Sunday, November 1, 2020

"चेटकीण"

 




लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


आपल्या लिखाणाने एक काळ गाजवलेले लेखक नारायण धारप. मराठी साहित्यात रहस्यकथा आणि कादंबऱ्यांचे दालन समृध्द करणारे लेखक म्हणून त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे. भीतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नारायण धारप यांच्या भयकथा वाचन हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल. भीतीने अंगावर शहारे येणे म्हणजे काय याची जाणीव धारपांच्या भयकथा वाचताना होते. एखादा अतिशय हॉरर चित्रपट पाहताना जितकी भीती आपल्याला वाटू शकते तितकीच किंबहुना त्याच्यातून थोडी जास्तच भीती धारपांच्या कथांमधून जाणवते आणि याचं कारण म्हणजे त्यांची कथा सांगण्याची पद्धत ज्याद्वारे वाचक त्यामध्ये हरवून जाऊन स्वतःला त्या वातावरणासोबत, त्या घटनांसोबत रिलेट करत राहतो. नारायण धारप यांचे "अघटित" हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक आणि तो वाचनाचा अनुभवच इतका वेगळा, रोमांचक होता की नकळत त्यांच्या इतरही काही पुस्तकांची यादी बनून गेली. त्यांपैकीच एक अतिशय रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेली, २०८ पानांची छोटीशीच पण अगदी जवळून भीतीचा अनुभव देणारी कादंबरी "चेटकीण".

कोणत्याही भयकथेसाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कथेसाठीचे व्यासपीठ अर्थातच ते ठिकाण जिथे अशा कथा जन्म घेतात. आणि कोकण हे नेहमीच अशा कथांसाठी प्रसिद्ध आहे. तर इथेसुद्धा कथानकाची सुरुवात होते आजही रहस्य आणि गूढकथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून. कोकणातील श्रीवर्धनजवळ, गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी दांडेकरांची वाडी ही या कथेच्या केंद्रस्थानी आहे.  समुद्राला येणाऱ्या भरतीच्यावेळी जगापासून पूर्णपणे संपर्क तुटणारी अशी ही दांडेकरांची वाडी आणि तिथे असणारी दोन घरे. एक ज्यामध्ये गोविंदराव त्यांच्या आईच्या मृत्यूनंतरच्या विधीसाठी आपल्या कुटुंबासोबत रहायला येतात आणि एक जे वर्षांनुवर्षे बंद आहे. कथेची नायिका सोनाली अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वडिलोपार्जित वाडीमध्ये कुटुंबासोबत राहायला येते आणि इथून सुरू होतो या कादंबरीचा गूढ प्रवास. वाडीमध्ये पहिल्यांदाच आलेल्या सोनालीला त्या बंद घराबद्दल असणारे आकर्षण आणि तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचे त्या घराबद्दल निघणारा कोणताही विषय टाळत राहणे सोनालीसोबतच एक वाचक म्हणून आपलीही उत्सुकता वाढवत राहते. आजीने लिहून ठेवलेला त्या बंद घराचा इतिहास आणि वर्षांनुवर्षे त्या वाडीवर आजीसोबत राहिलेल्या रखमाकडून मिळालेल्या माहितीतून हळूहळू त्या वास्तूबद्दल उलगडत जाणारी रहस्ये जी सोनालीसोबतच आपलंही कुतूहल वाढवत राहतात. त्या बंद वास्तूमध्ये असणारी एक गूढ शक्ती, तिचे वेगवेगळ्या रुपांमधे लोकांना दर्शन देऊन त्या वास्तूकडे आकर्षित करणे, त्या वास्तूत घडणाऱ्या मानवाच्या आकलनापलीकडच्या आणि आवाक्याबाहेरच्या घटना, या सर्वांचे चित्रण कादंबरीमध्ये वाचत असताना नकळत आपल्याही अंगावर शहारे येत राहतात. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवून अतिशय रहस्यमय आणि गूढ पद्धतीने पुढे सरकणारी या कादंबरीची कथा ज्यामध्ये भीतीच्या पाशात एखादी व्यक्ती कशी अडकते, तिला येणारे भयानक अनुभव आणि त्यातून भूत-पिशाच्च-क्रूर शक्ती या काल्पनिक जगाचे जाणवणारे अस्तित्व शिवाय दैवी शक्ती किंवा चमत्कारांनी त्यातून होणारी माणसाची सुटका याचे अतिशय रोमांचक वर्णन कादंबरीत आहे. शेवटी त्या गूढ आणि वाईट शक्तींपासून लोकांचे रक्षण करण्याची कला अनुवंशिकतेमुळे आजीकडून सोनालीकडे आल्याचे समजल्यानंतर सोनालीने घेतलेला एक धाडसी निर्णय कादंबरीचा शेवट करतो.

अतिशय चित्तथराक, रोमहर्षक, अकल्पित आणि गुढतेने खचाखच भरलेली, वाचकाला जागेवर खिळवून ठेवणारी, एखाद्या भयपटाला शोभणारी आवर्जून वाचण्यासारखी नारायण धारप यांची कादंबरी "चेटकीण".





संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये