Sunday, September 13, 2020

"धग"

 


लेखक : उद्धव ज. शेळके

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन


स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. या शक्तीची विशालता परिमाणापलीकडे आहे. मनात आणले तर एक स्त्री काय करू शकते याची शेकडो उदाहरणे अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून सुद्धा आपल्याला मिळू शकतील. आजच्या युगातसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून, स्वतःचं वेगळं असं अस्तिव निर्माण करून, ताठ मानेने समाजात वावरत असणाऱ्या बऱ्याच स्त्रियांची उदाहरणे आहेत. उद्धव शेळके यांची ही कादंबरी, "धग" म्हणजे अशाच एका सामान्य स्त्रीची असामान्य कहाणी आहे.

उद्धव शेळकेंनी १९६० साली लिहिलेल्या या कादंबरीची वास्तवता वाचकाला आजही जाणवत राहते. ही कादंबरी म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या एका शिंपी कुटुंबाची कहाणी. कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे "कौतिक" नावाची शिंपीण. जरी कौतिकला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कहाणी असली तरी सोबतच या कादंबरीतील इतर पात्रे जसे कौतिकचा भाऊ गोविंदा भाऊजय गंगा, तिची आई गोदूबाई, नवरा महादेव, त्यांची मुलं भीमा-नामा-यसोदी, सासरा रघुनाथ, शेजारणी सीता-सकीना आणि कासम सुद्धा तितकीच महत्वाची. अनेक चढ-उतारांनी भरलेली अशी ही कादंबरी. वर्‍हाडी भाषेत लिहिलेली ही कादंबरी सुरुवातीला थोडी कठीण वाटते, पण संदर्भातून पुढे सगळे स्पष्ट होत जाते. कौतिकचा नवरा महादेव तिच्या मानाने सगळ्याच बाबतीत कमी उत्साही. तो प्रयत्न करत नाही असं नाही, पण निरुत्साह आणि अपयशामुळे ढेपाळतो. त्याला शिवणकाम येत असतं पण त्यात मन रमत नाही. सुरुवातीला कौतिकच्या भावासोबत शिवणकाम करणारा महादेव अचानकच सर्व सोडून कुटुंबासह आपल्या मूळ गावी येतो आणि इथूनच चालू होते कौतिकची कहाणी. वावरात मोलमजूरी करण्याबाबत कंटाळा - कमीपणा वाटणारा महादेव आणि आपली २ मुले  भीमा-नामा यांना सोबत घेऊन चालू होते कौतिकची धडपड, स्वाभिमानाने जगण्यासाठी.

पूर्णतः ग्रामीण वातावरणातील या कादंबरीतून विदर्भातले दैनंदिन ग्रामीण जीवन उद्धव शेळकेंनी आपल्यासमोर मांडले आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लहान असणारी तिची दोन मुलं - भीमा आणि नामा, शेवट होईपर्यंत मोठी होऊन आपापल्या परीने आयुष्य जगायला लागतात. भीमा गुंड बनतो, जे काय हवं ते हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाही हा धडा परिस्थितीच त्याला शिकवते. याउलट नामाला कोणतीही गोष्ट मनापासून शिकायची हौस असते आणि शेवटी परिस्थितीसोबत आपल्या आशा-अपेक्षांची तडजोड करायला तो शिकतो. कादंबरीमध्ये कौतिक केंद्रस्थानी असली तरी कादंबरीचे अंत:करण हा नामा आहे, हे वाचकाला हळूहळू उलगडत जातं. नामाच्या डोळ्यातूनच वाचक शेवटी वास्तवाकडे पाहतो. नकळतपणे जीवनाची जबाबदारी कौतिककडून नामाकडे सोपवली जाते. जातीव्यवस्थेमुळे पारंपरिकरित्या महादेवकडे आलेलं शिंपीपण या कुटुंबाला रोजगार आणि सामाजिक आधार देण्यात कमी पडते. पारंपारिक विद्या जोपासायचं आणि वारसा चालवायचं उत्तम साधन म्हणून जातसंस्थेच्या अस्तित्वाचं कारण आजही सांगितलं जातं पण ते किती तकलादू आहे हे या कुटुंबाची होणारी परवड वाचताना समजते आणि वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. महादेवाला ही विद्या त्याच्या वडिलांकडून कमीजास्त प्रमाणात मिळते, पण त्याच्या पुढच्या पिढीतला नामा मात्र दोन्हीकडे फसतो. ही पारंपारिक जातीची विद्या त्यांच्या जातसमूहातून तर त्याला मिळतच नाही, पण त्याला आधुनिक शाळेतील शिक्षणही गरिबीमुळे मिळत नाही. कथानकाच्या शेवटी गहाण ठेवलेलं मशीन परत आणताना त्याचं ओझं कौतिकला पेलवत नाही आणि तिच्या पाठीला जखम होते, जणू काही त्या सर्व पारंपारिक साच्यातल्या अपेक्षांखाली ती शेवटी कोसळते. पारंपारिक नात्यांचा कोणताच आधार उरत नाही आणि शेवटी सगळ्यांची फारकत होते. भीमा आणि महादेव भटकत राहतात आणि नामा-कौतिक हे दोघे सोबत राहूनही खर्‍या अर्थाने एकत्र राहत नाहीत.

कौतिकची आपला संसार उभारण्याची धडपड आणि जिद्द वाचून आपल्याला नवीन आशा मिळते. कितीही कठीण प्रसंगापुढे गुढघे न टेकता त्याला सामोरी जाणारी कौतिक वाचत असताना आपल्यालाही एक प्रकारची ऊर्जा देऊन जाते. भूतकाळात लिहीलेली ही संपूर्ण कादंबरी शेवटी मात्र वर्तमानकाळाचा वापर करून, जातीव्यवस्था आजही कायम असल्याचे बिंबवते. वाचकाला कमालीचे अस्वस्थ करून होणारा या कादंबरीचा शेवट.

एका सामान्य शिंपिणीची, परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही कहाणी. कठोर वास्तवाचे दर्शन घडवणारी, आवर्जून वाचावी अशी उद्धव शेळकेंची कादंबरी "धग".




संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये