Monday, November 9, 2020

"बाजिंद"

 


लेखक : पै. गणेश मानुगडे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


गुप्तचर विभाग आणि गुप्तचर विभागाचं काम हे सामान्य लोकांसाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय असतो. आज २१ व्या शतकात प्रत्येक देशाचा स्वतंत्र असा गुप्तचर विभाग आहे आणि अहोरात्र त्यांचे काम अतिशय गुप्त पध्दतीने चालूच असते. आज इस्त्रायलची मोसाद किंवा अमेरिकेची CIA या गुप्तचरसंस्था अतिशय प्रगत आणि शक्तिशाली समजल्या जातात, त्यांच्या कारवाया किती गुप्त आणि धाडसी असतात याचे गोडवे नेहमीच गायले जातात. पण जगाच्या इतिहासात असंही एक हेरखाते होतं ज्याच्या कामाचे कौतुक आजही अगदी ३५० वर्षांनंतरही केलं जातं आणि ज्याची काम करण्याची पद्धत आजही एक अभ्यासाचा विषय आहे ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे हेरखाते. स्वराज्य उभारणीत जितका वाटा शिवरायांच्या आणि त्यांच्यासोबत मैदानात शत्रूसोबत लढणाऱ्या मावळ्यांच्या अफाट कर्तृत्वाचा होता तितकाच किंवा त्याहून थोडा जास्तच तो पडद्याआड राहून काम करणाऱ्या बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरखात्याचासुद्धा होता असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. गुप्तहेरखात्याचा प्रमुख जितका कुशल, बुद्धिमान तितकेच ते गुप्तहेरखाते जास्त प्रभावी.  शिवरायांच्या याच प्रभावी गुप्तहेरखात्याचे प्रमुख असणारे बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत असत यावरूनच आपण कल्पना करू शकतो बहिर्जी नाईकांबद्दल. कोणत्याही गुप्तहेर खात्याच्या कामाचे मूल्यमापन त्या कामाची गुप्तता आणि त्यानंतर मिळालेलं यश यावरून केलं जातं. आज आपण इतिहासात डोकावताना शिवरायांच्या सर्व मोहिमांत सहभागी असूनही बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत झालेल्या कारवायांबद्दल खूपच कमी माहिती किंवा पुरावे आपल्याला उपलब्ध दिसतील आणि त्यामध्येच त्यांच्या कार्याची महती किती मोठी आहे याचा अंदाज आपण लावू शकतो कारण कोणत्याही प्रकारची आधुनिक साधने नसताना ३००० पेक्षाही जास्त गुप्तहेरांचे जाळे भारतभर विणने आणि तेही कमालीची गुप्तता पाळून ही खरंच अचंबित करणारी गोष्ट आहे. स्वराज्यनिर्मितीपासून शिवरायांसोबत असणारे बहिर्जी नाईक पावलापावलावर गनिमांचा वावर असूनसुद्धा एकदा देखील शत्रूला सापडू शकले नाहीत, यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते. बरीच आधुनिक साधने असूनही जिथे आज माहितीची देवाणघेवाण करण्यात आपल्याकडून चूक होऊ शकते तिथे आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांनी त्याकाळी केलेलं कर्तृत्व किती अफाट आहे. शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या कारवायांमधील बहिर्जी नाईकांचा धावता उल्लेख सोडला तर त्यांच्याबद्दल फारच कमी लिहिलं गेलेलं आहे, त्यांपैकीच एक पै. गणेश मानुगडे यांनी लिहिलेली कादंबरी "बाजिंद".

"बाजिंद" ही रायगडाच्या पायथ्याशी टकमक टोकाखालच्या खोल दरीत, घनदाट जंगलात घडलेली, कल्पनेला इतिहासाची जोड देऊन लिहिलेली एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. टकमक टोकावरून दिली जाणारी कडेलोटाची शिक्षा आणि त्यानंतर पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाडीतील लोकांच्या आयुष्यावर होणारा त्याचा परिणाम यातून जन्म घेणारी ही रहस्यकथा. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन विश्वासू साथीदारांसोबत टकमक टोकावरून होणाऱ्या कडेलोटासंधर्भात एक फिर्याद घेऊन रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जायला निघतो. घनदाट जंगलातील प्रवासात वाटेत त्यांना नाट्यमयरीत्या सामोरा आलेला खंडोजी हा बहिर्जी नाईकांचा चेला रायगडावर प्रवेश मिळवून देऊन शिवरायांची भेट घालून देण्याचं वचन देऊन त्यांना सोबत घेऊन जायला निघतो आणि इथून सुरुवात होते या रहस्यमय कथेची. त्यानंतर यशवंत माचीचा इतिहास, यशवंत माची स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी बहिर्जी नाईकांनी उघडलेली एक धाडसी मोहीम, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के - कदंब यांचे वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, चंद्रगडची कथा शिवाय बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असणारी जंगलातील पशू-पक्षांची भाषा, ती गूढ भाषा अवगत करण्याचं रहस्य यासोबत इतरही अनेक थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांची वळणे घेत कादंबरी पुढे सरकत राहते. वाचकाला गुंतवून ठेऊन शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी जशी बहिर्जी नाईकांच्या अफाट बुद्धीचातुर्याची साक्ष देते तशीच ती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे सुराज्यही होतं हे पण आपल्याला दाखवून देते.

बहिर्जींनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या हजारो कारवायांचा विचार करता या एका पुस्तकामधून बहिर्जी नाईक समजून घेणे निव्वळ अशक्य आहे पण तरीही गणेश मानुगडेंनी आपल्यासमोर मांडलेल्या या एका घटनेतून बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरांची त्या काळी म्हणजेच ३५० वर्षांपूर्वीची काम करण्याची पद्धत कशी होती याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत, प्रखर राष्ट्रप्रेम या सर्वांतून साकार होणारी, बहिर्जी नाईकांच्या काम करण्याची पद्धत कशी होती हे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी पै. गणेश मानुगडे यांची ही कादंबरी "बाजिंद".




संदीप प्रकाश जाधव


एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल वाचल्यानंतर किंवा जाणून घेतल्यानंतर लगेचच त्या ठिकाणाला भेट देण्याचा आलेला अनुभव हा नेहमीच शब्दांत न सांगता येण्यासारखा असतो. "बाजिंद" या कादंबरी वाचनानंतर आज (०८/११/२०२०) असाच योग आला स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधी दर्शनाचा. समाधी दर्शनानंतर जितका अभिमान वाटला तितकंच वाईटही वाटलं या ठिकाणाकडे झालेलं दुर्लक्ष पाहून. स्वराज्य उभारणीत महाराजांसोबत अतिशय महत्त्वाची भुमिका पार पाडणारा हा वीर शिलेदार त्याचे कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या बुद्धीचातुर्याने नेहमीच दुश्मन लोकांच्या नजरेआड रहायचा पण स्वराज्य उभारणीत असणाऱ्या त्यांच्या अमुल्य योगदानानंतर त्यांना आज आपल्याच लोकांनी असे नजरेआड ठेवणं नक्कीच भूषणावह नाही. 







No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये