लेखक : हृषीकेश गुप्ते
प्रकाशक : रोहन प्रकाशन
आजच्या घडीला ज्यांच्या भयकथा - गूढकथा आवर्जून वाचाव्यात असे आणि ज्यांच्या "दंशकाल" या कादंबरी वाचनानंतर माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक झालेले लेखक म्हणजे हृषीकेश गुप्ते. "दंशकाल" शिवाय त्यांची इतर पुस्तके "चौरंग", "दैत्यालय", "अंधारवारी", "कालनिर्णय", "हाकामारी", "काळजुगारी" सुद्धा खासच आहेत. भयकथा - गूढकथा या कल्पनेवर आधारित असतात आणि हृषीकेश गुप्ते यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती. पण कल्पनाशक्तीतून साकारलेल्या कथा या तेव्हाच परिणामकारक होतात जेव्हा त्यांची उत्कृष्ट मांडणी केली जाते. हृषीकेश गुप्तेनीं लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आणि कथा परिणामकारक असण्याचं सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या कथांची केलेली मांडणी, जी वाचकाला त्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करते. याशिवाय काल्पनिक जरी असल्या तरी काही काही कथांमधून नकळत दिला जाणारा संदेश जो वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो. हृषीकेश गुप्ते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशाच ५ वेगवेगळ्या रोमांचक आणि थरारक कथांचा हा कथासंग्रह म्हणजे "घनगर्द".
पहिली कथा "घनगर्द" फिरते नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या गार्गी भोवती. कथेची सुरुवात होते माथेरानच्या डोंगरकड्यावरून, मंकी पॉइंटवरून एका माकडाच्या हल्ल्यात दरीमध्ये कोसळणारी गार्गी आणि तिला वाचवायला जाऊन तोल गेल्याने तिच्यासोबतच दरीत कोसळणारे तिचे वडिल या घटनेपासून. गार्गीला केंद्रस्थानी ठेवून भय आणि त्याच्या वेगवेगळ्या रुपांतून पुढे सरकणारे हे पहिल्या कथेचे कथानक. मंकी पॉइंटवरून दरीत पडताना वाटणारी मरणाची भीती, तारुण्यात प्रवेश करताना वाटणारी नैसर्गिक भीती, आई-वडिलांच्या सततच्या तणावपूर्ण नात्यामुळे वाटणारी भीती, एक मुलगी म्हणून समाजात वावरत असताना वाटणारी भीती अशा वेगवेगळ्या भीतीच्या छटांमधून उलगडत जाणारी ही पहिली कथा वाचताना हृषीकेश गुप्ते यांच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. डोंगरकड्यावरून खोल दरीत कोसळताना झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या गार्गीला, त्या गर्द अंधारात खोल दरीमध्ये अधांतरी लटकत असताना फ्लॅशबॅकमधे आठवणाऱ्या काही घटना आणि त्या घटनांना जोडून येणारे भय यांचे अगदी अफलातून वर्णन या पहिल्या कथेत वाचायला मिळेल. यासर्वांबरोबरच आपल्यासोबत दरीत पडलेल्या वडिलांच्या आठवणीने वाटणारे भय, त्यांना शोधण्यासाठी गार्गीने त्या गर्द अंधारात केलेली धडपड, अर्धमेल्या अवस्थेत नजरेस पडलेल्या वडिलांना पाहून गार्गीची झालेली अवस्था, त्याच परिस्थितीत वडिलांशेजारी झोपून काढलेली रात्र आणि तिथून सुटका होईपर्यंत वडिलांचा झालेला मृत्यू हे सर्व कथेत मांडत असताना हृषीकेश गुप्ते यांनी ती घटनाच आपल्यापुढे उभी केली आहे. अगदी चंद्राच्या प्रकाशात पडलेली डोंगराची सावलीसुद्धा त्यांच्या शब्दरचनेमुळे आपल्या पुढ्यात येते. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आपल्या आयुष्यात अक्राळविक्राळ, भीतिदायक माणसांच्या "घनगर्द" जंगलाची झालेली सुरुवात आणि त्यातून बाहेर पडण्याची वाट आता स्वतःलाच शोधावी लागणार या गार्गीला झालेल्या जाणीवेने झालेला या कथेचा शेवट.
दुसरी कथा "पावसात आला कोणी" ही फिरते एका लेखकाभोवती. वास्तव आणि कल्पना यांच्या एकत्रिकरणातून निर्माण होणारे भय आणि त्यातून पुढे सरकणारे असे या कथेचे कथानक. एका प्रतिभावान लेखकाच्या कल्पनांना अचानक लागलेला ब्रेक आणि त्यामुळे तब्बल ३ वर्षांहून अधिक काळ कोणतेच लिखान न झाल्याने त्याच्या मनाची होणारी घालमेल ही या कथेत भयाच्या केंद्रस्थानी आहे. एक दिवस अचानकच मुसळधार पावसात लेखकाच्या घरी आलेली एक व्यक्ती आणि त्याच्यासोबतच्या संवादातून उलघडत जाणारे रहस्य म्हणजे ही कथा. लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकाची कथा ही लेखकाने लिहिण्यापूर्वी, त्या कथेची कल्पना फार आधी मला सुचली होती आणि ती कल्पना लेखकाने चोरली असा दावा करणारी ही पावसात आलेली व्यक्ती. एखाद्याच्या डोक्यातील विचार किंवा कल्पना चोरता येणं निव्वळ अशक्य आहे असे म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणाऱ्या लेखकला शेवटी त्या व्यक्तीसोबत झालेल्या संवादातून, त्याने दिलेल्या पुराव्यातून आपल्या कल्पनाशक्तीला ३ वर्षे ब्रेक कशामुळे लागला याचं लेखकाला मिळालेलं उत्तर म्हणजे ही कथा. सत्य आणि कल्पना यांचा परस्परांवर होणारा परिणाम किती खोलवर असतो याच्या जाणिवेसह झालेला या कथेचा शेवट.
तिसरी कथा "पानगळ" लिहिली गेलेय कोकणातील फुलवर्धन या गावातील देवधर वाड्याला केंद्रस्थानी ठेवून. कथा फिरते नाथा आणि त्याचा मित्र रघू यांच्याभोवती. या कथेतील भय हे नाथा आणि रघू यांनी लहानपणी नकळत केलेल्या अपराधाशी निगडित आहे. देवधर काकू आणि त्यांचा देवधर वाडा हा संपूर्ण गावासाठी एक भीतीयुक्त कुतूहलाचा विषय. याच देवधर वाड्यातील एका हापूस आंब्याच्या लहानपणी गंमत म्हणून केलेल्या चोरीमुळे नाथा आणि रघू यांच्या आयुष्याची कशी वाताहत होते याची ही एक थरारक कहाणी. आंब्याच्या चोरीनंतर एखाद्या "पानगळीप्रमाणे" नाथाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या झालेल्या मृत्यूमुळे आपल्या आईसोबत फुलवर्धन सोडलेला नाथा पुढे २० वर्षे याच भीतीखाली जगला की आपल्या कुटुंबाची झालेली ही "पानगळ" म्हणजे देवधर काकूंनी दिलेल्या शापाचाच परिणाम. आणि याच भितीमुळे भिकेला लागून गावची वेस सुद्धा ओलांडू न शकलेला रघू. फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणाऱ्या या कथेत नाथा आणि रघू जेव्हा लहानपणी पहिल्यांदाच देवधर वाड्यात जातात त्यावेळचे वाड्याच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसराचे हृषीकेश गुप्ते यांनी केलेलं थरारक वर्णन एखाद्या हॉरर चित्रपटाचा प्रसंगच आपल्यासमोर उभा करते. पुढे तब्बल २० वर्षांनी देवधर वाड्यात हापूस बहरल्यानंतर रघूने नाथाला फुलवर्धनला बोलावून घेणे आणि दोघांच्याही आयुष्याची अशी वाताहत नेमकी का झाली याचा लागलेला शोध म्हणजे ही थरारक कहाणी.
चौथी कथा आहे "मुआवजा". या कथेतील भय फिरते गावाकडच्या उरुसामध्ये घडलेली एक घटना आणि सुखी आयुष्य जगायला मिळवण्यासाठी चुकते करावे लागणाऱ्या अज्ञात मोबदल्याभोवती. कथेचा नायक जो गावामध्ये वर्षानुवर्षे भरणाऱ्या उरुसामध्ये एका म्हाताऱ्याकडून स्वतःसाठी आयुष्यभराचे सुख मागून घेतो पण त्यासाठी असणारी अट म्हणजे त्या म्हाताऱ्याला द्यावा लागणारा मोबदला जो नायकासाठी अज्ञात असेल. मग तो कदाचित त्याने त्या म्हाताऱ्याकडे येण्यापूर्वीच चुकता केला असेल किंवा त्याला तो नंतरच्या आयुष्यात द्यावा लागेल. २१ वर्षे आपल्याला हवे तसे आयुष्य जगल्यानंतर तो मोबदला जाणून घेण्यासाठी नायक जेव्हा गावात परत येतो तेव्हा फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणारे या कथेचे कथानक. पुस्तकातील बाकी कथांप्रमाणेच या कथेमधील पार्श्वभूमीचे वर्णनसुद्धा नायकासोबत घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. खासकरून हृषीकेश गुप्ते यांनी जे उरुसाचे अगदी अप्रतिम वर्णन कथेत केलेलं आहे ते ज्या वाचकांनी असा उरुस बालपणी अनुभवला आहे त्यांना त्याची नक्कीच आठवण करून देईल. २१ वर्षे तो अज्ञात "मुआवजा" काय असेल या भीतीमध्ये गेल्यानंतर, तो "मुआवजा" नेमका काय आहे हे जेव्हा नायकाला समजते तेव्हा त्या भीतीचे रूपांतर अधिकच भयानक चिंतेमध्ये होऊन संपणारी ही कथा. कथेतील म्हाताऱ्याच्या तोंडचे एक आवडलेलं वाक्य - " डोळ्यांतल्या पाण्यावरून दुःखाची, वा गालांवर उमललेल्या खळीवरून सुखाची कल्पना नाही करता येत. खरं दुःख जेव्हा वाट्याला येतं तेव्हा विंचवाच्या नांगीनं काळीज कुरतडतं आणि खरं सुख जेव्हा लाभतं तेव्हा जगण्याची मनीषाच संपते."
शेवटची पाचवी कथा आहे "रमलवाटा". थोड्याश्या वेगळ्या प्रकारचे भय आपल्यासमोर घेऊन येणारे या कथेचे कथानक. एका मोठ्या लेखकाभोती फिरणारी ही कथा. वास्तव आणि कल्पना या दोन्हींच्यामध्ये जो एक सामायिक प्रदेश असतो त्या प्रदेशात लेखकाच्या आयुष्यात घडलेली घटना म्हणजे ही कथा. भयकथा लेखनाने प्रसिद्धी मिळाल्यानंतर भयकथांचा मार्ग सोडून इतर लेखनाकडे वळलेला लेखक आणि त्यामुळे अर्ध्यावर सोडून दिलेल्या काही भयकथा यांतून जन्म घेणारे या कथेचे कथानक. वि.वि. दिवेकर नामक एका व्यक्तीचे एक चाहता म्हणून लेखकाच्या आयुष्यात आल्यानंतर सुरुवात होते या कथेची. "सांगितल्या नाहीत, तर कथा मरतात." असे म्हणणारा हा दिवेकर. कथेचा शेवट काय होणार याचा थोडासाही अंदाज न लागू देता वाचकाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाऊन संपलेली अशी ही कथा. दिवेकरांसोबत सुरुवातीला कुतूहल म्हणून लेखकाने चालू केलेली चर्चा नंतर त्याला भीतीकडे घेऊन जाते आणि एक विस्मयकारक शेवट करते. दिवेकर ही व्यक्ती कोण आणि ती लेखकाच्या आयुष्यात अचानकपणे का आली याच्या धक्कादायक शोधानंतर लेखकाचे पुन्हा भयकथा लेखनास सुरू करणे हा या कथेचा शेवट.
हृषीकेश गुप्ते यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ५ कथा म्हणजे भय कथांची आवड असणाऱ्यांसाठी पंचपक्वानासारख्याच. हृषीकेश गुप्ते यांच्या खास शैलीतील लिखाणासाठी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक "घनगर्द".
संदीप प्रकाश जाधव