Sunday, September 27, 2020

"अघटित"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


रहस्यकथा, भयकथा लेखनातील एक वजनदार नाव आणि ज्यांचे लेखन आवर्जून वाचावे अशा मोजक्याच लेखकांपैकी एक लेखक म्हणजे नारायण धारप. आपल्या खास लेखनशैलीने, रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवणारे नारायण धारप. रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून राहील अशा रितीने लिहिलेल्या त्यांच्या थरारक कथा वाचकांना एक वेगळाच रोमांचक अनुभव देतात. त्यांच्या रहस्यकथा वाचल्यानंतर मनावर एक गडद सावट पडून वाटणारी भीती आणि तरीसुध्दा नवीन कथा वाचायची उत्सुकता हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य. त्यांचे गाजलेले काही कथासंग्रह चंद्राची सावली, चेटकीण, अंधारयात्रा, लुचाई, काळी जोगीण, वेडा विश्वनाथ, मृत्यूजाल, विधाता आणि इतरही बरीच. धारपांच्या  भयकथांपासून प्रेरणा घेऊन निर्माण केलेला "तुंबाड" सिनेमा बऱ्याच लोकांनी पहिला असणार, त्या कथेच्या मंडणीवरुनच धारपांच्या कल्पनाशक्तीचा अंदाज आपण लावू शकतो. नारायण धारप यांच्या अशाच ७ दर्जेदार भयकथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अघटित".

माणसाचं जीवन खूप गुंतागुंतीनी भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणा-या घटना घडत असतात ज्यांची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो आणि घडते नेमके त्याच्या उलटेच. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, ते आपण समजून घेण्याच्या आधीच सर्व काही घडून गेलेलं असतं. "हे असं कसं घडलं?" हा प्रश्न आपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारत राहतो. अशावेळी एकूण घटनाक्रमच आपल्या तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करून आपलं डोकं बधीर होऊन जातं आणि तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही. कारण त्या घटनाच अशा अकल्पित, अगम्य आणि आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या घटना सुरू होत असतात. अशावेळी आपण सारेच त्या काळाच्या, नियतीच्या हातातील बाहुले होऊन जातो. शेवटी एका पातळीवर जाऊन आपण हे सत्य स्वीकारतो पण तरीही दुस-या पातळीवर मात्र आपण विचार करीत असतो, शोध घेत असतो, "हे असं कसं घडलं?" कारण ते सर्व अघटित असतं. अशा अनेक थरारक आणि रोमहर्षक असलेल्या अकल्पित, अघटित घटनांनी भरलेला नारायण धारप यांचा हा कथासंग्रह "अघटित".

७ कथांच्या या पुस्तकातील कथा वाचत असताना त्या थोड्याफार प्रमाणात एकाच प्रकारच्या जरी वाटत असल्या तरी प्रत्येक कथेची मांडणी वेगळी आहे, विषय वेगळा आहे जे वाचकाला कथेमध्ये बांधून ठेवतात. पुढे काय होईल हे अपेक्षित असूनसुद्धा पुस्तक हातातून सोडवत नाही. वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणाऱ्या अशा कथा. प्रत्येक कथेमध्ये असणारे नायक किंवा नायिका यांच्यासोबत घडणाऱ्या तर्कापालिकडच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारे, अंगावर सरसरून काटा आणणारे भय वाचकांपर्यंत पोहचवताना धारपांनी कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याचीही तितकीच काळजी घेऊन लिहिलेल्या या कथा. 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "अघटित".




संदीप प्रकाश जाधव




Sunday, September 20, 2020

"समांतर"

 



लेखक : सुहास शिरवळकर

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


सुहास शिरवळकरांची "दुनियादारी" ही कादंबरी मी १४ वर्षांपूर्वी वाचली होती. चित्रपटाच्या माध्यमातून या कादंबरीची कथा बऱ्याच लोकांपर्यंत पोहचली, पण पुस्तकामध्ये कादंबरीरूपात सुशिंच्या लेखनातून उलगडत जाणारी "दुनियादारी" वाचण्याचा अनुभव खासच होता. आयुष्यात वाचलेली ही माझी पहिलीच कादंबरी आणि जिथून पुस्तक वाचनाला खरी गती मिळाली. त्यानंतर आजअखेर बऱ्याच लेखकांची पुस्तके वाचून झाली पण सुशिंचे एखादे पुस्तक वाचायचा योग इतक्या वर्षांनंतर पुन्हा आला तो "समांतर" या सुशिंच्या कादंबरीवर आधारीत वेब सिरिजमुळे. या वेब सिरीजची माध्यमांमध्ये जी चर्चा चालू होती त्यामुळे ती पाहण्याची खूप इच्छा होती पण "दुनियादारीच्या" असणाऱ्या अनुभवामुळे तो मोह टाळून मी पहिला पुस्तक वाचायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता हे कादंबरी वाचनास सुरुवात केल्यानंतर जाणवले. आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय याची कोणालाच कल्पना नसते पण तरीही अशी एकही व्यक्ती नाही सापडणार जीला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा नसेल. याच इच्छेखातर आणि उत्सुकतेमुळे आपण कधी वर्तमानपत्रात तर कधी एखाद्या ज्योतिष्याकडे आपले भविष्य जाणून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. याच विषयावर आधारीत सुहास शिरवळकरांनी लिहिलेली ही १९६ पानांची, वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी, भविष्याचा वेध घेणारी थरारक आणि रहस्यमयी कादंबरी "समांतर". 

नशिबाला कंटाळलेली एक व्यक्ती, कुमार महाजन हा या कादंबरीचा नायक. मुंबईमध्ये आपली पत्नी आणि मुलासोबत राहणारा तिशीतला एक मध्यमवर्गीय तरुण म्हणजे हा कुमार महाजन. आयुष्यात घडू नयेत अशा घडणाऱ्या घटना आणि आर्थिक विवंचनेत नेहमीच संघर्षमय जीवन जगावे लागणारा हा कुमार. त्याला या परिस्थितीला कंटाळलेला पाहून आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर त्याचा कार्यालयीन मित्र वाफगावकर त्याला एका प्रसिद्ध ज्योतिष्याकडे येण्यासाठी आग्रह करतो. देवांवर आणि ज्योतिष्यावर विश्वास नसणारा कुमार मित्राच्या आग्रहास्तव ज्योतिष्याकडे जातो खरा पण त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या काही अचूक गोष्टींमुळे त्याचा स्वामींवर विश्वास बसतो. पण कुमारचा हात पहायला घेताच स्वामी त्याला भविष्य सांगण्यास नकार देतात आणि अशा व्यक्तीचे नाव घेतात जे कुमारने पूर्वी कधीच ऐकलेलं नसतं. तीस वर्षांपूर्वी स्वामींकडे आलेला सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार यांच्या भविष्यरेषा सारख्याच असल्याचं स्वामी कुमारला सांगतात. स्वामींनी अपले भविष्य सांगण्यास नकार दिल्याने चिडलेला कुमार दोन लोकांच्या हस्तरेषा समान असणं केवळ अशक्य आहे असं म्हणून तिथून बाहेर पडतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकामागून एक घडणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे अस्वस्थ होतो. स्वामींवर बसलेल्या विश्वासामुळे कुमार त्याचा मित्र वाफगावकरसोबत सुदर्शन चक्रपाणी बद्दल माहिती मिळवायला चालू करतो. शोध घेत असताना त्यांना कुमार आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या समान गोष्टीबद्दल समजतं आणि इथेच कुमारला झालेली, अंगावर काटा आणणारी जाणीव म्हणजे सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ हा कुमारचा भविष्यकाळ आहे. "समांतर" म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ ! इथून सुरुवात होते या कादंबरीच्या थरारक आणि रहस्यमयी प्रवासाची.

कुमारने त्याच्या कंपनीमध्ये केलेल्या अफरातफरीमुळे त्याच्या पन्हाळ्याला झालेल्या बदलीनंतर ही कथा एका वेगळ्या वळणावर जाऊन वेग पकडते. या दरम्यान सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याच घटनांची कुमारला मिळालेली माहिती आणि त्या सर्व घटनांचे कुमारच्या आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांशी असणारे साधर्म्य यामुळे कथेचं गूढ वाढत जाते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं चक्रपाणीच्या भूतकाळाशी असणारं साधर्म्य कुमारला बेचैन करत राहतं आणि त्यातूनच तो सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटता यावं यासाठी पुन्हा एकदा जोमाने त्याचा शोध चालू करतो. चक्रपाणीच्या शोधात कुमारचा मध्यप्रदेशातील पालान हे छोटेसे गाव आणि तिथून रेतीमैदानातील चक्रपाणीच्या हवेलीपर्यंतचा प्रवास यांचं सुशिंनी केलेलं थरारक, रोमांचक  वर्णन वाचकाला कथेत गुंतवून ठेवते. पालानमध्ये जेव्हा कुमार सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटतो तेव्हाही त्याला त्याच्या आयुष्यात घडत असणाऱ्या आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक समांतर गोष्टींचा उलगडा होतो. कुमारला स्वतःचं भविष्य जाणून घेण्याची असणारी उत्सुकता आणि त्याने केलेल्या आग्रहामुळे चक्रपाणी त्याला आपण लिहिलेल्या डायरी वाचायला देतो पण त्यासाठीची असणारी अट म्हणजे कुमारला दररोज एकच पान वाचावं लागणार. डायरी मिळाल्यानंतर कुमारला स्वर्ग जणू दोन बोटे उरतो. पण नियती कोणाला चुकत नाही या उक्तीप्रमाणे चक्रपाणीच्या भूतकाळातील घटना कुमारच्या आयुष्यात घडत राहतात, भले त्या घडण्याचे कारण वेगळे असेल पण परिणाम तेच असतात जे चक्रपाणीने अनुभवलेले. डायरीतले प्रत्येक पान हे कुमारचा उद्याचा दिवस कसा आहे हे सांगत असतं, पण शेवट मात्र अधांतरीच असतो. सुदर्शन चक्रपाणीच्या भुतकाळात घडून गेलेल्या घटना आपल्या भविष्यकाळात घडू नयेत म्हणून कुमार काळजी घ्यायला सुरुवात करतो. तरीही मध्यंतरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि ही कथा शेवटाकडे जायला लागते. कुमार महाजन भोवती फिरत राहणाऱ्या या कथेचा अतिशय अनपेक्षितरित्या होणारा शेवट वाचकाला धक्का देऊन जातो.

हातामध्ये डायऱ्यांच्या रुपात स्वतःचं भविष्य माहित असणारा कुमार महाजन भविष्यात होऊ घातलेल्या घटना टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे आपल्याला कादंबरी वाचल्यावरच समजेल. वाचकाला कादंबरीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्यात सुशिंनी प्रचंड यश मिळवलंय. रहस्यमय घटनांनी खचाखच भरलेली आणि वाचत असताना शेवट काय असेल या विचाराने सतत आपली उत्कंठा वाढवणारी आवर्जून वाचण्यासारखी  सुहास शिरवळकरांची ही कादंबरी "समांतर".



संदीप प्रकाश जाधव

Sunday, September 13, 2020

"धग"

 


लेखक : उद्धव ज. शेळके

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन


स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. या शक्तीची विशालता परिमाणापलीकडे आहे. मनात आणले तर एक स्त्री काय करू शकते याची शेकडो उदाहरणे अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून सुद्धा आपल्याला मिळू शकतील. आजच्या युगातसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून, स्वतःचं वेगळं असं अस्तिव निर्माण करून, ताठ मानेने समाजात वावरत असणाऱ्या बऱ्याच स्त्रियांची उदाहरणे आहेत. उद्धव शेळके यांची ही कादंबरी, "धग" म्हणजे अशाच एका सामान्य स्त्रीची असामान्य कहाणी आहे.

उद्धव शेळकेंनी १९६० साली लिहिलेल्या या कादंबरीची वास्तवता वाचकाला आजही जाणवत राहते. ही कादंबरी म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या एका शिंपी कुटुंबाची कहाणी. कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे "कौतिक" नावाची शिंपीण. जरी कौतिकला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कहाणी असली तरी सोबतच या कादंबरीतील इतर पात्रे जसे कौतिकचा भाऊ गोविंदा भाऊजय गंगा, तिची आई गोदूबाई, नवरा महादेव, त्यांची मुलं भीमा-नामा-यसोदी, सासरा रघुनाथ, शेजारणी सीता-सकीना आणि कासम सुद्धा तितकीच महत्वाची. अनेक चढ-उतारांनी भरलेली अशी ही कादंबरी. वर्‍हाडी भाषेत लिहिलेली ही कादंबरी सुरुवातीला थोडी कठीण वाटते, पण संदर्भातून पुढे सगळे स्पष्ट होत जाते. कौतिकचा नवरा महादेव तिच्या मानाने सगळ्याच बाबतीत कमी उत्साही. तो प्रयत्न करत नाही असं नाही, पण निरुत्साह आणि अपयशामुळे ढेपाळतो. त्याला शिवणकाम येत असतं पण त्यात मन रमत नाही. सुरुवातीला कौतिकच्या भावासोबत शिवणकाम करणारा महादेव अचानकच सर्व सोडून कुटुंबासह आपल्या मूळ गावी येतो आणि इथूनच चालू होते कौतिकची कहाणी. वावरात मोलमजूरी करण्याबाबत कंटाळा - कमीपणा वाटणारा महादेव आणि आपली २ मुले  भीमा-नामा यांना सोबत घेऊन चालू होते कौतिकची धडपड, स्वाभिमानाने जगण्यासाठी.

पूर्णतः ग्रामीण वातावरणातील या कादंबरीतून विदर्भातले दैनंदिन ग्रामीण जीवन उद्धव शेळकेंनी आपल्यासमोर मांडले आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लहान असणारी तिची दोन मुलं - भीमा आणि नामा, शेवट होईपर्यंत मोठी होऊन आपापल्या परीने आयुष्य जगायला लागतात. भीमा गुंड बनतो, जे काय हवं ते हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाही हा धडा परिस्थितीच त्याला शिकवते. याउलट नामाला कोणतीही गोष्ट मनापासून शिकायची हौस असते आणि शेवटी परिस्थितीसोबत आपल्या आशा-अपेक्षांची तडजोड करायला तो शिकतो. कादंबरीमध्ये कौतिक केंद्रस्थानी असली तरी कादंबरीचे अंत:करण हा नामा आहे, हे वाचकाला हळूहळू उलगडत जातं. नामाच्या डोळ्यातूनच वाचक शेवटी वास्तवाकडे पाहतो. नकळतपणे जीवनाची जबाबदारी कौतिककडून नामाकडे सोपवली जाते. जातीव्यवस्थेमुळे पारंपरिकरित्या महादेवकडे आलेलं शिंपीपण या कुटुंबाला रोजगार आणि सामाजिक आधार देण्यात कमी पडते. पारंपारिक विद्या जोपासायचं आणि वारसा चालवायचं उत्तम साधन म्हणून जातसंस्थेच्या अस्तित्वाचं कारण आजही सांगितलं जातं पण ते किती तकलादू आहे हे या कुटुंबाची होणारी परवड वाचताना समजते आणि वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. महादेवाला ही विद्या त्याच्या वडिलांकडून कमीजास्त प्रमाणात मिळते, पण त्याच्या पुढच्या पिढीतला नामा मात्र दोन्हीकडे फसतो. ही पारंपारिक जातीची विद्या त्यांच्या जातसमूहातून तर त्याला मिळतच नाही, पण त्याला आधुनिक शाळेतील शिक्षणही गरिबीमुळे मिळत नाही. कथानकाच्या शेवटी गहाण ठेवलेलं मशीन परत आणताना त्याचं ओझं कौतिकला पेलवत नाही आणि तिच्या पाठीला जखम होते, जणू काही त्या सर्व पारंपारिक साच्यातल्या अपेक्षांखाली ती शेवटी कोसळते. पारंपारिक नात्यांचा कोणताच आधार उरत नाही आणि शेवटी सगळ्यांची फारकत होते. भीमा आणि महादेव भटकत राहतात आणि नामा-कौतिक हे दोघे सोबत राहूनही खर्‍या अर्थाने एकत्र राहत नाहीत.

कौतिकची आपला संसार उभारण्याची धडपड आणि जिद्द वाचून आपल्याला नवीन आशा मिळते. कितीही कठीण प्रसंगापुढे गुढघे न टेकता त्याला सामोरी जाणारी कौतिक वाचत असताना आपल्यालाही एक प्रकारची ऊर्जा देऊन जाते. भूतकाळात लिहीलेली ही संपूर्ण कादंबरी शेवटी मात्र वर्तमानकाळाचा वापर करून, जातीव्यवस्था आजही कायम असल्याचे बिंबवते. वाचकाला कमालीचे अस्वस्थ करून होणारा या कादंबरीचा शेवट.

एका सामान्य शिंपिणीची, परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही कहाणी. कठोर वास्तवाचे दर्शन घडवणारी, आवर्जून वाचावी अशी उद्धव शेळकेंची कादंबरी "धग".




संदीप प्रकाश जाधव

Sunday, September 6, 2020

"घनगर्द"

 

लेखक : हृषीकेश गुप्ते

प्रकाशक : रोहन प्रकाशन


आजच्या घडीला ज्यांच्या भयकथा - गूढकथा आवर्जून वाचाव्यात असे आणि ज्यांच्या "दंशकाल" या कादंबरी वाचनानंतर माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक झालेले लेखक म्हणजे हृषीकेश गुप्ते. "दंशकाल" शिवाय त्यांची इतर पुस्तके "चौरंग", "दैत्यालय", "अंधारवारी", "कालनिर्णय", "हाकामारी", "काळजुगारी" सुद्धा खासच आहेत. भयकथा - गूढकथा या कल्पनेवर आधारित असतात आणि हृषीकेश गुप्ते यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती. पण कल्पनाशक्तीतून साकारलेल्या कथा या तेव्हाच परिणामकारक होतात जेव्हा त्यांची उत्कृष्ट मांडणी केली जाते. हृषीकेश गुप्तेनीं लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आणि कथा परिणामकारक असण्याचं सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या कथांची केलेली मांडणी, जी वाचकाला त्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करते. याशिवाय काल्पनिक जरी असल्या तरी काही काही कथांमधून नकळत दिला जाणारा संदेश जो वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो. हृषीकेश गुप्ते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशाच ५ वेगवेगळ्या रोमांचक आणि थरारक कथांचा हा कथासंग्रह म्हणजे "घनगर्द".

पहिली कथा "घनगर्द" फिरते नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या गार्गी भोवती. कथेची सुरुवात होते माथेरानच्या डोंगरकड्यावरून, मंकी पॉइंटवरून एका माकडाच्या हल्ल्यात दरीमध्ये कोसळणारी गार्गी आणि तिला वाचवायला जाऊन तोल गेल्याने तिच्यासोबतच दरीत कोसळणारे तिचे वडिल या घटनेपासून. गार्गीला केंद्रस्थानी ठेवून भय आणि त्याच्या वेगवेगळ्या रुपांतून पुढे सरकणारे हे पहिल्या कथेचे कथानक. मंकी पॉइंटवरून दरीत पडताना वाटणारी मरणाची भीती, तारुण्यात प्रवेश करताना वाटणारी नैसर्गिक भीती, आई-वडिलांच्या सततच्या तणावपूर्ण नात्यामुळे वाटणारी भीती, एक मुलगी म्हणून समाजात वावरत असताना वाटणारी भीती अशा वेगवेगळ्या भीतीच्या छटांमधून उलगडत जाणारी ही पहिली कथा वाचताना हृषीकेश गुप्ते यांच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. डोंगरकड्यावरून खोल दरीत कोसळताना झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या गार्गीला, त्या गर्द अंधारात खोल दरीमध्ये अधांतरी लटकत असताना फ्लॅशबॅकमधे आठवणाऱ्या काही घटना आणि त्या घटनांना जोडून येणारे भय यांचे अगदी अफलातून वर्णन या पहिल्या कथेत वाचायला मिळेल. यासर्वांबरोबरच आपल्यासोबत दरीत पडलेल्या वडिलांच्या आठवणीने वाटणारे भय, त्यांना शोधण्यासाठी गार्गीने त्या गर्द अंधारात केलेली धडपड, अर्धमेल्या अवस्थेत नजरेस पडलेल्या वडिलांना पाहून गार्गीची झालेली अवस्था, त्याच परिस्थितीत वडिलांशेजारी झोपून काढलेली रात्र आणि तिथून सुटका होईपर्यंत वडिलांचा झालेला मृत्यू हे सर्व कथेत मांडत असताना हृषीकेश गुप्ते यांनी ती घटनाच आपल्यापुढे उभी केली आहे. अगदी चंद्राच्या प्रकाशात पडलेली डोंगराची सावलीसुद्धा त्यांच्या शब्दरचनेमुळे आपल्या पुढ्यात येते. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आपल्या आयुष्यात अक्राळविक्राळ, भीतिदायक माणसांच्या "घनगर्द" जंगलाची झालेली सुरुवात आणि त्यातून  बाहेर पडण्याची वाट आता स्वतःलाच शोधावी लागणार या गार्गीला झालेल्या जाणीवेने झालेला या कथेचा शेवट.

दुसरी कथा "पावसात आला कोणी" ही फिरते एका लेखकाभोवती. वास्तव आणि कल्पना यांच्या एकत्रिकरणातून निर्माण होणारे भय आणि त्यातून पुढे सरकणारे असे या कथेचे कथानक. एका प्रतिभावान लेखकाच्या कल्पनांना अचानक लागलेला ब्रेक आणि त्यामुळे तब्बल ३ वर्षांहून अधिक काळ कोणतेच लिखान न झाल्याने त्याच्या मनाची होणारी घालमेल ही या कथेत भयाच्या केंद्रस्थानी आहे. एक दिवस अचानकच मुसळधार पावसात लेखकाच्या घरी आलेली एक व्यक्ती आणि त्याच्यासोबतच्या संवादातून उलघडत जाणारे रहस्य म्हणजे ही कथा. लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकाची कथा ही लेखकाने लिहिण्यापूर्वी, त्या कथेची कल्पना फार आधी मला सुचली होती आणि ती कल्पना लेखकाने चोरली असा दावा करणारी ही पावसात आलेली व्यक्ती. एखाद्याच्या डोक्यातील विचार किंवा कल्पना चोरता येणं निव्वळ अशक्य आहे असे म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणाऱ्या लेखकला शेवटी त्या व्यक्तीसोबत झालेल्या संवादातून, त्याने दिलेल्या पुराव्यातून आपल्या कल्पनाशक्तीला ३ वर्षे ब्रेक कशामुळे लागला याचं लेखकाला मिळालेलं उत्तर म्हणजे ही कथा. सत्य आणि कल्पना यांचा परस्परांवर होणारा परिणाम किती खोलवर असतो याच्या जाणिवेसह झालेला या कथेचा शेवट.

तिसरी कथा "पानगळ" लिहिली गेलेय कोकणातील फुलवर्धन या गावातील देवधर वाड्याला केंद्रस्थानी ठेवून. कथा फिरते नाथा आणि त्याचा मित्र रघू यांच्याभोवती. या कथेतील भय हे नाथा आणि रघू यांनी लहानपणी नकळत केलेल्या अपराधाशी निगडित आहे. देवधर काकू आणि त्यांचा देवधर वाडा हा संपूर्ण गावासाठी एक भीतीयुक्त कुतूहलाचा विषय. याच देवधर वाड्यातील एका हापूस आंब्याच्या लहानपणी गंमत म्हणून केलेल्या चोरीमुळे नाथा आणि रघू यांच्या आयुष्याची कशी वाताहत होते याची ही एक थरारक कहाणी. आंब्याच्या चोरीनंतर एखाद्या "पानगळीप्रमाणे" नाथाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या झालेल्या मृत्यूमुळे आपल्या आईसोबत फुलवर्धन सोडलेला नाथा पुढे २० वर्षे याच भीतीखाली जगला की आपल्या कुटुंबाची झालेली ही "पानगळ" म्हणजे देवधर काकूंनी दिलेल्या शापाचाच परिणाम. आणि याच भितीमुळे भिकेला लागून गावची वेस सुद्धा ओलांडू न शकलेला रघू. फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणाऱ्या या कथेत नाथा आणि रघू जेव्हा लहानपणी पहिल्यांदाच देवधर वाड्यात जातात त्यावेळचे वाड्याच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसराचे हृषीकेश गुप्ते यांनी केलेलं थरारक वर्णन एखाद्या हॉरर चित्रपटाचा प्रसंगच आपल्यासमोर उभा करते. पुढे तब्बल २० वर्षांनी देवधर वाड्यात हापूस बहरल्यानंतर रघूने नाथाला फुलवर्धनला बोलावून घेणे आणि दोघांच्याही आयुष्याची अशी वाताहत नेमकी का झाली याचा लागलेला शोध म्हणजे ही थरारक कहाणी.

चौथी कथा आहे "मुआवजा". या कथेतील भय फिरते गावाकडच्या उरुसामध्ये घडलेली एक घटना आणि सुखी आयुष्य जगायला मिळवण्यासाठी चुकते करावे लागणाऱ्या अज्ञात मोबदल्याभोवती. कथेचा नायक जो गावामध्ये वर्षानुवर्षे भरणाऱ्या उरुसामध्ये एका म्हाताऱ्याकडून स्वतःसाठी आयुष्यभराचे सुख मागून घेतो पण त्यासाठी असणारी अट म्हणजे त्या म्हाताऱ्याला द्यावा लागणारा मोबदला जो नायकासाठी अज्ञात असेल. मग तो कदाचित त्याने त्या म्हाताऱ्याकडे येण्यापूर्वीच चुकता केला असेल किंवा त्याला तो नंतरच्या आयुष्यात द्यावा लागेल. २१ वर्षे आपल्याला हवे तसे आयुष्य जगल्यानंतर तो मोबदला जाणून घेण्यासाठी नायक जेव्हा गावात परत येतो तेव्हा फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणारे या कथेचे कथानक. पुस्तकातील बाकी कथांप्रमाणेच या कथेमधील पार्श्वभूमीचे वर्णनसुद्धा नायकासोबत घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. खासकरून हृषीकेश गुप्ते यांनी जे उरुसाचे अगदी अप्रतिम वर्णन कथेत केलेलं आहे ते ज्या वाचकांनी असा उरुस बालपणी अनुभवला आहे त्यांना त्याची नक्कीच आठवण करून देईल. २१ वर्षे तो अज्ञात "मुआवजा" काय असेल या भीतीमध्ये गेल्यानंतर, तो "मुआवजा" नेमका काय आहे हे जेव्हा नायकाला समजते तेव्हा त्या भीतीचे रूपांतर अधिकच भयानक चिंतेमध्ये होऊन संपणारी ही कथा. कथेतील म्हाताऱ्याच्या तोंडचे एक आवडलेलं वाक्य - " डोळ्यांतल्या पाण्यावरून दुःखाची, वा गालांवर उमललेल्या खळीवरून सुखाची कल्पना नाही करता येत. खरं दुःख जेव्हा वाट्याला येतं तेव्हा विंचवाच्या नांगीनं काळीज कुरतडतं आणि खरं सुख जेव्हा लाभतं तेव्हा जगण्याची मनीषाच संपते."

शेवटची पाचवी कथा आहे "रमलवाटा". थोड्याश्या वेगळ्या प्रकारचे भय आपल्यासमोर घेऊन येणारे या कथेचे कथानक. एका मोठ्या लेखकाभोती फिरणारी ही कथा. वास्तव आणि कल्पना या दोन्हींच्यामध्ये जो एक सामायिक प्रदेश असतो त्या प्रदेशात लेखकाच्या आयुष्यात घडलेली घटना म्हणजे ही कथा. भयकथा लेखनाने प्रसिद्धी मिळाल्यानंतर भयकथांचा मार्ग सोडून इतर लेखनाकडे वळलेला लेखक आणि त्यामुळे अर्ध्यावर सोडून दिलेल्या काही भयकथा यांतून जन्म घेणारे या कथेचे कथानक. वि.वि. दिवेकर नामक एका व्यक्तीचे एक चाहता म्हणून लेखकाच्या आयुष्यात आल्यानंतर सुरुवात होते या कथेची. "सांगितल्या नाहीत, तर कथा मरतात." असे म्हणणारा हा दिवेकर. कथेचा शेवट काय होणार याचा थोडासाही अंदाज न लागू देता वाचकाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाऊन संपलेली अशी ही कथा. दिवेकरांसोबत सुरुवातीला कुतूहल म्हणून लेखकाने चालू केलेली चर्चा नंतर त्याला भीतीकडे घेऊन जाते आणि एक विस्मयकारक शेवट करते. दिवेकर ही व्यक्ती कोण आणि ती लेखकाच्या आयुष्यात अचानकपणे का आली याच्या धक्कादायक शोधानंतर लेखकाचे पुन्हा भयकथा लेखनास सुरू करणे हा या कथेचा शेवट.

हृषीकेश गुप्ते यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ५ कथा म्हणजे भय कथांची आवड असणाऱ्यांसाठी पंचपक्वानासारख्याच. हृषीकेश गुप्ते यांच्या खास शैलीतील लिखाणासाठी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक "घनगर्द".




संदीप प्रकाश जाधव




"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये