लेखक : काका विधाते
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम हे स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांकडून पकडले जाणे हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले, अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. कोणतंही नेतृत्व नसणाऱ्या मराठ्यांकडून झालेला हा अफाट पराक्रम एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. मराठ्यांच्या या रणसंग्रामाचा विचार करताना एक व्यक्ती अशी आहे जिचे कर्तृत्व डावलून आपण पुढे जाऊच शकत नाही आणि ती म्हणजे "सेनापती संताजी घोरपडे". संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विस्कटलेलं स्वराज्य पुन्हा नव्या जिद्दीने आणि जोमाने उभं करण्याचा चंग बांधून, औरंगजेबाच्या एकाहून एक सरस सरदारांना, त्यांच्या विशाल सेनेला अंगावर घेऊन त्यांना पळता भुई थोडी करणारा रणधुरंधर म्हणजे "सेनापती संताजी घोरपडे". शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा अचूक आणि प्रभावीपणे वापर करून अपराजित, बलाढ्य समजल्या जाणाऱ्या मोगल सत्तेला त्यांनी जमिनीवर आणलं. परंतु या स्वातंत्र्यसंग्रामात अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं? किती हाल सोसावे लागले? संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडले, इतर राजकुटुंबावर लपून रहायची वेळ आली तेव्हा स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ मराठी वीरांची मानसिकता काय असेल? रयतेची काय अवस्था झाली असेल? नेतृत्वाचा जरब नसल्यामुळे वाढत जाणारी अंतर्गत दुही आणि त्यामुळे स्वराज्याचं नेमकं काय नुकसान झालं? इतक्या बलाढ्य मोगल साम्राज्याला टक्कर देण्याची ताकत, जिद्द मूठभर मराठ्यांमधे कोठून आली? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला काका विधाते यांच्या "संताजी" या कादंबरीमधे मिळतील.
मराठ्यांच्या इतिहासात काही पराक्रमी, धाडसी, शूर वीरांची नावे सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी आहेत आणि संताजी घोरपडे हे त्यातीलच एक नाव. म्हालोजी घोरपडे हे शिवरायांच्या स्वराज्यउभारणीच्या कार्यात सोबत असणारे एक मोठं नाव आणि त्यांच्याच ३ पुत्रांपैकी जेष्ठ पुत्र "संताजी". स्वराज्याच्या सैन्यात वडील मोठ्या हुद्द्यावर असूनही एका साध्या शिपायापासून संताजींनी आपला प्रवास सुरु केला. एकाहून एक सरस पराक्रम गाजवत शिपायापासून ते स्वराज्याच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा प्रवास कादंबरीत वाचत असताना आपल्याला अचंबित करून जातो. या शूर, रणधुरंधर सेनापतीचे चरित्र काका विधाते यांनी त्यांच्या "संताजी" या ८९२ पानांच्या कादंबरीतून आपल्यापुढे मांडलं आहे. संभाजी महाराजांना मुकर्रबखानाने संगमेश्वरात पकडले तेव्हा झालेल्या लढाईत संताजींचे वडील म्हालोजी कामी आले. शंभू राजांना तिथून सोडवण्याचा सर्वांनी आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी आपण पूर्णपणे अडकलो आहोत याची जाणीव झाल्यानंतर संभाजी महाराजांनी संताजींना तिथून निघून जाण्याची आज्ञा केली आणि अखेरपर्यंत औरंगजेबाशी लढत राहून स्वराज्य राखण्याचा सल्ला त्यांना दिला. तिथून नाईलाजास्तव संताजी रायगडी आले पण आपण आपल्या राजाला वाचवू शकलो नाही ही सल शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहिली. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर त्यांच्या मनात बदल्याची ठिणगी उठली आणि औरंगजेबाने महाराजांना मारल्यानंतर त्याच ठिणगीने वणव्याचे रूप घेऊन अख्ख्या मोगलाईला होरपळून काढले. संताजींनी जेव्हा लाखो सैनिकांच्या छावणीत घुसून औरंगजेबालाच मारण्याचा धाडसी प्रयत्न केला तेव्हा त्या वणव्याचे चटके साक्षात आलमगीर औरंगजेबाला पण बसले. केवळ त्याचं नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला. संगमेश्वर सोडताना महाराजांना मूकपणे दिलेला शब्द प्रमाण मानून संताजी शेवटच्या श्वासापर्यंत मोगलांशी लढत राहिले आणि शेवटी स्वकीयांच्याच राजकारणाचा बळी झाले. अंतर्गत दुही आणि राजकारण हे मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलेले, त्यातून "संताजी" तरी कसे सुटणार. खेकड्याने चालण्याची काही लोकांची वृत्तीच शेवटी संताजींच्या अंतास कारण ठरली. परंतु कादंबरी वाचून झाल्यानंतर एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल ती म्हणजे भलेही मोगलांचा प्रत्यक्ष पराभव हा महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज आणि पहिल्या बाजीरावांच्या कार्यकाळात झाला असला तरी औरंगजेबासहित मोगलांचे मोठ-मोठे सरदार आणि त्यांची बलाढ्य सेना यांचा मानसिक पराभव संताजींनी आधीच करून ठेवला होता.
काका विधाते यांनी बऱ्याच संशोधनातून आपल्याला माहीत नसलेलं संताजींचं आयुष्य या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे. संताजींचे बालपण, वैवाहिक आयुष्य, तरुणपणी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तालमीत तयार होत असताना त्यांनी गाजवलेले मोठमोठे पराक्रम, संभाजी महाराजांसोबत त्यांनी लढलेल्या लढाया, स्वराज्यासाठी त्यांनी केलेला त्याग, स्वराज्य स्वतंत्र झालं पाहिजे यासाठीची त्यांची तळमळ - धडपड, मोठ-मोठ्या दौडा मारून गनिमी काव्याने त्यांनी केलेल्या असंख्य लढाया आणि त्यामुळे मोगलांमध्ये बसलेली त्यांची जबरदस्त दहशत, स्वकीय सरदार आणि कारभाऱ्यांसोबतच स्वतःच्या राजाचीसुद्धा साथ नसताना त्यांनी मोगलांविरुद्ध खेळलेले डावपेच, संताजींनी बादशाहकडे येऊन हवं ते आणि हवं तेवढं वतन घेऊन मोगली मनसबदार व्हावं म्हणून मोगल त्यांच्यासाठी पायघड्या अंथरून बसलेले असताना स्वकीयच त्यांच्या जीवावर उठले होते तरीही शंभू राजांना दिलेल्या वचनाखातर शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहून अखेरपर्यंत बादशाही बुडवण्यासाठीच केलेले त्यांचे प्रयत्न, या सर्व प्रवासात मोजक्याच स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ लोकांची त्यांना मिळालेली साथ आणि शेवटी या स्वराज्याच्या वीर सेनापतीला डोंगरदाऱ्यांमधे लपत-छपत जगावं लागलेलं आयुष्य आणि तिथेच झालेला त्यांचा शेवट या सर्व गोष्टी आपल्याला या कादंबरीमधे अगदी विस्तृतपणे वाचायला मिळतील. सोबतच त्यावेळी दख्खनेत चालणारं मराठ्यांना अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचं राजकारण, त्याची पार्श्वभूमी या सर्वांचं तपशीलवार वर्णनसुद्धा आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल.
स्वराज्याच्या या सिंहाचा स्वकीयांकडूनच धोक्याने झालेला शेवट जरी मनाला चटका लावून जात असला तरी स्वराज्यनिष्ठा काय असते हे मोगलाईसोबतच अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिले. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावी अशी काका विधाते यांची कादंबरी "संताजी".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment