मराठ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाची विजयगाथा
लेखक : अजेय झणकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
१४ जानेवारी १७६१ ला झालेला पानिपतचा महासंग्राम कोणताच हिंदुस्थानी विसरू शकणार नाही कारण अब्दालीने केलेलं ते आक्रमण फक्त मराठा साम्राज्यावरचं नव्हतं तर अखंड हिंदुस्थानाचा घास घेण्यासाठी उचलेलं पाऊल होतं. धर्माच्या रक्षणाची चिथावणी देऊन अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आणला गेलेल्या पराक्रमी अब्दालीसमोर जेव्हा इतर हिंदुस्थानी साम्राज्ये लढायला धजत नव्हती तेव्हा देशहितासाठी मराठ्यांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले, मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या महासंग्रामात फुटल्या. पानिपतच्या या संग्रामात मराठ्यांनी दिलेला हा लढा एका धर्माविरुद्ध नव्हता तर तो देशहितासाठी होता आणि देशहितासाठी झालेला सर्वांत मोठा संग्राम म्हणून इतिहासात तो सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांनी या लढाईत केलेला पराक्रमच इतका मोठा होता की ही लढाई जिंकूनदेखील अब्दालीला रिकाम्या हातानेच अफगाणिस्तानला परत जावं लागलं तेही परत कधीच हिंदुस्थानावर आक्रमण न करण्याचा विचार मनात घेऊनच! पानिपतच्या या महासंग्रामानंतर अशीच एक लढाई महाराष्ट्राच्या मातीवर लढली गेली, जी इतिहासात "वडगावची लढाई" म्हणून ओळखली जाते. हिंदुस्थानच्या जवळपास दोन तृतीयांश भागावर पसरलेल्या मराठा साम्राज्यावर पानिपतानंतर तब्बल १८ वर्षांनी परकीय आक्रमण झालं. पहिलं मराठा-इंग्रज युद्ध म्हणून इतिहासात नोंदवल्या गेलेल्या, पुण्यापासून साधारण ४० किलोमीटरवर असणाऱ्या "वडगाव" या ठिकाणी झालेल्या या युद्धात मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा पानिपतपेक्षा नक्कीच कमी नव्हता. त्याचे कारण म्हणजे फिरंगी जरी सातासमुद्रापारहून आले असले तरी त्यांना जाऊन मिळालेल्या राघोबादादांसारख्या, अटकेपार झेंडा लावून पराक्रम गाजवणाऱ्या पेशव्यांनी गादीसाठी मराठी साम्राज्यासोबत केलेल्या "द्रोहाची" जखम घेऊन आपल्याच लोकांसोबत लढणे मानसिकदृष्टया खूपच आव्हानात्मक होतं. परंतु पानिपतच्या इतिहासापासून धडा घेऊन कारभाऱ्यांनी आखलेल्या योजना आणि त्यानंतर सैन्याने दाखवलेल्या अतुल्य पराक्रमाने "वडगाव" इथल्या लढाईत इंग्रजांचा मराठ्यांकडून दारूण पराभव झाला. याच "वडगावच्या लढाईला" केंद्रस्थानी ठेवून, इतिहासाला थोडीशी कल्पनेची जोड देऊन अजेय झणकर यांनी लिहिलेली कादंबरी, मराठ्यांची एक अभूतपूर्व विजयगाथा "द्रोहपर्व". जवळपास सात वर्षे अभ्यास व संशोधन करून लिहिल्या गेलेल्या "द्रोहपर्व" या ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरीमधे काही काल्पनिक पात्रं निर्माण करुन अजेय झणकर यांनी पुस्तकात एकप्रकारचा जिवंतपणा निर्माण केला आहे. "द्रोहपर्व" मधे अजेय झणकर यांनी पानिपतानंतरचा १७७३ ते १७७९ हा काळ रेखाटत असताना या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावादेखील घेतला आहे. शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून!! लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी!! गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं!! नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा!! रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर राघोबांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ!! निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया!! सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात!! संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र!! ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट!! या सर्व घटनांचा विस्तृत मागोवा घेणारी ही अजेय झणकर यांची ४९२ पानी कादंबरी "द्रोहपर्व".
"काका मला वाचवा" म्हणून राघोबादादांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्या नारायणराव पेशव्यांचा राघोबादादांच्या माणसांकडून शनिवार वाड्यात झालेल्या अमानुष खुनाने या कादंबरीची सुरुवात होते. कादंबरीची सुरुवातीची जवळपास १०० पाने "नारायणराव पेशव्यांचा खून" या घटनेशी संबंधित आहेत. या खुन-नाट्याला असणारी पार्श्वभूमी आपल्याला सुरुवातीच्या या १०० पानांमध्ये वाचायला मिळेल. ज्यामध्ये नानासाहेबांनंतर माधवराव पेशव्यांकडे आलेली पेशवाईची सूत्रे, त्यांची छोटीशीच पण यशस्वी कारकिर्द, त्यादरम्यानच राघोबादादांना खुणावणारी पेशवाईची गादी, त्यासाठी त्यांनी चालवलेल्या ना ना खटाटोपी, त्या करत असताना शरण आलेल्या निजामाशी परस्पर केलेल्या सलोख्यामुळे मधवरावांकडून त्यांना बदामी महालात दिला गेलेला बंदिवास, नंतर अचानकच माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर अवघ्या १७ वर्षें वयाच्या नारायणरावांकडे आलेलं पेशवेपद, पेशवाईच्या कारभारात नारायणरावांना मिळणारी नाना फडणीसांच्या मुत्सद्दीपणाची साथ, नाना फडणीसांचा दौलतीतील लोकांमध्ये असणारा दरारा, बंदिवासात राहूनही राघोबादादांचे गादी काबीज करण्यासाठी चालू असणारे अविरत प्रयत्न आणि शेवटी आनंदीबाईंनी केलेल्या "ध" चा "मा" मुळे ऐन गणेशोत्सवात शनिवार वाड्यात गारद्यांकडून नारायणारावांचा झालेला अमानुष खून या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व वाचकांसमोर सादर करत असताना लेखकांनी ऐतिहासिक संदर्भांना जी कल्पनेची जोड दिली आहे त्यामुळे हे खून-नाट्य अजूनच थरारक वाटते. नारायणारावांच्या खुनानंतर ही कादंबरी मराठे, इंग्रज आणि राघोबादादांमधे चाललेल्या राजकारणाचे विविध पैलू उलगडत वेग पकडते. नारायणारावांनंतर नानासाहेब पेशव्यांचा वंशच संपल्याने पेशवाई आपसूकच राघोबादादांकडे आल्यामुळे खुनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं. परंतु गंगाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि त्याने पेशवाईच्या राजगादीवर बसून राज्य सांभाळावे अशी इच्छा असणाऱ्या काही स्वराज्यनिष्ठ कारभारी आणि सरदार मंडळींनी गरोदर असणाऱ्या गंगाबाईंना सुरक्षेच्या कारणास्तव पुरंदरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले. तिथेच पुढे "सवाई माधवरावांचा" जन्म झाला. त्याचदरम्यान रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना भर दरबारात देहदंडाची शिक्षा सुनावली. नंतर याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेऊन आपला शिक्का बनवून घेतला आणि चवताळून पुरंदरावर हल्ल्याची योजना आखू लागले. गेल्या कित्येक वर्षांपासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी सोडायला ते तयार नव्हते. राजगादीसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी असणारे राघोबा दौलतीस कसे धोकादायक ठरू शकतात हे साताऱ्याच्या गादीस पटवून देण्यात नानांचा मुत्सद्दीपणा कामी येतो शिवाय पेशवाईच्या वारसाची रक्षा करण्यासोबतच दौलतीची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याची गरज ते महादजी शिंदे आणि होळकर यांसारख्या मतब्बर सरदारांना देखील पटवून देऊन आपल्या बाजूने वळवून घेतात. पुढे साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि नानांनी राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली. परंतु पेशवाईसाठी पेटून उठलेले राघोबादादा इंग्रजांच्या वळचणीला लागले आणि इथेच ठिणगी पडली पुढे येऊ घातलेल्या "मराठा-इंग्रज" या महासंग्रामाची!
इंग्रजांनी सुरुवातीला कितीही यासर्वांपासून अलिप्त राहायचा प्रयत्न केला तरी त्यांचीही इच्छा हिंदुस्थानावर राज्य करण्याचीच होती आणि त्यातील सर्वांत मोठा अडसर होता हिंदुस्थानभर पसरलेलं मराठा साम्राज्य. पेशवाईच्या निमित्ताने चालू झालेल्या या राजकारणामुळे राघोबादादा आयतेच इंग्रजांकडे मदतीसाठी चालून आले होते आणि हिंदुस्थानावर राज्य करण्याची संधीच जणू इंग्रजांना यामध्ये दिसू लागली. प्रदीर्घ चर्चा आणि छोटे-मोठे वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी शेवटी राघोबादादांना मदत करण्याचे आश्वासन दिले परंतु त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे राघोबांकडून कबूल करून घेतले. त्यानंतर आपल्या कवायती तुकड्या सज्ज करून इंग्रज मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. या सर्व गोष्टींची आधीपासूनच कल्पना असणाऱ्या मुत्सद्दी नानांनी अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले आणि मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे दिली. परंतु ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नव्हती कारण मराठ्यांच्या अफाट सैन्यासमोर इंग्रज संख्येने जरी कमी असले तरी त्यांच्याकडे असणारी आधुनिक हत्यारे युद्धाचे पारडे त्यांच्याबाजूने फिरवण्यास पुरेशी होती. असे असले तरी मराठ्यांनी थोरल्या महाराजांच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा असा काही प्रभावी वापर केला की फिरंगी फौजांनी खंडाळ्याचा घाट उतरल्यानंतर त्यांचे मुंबईला परतीचे मार्गच बंद झाले आणि शेवटी निर्णायक युद्धासाठी त्यांना मैदानात उतरावे लागले. कार्ल्याजवळच्या वडगाव येथे इंग्रजांना कोंडीत पकडून जो महासंग्राम झाला त्यात मराठ्यांनी विजय मिळवला. या "वडगावच्या लढाईत" इंग्रजांचा दारूण पराभव करून मराठ्यांनी आणखी एकदा हिंदुस्थानाला परकीय सत्तेच्या हाती जाण्यापासून थोपवले होते. योगायोगाने मकरसंक्रांतीच्याच दिवशी मिळवलेल्या या मोठ्या विजयाने १८ वर्षांपूर्वी पानिपतात झालेल्या जखमांवर जणू फुंकर घालायचेच काम केले. कादंबरीत अजेय झणकर यांच्या लेखणीतून साकारलेले प्रत्यक्ष युद्धाचे वर्णन वाचकांसमोर तो थरार उभा करण्यात कमालीचे यशस्वी झाले आहे.
"वडगावच्या लढाईत" जर इंग्रज जिंकले असते तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात गेला असता. इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो याचा प्रत्यय आणून देणारी आवर्जून वाचण्यासारखी ही ४९२ पानी ऐतिहासिक कादंबरी "द्रोहपर्व".
संदीप प्रकाश जाधव