Sunday, September 27, 2020

"अघटित"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


रहस्यकथा, भयकथा लेखनातील एक वजनदार नाव आणि ज्यांचे लेखन आवर्जून वाचावे अशा मोजक्याच लेखकांपैकी एक लेखक म्हणजे नारायण धारप. आपल्या खास लेखनशैलीने, रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवणारे नारायण धारप. रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून राहील अशा रितीने लिहिलेल्या त्यांच्या थरारक कथा वाचकांना एक वेगळाच रोमांचक अनुभव देतात. त्यांच्या रहस्यकथा वाचल्यानंतर मनावर एक गडद सावट पडून वाटणारी भीती आणि तरीसुध्दा नवीन कथा वाचायची उत्सुकता हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य. त्यांचे गाजलेले काही कथासंग्रह चंद्राची सावली, चेटकीण, अंधारयात्रा, लुचाई, काळी जोगीण, वेडा विश्वनाथ, मृत्यूजाल, विधाता आणि इतरही बरीच. धारपांच्या  भयकथांपासून प्रेरणा घेऊन निर्माण केलेला "तुंबाड" सिनेमा बऱ्याच लोकांनी पहिला असणार, त्या कथेच्या मंडणीवरुनच धारपांच्या कल्पनाशक्तीचा अंदाज आपण लावू शकतो. नारायण धारप यांच्या अशाच ७ दर्जेदार भयकथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अघटित".

माणसाचं जीवन खूप गुंतागुंतीनी भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणा-या घटना घडत असतात ज्यांची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो आणि घडते नेमके त्याच्या उलटेच. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, ते आपण समजून घेण्याच्या आधीच सर्व काही घडून गेलेलं असतं. "हे असं कसं घडलं?" हा प्रश्न आपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारत राहतो. अशावेळी एकूण घटनाक्रमच आपल्या तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करून आपलं डोकं बधीर होऊन जातं आणि तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही. कारण त्या घटनाच अशा अकल्पित, अगम्य आणि आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या घटना सुरू होत असतात. अशावेळी आपण सारेच त्या काळाच्या, नियतीच्या हातातील बाहुले होऊन जातो. शेवटी एका पातळीवर जाऊन आपण हे सत्य स्वीकारतो पण तरीही दुस-या पातळीवर मात्र आपण विचार करीत असतो, शोध घेत असतो, "हे असं कसं घडलं?" कारण ते सर्व अघटित असतं. अशा अनेक थरारक आणि रोमहर्षक असलेल्या अकल्पित, अघटित घटनांनी भरलेला नारायण धारप यांचा हा कथासंग्रह "अघटित".

७ कथांच्या या पुस्तकातील कथा वाचत असताना त्या थोड्याफार प्रमाणात एकाच प्रकारच्या जरी वाटत असल्या तरी प्रत्येक कथेची मांडणी वेगळी आहे, विषय वेगळा आहे जे वाचकाला कथेमध्ये बांधून ठेवतात. पुढे काय होईल हे अपेक्षित असूनसुद्धा पुस्तक हातातून सोडवत नाही. वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणाऱ्या अशा कथा. प्रत्येक कथेमध्ये असणारे नायक किंवा नायिका यांच्यासोबत घडणाऱ्या तर्कापालिकडच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारे, अंगावर सरसरून काटा आणणारे भय वाचकांपर्यंत पोहचवताना धारपांनी कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याचीही तितकीच काळजी घेऊन लिहिलेल्या या कथा. 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "अघटित".




संदीप प्रकाश जाधव




No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये