Monday, May 31, 2021

"माणसं"

 


लेखक : अनिल अवचट

प्रकाशक : मौज प्रकाशन

अनिल अवचट हे सामाजिक क्षेत्रात काम करणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व! डॉक्टर, पत्रकार, लेखक आणि समाजसेवक म्हणून समाजात परिचित असले तरी ते खास ओळखले जातात पुण्यातील येरवडा येथे त्यांनी चालू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्र, "मुक्तांगण"मुळे. मुक्तांगणमधे येणाऱ्या विविध व्यसनी लोकांवर उपचार करून त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण आपल्या समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते इथे बऱ्याच लोकांना व्यसनापासून परावृत्त करून समाजात ताठ मानेनं उभं करायचं काम करत आहेत. अशा समाजकार्यासोबतच साहित्यक्षेत्रातील त्यांचं योगदानसुद्धा भरपूर मोलाचं आहे. आजपर्यंत त्यांची जवळपास २२पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि समाजातील उपेक्षित लोकांप्रती असणारी त्यांची भावना त्यांच्या प्रत्येक पुस्तकातदेखील उतरली आहे. त्यामुळेच त्यांच्या बऱ्याच पुस्तकांचा विषय हा नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी झालेल्या असहाय्य लोकांना नजरेसमोर ठेऊन मांडला गेला आहे. अशाच पुस्तकांच्या पंक्तीमधील मन सुन्न करणारं, वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं, प्रत्येक ठिकाणाहून हाकललं जाणं हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र आहे अश्या कष्टकरी, नडलेल्या, आपल्याच समाजातील एका वेगळ्या समाजचं दर्शन घडवून आणणारं एक पुस्तक "माणसं". हमाल, भंगी, वेश्या, ऊसतोड कामगार, धार्मिक भोंदूगिरी करणारे अशा कितीतरी समाजात असून नसलेल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारं हे पुस्तक. अनिल अवचट यांचं "माणसं" हे पुस्तक त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पाच लेखांचा संग्रह आहे. जन्माला आल्यामुळे केवळ जगत राहणं आणि जगण्यासाठी म्हणून एखाद्या जनावरापेक्षा जास्त राबत राहणं एवढंच आयुष्य असणाऱ्या समाजातील काही लोकांची ही करुण कहाणी. अंगातील धग जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत फक्त मेहनत आणि शेवटी खाटिकखान्यात पोहचलेल्या एखाद्या ढोरासारखं मरण हेच ज्यांच्या पाचवीला पुजले आहे असे काही आपल्याच आजूबाजूला असणारे लोक, मग ते गावाकडे मानाने जगणारे पण दुष्काळग्रस्त झाल्याने देशोधडीला लागणारे लोक असोत की जन्मभर कशाकशाची ओझी वाहत त्या ओझ्यांखाली पिचत रहाणारे हमाल असोत, शहरात उदारनिर्वाहसाठी येऊन नरकावस्थेतील झोपडपट्ट्यांमधे रहाणारे लोक असोत की रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा घेऊन जगायची धडपड करणारे लोक असोत किंवा डोंबारी, कोल्हाटी, मदारी, फासेपारधी अशा अनेक दुर्लक्षित लोकांचं आयुष्य असो. अनिल अवचट यांचं "माणसं" ही अशा सर्वांची कथा आहे. १९८० साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात अशा समाजाचं जे आयुष्य अवचट यांनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याची आजच्या सामाजिक परिस्थितीशी तुलना केली तर म्हणावा तसा फरक या लोकांच्या आयुष्यात नाहीच पडला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन! 'हे असेच लोक आहेत आणि हे असंच जगत राहणार' या एकाच नजरेने त्यांच्याकडे पाहिलं गेल्यानं ते नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहत आले आणि त्यांची एक माणूस म्हणून जगण्यासाठी चालू असणारी धडपड कधी समोर आलीच नाही. परंतु अनिल अवचट यांचं "माणसं" मधे आपला हा दृष्टिकोन बदलण्याची ताकत नक्कीच आहे.

अनिल अवचट यांनी "माणसं" मधून केलेलं आपल्याच आजूबाजूला असून देखील एक समाज म्हणून मुख्य प्रवाहापासून नेहमीच वेगळं आयुष्य जगणाऱ्या अनेक जाती, जमाती आणि लोकांचं दर्शन वाचकाच्या मनाला चटका लावून जाते. "माणसं", "कोण माणसं...कोण जनावरं", "वस्त्या माणसांच्या", "अनिकेत" आणि "अंधेरनगरी निपाणी" या पाच लेखांतून समोर आलेल्या लोकांचं आयुष्य वाचत असताना पानापानावर सतत जाणीव होत राहते की आपण किती नशिबवान आहोत जे आपल्या वाट्याला असं आयुष्य नाही आलं परंतु मनाच्या एका कोपऱ्यात तितकंच वाईटही वाटतं की एखाद्याच्या वाट्याला इतकं हालाखीचं आयुष्य कसं येऊ शकतं? तेही जगताहेत आणि आपणही जगत आहोत पण दोन्ही जगण्यातला विरोधाभास वाचकाच्या मनाला अक्षरशः घरे पाडतो. याचं श्रेय अवचट यांच्या ओघवत्या भाषेलादेखील दिलं पाहिजे कारण त्यांच्या प्रत्येक लेखासोबत वाचक जणू काही वहावत जातो. पुस्तकामधे तंबाखूच्या गोदामात काम करणाऱ्या, मिरचीच्या किंवा सिमेंटच्या गोदामात पोत्यांच्या थप्प्या लावणाऱ्या कामगारांच्या हालअपेष्टांचं जे वर्णन अवचट यांनी केलेलं आहे ते अंगावर शहारे आणणारं आहे.  शिवाय दुष्काळी भागातील आपलं घरदार विकून दोनवेळच्या पोटाचा प्रश्न मिटावा म्हणून बायकामुलांसह शहराकडे आलेल्या शेतकऱ्यांचे हाल वाचकाच्या डोळ्यात अश्रू घेऊन येतात. गावकडचं घरदार विकून आल्यामुळे परतही जाता येत नाही आणि शहरी वातावरणाशी जुळवूनही घेता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या व्यक्तीच्या वाट्याला येणाऱ्या आयुष्याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भंग्यांच्या आयुष्यावर त्यांनी टाकलेला प्रकाश वाचताना अंगावर काटा येतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुस्तकातील प्रत्येक समाजातील लोकांमध्ये प्रत्यक्ष मिसळून त्यांचं आयुष्य जवळून पाहिल्यानंतर अवचट यांनी त्याला पुस्तकबद्ध केलेलं आहे त्यामुळे या "माणसांच्या" आयुष्याची दाहकता अजूनच जाणवत राहते.

समाजातील दुर्लक्षित अशा लोकांप्रती असणारे आपले विचार बदलवणारे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तक "माणसं".





संदीप प्रकाश जाधव

Monday, May 24, 2021

"एक होता कार्व्हर"

 



लेखिका : वीणा गवाणकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

बऱ्याच दिवसांपूर्वी वाचायचं म्हणून संग्रही घेतलेलं पण इतर पुस्तकांच्या गर्दीत हरवलेलं हे पुस्तक काही दिवसांपूर्वी हाती लागलं. तरीही वाचण्याचा मोह मुद्दामहून आवरता घेतला आणि परत ठेऊन दिलं माझ्या ५०व्या पुस्तक परिचयासाठी, जेणेकरून पुस्तक वाचन आणि परिचय दोन्हीही खास व्हावं. पण वाचून झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे चार ओळींत परिचय देण्यासारखं हे पुस्तक नक्कीच नाही. हे पुस्तक म्हणजे कथा आहे शतकाचा महानायक ठरवता येईल अशा एका व्यक्तिमत्वाची, उभं आयुष्य आपल्या ध्येयासाठी वाहून घेणाऱ्या एका कर्मयोग्याची, अमेरिकेच्या निर्जिव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणाऱ्या एका महामानवाची, एका अमेरिकन कृषी तज्ज्ञाची, तपस्वी मुक्तात्म्याची आणि ज्ञानयोग्याची अर्थातच 'डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' यांची. अमेरिकेतील निग्रो जमातीत जन्मलेला, वर्णभेदाच्या आणि गुलामगिरीच्या अंधारात पोरकेपणा वाट्याला आलेला हा एक दमेकरी, आजारी आणि कृश मुलगा. अमेरिकेत वर्णभेद जेव्हा अगदी टिपेला होता त्या काळात "निग्रो" म्हणून जन्माला आलेलं, अवघं २ महिन्यांचं असताना ज्याच्या आईला गुलाम म्हणून विकण्यासाठी पळवून नेलं गेलं, पोरकेपणा वाट्याला आल्यानंतर आज मरेल की उद्या अशा अवस्थेत ज्याची आयुष्यासोबत लढाई चालू होती ते मूल पुढे जाऊन एक महान शास्त्रज्ञ होईल असं कोणी जर बोललं असतं तर नक्कीच त्याची गणना तेव्हा मूर्खात केली गेली असती. परंतु आपल्या अपार कष्टाच्या जोरावर, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कार्व्हर यांनी मिळवलेलं यश किती अफाट होतं याची प्रचिती या पुस्तकातून येते. ज्ञानलालसेपोटी अधांतरी फिरून, पडेल ती कामे करून, ज्ञानार्जन करून आयुष्य संपेपर्यंत निष्णात कर्मयोग्याप्रमाणे समाजासाठी झटलेल्या, बंधन नको म्हणून आजन्म अविवाहित राहिलेल्या, समाजसेवेसाठी जीवन वाहिलेल्या डॉक्टर कार्व्हर यांची महानता "एक होता कार्व्हर" च्या माध्यमातून वीणा गवाणकर यांनी आपल्यासमोर मांडली आहे. कार्व्हर यांनी लावलेले फक्त शोधच नाहीत तर प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून जगण्याची कला आणि अपल्या ज्ञानाचा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी केलेला वापर याचे सार्थ दर्शन या पुस्तकामधून होते. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वाँश्गिंटन कार्व्हर यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनाची गाथा आणि त्यांचा खडतर जीवनप्रवास वीणा गवाणकर यांनी रेखाटला आहे त्यांच्या या १८० पानी पुस्तकात "एक होता कार्व्हर" मधे. हृदय पिळवटून टाकणारा आयुष्याचा प्रवास आणि खडतर गुलामाचे आयुष्य जगूनसुद्धा फक्त आपली मायभूमी आणि स्वतःच्या समाजासाठी झटणाऱ्या एका निस्वार्थी, महान, असामान्य व्यक्तीची ही कहाणी "एक होता कार्व्हर".

अमेरिकेतील मिसोरी प्रांतातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्व्हर या दांपत्याकडे काम करणारी मेरी ही गुलाम निग्रो स्री अमेरिकेत गुलामांना पळवून विकण्याचा धंदा तेजीत असताना एका टोळीकडून आपल्या २ महिन्यांच्या मुलासोबतच पळवून नेली जाते. पुढे एका उमद्या घोड्याच्या मोबदल्यात मेरीचा दोन महिन्याचा मरणोन्मुख, दमेकरी, दुबळा मुलगा मोझेस दांपत्याला परत मिळाला आणि इथूनच सुरू झाली या महानायकाच्या संघर्षाची. एकाकी आणि अबोल राहणाऱ्या कार्व्हरचं बालपण कामाच्या रगाडयात हरवुन गेलं, सोबत कोणीच नसल्याने संपूर्ण स्वावलंबन अंगी रुजलं, कितीही तडाखे बसले तरी कोणाच्या मदतीशिवाय आपण ताठ उभे राहू शकतो याची जाणीव त्यांना बालपणातच झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मजुरी, स्वयंपाकी, लाकडं फोडणं, लोहाराच्या हाताखाली राबायला जाणं अशी हरप्रकारची कामं करत कार्व्हर शिकत राहिले. पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे, रानावनातील झाडेझुडपे हेच त्यांचे मित्र बनले. दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मिळतील ती कामं ते करायचं. त्यांचं  शिक्षण हे असंच चाललं होतं, जिथून आणि जसं मिळेल तसं! पुढे अधिकाधिक वाढत जाणाऱ्या ज्ञानलालसेमुळे पडतील ते कष्ट उपसून ते शिकत राहिले. कामधंदा करून पैसे मिळवायचे, मग शाळेत नाव घालायचं. शिकत असताना पैसे संपले की शाळा सोडायची. परत काम करायचं. 'आपण इतकं शिकावं, इतकं शिकावं की एक दिवस कुठल्याच शिक्षकाने शिकवावं असं ज्ञान उरणार नाही आणि मग या सृष्टीचा विधाता त्याचं रहस्य आपल्यापुढे उलगडून ठेवेल.' असं स्वप्न उराशी बाळगणारा कार्व्हर वयाच्या केवळ दहाव्या वर्षी  शिक्षणासाठी आपलं गाव ‘डायमंड ग्रोव्ह’, आपले मालक ‘मोझेस आणि सूझन कार्व्हर’ या सगळ्यांना सोडून एकटाच नीओशे गावात गेला. निओशे येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी मरमर काबाडकष्ट करून रात्री झोपायला जुना पडका गोठा अशी कार्व्हरची अवस्था होती. लहानपणापासूनच कोणतीही गोष्ट कलाकाराच्या वृत्तीने शिकणारे जॉर्ज एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून घडू लागले. आभाळाएवढं दारिद्र्य आणि नशिबी आलेला अनाथपणा या अवस्थेत जॉर्ज यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कृष्णवर्णीय असल्याने पात्रता असूनदेखील हायलड युनिव्हर्सिटीने जेव्हा कॉलेज प्रवेश नाकारला गेला तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. तरीही त्यांची शिकण्याची इच्छा काही कमी नाही झाली. निग्रो लोकांसाठी खास असणाऱ्या सिंपसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि माणुस म्हणून जगणं ही काय चीज असते याचा पहिला निखळ अनुभव त्यांना इथे मिळाला. १८६५ साली कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता मिळूनही निग्रो समाज हिंसाचार आणि जाळपोळ यांमध्ये होरपळून निघत होता. अमेरिकेतील वर्णद्वेषाची यादवी कायद्याने नष्ट करण्यात आली होती, परंतु सामान्य लोकांच्या मनातील गुलामगिरीची धग कायम होती. एका कृष्णवर्णीय कैद्याला जिवंत जाळण्याचा प्रकार बघितल्यानंतर जॉर्ज मुळापासून हादरले, काळ्या कातडीचा अर्थ तेव्हा त्यांना पूर्णपणे समजला. अशा अतिशय प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून कार्व्हर यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १८९४ साली विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यावर त्याच कॉलेजमध्ये कार्व्हर यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढे १८९६ साली त्यांनी Agricultural and Bacterial Botany या विषयाची उच्च पदवी, MS संपादन केली.

कार्व्हर यांनी केलेल्या कष्टाला खरी झळाळी मिळाली ती त्यांचे 'बुकर टी वाँशिग्टन' यांच्याशी जोडले गेल्यानंतर. मानवाला सुजाण बनवणारा शिक्षणतज्ज्ञ म्हणुन अलाबामा टस्कगी शाळेचे बुकर टी वाँशिग्टन यांची ख्याती झाली होती. बुकर टी वाँशिग्टन यांनी जॉर्ज कार्व्हर यांना शतकानुशतके दारिद्रयाने गांजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या त्यांच्या समाजबांधवांना उद्धारुन त्यांना सुजाण बनवण्याच्या कामात मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कार्व्हर दक्षिण अमेरिकेत, अलाबामात पाऊल ठेवले आणि सुरुवात झाली जगाला स्तिमित करणाऱ्या एकाहून एक संशोधन मालिकांची! आपल्या शिक्षणाचा आपल्या बांधवांना उपयोग झाला पाहिजे अशी भावना असणाऱ्या कार्व्हर यांनी आपल्या आयुष्याची पुढची जवळपास ४० हून अधिक वर्षें अलाबामा येथे काढली. अलाबामा टस्कगी शिक्षणसंस्थेच्या शेतकरी विभागाचे पहिले डायरेक्टर म्हणून कार्व्हर यांची नेमणुक झाल्यानंतर त्यांचा पगार होता वार्षिक १५०० डॉलर्स. या संस्थेत डॉ. कार्व्हर शेतीतज्ञ म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अचाट कामगिरीने आपल्या बांधवांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. शेतकऱ्यांचे समृध्द जीवनच राष्ट्राचा विकास घडवते हा एकच मंत्र मनात ठेवून डॉ. कार्व्हर यांनी समाजाच्या तळागाळातील घटकांच्या गरजा ओळखून आपल्या संशोधनाला दिशा दिली. कार्व्हर यांनी आपल्या अपार मेहनत आणि चिकाटीने दक्षीण अमेरिकेला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने लोकांच्या आयुष्यवार दूरगामी परिणाम करणारे संशोधन केलं. कार्व्हर यांच्या बुद्धीचातुर्याने आणि संशोधनाने सारं जग स्तिमित झालं. डॉक्टर कार्व्हर यांनी अमेरिकन निग्रो आणि गो-या या दोन्ही समाजासाठी केलेलं कार्य अजरामर आहे. वर्णभेदाच्या भिंती ओलांडून कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या अष्टपैलू बुद्धीचातुर्याने संगीत, कला, फुल-फळझाडे, विविध शेतपीके, वैद्यकशास्त्र यामध्ये त्यांनी केलेलं संशोधन आज इतक्या वर्षांनंतरदेखील अमेरिकेसाठी एक संजीवनी आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजू लोकांसाठी करणाऱ्या कार्व्हर यांनी अलाबामामधे आपला अखेरचा श्वास घेतला. कार्व्हर यांच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे परंतु वीणा गवाणकर यांनी थोडक्यात पण अतिशय उत्कृष्टपणे कार्व्हर यांचं चरित्र ज्या पद्धतीने "एक होता कार्व्हर" मधून लोकांपर्यंत पोहोचवलं आहे ते नक्कीच प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

संग्रही ठेवून प्रत्येकाने अगदी आवर्जून वाचावं असं पुस्तक "एक होता कार्व्हर".




संदीप प्रकाश जाधव




Monday, May 17, 2021

"उत्तरकांड"

 


लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा यांचं प्रत्येक साहित्य वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं, वाचत असताना वाचक एका वेगळ्याच विचारचक्रात हरवून जातो आणि याचाच प्रत्यय मला पुन्हा एकदा आला त्यांची रामायणावर आधारित कादंबरी "उत्तरकांड" वाचत असताना! "साक्षी" आणि "आवरण" या कादंबऱ्या वाचल्यानंतर "उत्तरकांड" ही त्यांची तिसरी कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. प्रत्येक कादंबरीचा विषय जरी वेगळा असला तरी भैरप्पांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साहित्य हे मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. "उत्तरकांड" ही रामायणावर आधारित कादंबरी रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहत असताना सीतेच्या निवेदनातून उलगडत जाते. रामायणात घडलेल्या घटनांसोबत बरेच चांगले-वाईट प्रसंग सीतेच्या दृष्टिकोनातून उलगडत असताना सीतेचा वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधे वाचकाला गुंतवून ठेवत ही कादंबरी पुढे सरकत राहते. रामाची पत्नी म्हणून सीतेच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण भैरप्पांनी या कादंबरीत केलेलं आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाबरोबरच रामायणातील इतरही पात्रांचे जे वर्णन भैरप्पा यांनी केलं आहे ते वाचत असताना आजपर्यंत ज्या पारंपारिक चौकटींमध्ये आपण या पात्रांना पाहत आलो आहोत त्या सर्व भेदून ही पात्रे आपल्यासमोर उभी राहतात. शिवाय रामायणात घडलेल्या सर्वच घटना कोणताही दैवी मुलामा न देता वर्णन केल्याने आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला मानवी पातळीवर आणून मांडल्यामुळे सीतेच्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे आजच्या समाजात, आपल्या आसपास घडत असणारी एखादी कथाच असल्याचा भास वाचकाला होत राहतो आणि त्यामुळेच सीतेच्या निवेदनातून पुढे सरकत असताना कादंबरीत एकप्रकारचं नाट्य निर्माण झालं आहे जे रामायणाचा एक नवा अर्थ आपल्यासमोर घेऊन येते. 'पतिव्रता', 'सोशिकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण' फक्त याच नजरेतून आजपर्यंत सीतेकडे पाहिलं गेलं आणि पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी एक आदर्श म्हणून समाजापुढे त्याचं इतकं उदात्तीकरण केलं गेलं की सीतेवर एक स्त्री म्हणून झालेला अन्याय आपसूकच झाकला गेला, तिचा आवाज दबला गेला. एस. एल. भैरप्पांनी सीतेवर झालेल्या याच अन्यायाला वाचा फोडण्याचा, सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या या "उत्तरकांड" कादंबरीमधून केला आहे. सीतेला एका वेगळ्याच रुपात भैरप्पांनी या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे ज्यामुळे सीता जणूकाही आजच्या काळातली एखादी स्त्रीवादी व्यक्तिरेखाच वाटत राहते. "उत्तरकांड" या कादंबरीमधे भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून स्त्रीची एक तेजस्वी बाजू आपल्यासमोर आणली आहे. रावणाकडून सुटका केल्यानंतर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली परंतु सीता जशी रामापासून दूर होती तसाच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल दबक्या आवाजात अनेकदा केला जातो पण सीता ही एक "स्त्री" असल्या कारणाने रामाने जे केलं ते कसं योग्य होतं असंच आजपर्यंत सांगितलं गेलं. भैरप्पांचं "उत्तरकांड" याला अपवाद आहे, भैरप्पांच्या "उत्तरकांड" मधील सीता नेमका असाच सवाल रामाला भर धर्मसभेत करते - ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर राहतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने रामसारखंच दुटप्पीपणे वागणाऱ्या आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे. त्यामुळेच पौराणिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या वास्तविक जगाला अगदी तंतोतंत लागू होणारी भैरप्पांची ही ३०४ पानी कादंबरी "उत्तरकांड" वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते.

रामायण असो वा महाभारत ही महाकाव्ये आहेत की खरंच आपला इतिहास हा नेहमीच एक वादाचा विषय राहिला आहे. परंतु जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर एक गोष्ट नक्की की या दोन्हींमधील घटनांचा भारतीय जनमानसावर भरपूर प्रभाव आहे. रामायणातील जवळपास सर्वच घटना लोकांच्या मनामध्ये खूप खोलवर रुजल्या आहेत, सीतेइतकी लोकप्रिय आणि जनमानसात रुजलेली पौराणिक व्यक्तिरेखा तर दुसरी कोणतीच सापडणार नाही. त्यामुळेच रामायणातील सीता या उत्तुंग पात्राभोवती गुंफलेले हे "उत्तरकांड" वाचकाला कमालीचे घेरून टाकते. सीता स्वयंवर, रामाचा वनवास आणि त्याची पार्श्वभूमी, शूर्पणखा प्रकरण, सीताहरण, सुग्रीवाला वालीविरुद्ध रामाने केलेली मदत, हनुमान भेट, समुद्रापार जाऊन रामाने लंकेवर केलेली स्वारी, रावणाचा वध करून केलेली सीतेची सुटका, विजयी होऊन अयोध्येत परत आल्यानंतर लोकाभिचाराला सामोरं जाऊन रामाने केलेला सीतात्याग, त्यानंतर सीतेच्या मनातील विचारांचे काहूर आणि त्यावर तिने केलेली मात, जनकाने भूमीतून सापडलेल्या एका कन्येचा केलेला सांभाळ, त्या भूमीबद्दल सीतेची असणारी ओढ आणि त्या ओढीमुळेच रामाने त्यागल्यानंतर कृषक म्हणून केलेली शेतीची कामे, सीतेने महर्षी वाल्मीकींच्या आश्रमात व्यतीत केलेला काळ, आपली सखी सुकेशीच्या मदतीने लव-कुश यांचं केलेलं संगोपन, लव-कुश यांनी पकडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडून न देता वाल्मिकी ऋषींनी केलेल्या मध्यस्थीतून अयोध्येत भरवली गेलेली धर्मसभा आणि त्यात सीतेने बजावलेली स्त्रीच्या हक्कासाठीची भूमिका. अशा अगदी तोंडपाठ असणाऱ्या रामायणातील घटना भैरप्पांनी ज्या पद्धतीने त्यांच्या "उत्तरकांड" मधून आपल्यासमोर आणल्या आहेत त्यातून सीतेच्या पारंपरिक रुपाला छेद देणारी एक वेगळीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

संग्रही ठेऊन आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव


Monday, May 10, 2021

"तांडव"

 



लेखक : महाबळेश्वर सैल

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

महाबळेश्वर सैल यांच्या "तांडव" या कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकून होतो. "धर्म" या संकल्पनेवर लिहिलेली एक रोखठोक आणि तटस्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवली गेलेली ही ऐतिहासिक घटनेवर आधारीत कादंबरी बऱ्याच जणांनी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली होती. जितकं काही ऐकलं होतं त्या सर्व गोष्टींवर अगदी पुरेपूर उतरणारी अशी ही कादंबरी "तांडव". धर्मांतरावर आधारीत या कादंबरीचे मुखपृष्ठच इतकं जबरदस्त आणि बोलकं आहे की त्यावरूनच कादंबरीतील "पसाऱ्याचा" अंदाज यावा. ५ शतकांपूर्वी सातासमुद्रापारहून येऊन पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतले. परंतु गोवा जिंकल्यानंतर फक्त त्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन करून ते थांबले नाहीत तर जो राजाचा धर्म तोच प्रजेचादेखील असला पाहिजे अशा धर्मवेडानं पछाडलेल्या पोर्तुगीजांनी गोव्यातील प्रजेचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी आणि त्यांना ख्रिश्चन धर्मात आणण्यासाठी त्यांच्यावर पाशवी अत्याचार चालू केले, त्यांचा अतोनात छळ चालू केला या अत्याचारांचंच रौद्र रूप म्हणजे महाबळेश्वर सैल यांनी लिहिलेली ही कादंबरी "तांडव". पूर्वापारपासून चालत आलेल्या आपल्या रूढी-परंपरांना जपत, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या चौकटीत स्वतःला बांधून घेऊन आपलं आयुष्य जगणाऱ्या लोकांवर सातासमुद्रापारहून आलेला पोर्तुगीज आणि त्यांचा ख्रिस्ती धर्म अचानकच चक्रीवादळासारखा येऊन धडकल्यानंतर गोव्याच्या धरतीवर धर्मांतराचा जो "तांडव" सुरू झाला त्याचीच ही कहाणी. धर्मांतराची जबरदस्ती, धार्मिक अत्याचारातून विस्कळीत झालेली सामाजिक घडी, देवा-धर्माला डोक्यावर घेऊन, जीवावर उदार होऊन अनेकांनी केलेली पलायनं आणि या साऱ्या घडामोडींमध्ये देशोधडीला लागलेली अनेक कुटुंबं यांचं अतिशय विदारक चित्रण महाबळेश्वर सैल यांनी "तांडव" मध्ये केलेलं पहायला मिळेल. धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना वेठीस धरत असताना त्या धर्मातून येणारी क्रूरता कादंबरीतून लोकांपर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकांनी केला आहे. अत्याचारातून झालेलं धर्मांतर आणि आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर त्या लोकांची होणारी घालमेल वाचकालासुद्धा अस्वस्थ करून जाते. ५ शतकांपूर्वी घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला कादंबरी स्वरूपात लोकांसमोर आणत असताना महाबळेश्वर सैल यांनी कल्पनेची जी जोड त्या घटनांना दिलेली आहे त्यामुळे त्या धर्मांतराची दाहकता जाणवत राहते जी पुढे वाचकाच्या मनामध्ये देखील विचारांचा "तांडव" चालू करते. "धर्म" या अतिशय संवेदनशील संकल्पनेवर बेतलेली, ऐतिहासिक सत्यावर आधारीत ही कादंबरी महाबळेश्वर सैल यांनी जितक्या तटस्थपणे लिहिली आहे तितक्याच तटस्थपणे एक वाचक म्हणून ती वाचनंदेखील आवश्यक आहे. ३६३ पानांच्या या कादंबरीतून गोवा आणि आसपासच्या परिसरातील गावांमध्ये ५ शतकांपूर्वी धर्मांतराच्या नावाखाली झालेल्या स्थित्यंतराचा अचूक धागा पकडून महाबळेश्वर सैल यांनी उभा केलेला हा "तांडव".

आज गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो गोव्याचा स्वच्छ समुद्र, गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, ओसंडून वाहणारे मद्याचे प्याले, असंख्य चर्च आणि बऱ्याच "फिरंगी" गोष्टी. पण खरंच पूर्वीचं गोवा असं होतं का? तर नाही! पोर्तुगीजांनी आक्रमण करण्यापूर्वीचं गोव्याचं एक अतिशय वेगळं दर्शन आपल्याला "तांडव" मधून वाचायला मिळेल. पश्चिम घाटाच्या कुशीत, गर्द जंगलात वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या - गावं यांनी सजलेलं गोवा! याच गोव्यातील आदोळशी या गावात घडणारी या कादंबरीची कथा ५ शतकापूर्वीच्या संपूर्ण गोव्याची एक सामाजिक आणि मानसिक अवस्था आपल्यासमोर उभी करते. आदोळशी गावाची ही कथा प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडत असताना लेखकांनी संपूर्ण गोव्याची त्याकाळातील अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आदोळशी गावावर धाड टाकल्यानंतर सातासमुद्रापलीकडून आलेल्या या "सुसंस्कृत" ख्रिस्तांनी धर्मांतराचा जो "तांडव" चालू केला त्यामध्ये आदोळशी सारखी अशी असंख्य गावं होरपळून निघाली, गावंच्या गावं ख्रिश्चन झाली आणि सोबतच संपूर्ण गोवा! लोकांच्या अंगणातील तुळस, बायकांच्या गळ्यातील मंगळसूत्र, घरांचे कळस जाऊन त्या जागी क्रॉस आले तरीही हा जबरदस्तीचा क्रॉस घेऊन आणि अत्याचार सहन करूनदेखील असंख्य घरातील हळदी-कुंकू जपले जात होते. स्वधर्म टिकवला जात होता. धर्मांतराच्या तडाख्यातून वाचण्यासाठी जीवावर उदार होऊन असंख्य पलायने केली जात होती. जीवनाचा सर्व हवाला देवावर टाकलेला, जगण्यासाठी शेती हा एकमेव आधार असणारा आदोळशी गावातील समाजात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी फक्त देवाच्याच हातात असतात आणि देऊळ पाडणाऱ्यालाही देवच शिक्षा करील ही भावना इतकी खोलवर रुजली होती की त्यांना पोर्तुगीजांच्या अन्याया विरोधात पेटून उठण्याची, विद्रोह करण्याची बुद्धीच कधी सुचली नाही. त्या काळच्या गरीब समाजाचं, देवावर सारी भिस्त ठेवून जगणाऱ्या गरीब लोकांचं चित्रण कादंबरीत वाचत असताना वाईट तर वाटतंच पण अशा देवा-धर्माच्या खुळचट समजुतींना कवटाळून घेऊन स्वतःहून या धर्मांतराला पायघड्या अंथरणाऱ्या लोकांची चीडपण येते. हिंदू धर्मातल्या लोकांना बाटवणं हे नको इतकं सोपं आहे, केवळ घरात पाणी शिंपडून किंवा परधर्माच्या माणसानं प्रवेश केल्यानं त्या घराचा वा कुटुंबाचा धर्म बदलतो अशी समजूत असणाऱ्या लोकांना पोर्तुगीजांनी अगदी चतुराईने धर्मांतरास भाग पाडले. साम, दाम, दंड या सर्व मार्गांनी लोकांचे धर्मांतर चालू असताना देवच आपल्याला यातून वाचवू शकेल या भोळ्या विश्वासानेच त्यांचा घात केला आणि बरीच कुटुंबं रस्त्यावर आली. शेतजमिनीच्या बदल्यात, चाकरीच्या बदल्यात, स्वतःचं मुल परत हवं असेल, शील वाचवायचं असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि नाही स्वीकारला तर घरं जाळण्यात येतील, तलवारीच्या जोरावर तुम्हाला तो स्वीकारणं भाग पाडू म्हणणाऱ्या मूठभर पोर्तुगीजांच्या अत्याचाराविरोधात संघर्ष करायच्या ऐवजी गावकरी गाव सोडून दिगंतराला जाऊ लागले. त्यांच्या याच असहाय्यतेचा फायदा घेऊन, घरं जाळून, संसार उद्ध्वस्त करून असंख्य कुटुंबांना जबरदस्तीने बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात आलं. त्या काळातील हे "तांडव" वाचत असताना वाचक गलबलून जातो. गावकऱ्यांना ख्रिश्चन झाल्याशिवाय जगणंही मुश्कील व्हावं इतका टोकाचा अत्याचार! यासर्वांपासून सुटका करून घेण्याचे तीनच उपाय एक तर हिंदू धर्म सोडणे, गाव सोडणे किंवा जगणं सोडणे! जे लोक धर्म सोडत होते त्यांचीही तशी सुटका होतच नव्हती कारण ख्रिश्चन झाल्यानंतर चुकून जरी हिंदू धर्मातील एखादी परंपरा पाळली गेली किंवा नव्या धर्माचा अपमान झाला तर इनिक्विझिशनच्या क्रूर शिक्षांना सामोरं जावं लागणार, म्हणजे इथेही पुन्हा मरणच! अशा विदारक परिस्थितीचे कादंबरीतील वर्णन अंगावर काटा आणते.

धर्मसंकटात सापडलेल्या माणसाच्या आयुष्यात घडणारे विविध प्रसंग कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतील. धाकातून, निराशेतून, स्वार्थातून, दुःखातून, अविचारातून, चिंतेतून, नाईलाजातून, द्वेषातून परधर्म स्वीकारणाऱ्या माणसांचं दर्शन आपल्याला कादंबरीत पानापानावर होत राहते. धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात जाऊनही आपल्या मनाची तगमग शांत न झालेले, अस्वस्थ लोकसुद्धा आपल्याला कादंबरीत वाचायला मिळतील आणि आपण आपल्या जुन्या धर्मातलं काय गमावलं आणि नव्या धर्मातलं काय कमावलं याचा हिशोब कधीच न लागलेले संभ्रमी लोकही इथे आपल्याला दिसतील. किमान देवाला तरी या दुष्टचक्रातून बाहेर काढूत असं म्हणून देवासह परागंदा झालेली माणसं दिसतील. आपण ख्रिश्चन झाल्यावर एका क्षणात दुरावलेली आपली जुनी माणसं आणि ती दुरावलेली माणसं पुढे स्वतःच ख्रिश्चन झाल्याने पुन्हा जवळ आल्याचे चमत्कारिक प्रसंगही वाचायला मिळतील. श्रद्धेने धर्मपालन करणाऱ्या लोकांवर एका लादल्या गेलेल्या धर्मामुळे जी जी म्हणून उलथापालथ होऊ शकते ती ती सगळी आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळेल. हे सर्व मांडत असताना हिंदू धर्मातील काही गोष्टी या धर्मांतरास कसे हातभार लावत होत्या याचंही तितकंच तटस्थ वर्णन कादंबरीत लेखकांनी केलेलं आहे. देव, धर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या गावकऱ्यांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या खुळचट धारणा जसे की 'ख्रिश्चनांच्या नुसत्या स्पर्शाने आणि त्यांचं उष्टं खाल्ल्याने आपण बाटले जातो!' ही एक अशी मूर्ख समजूत ज्यामुळे आपल्या कितीतरी आप्तेष्टांना आपण आपल्यापासून तोडून टाकलं आणि स्वतःहूनच धर्मांतर करायला भाग पाडलं याचा हिशोबच लागत नाही. शिवाय जातिश्रेष्ठत्वाच्या अहंकारातून समाजातल्या अनेक घटकांना कसं दूर लोटलं याबद्दलही परखड भाष्य कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. 

महाबळेश्वर सैल यांनी साकारलेला धर्मांतराचा हा "तांडव" कोणत्याही धर्माविषयी पूर्वग्रह मनात न ठेवता वाचला तर नक्कीच एक दर्जेदार साहित्य वाचल्याचं समाधान देऊन जातो. आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "तांडव".




संदीप प्रकाश जाधव

Monday, May 3, 2021

"परत्या"

 



लेखक : उत्तम कांबळे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

उत्तम कांबळे यांच्या "काळजात धावतोय ससा" नंतर त्यांचं  "परत्या" हे दुसरं पुस्तक आज वाचनात आलं. दोन्ही पुस्तके वाचताना मनाला भावणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या लिखाणातील साधेपणा. अगदी सहज सुंदर भाषेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधूनच साकारलेली त्यांची पुस्तके म्हणूनच मनाला भुरळ घालतात. "काळजात धावतोय ससा" हा कथासंग्रह त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या विविध लोकांना आलेल्या अनुभवांच्या कथांनी सजला आहे ज्यामध्ये उत्तम कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व आगतिकता अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे जी वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देणारा, ज्वलंत अशा सामाजिक विषयांना हात घालत असताना सोबतच वाचकालासुद्धा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आणि काही काही पानांवर मन सुन्न करणाऱ्या घटनांनी साकारलेला आणखी एक कथा संग्रह "परत्या". ११९ पानांच्या या छोट्याशाच कथासंग्रहातील एकूण ९ कथा या मुख्यतः दलित आणि अतिशय दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांभोवती फिरणाऱ्या आहेत. प्रत्येक कथेचा  आशय जरी वेगळा असला तरी त्यातून दिला जाणारा संदेश एक समाज म्हणून आपण कुठे आहोत आणि कुठे असलं पाहिजे याचा विचार करायला लावतो. साध्याच गोष्टी ज्या आपण आपल्या आसपास वेगळ्या पद्धतीने अनुभवल्या देखील असतील पण उत्तम कांबळेंच्या लिखाणाची शैलीच अशी आहे की या कथा वाचत असताना डोळ्यासमोर त्या घटना उभ्या राहतात ज्या वाचकाच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या करून जातात. माणूस म्हणून आपण कितीही प्रगती केलेली असली तरी आजही लहान लहान खेड्यांमध्ये जातिव्यवस्थेच्या नावाखाली घडणाऱ्या काही काही घटना एक समाज म्हणून आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे हेच सांगून जातात. याचंच एक प्रातिनिधिक चित्र आपल्याला उत्तम कांबळेंच्या "परत्या" मधील काही कथांमध्ये वाचायला मिळेल. "नवं स्मशान", "जातीचा मुका मार", "किरळ", "संस्कार", "टेडी बेअरचे डोळे", "जखमा", "अपराधीपणा", "एका मड्याची भटकंती" आणि "परत्या" या ९ कथांमधून उत्तम कांबळेंच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. 

पहिली कथा "नवं स्मशान" फिरते एका अतिशय गरीब, दलित कुटुंबातील १५ वर्षीय मुलाच्या मृत्यूभोवती. विटांनी भरलेल्या ट्रॉलीखाली चिरडून झालेल्या अपघातानंतर सिद्धार्थ या अतिशय होतकरू तरुणाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर फक्त पंचनाम्यासाठी तसाच ट्रॉलीखाली तब्बल ३० तासांहून अधिक वेळ पडून राहिलेला त्याचा मृतदेह अशी विदारक पार्श्वभूमी असणारी ही कथा. दलित म्हणून असणारा शिक्का आणि स्मशानासाठी देखील दुसऱ्यांच्या जमिनीवर अवलंबून राहणारा हा समाज सिद्धार्थचा मृतदेह हाती लागल्यानंतरसुद्धा त्याच्या दफनविधीसाठी संघर्ष करत राहतो. शेवटी स्वतःच्या जागेत दलित समाजाची वेगळी स्मशानभूमी उभी करायचा निश्चय करून होणारा कथेचा शेवट. आपल्या समाजात जातीव्यवस्था किती खोलवर रुजली आहे आणि स्वार्थी राजकारणापायी याबाबतीत आपली न्यायव्यवस्था कशी कमजोर होऊन गेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दुसरी कथा "जातीचा मुका मार". दिपक कुरणे हा दलित समाजातील मुलगा स्वकर्तुत्वावर शिकून सनदी अधिकारी बनतो, नवनवीन योजनांच्या माध्यमातून स्वतःच्या गावचा विकास करतो पण गावातील जत्रेत देवाच्या पालखीला हात लावल्याचे निमित्त होऊन त्याला जातिव्यवस्थेचा असा काही दणका बसतो की न्याय मिळवण्यासाठी तब्बल २५ वर्षें संघर्ष करून देखील त्याच्या हाती काहीच लागत नाही. कथा संपत असताना डोक्यात एकच विचार ठेऊन संपते की इतक्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत असं होत असेल तर बाकी दलित समजातील लोकांची काय अवस्था असेल. तिसरी कथा "किरळ" ही दुष्काळाने होरपळत असणाऱ्या गावातील एका डोळ्याने अंध जनी या म्हातारीची. दुष्काळामुळे गाव सोडून शहरात गेलेल्या आपल्या मुलांच्या आठवणीत गावात एकटीच राहणारी जना. सोबत देवाला सोडलेला एक बोकड आणि अधून मधून थेंबभर दूध देणारी एक शेळी. तिचा अशा अतिशय कठीण परिस्थितीत जगण्यासाठीचा संघर्ष आपल्याला ऊर्जा तर देतोच पण जनाच्या एकुलत्या एक शेळीच्या दुर्दैवी मृत्यूने होणारा कथेचा शेवट मनाला चटका लावून जातो. जातीधर्माच्या पलिकडे जाऊन ब्राह्मण - दलित कुटुंबातील दोन मुलांची मैत्री आणि पालकांकडून मुलांवर होणाऱ्या संस्काराचे महत्व सांगणारी कथा "संस्कार". कथेच्या नायकाला एका अंध मुलीकडून विचारला जाणारा हळवा प्रश्न "टेडी बेअरचे डोळे" मला चालतील का हा नायकासोबतच वाचकालादेखील काही क्षण स्तब्ध करून विचारात पाडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या "जखमा" मनाला देऊनच जातात. आंतरजातीय प्रेमविवाहानंतर झालेला घटस्फोट नायकाच्या मनावर खोलवर "जखमा" देऊन जातो तसाच वेश्याव्यवसाय करून आपले पोट भरणाऱ्या एका स्त्रीने स्वतःहून करून घेतलेल्या "जखमा" यांपैकी कोणती जखम जास्त त्रासदायक या विचारात संपणारी ही कथा. समाज म्हणून जगत असताना आपण त्या समाजाचे काहीतरी देणे लागत असतो, आपण जेव्हा पोटभर जेवत असतो त्याच वेळी बाहेर असे लाखो जीव असतात जे २ घास अन्न मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्याचंच एक प्रतिनिधिक उदाहरण एका भिकारणीच्या माध्यमातून देऊन लेखकांनी सामाजिक भान जपण्याचा संदेश "अपराधीपणा" या कथेतून दिला आहे. भटके आयुष्य जगणारी आणि भीक मागून खाणारी एक जमात 'डवरी' यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी कथा "एका मड्याची भटकंती". मृत्यूनंतर आपल्यातीलच एकाचा मृतदेह सोबत घेऊन फूटभर जागेसाठी मैलोंमैल करावी लागणारी या लोकांची पायपीट मन पिळवटून टाकते.

या संग्रहातील शेवटची कथा "परत्या" फिरते एका असहाय मातेभोवती. काळीज पिळवटून टाकणा-या एका विलक्षण मातेची ही कथा. घरातील दारिद्र्याला कंटाळून वडिलांकडून जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा धुरपी शहरात येते तिथून ही कथा चालू होते. नवऱ्याकडून फसवलं गेल्यानंतर होणारी तिची फरफट आपल्या सामाजिक मूल्यांबद्दल आपल्याला खूप काही सांगून जाते. आपली पुरुषप्रधान व्यवस्था भुलभुलैय्याचा मार्ग वापरून, तर कधी स्वप्नांचे मृगजळ तयार करून, तर कधी वासनेची शिकार बनवून अनेक स्त्रियांना नको असताना 'गर्भदान' करते. पुढे गर्भाला अंकुर फुटायला लागला, पाय फुटायला लागले, की मग महागंभीर प्रश्न तयार होतात. या प्रश्नांचे डंख असह्य झाल्यानंतर काही जणी गर्भाचा देठच खुडून टाकतात, काही जणी गर्भच फेकून देतात, तर काही जणी गुपचूप त्या गर्भाचा गोळा विक्रीला काढतात. विक्री झाल्यानंतरही जेव्हा काळीज तडफडायला लागतं, समाजाचा दबाव वाढायला लागतो तेव्हा हात-पाय हलवणारा आपला गर्भगोळा परत आणणाऱ्या स्त्रियाही काही कमी नाहीत. अशाच पुरुषप्रधान संस्कृतीची बळी पडलेली या कथेची नायिका 'धुरपी'. पोटचा गोळा विकणारी आणि त्याला परत आणून झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप करणारी 'धुरपी' उत्तम कांबळे यांनी खूप ताकदीने या कथेत साकारली आहे. 

एक संवेदनशील आणि वाचनिय कथासंग्रह.




संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये