Monday, December 28, 2020

"लुचाई"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


नारायण धारप यांच्याबद्दल फार आधी कुठेतर वाचलं होतं की " नारायण धारप हे एक असं रसायन आहे की ज्यांचं एक पुस्तक वाचलं तर इतरही पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नाही, त्यांनी लिहिलेल्या भयकथा वाचनाचं व्यसनच लागून जाते." मीही सध्या अशाच काहीशा अनुभवातून जात आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांच्या "अघटित" आणि "चेटकीण" या दोन पुस्तकांनंतर "लुचाई" हे तिसरे पुस्तक  वाचून हातावेगळं केलं आणि लगेचच त्यांचं आणखी एखादं संग्रहित पुस्तक वाचण्याचा विचार मनात घोळूही लागला. आज बऱ्याच लेखकांचे अतिशय उत्कृष्ट असे गूढकथा संग्रह आणि कादंबऱ्या वाचायला उपलब्ध आहेत आणि मी त्यातील काही वाचले देखील आहेत पण ६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या नारायण धारप यांच्या लेखनाला आजही तोड नाही. माझ्यासारख्या आजच्या पिढीला जरी नारायण धारप हे नाव नवीन असले तरी आपल्या भयकथा - कादंबऱ्यांनी त्यांनी मराठी साहित्यविश्वाचा एक काळ गाजवला होता. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक. नारायण धारप यांची आजपर्यंत ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आणि त्यांपैकीच एक प्रचंड गाजलेली अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणारी, २७० पानांमध्ये भीतीचा अगदी जवळून अनुभव देणारी कादंबरी "लुचाई".

दुर्गापूर या गावात असणारा नाईकांचा वाडा आणि गोपाळ शंकर जावडेकर म्हणजेच जयदेव व्यास यांच्या भोवती फिरणारी या कादंबरीची कथा. भर उन्हात एक १२-१३ वर्षांचा मुलगा एका तरुणासोबत ओसाड पडलेल्या गावातील प्रत्येक घरात जाऊन ते घर पेटवून देऊन बाहेर पडत आहे आणि हे सर्व करत असताना कोणत्यातरी जबर अशा भीतीचा पगडासुद्धा त्यांच्या मनावर आहे, अशी एखाद्या भयपटाला शोभण्यासारखी या कादंबरीची सुरुवात. त्या पेटवलेल्या घरांचे वर्णन वाचता वाचता इथूनच एक कुतूहल मिश्रित भीती वाचकाला घेरायला चालू करते जी पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतरसुद्धा बराच वेळ अपल्यासोबत राहते. त्यानंतर मग फ्लॅशबॅकमधे जाऊन जयदेवचा दुर्गापूरमधला भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटना यांना जोडत चालू होतो या कादंबरीचा रहस्यमय, भीतीदायक असा प्रवास. १९४८ च्या जाळपोळीनंतर आपल्या आजोबांसोबत दुर्गापूर सोडून मुंबईला गेलेला जयदेव जवळपास २२ वर्षांनी पुन्हा दुर्गापूरमध्ये येतो आणि त्याचदरम्यान काही गूढ घटनांची मालिका गावात चालू होते. गावातील एकामागून एक लोकांचे रहस्यमयरीत्या आजारी पडणे आणि शेवटी एखाद्या रस शोषून घेतल्यानंतर दिसणाऱ्या फळासारखे शरीर होऊन मरून जाणे अशी रोज एखादी तरी घटना जयदेवच्या आसपास घडायला चालू होते. दिवसा सूर्यप्रकाशात हसत खेळत राहणारे गाव दररोज अंधार पडल्यानंतर हळूहळू एका वेगळ्या जगाच्या स्वाधीन होण्यास सुरुवात होते. रोज सायंकाळनंतर कोण ना कोण त्या "लुचाई" चा शिकार व्हायला लागतो. "लुचाई" म्हणजे लुचने, गळ्यामध्ये लुचून रक्त शोषून घेणारी म्हणजेच "लुचाई". अतिशय अप्रतिम आणि खिळवून ठेवणाऱ्या कथेतून नारायण धारप यांनी लुचाई एकदम जिवंत आपल्या डोळ्यासमोर आणली आहे जे वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. भितीने रक्त गोठून टाकणारा सैतानी नंगानाचच त्यांनी या कादंबरीतून आपल्यासमोर उभा केला आहे. नाईकांचा गूढ वाडा, शिंदेंचा पडका वाडा, गावातील बाग, स्मशानभूमी, गावाची वेस, एकनाथचं घर अशा एकामागून एक ठिकाणी प्रकट होणारी "लुचाई" आपल्या समोर पण येते की काय अशी नकळत एक भीती वाचकाला वाटावी इतकी भयानक पार्श्वभूमी धारप यांनी कथेला दिलेली आहे. जयदेव गावात आल्यानंतर सुरुवातीला १-२ लोकांना लुचणारी ती "लुचाई" हळूहळू संपूर्ण गावाला लुचते आणि मागे राहतात फक्त जयदेव, त्याचा मित्र डॉ. रामदास आणि १३ वर्षांचा गावातीलच एक मुलगा एकनाथ. या तिघांनी त्या अतिशय गूढ, रहस्यमय, भयानक घटनांचा लावलेला छडा आणि त्या वाईट शक्तीचा केलेला शेवट यांची थरारक कथा म्हणजेच ही कादंबरी "लुचाई". 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नक्कीच नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "लुचाई".





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, December 22, 2020

"साक्षी"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा, एक अतिशय लोकप्रिय कन्नड कादंबरीकार. सौ. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या त्यांच्या काही मराठी कादंबऱ्या अंचू, पर्व, अवेषण, आवरण, सार्थ, वंशवृक्ष या आणि बऱ्याच ज्या कन्नड इतक्याच मराठीमध्येसुद्धा खूप प्रसिद्धीस आल्या. त्यांच्या अशाच साहित्यांपैकी एक गाजलेलं आणि अतिशय उत्कृष्ट साहित्य म्हणजे त्यांची कादंबरी "साक्षी". "साक्षी" चा अर्थ खरं बोलणं, परंतु आज समाजात वावरत असताना एखाद्या साक्षीदाराकडून बोललं जाणारं खरं हे ते ज्या व्यक्तीसाठी बोललं जातं त्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा अशाच प्रकारचं असतं. अगदी देवाशपथ खरं बोलेन असं म्हणून दिल्या गेलेल्या "साक्षी" या बऱ्याच वेळा खोट्याच असतात. परंतु तत्वज्ञानानुसार बोलायचं झालं तर "साक्षी" म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ज्याचा संबंध मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाशी आहे तसेच शरीरात असणाऱ्या आपल्या मन, बुद्धी आणि आत्म्याशी आहे. जेव्हा "साक्षी" च्या त्या स्तरापर्यंत एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती खोटं बोलूच शकत नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या स्तरापर्यंत पोहचू शकत नसल्याने बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या अंतरात्म्याशी संघर्ष चालू होतो. हाच मानवी मनाचा संघर्ष आणि भाव-भावना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेलेली तत्वज्ञानावर आधारित अशी ही कादंबरी "साक्षी".

परमेश्वरय्या या अतिशय सज्जन, गांधीवादी, कधीही खोटं न बोलणारा अशी समाजात ओळख असणाऱ्या व्यक्तीभोवती फिरणारी ही कादंबरी. खुनाच्या आरोपाखाली ज्याच्यावर खटला चालू असतो असा त्यांचा जावई मंजय्या त्यांना खोटा साक्षीदार म्हणून न्यायालयात येऊन त्याच्या बाजूने साक्ष देण्यासाठी विनंती करतो. परमेश्वरय्यांची समाजात असणारी प्रतिमा, त्यांच्या शब्दाला असणारा मान आपल्याला न्यायालयात निर्दोष सिद्ध करण्यास पुरेसा आहे हे ओळखून मंजय्या त्यांना भावनिक पातळीवर कात्रीत पकडतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, आईविना वाढलेल्या मुलीवर असणारे प्रेम आणि आपली तत्वनिष्ठा, समाजात असणारी आपली प्रतिमा या सर्वांमुळे द्विधा मनःस्थितीत असणारे परमेश्वरय्या अखेर न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी तयार होतात. न्यायालयात उभे राहून देवाच्या साक्षीने खरे बोलायचे वचन देऊन ते खोटे बोलतात आणि त्यांच्या त्या एका "साक्षी" ने मंजय्याची खुनाच्या आरोपातून सुटका होते. परंतु आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिलेले परमेश्वरय्या या घटनेनंतर मनातून खचून जातात, आपण दिलेल्या खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या पश्चात्तापातून आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. यमसदनात चालू झालेल्या त्यांच्या निवाड्यापासून वेगळ्या वळणाने कादंबरीचा प्रवास चालू होतो जो बघता बघता वाचकाला घेरून टाकतो. यमसदनात यम आणि चित्रगुप्तापुढे उलगडत जाणारी परमेश्वरय्यांची कहाणी आपल्याला हेच सांगते की मनुष्याने आयुष्यात कितीही साक्षीभावाने राहण्याचा प्रयत्न केला तरीही काही प्रश्नांकडे इतक्या अलिप्तपणे पाहणं त्याला जमतंच असं नाही. धर्म, अर्थ आणि काम या तीन मार्गानी मोक्षापर्यंत नक्कीच जाता येईल परंतु यांपैकी एकाचाही जरी अतिरेक झाला तर व्यक्तिगत आयुष्यासोबतच कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यही ढवळून जाते हेच आपल्याला परमेश्वरय्यांची कथा वाचत असताना जाणवत राहते.

आपण आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे जाणून घेण्यासाठी पुढे यमधर्माच्या परवानगीने परमेश्वरय्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा भूतलावर पाठवण्यात येते आणि त्यांचा भोवताल "साक्षीभावाने" पाहण्यास सांगितलं जातं. पृथ्वीवर परत येऊन सत्याचा शोध घेत, जीवनाचं वास्तव पाहता पाहता शेवटी परमेश्वरय्याला पडणारा प्रश्न, "असत्याचं मूळ कोणतं? त्याला अंतच नाही का?" हा नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतो. मानवी भाव-भावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप मिळू शकते हे कादंबरी वाचत असताना जाणवत राहते. मानवी भाव-भावनांचा निरंतर संघर्ष दाखवणारी, यमलोक-यमधर्म-चित्रगुप्त यांच्यासमोर निवाड्यासाठी उभी राहिलेली ही कथा जितकी परमेश्वरय्या, नागप्पा आणि मंजय्याची आहे तितकीच ती या तिघांच्या सहवासात ग्रासलेल्या सावित्री, सत्यप्पा आणि रामकृष्ण यांचीही आहे. शेवटी नकळत ती वाचकाचीही होऊन जाते.

एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" ची कथा जरी चाकोरीबाहेरची असली तरी विषय नक्कीच वास्तवाकडे घेऊन जाणारा आहे. मानवी भाव-भावना आणि त्यांच्या निरंतर संघर्षाची जाणीव करून देणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, December 15, 2020

"झोंबी"

 


लेखक : आनंद यादव

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


एखाद्याची आत्मकथा म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यातून घडत गेलेलं त्याचं आयुष्य इतकी सरळ सोपी व्याख्या. बऱ्याच लोकांच्या प्रेरणादायी आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या, ज्या शक्यतो अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य आपल्यासमोर मांडत असतात. आनंद यादव यांची "झोंबी" वाचायला घेण्यापूर्वी  हिसुद्धा अशाच पठडीतील एक आत्मकथा असावी असा ग्रह मनात ठेवून वाचायला सुरुवात केली पण पु. ल. देशपांडेंची सुरुवातीची प्रस्तावना वाचल्यानंतरच लक्षात आले की आपण काहीतरी वेगळं, अतिशय उत्कृष्ट असं वाचायला हातात घेतलं आहे. सुरुवातीलाच पु. ल. देशपांडे म्हणतात की आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा, कारण ह्या कथनात इतक्या भयंकर परिस्थितीतलं बालपण दाखवलंय ज्याची की आपण कल्पनाही करु शकत नाही. अतिशय हट्टी आणि कामचुकार वडील, आपल्या अकरा मुलांचा जीवाच्या आकांताने सांभाळ करुन संसार सावरणारी आई आणि भीषण दारिद्र्य ह्याचं खूपच विदारक शब्दचित्र लेखकाने चितारलंय. आनंद यादव यांनी हे सगळं स्वत: भोगलं असल्यामुळे त्यातला निखार वाचकाच्या अंगावर येतो. झोंबीचा शब्दशः अर्थ म्हणजे लढाई! दोघांमध्ये झालेली लढाई म्हणजेच "झोंबी". आनंद यादव यांची ही आत्मकथा म्हणजे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई आहे. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी "झोंबी".

आनंद यादव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड पण ते ज्या समाजात रहायचे तिथे त्यांनी अशी आवड ठेवणं, स्वप्न बघणं म्हणजे जणू गुन्हाच. ज्या समाजात 'शाळा शिकणे' म्हणजे आपल्या कुळाला बट्टा लावणे असं मानलं जायचं त्या समाजात जन्माला येऊन आनंद यादव यांनी 'मॅट्रिक' पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं तेही घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना. त्यांचा हा मॅट्रिकपर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "झोंबी". आनंद यादव यांच्या या कादंबरीत त्यांनी फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथा, हालच आहेत असे नाही तर अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे जवळून होणारे दर्शनसुद्धा आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, गावाच्या आसपासचा निसर्ग, बापाचा आडमुठेपणा, आईचा होणारा अपरिमित छळ, लागोपाठ होणारी मुले, मुलांचे अपमृत्यू, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव, तर्‍हा,गावातले उरूस, जत्रा, महात्मा गांधी यांच्या वधानंतर झालेली स्थिती या आणि अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण आहे. आपण विचारसुद्धा करू शकणार नाही अशा अतिशय हालाखीच्या परिस्थितीतदेखील आनंद यादव यांच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. घरची परिस्थिती आणि वडिलांचा शाळेसाठी असणारा प्रखर विरोध यामुळे अर्धवट सोडावी लागणारी शाळा ते ज्या जिद्दीने मॅट्रिक पर्यंत पूर्ण करतात त्याला तोड नाही. त्या जिद्दीला आपल्या मेहनतीची जोड देऊन अगदी जीव जायची वेळ येईपर्यंत त्यांनी उपाशी पोटी वेगवेगळी कामे करून, वेळप्रसंगी चोरी करून आणि त्या आलेल्या पैशांत शाळेची पुस्तके विकत घेऊन, फी भरून, सोबतच आपल्या बरोबरीच्या मुलाची शिकवणी घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये फिरून नकलांचे कार्यक्रम करून ते मॅट्रिक पर्यंत शिकतात. मुलगा शाळेत गेला तर शेतातली सगळी कामं आपल्यावर पडणार शिवाय शाळेसाठी पैसे नाहीत त्यामुळे वडिलांचा नेहमीच असणारा विरोध आणि त्या विरोधापायीच त्यांनी वडीलांचा खाल्लेला बेदम मार हे सर्व कादंबरीत वाचत असताना नकळत वाचकालाही लेखकाच्या वडिलांचा राग येऊ लागतो. कादंबरीमध्ये प्रत्येक पानावर वाचकाला अस्वस्थ करणारे प्रसंग आहेत पण मला सर्वात जास्त अस्वस्थ करून गेला तो आनंद यादव यांच्या मोठ्या बहिणीचा, अनसाचा तिच्या बाळंतपणात झालेला मृत्यू. 

लेखकाच्या घरात अकरा भावंडं, तीही अगदी एका पाठोपाठ एक झालेली त्यामुळे १-२ सोडले तर बाकी सगळी रोगट आणि अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत त्यात भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे आणि वडिलांच्या कामचुकारपणामुळे शेतातील सर्व कामे लेखकालाच करावी लागत. शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाहीत. शेतातल्या कामामुळे नेहमीच शाळेत जायला होणारा उशीर आणि या सर्वामुळे शिक्षणाचे होणारे नुकसान! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एक-एक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्यांची परिस्थिती समजून त्यांना मदत केली तर काही वेळेला त्यांना मुद्दाम त्रासही दिला. मुळातच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे  वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्यांनी कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही ते शाळेत नेहमीच पहिला, दुसरा क्रमांक मिळवत राहिले. त्यांच्या शिक्षणाच्या वेडाला त्यांच्या वडीलांनी कधीच दाद दिली नाही पण शेवटी असह्य होऊन जेव्हा लेखक घर सोडून जातात तेव्हा त्यांच्या वडिलांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने वडिलांनी त्यांना एस.एस.सी. ची परिक्षा देण्याची परवानगी दिली आणि आनंद यादव यांनी त्या संधीचं सोनं केलं. "झोंबी" या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी एस.एस.सी. पर्यंतच केलेल्या संघर्षाचे चित्रण आहे. त्यामुळे कादंबरी वाचून झाल्यानंतर आनंद यादव यांचे पुढे काय झाले असेल? एस. एस. सी. नंतर त्यांनी पुढे काय केले असेल? एस. एस. सी. पास झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय असेल? त्यांच्या भावंडांचे पुढे काय झाले असेल? असे एक ना अनेक प्रश्न वाचकांना पडतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांच्या यापुढील नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या पुस्तकांमध्ये मिळतील.

आनंद यादव यांची ही आत्मकथा वाचकाला प्रचंड अस्वस्थ तर करतेच पण शिक्षणाच्या बाबतीत आपण किती नशिबवान आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे.






संदीप प्रकाश जाधव

Monday, December 7, 2020

"नदीष्ट"

 


लेखक : मनोज बोरगावकर

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मनोज बोरगावकरांच्या "नदीष्ट" या कादंबरीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि आज ती वाचायचा योग आला. कादंबरीचे नाव वाचून आणि मुखपृष्ठ पाहूनच आपण एक अंदाज बांधू शकतो की कादंबरीचा विषय हा नदीशी निगडीत असणार. नदीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली, अतिशय वेगळा आणि चाकोरीबाहेरचा विषय अगदी सहज, सुंदर भाषेत आपल्यासमोर घेऊन येणारी ही मनोज बोरगावकरांची कादंबरी. पूर्णपणे नदीच्या काठावर घडलेली, वेगवेगळ्या घटनांमधून, लोकांमधून उलगडत जाणारी "नदीष्ट" ही कादंबरी नदीची  विविध रूपे आणि नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदी यांचं आदिम नातं लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केलं आहे. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजेच "नदीष्ट".

सतत १० वर्षे, दररोज न चुकता नदीला पोहायला जाणारा या कादंबरीचा नायक. आणि नायकाच्या याच दैनंदिन आयुष्यात त्याला नदीवर आणि नदीच्या आसपासच्या परिसरात भेटणारे लोक, त्यामधून त्याला येणारे नवनवीन अनुभव शिवाय नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेण्याचा नायकाचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे नायकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पात्राला नाव आहे पण नायकाला नाव नाही. आज आपण बर्‍याचदा आत्मकेंद्री आयुष्य जगत असतो आणि आपल्या आजुबाजुला काय घडतंय याचंही आपल्याला कधी-कधी भान नसते. आसपासच्या लोकांशी आपल्याला काहीच देणे घेणे नसते. बऱ्याचदा हेच आत्मकेंद्री वागणं आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचा स्वभावच नाही तर जीवनशैलीच होऊन जाते. मात्र या कादंबरीचा नायक, आयुष्य जगत असताना नेहमीच एक माणूसपण सोबतीला ठेऊन राहतो त्यामुळे तो त्याला नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेतो. समाजाने ज्यांचे माणूसपण नाकारले अशा लोकांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची ही गोष्ट आहे. या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभैय्या, नदीवरील मंदिराचा पुजारी, बामनवाड, सगुणा, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रसाद, भिकाजी ही पात्रे भेटतात.  या सगळ्यांची प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे.  या सगळ्यांचं जगणं - त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा नायकाने प्रयत्न केला आहे. कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना ह्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात.  ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टीकोन आणि जगण्याचं भान देऊन, संवेदनशील बनवते. नायकाला नदी किनाऱ्यावर भेटलेले सगुणा हे तृतीयपंथी पात्र आणि भिकाजी हा भिकारी या दोघांचा संवेदनशील भूतकाळ नायकापुढे उलगडत जाताना मधेमधे मिळालेल्या इतर पात्रांच्या कथा आपल्याला बऱ्याच वेळा सुन्न करून जातात. सगुणाची कहाणी तर आपल्याला खूपच संवेदनशील बनवते. सगुणा ही  प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली एक तृतीयपंथी व्यक्ती. सुरुवातीला जेव्हा ट्रेनमध्ये सगुणा भेटते तेव्हा तिच्याकडे तुच्छ नजरेने बघणाऱ्या, सगुणापासून दूर पळणाऱ्या नायकाला जेव्हा सगुणाचा भूतकाळ समजतो तेव्हा नकळत त्याला ती आणि तिच्या समाजाबद्दल आदर वाटायला लागतो. सगुणा आपली भळभळणारी जखम नायकापुढे धरत आपला भूतकाळ त्याच्या पुढ्यात ठेवते. जो वाचत असताना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओलावतील. तृतीय पंथातील अनेक बारकावे लेखकाने अचूक टिपले आहेत. त्यांची जीवनशैली- भाषाशैली याचं अगदी यथार्थ दर्शन कादंबरीत होते. तृतीयपंथीयांचे  दैनंदिन शब्द लेखकाने कादंबरीत वापरले आहेत त्यामुळे लेखकाची संशोधन वृत्तीसुद्धा आपल्याला दिसून येते. या तृतीयपंथी लोकांविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याची उत्तरे आपल्याला या कादंबरीत नक्कीच मिळतात. तृतीयपंथीयामधील दीक्षा देण्याची प्रथा वाचताना तर अंगावर काटा येतो. तृतीयपंथीयांच्या व्यथा - वेदना यांचं दाहक आणि वास्तव चित्रण या कादंबरीत आहे.

सगुणाप्रमाणेच आणखीन एक संवेदनशील पात्र म्हणजे नायकाला रोज भेटणारा भिकारी "भिकाजी". भिकाजीच्या वागण्याबोलण्यातून तो जन्मजात भिकारी नाही हे लक्ष्यात आल्यानंतर नायकसोबतच वाचकालाही त्याच्या भूतकाळाबादद्दल कुतूहल निर्माण होते. कादंबरीतील भिकारी असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारून टाकतो, त्यामुळे कादंबरी वाचताना सुरुवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटत राहतो. त्याच्या हातून अनवधानाने झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला पंधरा वर्षाचा तुरुंगवास देखील होतो.  मात्र तो कायम स्वतःला अपराधी समजत राहतो. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याचं भिकारी बनून गावोगावी फिरणं मनाला चटका लावून जाते. बाळाच्या मृत्युनंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं दुःख, अबोलवृत्ती, त्याला झालेला मांजराचा फोबिया या गोष्टी त्याच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतात. नायकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव जेव्हा त्यांच्या आईच्या मरणाचा प्रसंग नायकाला सांगतात तेव्हा त्याच्यासोबतच आपणही भावूक होऊन जातो. तान्ह्या दादारावांनी मेलेल्या आईचे दूध पिण्याचा हा प्रसंग आपण वाचतो तेव्हा सुन्न व्हायला होतं. कादंबरीतील इतर पात्रे जसे नदीवर मासे पकडायला येणारा बामनवाड, त्याची नदीच्या व्हर्जिन जागेतील वाळूची कहाणी, मंदिराचा पुजारी, दररोज आपल्या म्हैशीना नदीवर घेऊन येणारे कालूभैय्या आणि त्याची प्रेयसी, पहाटे-पहाटे नदीवर अंघोळीसाठी येणारी भिकारीण सकिनाबी, नदीवर नायकाला अचानकच भेटलेला अगदी तरुण वयातला सर्पमित्र प्रसाद आणि त्याने तो लहान असताना पहिल्यांदाच नाग कसा पकडला याची सांगितलेली कहाणी  या सर्व गोष्टी आपल्यालाही नदी किनाऱ्यावर घेऊन जातात. कादंबरीत निसर्गातील अनेक सूक्ष्म बारकावे आले आहेत. माकडांच्या टोळी पासून ते मोरांच्या थव्यापर्यंत आणि आकाशाकडे एक डोळा करून नदीत पोहणाऱ्या माशांपासून ते खेकड्यापर्यंत सर्वच गोष्टींतील बारकावे लेखकाने अगदी अचूक टिपले आहेत. रोजच्या नदीवर येण्याने निसर्ग आणि निसर्गातील अनेक गोष्टी नायकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केलं. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असं कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येतं. शिवाय परिसरातील अनेक गोष्टींचे प्रचंड ताकतीने वर्णन केलं आहे, त्यामुळे ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब चित्र येतं, जणूकाही आपणच प्रत्यक्षच त्या घटनांचे साक्षीदार आहोत. 

वेगवेगळे लोक नदीकिनारी नायकाच्या आयुष्यात येत राहतात आणि ठराविक अंतराने आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण या छोट्याशा भेटीमध्ये स्वतःच्या भूतकाळातून नायकाला खूप काही शिकवून जातात, साध्या साध्या घटनांमधून जगण्याचं मोठं तत्वज्ञान शिकवून जातात. नायकाला भेटलेली सर्व पात्रे, नायकाने अनुभवलेले सर्व प्रसंग त्याच्याप्रमाणेच वाचकाच्या मनावरसुद्धा कोरली जातात.  कादंबरी वाचताना संपुच नये, असं वाटत राहतं. एक एक करून सर्व पात्रे निघून गेल्यानंतर शेवटी सगुणा जेव्हा निघून जाते तेव्हा कादंबरी संपली असं वाटतं पण नायक घाटाच्या पायऱ्या चढून वर येत असताना त्याला पायऱ्या उतरून नदीवर येणारा फकीर भेटतो आणि कादंबरीचा ओपन एंडेड शेवट होतो जो वाचकाला पुन्हा नव्याने जन्माला येणाऱ्या कथेचा विचार करायला भाग पाडतो.

चाकोरीबाहेरचा आणि वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा विषय अनुभवण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "नदीष्ट".





संदीप प्रकाश जाधव




"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये