Monday, March 1, 2021

"अंश"

 


लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस


रत्नाकर मतकरींचा आणखी एक दर्जेदार कथासंग्रह "अंश" वाचून झाला. यापूर्वी त्यांचं "अंतर्बाह्य" आणि "खेकडा" वाचलं होतं आणि तेव्हा जो अनुभव आला अगदी तसाच किंबहुना त्याहून थोडं जास्त शहारून आलं त्यांचा "अंश" हा कथासंग्रह वाचताना. गूढकथा हा रत्नाकर मतकरींच्या सर्वच पुस्तकांचा गाभा असला तरी त्यातील प्रत्येक कथेचा विषय वेगळा, त्यातून वाचकाला मिळणारे अनुभव वेगळे. "अंश" ची प्रत्येक कथा वाचत असताना सतत माझ्या डोक्यात एकच विचार येत होता की एखाद्या व्यक्तीची कल्पनाशक्ती इतकी अफाट कशी असू शकते? शेकडोंनी गूढकथा लिहून देखील प्रत्येक कथा मतकरींच्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. त्यांच्या "अंश" या कथासंग्रहातील १० कथा आणि १५४ पानांतून रत्नाकर मतकरी वाचकाला एका अतिशय गूढ विश्वात घेऊन जातात. मतकरींचा हा कथासंग्रह अगदी एका बैठकीत जरी वाचून पूर्ण होण्यासारखा असला तरी प्रत्येक कथेला थोडक्यात आणि तितक्याच ताकदीने दिला गेलेला गूढपणा वाचकाला अक्षरशः त्या कथेतील पात्रांसोबतच वावरत असल्याचा भास निर्माण करतो. कथांमधील काही काही प्रसंग तर वाचत असताना अंगावर काटा यावा इतकी भन्नाट वातावरण निर्मिती मतकरींनी त्यांच्या शब्दांतून केली आहे. खासकरून शेवटची कथा "आपुलीच प्रतीमा होते..." मधील मध्यरात्री बंद नाट्यगृहामधे कथेच्या नायकासोबत घडलेला प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. या कथेसोबतच इतर कथा "अंश", "वारं", "राजाराव राणीबाई", "ऋणको", "पांदेगा", "स्वप्न आणि मार्ग", "शेवटची कादंबरी", "पर्जन्य", "जन्म" या कथासुद्धा तितक्याच दर्जेदार आहेत. 

एखादा गूढकथाकार जेव्हा कथेची पेरणी करत असतो तेव्हा त्याचा उद्देश असतो तो मानवी जीवनातील आणि त्याच्याही पलीकडील सत्याचा शोध घेण्याचा. गूढकथा या कितीही अवास्तव वाटणाऱ्या असल्या तरी लेखकाचा प्रयत्न असतो वास्तवाच्या जवळ जाण्याचा आणि त्या वास्तवाचा व्यापक अर्थ लावण्याचा. जेणेकरून गूढकथा या फक्त गूढकथा न राहता त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या असाव्यात, त्यांनी वाचकाला विचार करायला भाग पाडावं की खरंच असं होऊ शकतं का? खरंच असं काही असू शकतं का? परंतु हे करत असताना गूढकथा या तेव्हाच पटण्यासारख्या किंवा परिपूर्ण वाटतात जेव्हा कथेतील पात्रे, घटना, वातावरण आणि आशय यांची योग्य भाषेत मांडणी केली जाते. रत्नाकर मतकरींचा प्रत्येक कथासंग्रह या कसोटीवर पुरेपूर उतरतो आणि "अंश" सुध्दा त्याला अपवाद नाही.

- पंचमहाभूतांमधील वायूचे झपाटून टाकणे…

- कलावंताचे आणि त्याच्या प्रतिमेचे नाते…

- केवळ बुद्धीने प्रगती साधू पाहणार्‍या मानवजातीचे भविष्य…

- कादंबरीकाराच्या वर्तमानात मिसळलेला त्याचा भूतकाळ…

- माणूस आणि निसर्ग यांचा मित्र-शत्रू संबंध…

- माणसामध्ये नकळत नांदणारा सनातनाचा अंश…

मानवी जीवनाला लपेटून राहिलेल्या या आणि अशा कितीतरी गहन गूढांवर, वाचकाला गुंगवून टाकणार्‍या कथानकांच्या द्वारे अत्यंत नेमकेपणाने, सहजसुंदर भाषेत लिहिलेल्या, वाचकाला समग्र जीवनाचाच पुन्हा एकदा खोलवर विचार करायला लावणाऱ्या अशा रत्नाकर मतकरींच्या "अंश" या कथासंग्रहातील कथा.



एक आवर्जून वाचण्यासारखा गूढकथासंग्रह "अंश".



2 comments:

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये