Monday, April 26, 2021

"द्रोहपर्व"

 मराठ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाची विजयगाथा


लेखक : अजेय झणकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

१४ जानेवारी १७६१ ला झालेला पानिपतचा महासंग्राम कोणताच हिंदुस्थानी विसरू शकणार नाही कारण अब्दालीने केलेलं ते आक्रमण फक्त मराठा साम्राज्यावरचं नव्हतं तर अखंड हिंदुस्थानाचा घास घेण्यासाठी उचलेलं पाऊल होतं. धर्माच्या रक्षणाची चिथावणी देऊन अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आणला गेलेल्या पराक्रमी अब्दालीसमोर जेव्हा इतर हिंदुस्थानी साम्राज्ये लढायला धजत नव्हती तेव्हा देशहितासाठी मराठ्यांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे पानिपतात त्वेषाने लढले, मराठ्यांच्या तब्बल सव्वा लाख बांगड्या त्या महासंग्रामात फुटल्या. पानिपतच्या या संग्रामात मराठ्यांनी दिलेला हा लढा एका धर्माविरुद्ध नव्हता तर तो देशहितासाठी होता आणि देशहितासाठी झालेला सर्वांत मोठा संग्राम म्हणून इतिहासात तो सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांनी या लढाईत केलेला पराक्रमच इतका मोठा होता की ही लढाई जिंकूनदेखील अब्दालीला रिकाम्या हातानेच अफगाणिस्तानला परत जावं लागलं तेही परत कधीच हिंदुस्थानावर आक्रमण न करण्याचा विचार मनात घेऊनच! पानिपतच्या या महासंग्रामानंतर अशीच एक लढाई महाराष्ट्राच्या मातीवर लढली गेली, जी इतिहासात "वडगावची लढाई" म्हणून ओळखली जाते. हिंदुस्थानच्या जवळपास दोन तृतीयांश भागावर पसरलेल्या मराठा साम्राज्यावर पानिपतानंतर  तब्बल १८ वर्षांनी परकीय आक्रमण झालं. पहिलं मराठा-इंग्रज युद्ध म्हणून इतिहासात नोंदवल्या गेलेल्या, पुण्यापासून साधारण ४० किलोमीटरवर असणाऱ्या "वडगाव" या ठिकाणी झालेल्या या युद्धात मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा पानिपतपेक्षा नक्कीच कमी नव्हता. त्याचे कारण म्हणजे फिरंगी जरी सातासमुद्रापारहून आले असले तरी त्यांना जाऊन मिळालेल्या राघोबादादांसारख्या, अटकेपार झेंडा लावून पराक्रम गाजवणाऱ्या पेशव्यांनी गादीसाठी मराठी साम्राज्यासोबत केलेल्या "द्रोहाची" जखम घेऊन आपल्याच लोकांसोबत लढणे मानसिकदृष्टया खूपच आव्हानात्मक होतं. परंतु पानिपतच्या इतिहासापासून धडा घेऊन कारभाऱ्यांनी आखलेल्या योजना आणि त्यानंतर सैन्याने दाखवलेल्या अतुल्य पराक्रमाने "वडगाव" इथल्या लढाईत इंग्रजांचा मराठ्यांकडून दारूण पराभव झाला. याच "वडगावच्या लढाईला" केंद्रस्थानी ठेवून, इतिहासाला थोडीशी कल्पनेची जोड देऊन अजेय झणकर यांनी लिहिलेली कादंबरी, मराठ्यांची एक अभूतपूर्व विजयगाथा "द्रोहपर्व". जवळपास सात वर्षे अभ्यास व संशोधन करून लिहिल्या गेलेल्या "द्रोहपर्व" या ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरीमधे काही काल्पनिक पात्रं निर्माण करुन अजेय झणकर यांनी पुस्तकात एकप्रकारचा जिवंतपणा निर्माण केला आहे. "द्रोहपर्व" मधे अजेय झणकर यांनी पानिपतानंतरचा १७७३ ते १७७९ हा काळ रेखाटत असताना या काळात मराठा साम्राज्यात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावादेखील घेतला आहे. शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून!! लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी!! गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं!! नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा!! रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर राघोबांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ!! निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया!! सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात!! संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र!! ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट!! या सर्व घटनांचा विस्तृत मागोवा घेणारी ही अजेय झणकर यांची ४९२ पानी कादंबरी "द्रोहपर्व".

"काका मला वाचवा" म्हणून राघोबादादांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्या नारायणराव पेशव्यांचा राघोबादादांच्या माणसांकडून शनिवार वाड्यात झालेल्या अमानुष खुनाने या कादंबरीची सुरुवात होते. कादंबरीची सुरुवातीची जवळपास १०० पाने "नारायणराव पेशव्यांचा खून" या घटनेशी संबंधित आहेत. या खुन-नाट्याला असणारी पार्श्वभूमी आपल्याला सुरुवातीच्या या १०० पानांमध्ये वाचायला मिळेल. ज्यामध्ये नानासाहेबांनंतर माधवराव पेशव्यांकडे आलेली पेशवाईची सूत्रे, त्यांची छोटीशीच पण यशस्वी कारकिर्द, त्यादरम्यानच राघोबादादांना खुणावणारी पेशवाईची गादी, त्यासाठी त्यांनी चालवलेल्या ना ना खटाटोपी, त्या करत असताना शरण आलेल्या निजामाशी परस्पर केलेल्या सलोख्यामुळे मधवरावांकडून त्यांना बदामी महालात दिला गेलेला बंदिवास, नंतर अचानकच माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर अवघ्या १७ वर्षें वयाच्या नारायणरावांकडे आलेलं पेशवेपद, पेशवाईच्या कारभारात नारायणरावांना मिळणारी नाना फडणीसांच्या मुत्सद्दीपणाची साथ, नाना फडणीसांचा दौलतीतील लोकांमध्ये असणारा दरारा, बंदिवासात राहूनही राघोबादादांचे गादी काबीज करण्यासाठी चालू असणारे अविरत प्रयत्न आणि शेवटी आनंदीबाईंनी केलेल्या "ध" चा "मा" मुळे ऐन गणेशोत्सवात  शनिवार वाड्यात गारद्यांकडून नारायणारावांचा झालेला अमानुष खून या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. हे सर्व वाचकांसमोर सादर करत असताना लेखकांनी ऐतिहासिक संदर्भांना जी कल्पनेची जोड दिली आहे त्यामुळे हे खून-नाट्य अजूनच थरारक वाटते. नारायणारावांच्या खुनानंतर ही कादंबरी मराठे, इंग्रज आणि राघोबादादांमधे चाललेल्या राजकारणाचे विविध पैलू उलगडत वेग पकडते. नारायणारावांनंतर नानासाहेब पेशव्यांचा वंशच संपल्याने पेशवाई आपसूकच राघोबादादांकडे आल्यामुळे खुनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वत:च्या नावाची द्वाही पुण्यात फिरवली आणि साताऱ्याच्या छ्त्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मागवण्यासाठी पत्र पाठवलं. परंतु गंगाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि त्याने पेशवाईच्या राजगादीवर बसून राज्य सांभाळावे अशी इच्छा असणाऱ्या काही स्वराज्यनिष्ठ कारभारी आणि सरदार मंडळींनी गरोदर असणाऱ्या गंगाबाईंना सुरक्षेच्या कारणास्तव पुरंदरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले. तिथेच पुढे "सवाई माधवरावांचा" जन्म झाला. त्याचदरम्यान रामशास्त्री प्रभूण्यांनी नारायणरावांच्या खुनाची चौकशी सुरु केली आणि मुख्य आरोपी म्हणून श्रीमंत राघोबादादांच्या नावाची घोषणा करून, त्यांना भर दरबारात देहदंडाची शिक्षा सुनावली. नंतर याच दरबारात राघोबादादांनी पेशवाईची वस्त्रे घेऊन आपला शिक्का बनवून घेतला आणि चवताळून पुरंदरावर हल्ल्याची योजना आखू लागले. गेल्या कित्येक वर्षांपासून ही राजगादी मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा आता कुठे पूर्ण झाली होती आणि ती संधी अशी सहजासहजी सोडायला ते तयार नव्हते. राजगादीसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी असणारे राघोबा दौलतीस कसे धोकादायक ठरू शकतात हे साताऱ्याच्या गादीस पटवून देण्यात नानांचा मुत्सद्दीपणा कामी येतो शिवाय पेशवाईच्या वारसाची रक्षा करण्यासोबतच दौलतीची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याची गरज ते महादजी शिंदे आणि होळकर यांसारख्या मतब्बर सरदारांना देखील पटवून देऊन आपल्या बाजूने वळवून घेतात. पुढे साताऱ्याच्या छत्रपतींनी राघोबादादांची पेशवाई रद्द केली आणि नानांनी राघोबादादांची सर्व बाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली. परंतु पेशवाईसाठी पेटून उठलेले राघोबादादा इंग्रजांच्या वळचणीला लागले आणि इथेच ठिणगी पडली पुढे येऊ घातलेल्या "मराठा-इंग्रज" या महासंग्रामाची!

इंग्रजांनी सुरुवातीला कितीही यासर्वांपासून अलिप्त राहायचा प्रयत्न केला तरी त्यांचीही इच्छा हिंदुस्थानावर राज्य करण्याचीच होती आणि त्यातील सर्वांत मोठा अडसर होता हिंदुस्थानभर पसरलेलं मराठा साम्राज्य. पेशवाईच्या निमित्ताने चालू झालेल्या या राजकारणामुळे राघोबादादा आयतेच इंग्रजांकडे मदतीसाठी चालून आले होते आणि हिंदुस्थानावर राज्य करण्याची संधीच जणू इंग्रजांना यामध्ये दिसू लागली. प्रदीर्घ चर्चा आणि छोटे-मोठे वाद झाल्यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी शेवटी राघोबादादांना मदत करण्याचे आश्वासन दिले परंतु त्याबदल्यात इंग्रजांना किनारपट्टी परिसरात असलेले महत्त्वाचे किल्ले जसे वसई, साष्टी आणि युद्धाचा संपूर्ण खर्च देण्याचे राघोबांकडून कबूल करून घेतले. त्यानंतर आपल्या कवायती तुकड्या सज्ज करून इंग्रज मराठ्यांविरुद्ध लढायला तयार झाले. या सर्व गोष्टींची आधीपासूनच कल्पना असणाऱ्या मुत्सद्दी नानांनी अवघ्या मराठी सरदारांनी पुन्हा एकत्र येऊन इंग्रजांचा पाडाव करावा असे आवाहन केले आणि मोहिमेची सर्व सूत्रे पाटीलबाबा म्हणजे महादजी शिंद्यांकडे दिली. परंतु ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नव्हती कारण मराठ्यांच्या अफाट सैन्यासमोर इंग्रज संख्येने जरी कमी असले तरी त्यांच्याकडे असणारी आधुनिक हत्यारे युद्धाचे पारडे त्यांच्याबाजूने फिरवण्यास पुरेशी होती. असे असले तरी मराठ्यांनी थोरल्या महाराजांच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा असा काही प्रभावी वापर केला की फिरंगी फौजांनी खंडाळ्याचा घाट उतरल्यानंतर त्यांचे मुंबईला परतीचे मार्गच बंद झाले आणि शेवटी निर्णायक युद्धासाठी त्यांना मैदानात उतरावे लागले. कार्ल्याजवळच्या वडगाव येथे इंग्रजांना कोंडीत पकडून जो महासंग्राम झाला त्यात मराठ्यांनी विजय मिळवला. या "वडगावच्या लढाईत" इंग्रजांचा दारूण पराभव करून मराठ्यांनी आणखी एकदा हिंदुस्थानाला परकीय सत्तेच्या हाती जाण्यापासून थोपवले होते. योगायोगाने मकरसंक्रांतीच्याच दिवशी मिळवलेल्या या मोठ्या विजयाने १८ वर्षांपूर्वी पानिपतात झालेल्या जखमांवर जणू फुंकर घालायचेच काम केले. कादंबरीत अजेय झणकर यांच्या लेखणीतून साकारलेले प्रत्यक्ष युद्धाचे वर्णन वाचकांसमोर तो थरार उभा करण्यात कमालीचे यशस्वी झाले आहे.

"वडगावच्या लढाईत" जर इंग्रज जिंकले असते तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात गेला असता. इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो याचा प्रत्यय आणून देणारी आवर्जून वाचण्यासारखी ही ४९२ पानी ऐतिहासिक कादंबरी "द्रोहपर्व". 





संदीप प्रकाश जाधव





Monday, April 19, 2021

"इंधन"

 


लेखक : हमीद दलवाई

प्रकाशक : मौज प्रकाशन


हमीद दलवाई यांनी लिहिलेली एकमेव कादंबरी "इंधन". या आत्मचरित्रात्मक कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकून होतो, बऱ्याच लोकांनी ही आवर्जून वाचण्यासाठी सुचवली आणि अखेर ही उत्कृष्ठ कादंबरी संग्रही घेऊन वाचून काढली. अगदी छोटेखानी आणि एका बैठकीत वाचून पूर्ण होणाऱ्या या कादंबरीमध्ये ज्या विषयाला दलवाई यांनी लोकांसमोर मांडलं आहे ते खरंच शब्दांत वर्णन न करता येण्यासारखं आहे. १९६५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही वाचकाच्या मनावर तितकाच प्रभाव पाडत आहे, एका गावातील विविध घटनांचा आणि त्यांच्या आपापसातील नात्यांचा वेध घेणारी ही कादंबरी. कादंबरीमध्ये शेवटपर्यंत ज्याच्या नावाचा उल्लेखच नाही झाला असा हा कादंबरीचा नायक जेव्हा १५ वर्षांनी गावात परत येतो तेव्हा त्याच्या निवेदनातून उलगडत जाणारी या कादंबरीची कथा. स्वातंत्र्याच्या दोन दशकानंतरच्या वातावरणात घडलेली या कादंबरीची कथा आज वर्तमान काळातील वातावरणाला देखील तितकीच लागू होते. देशाच्या फाळणीमुळे झालेली जखम मनात ठेवून स्वतःचे अस्तित्व शोधणारा मागासलेला समाज आणि त्याच वेळी खोती-जमिनदारी यांसारख्या सरंजामी प्रवृत्तींना बसत जाणारा चाप या काळामधे घडणारी ही कथा. आपल्या तत्त्वापेक्षाही अहंकाराला जपण्याचा आणि स्वत:चंच खरं करण्याच्या सामूहिक अट्टहासाचा एकत्रित परिपाक म्हणजे ही कादंबरी. तसं पाहिलं तर भडका उडण्यासाठी वाऱ्याचा एक झोतदेखील पुरेसा असतो पण त्या परिस्थितीत जर त्यामध्ये इंधन ओतले गेल्यानंतरचा वणवा ज्या पद्धतीने पेटू शकतो तसाच गावातल्या काही छोट्या छोट्या घटनांमुळे संपूर्ण गाव कसं गढळून निघते, त्याचे चित्रण म्हणजे ही कादंबरी "इंधन". स्वतःच्याच समाजातल्या वाईट प्रवृत्ती आणि चालीरितींच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा या कादंबरीचा नायक! धर्म या संकल्पनेवरच विश्वास नसणारा, कधीही नमाज न पडणारा, अतिशय विवेकवादी असला तरी चांगले-वाईट, उच्च-नीच या गोष्टींची जाणीव ठेवून आपली वैयक्तिक मूल्ये जपणारा आणि ती कधीही इतरांवर न थोपवता समाजपरिवर्तनासाठी प्रयत्न करणारा नायक! गांधी टोपी मुस्लिमांसाठी निषिद्ध असताना ती टोपी घालून राष्ट्रसेवादलात सामील होऊन समाजकारणात स्वतःला झोकून देणारा नायक! याच समाजकारणातून पुढे कुणबी आणि मुस्लिम खोतांमध्ये असणाऱ्या जमिनीच्या वादात त्याने मुस्लिमांच्या विरोधात कुणब्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे घरातील लोकांसोबतच गावातील इतर मुसलमान त्याच्यासोबत अंतर राखून रहायला चालू करतात. नायकामधला प्रखर विवेकीवाद गावामधे कुणालाच आवडत नसल्याने शेवटी गाव सोडून मुंबईला जाऊन राजकारण-समाजकारणात नाव कमावणारा नायक तब्बल १५ वर्षांनी जेव्हा गावात परत येतो त्यानंतर उलगडत जाणारी ही कादंबरी "इंधन".

मुंबईमध्ये राजकारण आणि समाजकारणासोबत समाज प्रबोधनाचे काम करत असणारा नायक हर्ट-अटॅकच्या दुखण्यातून सावरून गावी विश्रांतीसाठी येतो. गावात पाऊल ठेवल्यानंतर त्याला होणारी पहिली जाणीव म्हणजे त्याच्याबद्दल असणारा तिरस्कार लोकांच्या मनातून कमी झाल्याची. १५ वर्षांनी परिस्थिती बरीच बदलेली त्याला जाणवते, आता गावातील लोकांना आपल्या गावच्या या नेत्याचे कौतुक आहे हेसुद्धा त्याच्या लक्षात येते. १५ वर्षांनंतर आलेला नायक मात्र शक्य तितके तटस्थ राहून गावातल्या नात्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गावामधील मुस्लिम, ब्राह्मण, परीट, न्हावी, वाणी, कुळवाडी, कुणबी आणि पूर्वीचे महार पण आता बौद्ध झालेले दलित अशा अनेक समाजघटकांमधे या १५ वर्षांत झालेले बदल तसेच काही ठिकाणी अजिबातच न झालेले बदल नायक टिपत जातो. गावातील सगळेच लोक रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकांवर अवलंबून असले तरी सर्वांच्या मनामधे एकमेकांबद्दल असणारी सूक्ष्म अढी लेखकाला खटकते. असे असूनदेखील गावामध्ये “भानगडी” करणाऱ्या लोकांची काहीच कमी नाही याचे नायकाला आश्चर्य वाटते. अशा अनेक "भानगडींमध्ये" खुद्द नायकाच्या भावाची एका ब्राह्मण विद्यार्थिनीसोबत असणारी "भानगड" नायकाला धक्का देऊन जाते. गावात घडणाऱ्या अशा गोष्टी गावाला नवीन नसल्याने गावातील सलोखा कधीच बिघडला नव्हता, एकमेकांबद्दल असणारी अढी मनातच धुमसत राही पण कधी त्याचा गावातील वातावरणावर परिणाम नाही झाला. परंतु गावामधे नवीन घर बांधणारा इसाक त्याच्या बांधकामावर मजुरी करणार्‍या बौद्धाच्या लक्षुमीला घरी ठेवून घेतो आणि इथे ठिणगी पडते पुढे येऊ घातलेल्या वणव्याची. आताच्या बदललेल्या काळात एका मुसलमान खोताने राजरोसपणे एका विवाहित स्त्रीला आपल्या घरात ठेवून घेणं बौद्धांना रूचत नाही. आपल्या स्वतंत्र अस्तित्त्वाची, आपल्या स्त्रियांच्या अब्रू इज्जतीची त्यांना झालेली जाणीव गावात एक वेगळाच संघर्ष उभा करते. या संघर्षामधे दोन्ही बाजूंचं कधीही भरून न निघणारं नुकसान होणार हे सर्वांना समजत असलं तरीदेखील तो संघर्ष वाढतच जातो कारण ही लढाई असते स्वत:च्या धर्माभिमानाची, जातीच्या अभिमानाची! शिमग्याला निघणाऱ्या पालखीच्या मिरवणुकीत हा संघर्ष अत्यंत रौद्र आणि भेसूर रूप धारण करतो जो नायकसोबतच वाचकालादेखील विचारात पाडतो. त्या धक्कादायक घटनेनंतर नायक गाव सोडून परत मुंबईला निघून जातो, पण तरीही गावामधे घटनांची साखळी पुढे चालूच राहते. नायक गावामधून बाहेर पडल्यानंतर वर्तमानात चालू असणारं या कथेचं निवेदन भविष्यकाळात चालू होतं. इथून पुढच्या भविष्यकाळातील घटना म्हणजे “हे असंच घडेल” अशी नायकाच्या मनाची धारणा आहे की नायकाच्या आजपर्यंतच्या अनुभवावरून “हे असं घडायला हवं” हा त्याचा स्वप्नविलास या विचारत वाचकाला सोडून देऊन कथेचा शेवट होतो.

जितकं लोकांकडून ऐकलं होतं त्या सर्व अपेक्षांना खरं उतरणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "इंधन".


संदीप प्रकाश जाधव

Monday, April 12, 2021

"अंधारवारी"

 


लेखक : हृषिकेश गुप्ते

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन


एक काळ असा होता की गूढकथा किंवा रहस्यकथा वाचाव्यात तर रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांच्याच. इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कथांना आजही तोड नाही. गूढकथा आणि रहस्यकथांची आवड असल्याने रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांची बरीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या या कथा वाचत असताना आजही अंगावर शहारे आणतात. पण आजच्या घडीला मोजकेच काही लेखक वाचकांची अशा साहित्याची आवड पूर्ण करत आहेत. अशा कथा लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी आवर्जून घ्यावे असं एक नाव म्हणजे हृषिकेश गुप्ते! भयकथा - गूढकथा लिहिताना त्या कथांना कधीच वास्तवाचा आधार नसतो, त्या नेहमीच कल्पनेवर आधारित असतात आणि हृषिकेश गुप्ते यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती. पण कल्पनाशक्तीतून साकारलेल्या कथा या तेव्हाच परिणामकारक होतात जेव्हा त्यांची उत्कृष्ट मांडणी केली जाते. हृषिकेश गुप्ते यांनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आणि कथा परिणामकारक असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या कथांची केलेली मांडणी, जी वाचकाला त्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतात. हृषिकेश गुप्ते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशाच ६ वेगवेगळ्या दर्जेदार भयकथांचा संग्रह "अंधारवारी". "अंधारवारी" पुस्तकातील प्रत्येक कथा जणू लेखकाच्या जबरदस्त कल्पनाशक्तीची साक्षच देते. प्रेम, दु:खं, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावनांमध्ये थोडीशी "भीती" मिसळली गेली की या भावनांचा बाजच कसा बदलून जातो याची प्रचिती पुस्तकातील प्रत्येक कथेत येते. "अंधारवारी" मधील सर्व कथांमधील कथानके जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक कथेचे सूत्र एकच आहे आणि ते म्हणजे कथा वाचताना वाचकाचे डोळे विस्फारत जाऊन त्याला अखेपर्यंत खिळवून ठेवणे, कथेमध्ये पूर्णपणे गुंतवून ठेवणे. एखाद्या भयपटाला साजेल अशी वातावरण निर्मिती आणि जबर अशा धक्क्यातून प्रत्येक कथेचा शेवट हे आणखी एक वैशिष्ट्य. ’काळ्याकपारी’, ’गानूआजींची अंगाई’, 'बांदेकरांचं बाळ’, ’ती गेली तेव्हा’, ’वॉचमन’ आणि ’गोष्ट अजून संपली नाही’ अशा सहा दर्जेदार भयकथांचा संग्रह म्हणजेच हे हृषिकेश गुप्ते यांचे १६० पानी पुस्तक "अंधारवारी".

भीती ही मानवी मनाचा एक अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंदेखील कधीकधी तितकंच आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी आणि साहसाशी असतो. गूढ आणि रहस्यमय असं काही अनुभवणं ही खरे तर मानवी मनाची गरजच असते. आणि हीच वाचकांची गरज "अंधारवारी" मधील प्रत्येक कथा पूर्ण करते. ’काळ्याकपारी’ ही पहिली कथा विराज नाडगौडा या मानसोपचारतज्ञाने केलेल्या आत्महत्येतून जन्म घेते. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून फ्लॅशबॅकमधे ही कथा उलगडत जाते. आपल्याकडे उपचारासाठी आलेला मानसिक रोगी "ज्ञ" याला काळोखदरी नावाच्या ठिकाणी आलेले काही विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवानंतर त्याला जडलेल्या काही विचित्र सवयी याभोवती फिरणारी ही कथा पण सोबतच लेखक मानवी मनोव्यापारांच्या अनेक गुंतावळी सोडवण्याचा प्रयत्न या कथेत करतात. "ज्ञ" सोबत घडणाऱ्या विचित्र गोष्टी समजून घेत असताना अचानकच "ज्ञ" ने केलेली आत्महत्या आणि त्यानंतर "ज्ञ" सोबत घडणाऱ्या त्याच विचित्र गोष्टींची विराजच्या आयुष्यात झालेली सुरुवात, पुढे त्याचाही आत्महत्येतून झालेला शेवट या सर्वांच्यामधे घडणारी ही रोमांचक भयकथा. कथा जितकी रोमांचक तितकाच तिचा शेवटसुद्धा धक्कादायक. पुस्तकातील ६ कथांमधील सर्वांत भीतीदायक कथा जर कोणती असेल तर ती 'गानूआजींची अंगाई'. "तुंबाड" मधील बांधून घातलेली ती "आजी" आणि "हस्तर" ची आठवण करून देणारी अशी ही कथा. कोकणातील सरपणी या छोट्याशा गावातील गानूवाड्यात घडणाऱ्या या कथेत काही काही प्रसंगांत लेखकांनी जी वातावरण निर्मिती केली आहे त्याने वाचताना अक्षरशः अंगावर शहारे येतात. लहान-लहान गोष्टींचे इतके जबरदस्त वर्णन लेखकाने केलं आहे की वाचकाला आपण स्वतः गानूवाड्यात असल्याचाच भास व्हावा. नाट्यमय वर्णनांसह कथानकाचा आलेख अधिकाधिक उंचावत जातो आणि शेवटी एक वेगळाच धक्का देत तो थांबतो. 'वॉचमन’ ची कथा फिरते एका लेखकाभोवती. बेकारीतून आलेल्या वैफल्यामधून 'वॉचमन' या कथेच्या नायकाची झालेली मानसिक अवस्था आणि या वैफल्याचा क्रौर्यात झालेला स्फोट वाचकाला अक्षरश: हादरवून सोडतो. 'वॉचमन’ नावाच्या बागुलबुवाने लेखकाच्या मन-मेंदूचा घेतलेला ताबा, त्यातून घडलेली ही कथा आणि मनाला चटका लावून जाणारा कथेचा शेवट. बाळंतपणामध्ये आपल्या पत्नी आणि बाळाचा झालेल्या मृत्यूनंतर जन्म घेणारी कथा 'बांदेकरांचं बाळ’, कथेचा नायक आयुष्यातील दु:ख सहन न होऊन स्वप्नरंजनाकडे वळतो आणि त्यानंतर घडणाऱ्या कथेचा शेवट वाचकाला नकळत गहिवरून यायला भाग पाडतो. 'ती गेली तेव्हा’, स्वतःला कामाच्या व्यापात झोकून दिल्याने पत्नीला न देता आलेला वेळ आणि त्या एकटेपणात पत्नीचे भीतीदायक वागणे यांतून पुढे सरकणारी, पत्नीच्या जाण्याने आयुष्यात निर्माण होणारी पोकळी आणि त्याच पश्चात्तापातून घडलेली ही कथा. सुरुवातीपासून शेवटापर्यंत एखाद्या प्रेमकथेसारखी ही कथा पुढे सरकत राहते पण भयकथा म्हणून असलेली आपली पकड कुठेही ढिली होऊ देत नाही. शेवटची कथा ’गोष्ट अजून संपली नाही’ ही नावाला साजेशी अशीच आहे. एक वाचक म्हणून आपल्या अपेक्षा वाढवणारी ही कथा अचानकच संपते आणि हे भान कदाचित लेखकालाही असल्यामुळे ते शेवटी म्हणतात, 'गोष्ट अजून संपली नाही'. चार मुलांचा एका अंधाऱ्या गुहेतील प्रवास, त्यातून एका मुलाची झालेली हत्या आपल्या अंगावर शहारे तर आणतेच पण त्या हत्येचे वर्णन किळसही निर्माण करते. या हत्येचा बदला म्हणून पुढे गावातील एका स्त्रीवर झालेला बलात्कार आणि तिला पेटत्या होळीत टाकून जाळणं या क्रौर्याच्या परिसीमा गाठणाऱ्या घटना वाचकाच्या मनात चीड निर्माण करतात. गुहेतील मुलाच्या हत्येचे कारण सांगणाऱ्या जाधव नावाच्या मुलाकडून  आपल्या आईला जिवंत जाळलेल्या गावाचा सूड घेण्याच्या केलेल्या वाक्याने कथा संपते आणि संपूनही पुढे चालूच राहते, लेखकाने सांगितल्याप्रमाणे! 'गोष्ट अजून संपली नाही'.

हृषिकेश गुप्ते यांच्या काही कथांवर सध्या होत असलेला वाङ्मयचोरीचा आरोप एक वाचक म्हणून मला निरर्थक वाटतो कारण जरी त्यांच्या एक-दोन कथा या परकीय कथाकल्पनांचा आधार घेऊन किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिल्या गेल्या असल्या तरी त्या कथा त्यांनी त्यांच्या खास शैलीत ज्याप्रकारे वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे अशा कथांचा वाचकवर्ग वाढण्यास एकप्रकारे मदतच झाली आहे. भीतीची जाणीव करून द्यायला हिंसा किंवा ओंगळवाण्या घटनांची आवश्यकता नसते, हे या कथासंग्रहातून हृषिकेश गुप्ते यांनी दाखवून दिले आहे. प्रेम, दु:ख, मत्सर, क्रौर्य या मानवी भावभावनांच्या जोडीनं येणारं गूढत्व आणि भीती "अंधारवारी" मधील कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.





संदीप प्रकाश जाधव




Monday, April 5, 2021

"इन्शाअल्लाह"

धर्म आणि रूढी-परंपरा यांचा नव्याने विचार करायला लावणारी कादंबरी


लेखक : अभिराम भडकमकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांची अतिशय वेगळ्या विषयावरची कादंबरी "इन्शाअल्लाह" वाचून पूर्ण झाली. भारतासारख्या देशात आजसुद्धा कोणताही धर्म आणि त्या धर्माच्या रूढी-परंपरांबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना हजार वेळा विचार करून बोलावं लागतं, खासकरून जर तो विषय हिंदू-मुस्लीम धर्मातील एखाद्या गोष्टीचा असेल तर बोलताना अधिकच काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या "इन्शाअल्लाह" या कादंबरीतून मुस्लिम धर्मातील जाचक रूढी-परंपरांना केंद्रस्थानी ठेवून जे विचार मांडले आहेत ते जितके धाडसाचे तितकेच कौतुकास्पद आहेत. आणि त्याहून अधिक एक समाज म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहेत. धर्म आणि रूढी-परंपरा यामधे असणारा फरक ओळखून त्याप्रमाणे वागणे जितके महत्वाचे असते तितकेच किंबहुना त्याहून जास्त आपल्या रूढी-परंपरांमधे कालानुरूप बदल करणेसुद्धा महत्वाचे असते. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी-परंपरा म्हणजेच आपला धर्म असं समजून आजचा मुस्लिम समाज ज्या जाचक रूढी-परंपरांना कवटाळून बसला आहे त्यामुळे त्यांच्या आजच्या तसेच भावी पिढ्यांचेसुद्धा कधीही न भरून निघणारे असे नुकसान होत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मुस्लिम व्यक्तीला आज एकाच नजरेने पाहिले जाते भले ती व्यक्ती कितीही उच्चशिक्षित असो, असं का? याचं एकच उत्तर देता येईल ते म्हणजे बदलत्या जगासोबत न बदललेल्या रूढी-परंपरा आणि जगासमोर केलेलं त्यांचं प्रदर्शन. या एकाच गोष्टीमुळे मुस्लिम समाजाची धर्मांध अशी एक छबी सामान्य माणसाच्या मनात जगभर तयार झाली आणि ती जर सुधारायची असेल तर मुस्लिम समाजाने या जाचक रूढी-परंपरा झुगारून स्वतःमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे, धर्माला रूढी-परंपरांपासून वेगळं करण्याची गरज आहे, हेच सांगायचा प्रयत्न भडकमकर यांनी त्यांच्या या ३२१ पानी कादंबरी "इन्शाअल्लाह" मधून केला आहे. सध्याच्या घडीला मुस्लिमांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बदलांचा फक्त विचारच केलेला बरा अशी परिस्थिती असताना अभिराम भडकमकरांचे लोकांपर्यंत पोहचलेलं हे साहित्य म्हणूनच त्याच्या वेगळेपणाची साक्ष देते. "इन्शाअल्लाह" मधे घडणारी कथा ही कोल्हापूर शरहातील रहिमनगर या मुस्लिम मोहल्ल्याभोवती फिरते त्यामुळे साहजिकच कादंबरीतले सर्व संवाद कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि आसपासच्या भागात बोलल्या जाणाऱ्या बागवानी हिंदीत आहेत जे वाचनाचा एक वेगळाच आनंद देऊन जातात. दारिद्र्यात पिचत असलेली रहिमनगरची मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव, अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी अचानक रहिमनगर मोहल्ला ढवळून निघतो, मोहल्ल्यातील काही मुलांची पोलिसांकडून धरपकड होते. आरोप असतो कोल्हापूर रेल्वेस्थानक स्फोटाने उडवून देण्याच्या कटात सहभाग असल्याचा. त्याच दरम्यान मोहल्ल्यातीलच एक तरुण जुनैद अचानक नाहीसा होतो. कॉलेजमध्ये शिकणारा साधा सरळ मुलगा अशी मोहल्ल्यात ओळख असणारा, अभ्यासू आणि कविताप्रेमी जुनैद घरी येतच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नसतो. या एका घटनेनंतर शहरातलं बदललेलं वातावरण, हिंदू-मुस्लीम राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला या घटनेचा वापर, शिवाय मोहल्ल्यातील इतर लोकांच्या जीवनावर त्या घटनेचा झालेला परिणाम, फतेह सारख्या ग्रुपच्या माध्यमातून मुस्लिम लोकांच्या विचारात बदल करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, त्या प्रयत्नांना मिळणाऱ्या चांगल्या वाईट प्रतिसादातून घडणारे छोटे-छोटे प्रसंग या सर्वांतून पुढे सरकणारी ही कादंबरी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वाचत असताना जणू काही एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डोळ्यासमोर चालू असावी इतक्या ताकदीने अभिराम भडकमकरांनी "इन्शाअल्लाह" वाचकांसमोर सादर केलीय.

"इन्शाअल्लाह" मधील कथानकाची सुरुवातच मुळी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. नजमाच्या लग्नासाठी तिच्या घरी असणाऱ्या आनंदी वातावरणात, लग्नकार्यासाठी एकत्र आलेल्या आणि लग्नाच्या धावपळीत असणाऱ्या साऱ्या मोहल्ल्याला पुसटशी कल्पनाही नसते की काही तासांतच त्यांच्या पुढ्यात किती मोठं अरिष्ट येऊ घातलंय. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मोहल्ल्यावर वादळासारख्या येऊन धडकणाऱ्या एका बातमीने ही कथा पुढे वेग पकडते. "कोल्हापूरचे रेल्वेस्थानक उडवून देण्याचा दहशतवादी कट पोलिसांनी उधळला" या बातमीमुळे रहिमनगर मोहल्ल्यासोबतच संपूर्ण कोल्हापूर शहर हादरून जाते. कटात सहभागी असण्याच्या आरोपावरून मग रहिमनगर मोहल्ल्यातील काही मुलांना पोलिस अटक करून घेऊन जातात आणि नेमके त्याच दरम्यान जुनैद नावाचा एक सुशिक्षित तरुणदेखील अचानक गायब होतो. पोलिसांनी पकडून घेऊन गेलेल्या मुलांमधेही तो नसल्याने आणि घरीदेखील परत न आल्याने त्याच्या भोवती संशयाचे ढग तयार होऊ लागतात. परंतु नोकरी करत आपले शिक्षण पूर्ण करणारा, नवऱ्याने टाकलेल्या आपल्या आईला घर चालवण्यात हातभार लावणारा, साधा सरळ मुलगा अशी मोहल्ल्यात ओळख असणारा, अभ्यासू आणि कविताप्रेमी जुनैद असं कृत्य करूच शकत नाही असं म्हणणारी त्याची आई जमिला त्याच्या शोधासाठी धडपड करायला चालू करते. मग सुरू झालेला हा जुनैदचा शोध समाजातील एक एक घटकांना स्पर्श करत पुढं सरकू लागतो. जुनैदच्या शोधा भोवती फिरणारं हे कथानक अनेक धार्मिक गोष्टींना, चर्चांना, माणसांना, राजकारणाला स्पर्श करत आपल्या समोर उलगडत जातं. इथून पुढे ज्या वैचारिक द्वंद्वासोबत कादंबरीचा प्रवास सुरु होतो तो वाचकाला सोबत घेऊनच पुढे सरकतो. वाचक अक्षरशः कथानकासोबत खेचला जातो. याचं सारं श्रेय लेखकाला द्यावे लागेल. हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन आताच्या काळातली सामाजिक समीकरणं बांधणं तसं कठीण आहे. मुळात जेव्हा ते धर्मग्रंथ लिहिले गेले त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे पण तरीही त्या जुन्या, जाचक रूढी-परंपरा जपत मुस्लिम समाज आजही तसाच खितपत पडला आहे. त्याच धर्मग्रंथांचा आधार घेऊन "आपला मुस्लिम धर्म या गोष्टीला मान्यता देत नाही", "आपल्या मुस्लिम धर्मात ही गोष्ट करणं म्हणजे पाप आहे", "ऐसा करोगे तो कयामत के दिन अल्लाह तुम्हारा इंसाफ करेंगा", "ऐसे रहोगे तो तुमको जन्नत नही मिलेगी" या आणि अशा बऱ्याच शिर्षकांखाली मुस्लिम समाजात नेहमीच चांगल्या गोष्टींची गळचेपी केली जाते. अशा अनेक मुद्द्यांवर जुनैदच्या शोधाबरोबर कादंबरीत होणारी सखोल चर्चा समाजाचा एक हिस्सा म्हणून आपल्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. याबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोगामी विचारसरणी, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य, कट्टरवाद, स्त्रियांचं आयुष्य यावर कादंबरीत बरीच उदाहरणे देऊन टाकलेला प्रकाश वाचकाला विचार करायला लावतो.

"इन्शाअल्लाह" मधील ही कथा जरी "इस्लाम" धर्माला केंद्रस्थानी ठेऊन लिहिली गेली असली तरी कादंबरीतील इतर बिगरमुस्लिम पात्रांचा या कथेत असणारा सहभाग लक्षात राहण्यासारखा आहे. शिवाय नसीमामॅम, सईदा, फिदाजी, रफिक आणि फतेहसारखी सुधारणावादी मुसलमानांची संस्था, त्यांच्याशी आपसूकपणे नाळ जोडली गेलेला झुल्फी या काही पात्रांमुळे कथेत मांडलेल्या विषयाला एक प्रकारची मजबुती मिळते. कथेत एकीकडे आपल्या धर्मात, लोकांमध्ये सुधारणावादी विचार रुजवण्यासाठी धडपडणारा "झुल्फि" आहे तर त्याच वेळी त्याला विरोध करणारे त्याच्याच धर्मातले कट्टरही आहेत. झुल्फिची त्याच्या हिंदू मित्रांबरोबरची चर्चादेखील खरंच सर्वांचे डोळे उघणारी आहे. हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मातील काही काही गोष्टींवर होणारी या कथेतील चर्चा "धर्म" या संकल्पनेवर नव्याने विचार करायला लावते. हिंदू म्हटलं की तो मुस्लिमविरोधी, मुसलमान म्हटलं की तो कट्टर अशी जी एक प्रतिमा आपल्या समाजात बनली आहे याला कुठे तरी लगाम घालणं आवश्यक आहेच परंतु ते करत असताना पुरोगामी असण्याच्या नावाखाली समाजात धार्मिक तेढ  निर्माण न करता समतोल समाजिक जीवन कसं जगता येऊ शकतं याची शिकवण भडकमकरांनी "इन्शाअल्लाह" मधून दिली आहे. अभिराम भडकमकरांनी कादंबरीमधे जरी कथेचा शेवट केला असला तरी त्यानंतर वाचकाच्या डोक्यात चालू होणाऱ्या विचारचक्रांनी या कथेचा प्रवास पुढे चालूच राहतो. "इन्शाअल्लाह" मधून वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत.

एक वेगळ्या विषयावरचे आवर्जून वाचून संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक.





संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये