते चुकीचे नाही ठरणार. पण कितीही वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी एक नवीन ऊर्जा देणाऱ्या अशा या घटना. या कादंबरीचा विषयसुद्धा असाच. शिवचरित्रातील एक मानाचे पान म्हणजे  बाजीप्रभू देशपांडेंचा घोडखिंड म्हणजेच पावनखिंड याठिकाणी केलेला पराक्रम. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक अशी ही घटना. याच बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमावर लिहिलेली ही कादंबरी. जरी ही घटना सर्वांना माहीत असली तरी रणजित देसाईंनी लिहिलेल्या कादंबरी रुपात ती वाचत असताना एक वेगळाच अनुभव देऊन जाते. बाजीप्रभू देशपांडेंना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या कादंबरीमधे, रणजित देसाईंनी बाजीप्रभूंच्या शिवाजी महाराजांना भेटण्यापूर्वीच्या आयुष्यावरसुध्दा प्रकाश टाकला आहे. १२ मावळातील लोकांना स्वराज्यात जोडत असताना बांदल-देशमुखांसोबत झालेल्या एका लढाईत शत्रू म्हणून समोर आलेल्या बाजीप्रभूंना शिवरायांनी कसे आपलेसे केले? सोबतच बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे सुद्धा महाराजांकडे कसे आले? याचे वर्णन रणजित देसाईंनी या कादंबरीच्या सुरुवातीला केलेलं आहे. आधी विरोध करणारे आणि नंतर महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्याने प्रभावित होऊन, स्वराज्यात येऊन अतुल्य पराक्रम गाजवणारे बाजी आपल्याला या कादंबरीमधे वाचायला मिळतील. स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा आणि पराक्रम म्हणजे काय असतो हे बाजी आणि ३०० मावळ्यांनी घोडखिंडीत जगाला दाखवून दिले. या अचाट पराक्रमात घोडखिंडीची "पावनखिंड" कशी झाली याचे थरारक वर्णन कादंबरीत करत असताना, पन्हाळा किल्ल्याचा दिलेला परिचय, सिद्दीच्या वेढ्याबद्दलचे वर्णन, तो वेढा फोडण्यासाठी वेळोवेळी केले गेलेले प्रयत्न आणि नाइलाजास्तव वेढ्यातून निसटून पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेताना महाराजांच्या काळजीने सर्वांची झालेली मानसिक अवस्था, तसेच या ऐतिहासिक घटनेपूर्वीच्या इतर गोष्टींची पार्श्वभूमी जसे अफझलखान वध आणि त्यानंतर एकामागून एक महाराजांनी जिंकलेले किल्ले या सर्व गोष्टींमधून रणजित देसाईंनी तो काळ आपल्यासमोर उभा केला आहे.

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज हे  फक्त पावनखिंडी पुरते मर्यादित नाहीत. अफजलखान भेटीच्या वेळीसुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी बाजींनी पार पडली होती त्याचेही सविस्तर वर्णन आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. रणजित देसाईंनी बाजींचे केलेले या कादंबरीतील वर्णन धिप्पाड शरीरयष्टीचा एक शूर मावळा आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. असा धिप्पाड शरीरयष्टीचा शूर माणूससुद्धा किती हळवा असू शकतो हे महाराज पन्हाळ्यातून विशाळगडाकडे निघण्यापूर्वी भावनिक झालेला बाजी वाचताना समजते. भर पावसात, काटे, चिखल तुडवत, पाठलाग करणाऱ्या जवळपास २००० पेक्ष्या जास्त असणाऱ्या सिद्दीच्या सैन्याचा मागोवा घेत, १२-१३ तासांच्या अथक वाटचालीनंतर पन्हाळा ते घोडखिंड हे जवळपास ६० किलोमीटरचे अंतर पार करून राजांसह बाजी आणि ६०० मावळे जेव्हा घोडखिंडीत पोहचतात तेव्हा पन्हाळ्यावर हळवे झालेले हेच बाजी कठोर होऊन राजांना विशाळगड जवळ करण्याचा आग्रह करताना दिसतात. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हे एकच वाक्य डोक्यात ठेऊन बाजीप्रभू, फुलाजी आणि त्यांच्यासोबतच्या ३०० मावळ्यांनी स्वराज्यासाठी महाराजांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली, मरतानासुद्धा महाराजांना मुजरा करुनच प्राण सोडले. बाजींच्या आधी धारातीर्थी पडलेला आपला मोठा भाऊ फुलाजींच्या देहाकडे पाहत, "भाऊ जगण्याचं सार्थक केलंस.. गेलास.. म्हणजे जातोस कुठं.. तू मोठा ना.. तुझा मान पहिला... मी मागून आलोच" असे बोलणारे बाजी कादंबरीमध्ये वाचताना डोळ्यात नकळत पाणी आणतात. अंगावर झालेल्या अगणित जखमा, त्यातून वाहणारे रक्त घेऊन त्वेषाने लढणाऱ्या, "तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला" असे ठणकावून सांगत मावळ्यांचा लढण्याचा उत्साह वाढवणाऱ्या बाजींनी महाराज विशाळगाडी सुखरूप पोहचल्यानंतरच आपला देह ठेवला. बाजीप्रभू आणि इतर अनेक मावळ्यांच्या बलिदानाने, स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, "पावनखिंड" झाली.

जरी अगदी लहानपणापासून सर्वांना माहीत असलेली अशी ही ऐतिहासिक घटना असली तरीही रणजित देसाईंनी लिहिलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी आणि एका नरवीराच्या पराक्रमाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखे कादंबरीरूपातील पुस्तक "पावनखिंड".





संदीप प्रकाश जाधव


5 comments:

  1. संदीप भावा जबरदस्त ....

    ReplyDelete
  2. अनिकेत गाडगीळAugust 9, 2020 at 6:57 PM

    छान लिहिला आहेस रिव्ह्यू!

    ReplyDelete

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये