लेखक : अनिल अवचट
प्रकाशक : मौज प्रकाशन
अनिल अवचट हे सामाजिक क्षेत्रात काम करणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व! डॉक्टर, पत्रकार, लेखक आणि समाजसेवक म्हणून समाजात परिचित असले तरी ते खास ओळखले जातात पुण्यातील येरवडा येथे त्यांनी चालू केलेल्या व्यसनमुक्ती केंद्र, "मुक्तांगण"मुळे. मुक्तांगणमधे येणाऱ्या विविध व्यसनी लोकांवर उपचार करून त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण आपल्या समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते इथे बऱ्याच लोकांना व्यसनापासून परावृत्त करून समाजात ताठ मानेनं उभं करायचं काम करत आहेत. अशा समाजकार्यासोबतच साहित्यक्षेत्रातील त्यांचं योगदानसुद्धा भरपूर मोलाचं आहे. आजपर्यंत त्यांची जवळपास २२पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि समाजातील उपेक्षित लोकांप्रती असणारी त्यांची भावना त्यांच्या प्रत्येक पुस्तकातदेखील उतरली आहे. त्यामुळेच त्यांच्या बऱ्याच पुस्तकांचा विषय हा नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी झालेल्या असहाय्य लोकांना नजरेसमोर ठेऊन मांडला गेला आहे. अशाच पुस्तकांच्या पंक्तीमधील मन सुन्न करणारं, वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं, प्रत्येक ठिकाणाहून हाकललं जाणं हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र आहे अश्या कष्टकरी, नडलेल्या, आपल्याच समाजातील एका वेगळ्या समाजचं दर्शन घडवून आणणारं एक पुस्तक "माणसं". हमाल, भंगी, वेश्या, ऊसतोड कामगार, धार्मिक भोंदूगिरी करणारे अशा कितीतरी समाजात असून नसलेल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारं हे पुस्तक. अनिल अवचट यांचं "माणसं" हे पुस्तक त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पाच लेखांचा संग्रह आहे. जन्माला आल्यामुळे केवळ जगत राहणं आणि जगण्यासाठी म्हणून एखाद्या जनावरापेक्षा जास्त राबत राहणं एवढंच आयुष्य असणाऱ्या समाजातील काही लोकांची ही करुण कहाणी. अंगातील धग जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत फक्त मेहनत आणि शेवटी खाटिकखान्यात पोहचलेल्या एखाद्या ढोरासारखं मरण हेच ज्यांच्या पाचवीला पुजले आहे असे काही आपल्याच आजूबाजूला असणारे लोक, मग ते गावाकडे मानाने जगणारे पण दुष्काळग्रस्त झाल्याने देशोधडीला लागणारे लोक असोत की जन्मभर कशाकशाची ओझी वाहत त्या ओझ्यांखाली पिचत रहाणारे हमाल असोत, शहरात उदारनिर्वाहसाठी येऊन नरकावस्थेतील झोपडपट्ट्यांमधे रहाणारे लोक असोत की रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा घेऊन जगायची धडपड करणारे लोक असोत किंवा डोंबारी, कोल्हाटी, मदारी, फासेपारधी अशा अनेक दुर्लक्षित लोकांचं आयुष्य असो. अनिल अवचट यांचं "माणसं" ही अशा सर्वांची कथा आहे. १९८० साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात अशा समाजाचं जे आयुष्य अवचट यांनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याची आजच्या सामाजिक परिस्थितीशी तुलना केली तर म्हणावा तसा फरक या लोकांच्या आयुष्यात नाहीच पडला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपला या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन! 'हे असेच लोक आहेत आणि हे असंच जगत राहणार' या एकाच नजरेने त्यांच्याकडे पाहिलं गेल्यानं ते नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहत आले आणि त्यांची एक माणूस म्हणून जगण्यासाठी चालू असणारी धडपड कधी समोर आलीच नाही. परंतु अनिल अवचट यांचं "माणसं" मधे आपला हा दृष्टिकोन बदलण्याची ताकत नक्कीच आहे.
अनिल अवचट यांनी "माणसं" मधून केलेलं आपल्याच आजूबाजूला असून देखील एक समाज म्हणून मुख्य प्रवाहापासून नेहमीच वेगळं आयुष्य जगणाऱ्या अनेक जाती, जमाती आणि लोकांचं दर्शन वाचकाच्या मनाला चटका लावून जाते. "माणसं", "कोण माणसं...कोण जनावरं", "वस्त्या माणसांच्या", "अनिकेत" आणि "अंधेरनगरी निपाणी" या पाच लेखांतून समोर आलेल्या लोकांचं आयुष्य वाचत असताना पानापानावर सतत जाणीव होत राहते की आपण किती नशिबवान आहोत जे आपल्या वाट्याला असं आयुष्य नाही आलं परंतु मनाच्या एका कोपऱ्यात तितकंच वाईटही वाटतं की एखाद्याच्या वाट्याला इतकं हालाखीचं आयुष्य कसं येऊ शकतं? तेही जगताहेत आणि आपणही जगत आहोत पण दोन्ही जगण्यातला विरोधाभास वाचकाच्या मनाला अक्षरशः घरे पाडतो. याचं श्रेय अवचट यांच्या ओघवत्या भाषेलादेखील दिलं पाहिजे कारण त्यांच्या प्रत्येक लेखासोबत वाचक जणू काही वहावत जातो. पुस्तकामधे तंबाखूच्या गोदामात काम करणाऱ्या, मिरचीच्या किंवा सिमेंटच्या गोदामात पोत्यांच्या थप्प्या लावणाऱ्या कामगारांच्या हालअपेष्टांचं जे वर्णन अवचट यांनी केलेलं आहे ते अंगावर शहारे आणणारं आहे. शिवाय दुष्काळी भागातील आपलं घरदार विकून दोनवेळच्या पोटाचा प्रश्न मिटावा म्हणून बायकामुलांसह शहराकडे आलेल्या शेतकऱ्यांचे हाल वाचकाच्या डोळ्यात अश्रू घेऊन येतात. गावकडचं घरदार विकून आल्यामुळे परतही जाता येत नाही आणि शहरी वातावरणाशी जुळवूनही घेता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या व्यक्तीच्या वाट्याला येणाऱ्या आयुष्याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भंग्यांच्या आयुष्यावर त्यांनी टाकलेला प्रकाश वाचताना अंगावर काटा येतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुस्तकातील प्रत्येक समाजातील लोकांमध्ये प्रत्यक्ष मिसळून त्यांचं आयुष्य जवळून पाहिल्यानंतर अवचट यांनी त्याला पुस्तकबद्ध केलेलं आहे त्यामुळे या "माणसांच्या" आयुष्याची दाहकता अजूनच जाणवत राहते.
समाजातील दुर्लक्षित अशा लोकांप्रती असणारे आपले विचार बदलवणारे आणि प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं पुस्तक "माणसं".
संदीप प्रकाश जाधव