Monday, May 3, 2021

"परत्या"

 



लेखक : उत्तम कांबळे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

उत्तम कांबळे यांच्या "काळजात धावतोय ससा" नंतर त्यांचं  "परत्या" हे दुसरं पुस्तक आज वाचनात आलं. दोन्ही पुस्तके वाचताना मनाला भावणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या लिखाणातील साधेपणा. अगदी सहज सुंदर भाषेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधूनच साकारलेली त्यांची पुस्तके म्हणूनच मनाला भुरळ घालतात. "काळजात धावतोय ससा" हा कथासंग्रह त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या विविध लोकांना आलेल्या अनुभवांच्या कथांनी सजला आहे ज्यामध्ये उत्तम कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व आगतिकता अतिशय संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे जी वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देणारा, ज्वलंत अशा सामाजिक विषयांना हात घालत असताना सोबतच वाचकालासुद्धा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आणि काही काही पानांवर मन सुन्न करणाऱ्या घटनांनी साकारलेला आणखी एक कथा संग्रह "परत्या". ११९ पानांच्या या छोट्याशाच कथासंग्रहातील एकूण ९ कथा या मुख्यतः दलित आणि अतिशय दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांभोवती फिरणाऱ्या आहेत. प्रत्येक कथेचा  आशय जरी वेगळा असला तरी त्यातून दिला जाणारा संदेश एक समाज म्हणून आपण कुठे आहोत आणि कुठे असलं पाहिजे याचा विचार करायला लावतो. साध्याच गोष्टी ज्या आपण आपल्या आसपास वेगळ्या पद्धतीने अनुभवल्या देखील असतील पण उत्तम कांबळेंच्या लिखाणाची शैलीच अशी आहे की या कथा वाचत असताना डोळ्यासमोर त्या घटना उभ्या राहतात ज्या वाचकाच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या करून जातात. माणूस म्हणून आपण कितीही प्रगती केलेली असली तरी आजही लहान लहान खेड्यांमध्ये जातिव्यवस्थेच्या नावाखाली घडणाऱ्या काही काही घटना एक समाज म्हणून आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे हेच सांगून जातात. याचंच एक प्रातिनिधिक चित्र आपल्याला उत्तम कांबळेंच्या "परत्या" मधील काही कथांमध्ये वाचायला मिळेल. "नवं स्मशान", "जातीचा मुका मार", "किरळ", "संस्कार", "टेडी बेअरचे डोळे", "जखमा", "अपराधीपणा", "एका मड्याची भटकंती" आणि "परत्या" या ९ कथांमधून उत्तम कांबळेंच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. 

पहिली कथा "नवं स्मशान" फिरते एका अतिशय गरीब, दलित कुटुंबातील १५ वर्षीय मुलाच्या मृत्यूभोवती. विटांनी भरलेल्या ट्रॉलीखाली चिरडून झालेल्या अपघातानंतर सिद्धार्थ या अतिशय होतकरू तरुणाचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर फक्त पंचनाम्यासाठी तसाच ट्रॉलीखाली तब्बल ३० तासांहून अधिक वेळ पडून राहिलेला त्याचा मृतदेह अशी विदारक पार्श्वभूमी असणारी ही कथा. दलित म्हणून असणारा शिक्का आणि स्मशानासाठी देखील दुसऱ्यांच्या जमिनीवर अवलंबून राहणारा हा समाज सिद्धार्थचा मृतदेह हाती लागल्यानंतरसुद्धा त्याच्या दफनविधीसाठी संघर्ष करत राहतो. शेवटी स्वतःच्या जागेत दलित समाजाची वेगळी स्मशानभूमी उभी करायचा निश्चय करून होणारा कथेचा शेवट. आपल्या समाजात जातीव्यवस्था किती खोलवर रुजली आहे आणि स्वार्थी राजकारणापायी याबाबतीत आपली न्यायव्यवस्था कशी कमजोर होऊन गेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दुसरी कथा "जातीचा मुका मार". दिपक कुरणे हा दलित समाजातील मुलगा स्वकर्तुत्वावर शिकून सनदी अधिकारी बनतो, नवनवीन योजनांच्या माध्यमातून स्वतःच्या गावचा विकास करतो पण गावातील जत्रेत देवाच्या पालखीला हात लावल्याचे निमित्त होऊन त्याला जातिव्यवस्थेचा असा काही दणका बसतो की न्याय मिळवण्यासाठी तब्बल २५ वर्षें संघर्ष करून देखील त्याच्या हाती काहीच लागत नाही. कथा संपत असताना डोक्यात एकच विचार ठेऊन संपते की इतक्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत असं होत असेल तर बाकी दलित समजातील लोकांची काय अवस्था असेल. तिसरी कथा "किरळ" ही दुष्काळाने होरपळत असणाऱ्या गावातील एका डोळ्याने अंध जनी या म्हातारीची. दुष्काळामुळे गाव सोडून शहरात गेलेल्या आपल्या मुलांच्या आठवणीत गावात एकटीच राहणारी जना. सोबत देवाला सोडलेला एक बोकड आणि अधून मधून थेंबभर दूध देणारी एक शेळी. तिचा अशा अतिशय कठीण परिस्थितीत जगण्यासाठीचा संघर्ष आपल्याला ऊर्जा तर देतोच पण जनाच्या एकुलत्या एक शेळीच्या दुर्दैवी मृत्यूने होणारा कथेचा शेवट मनाला चटका लावून जातो. जातीधर्माच्या पलिकडे जाऊन ब्राह्मण - दलित कुटुंबातील दोन मुलांची मैत्री आणि पालकांकडून मुलांवर होणाऱ्या संस्काराचे महत्व सांगणारी कथा "संस्कार". कथेच्या नायकाला एका अंध मुलीकडून विचारला जाणारा हळवा प्रश्न "टेडी बेअरचे डोळे" मला चालतील का हा नायकासोबतच वाचकालादेखील काही क्षण स्तब्ध करून विचारात पाडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या "जखमा" मनाला देऊनच जातात. आंतरजातीय प्रेमविवाहानंतर झालेला घटस्फोट नायकाच्या मनावर खोलवर "जखमा" देऊन जातो तसाच वेश्याव्यवसाय करून आपले पोट भरणाऱ्या एका स्त्रीने स्वतःहून करून घेतलेल्या "जखमा" यांपैकी कोणती जखम जास्त त्रासदायक या विचारात संपणारी ही कथा. समाज म्हणून जगत असताना आपण त्या समाजाचे काहीतरी देणे लागत असतो, आपण जेव्हा पोटभर जेवत असतो त्याच वेळी बाहेर असे लाखो जीव असतात जे २ घास अन्न मिळवण्यासाठी धडपडत असतात. त्याचंच एक प्रतिनिधिक उदाहरण एका भिकारणीच्या माध्यमातून देऊन लेखकांनी सामाजिक भान जपण्याचा संदेश "अपराधीपणा" या कथेतून दिला आहे. भटके आयुष्य जगणारी आणि भीक मागून खाणारी एक जमात 'डवरी' यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी कथा "एका मड्याची भटकंती". मृत्यूनंतर आपल्यातीलच एकाचा मृतदेह सोबत घेऊन फूटभर जागेसाठी मैलोंमैल करावी लागणारी या लोकांची पायपीट मन पिळवटून टाकते.

या संग्रहातील शेवटची कथा "परत्या" फिरते एका असहाय मातेभोवती. काळीज पिळवटून टाकणा-या एका विलक्षण मातेची ही कथा. घरातील दारिद्र्याला कंटाळून वडिलांकडून जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा धुरपी शहरात येते तिथून ही कथा चालू होते. नवऱ्याकडून फसवलं गेल्यानंतर होणारी तिची फरफट आपल्या सामाजिक मूल्यांबद्दल आपल्याला खूप काही सांगून जाते. आपली पुरुषप्रधान व्यवस्था भुलभुलैय्याचा मार्ग वापरून, तर कधी स्वप्नांचे मृगजळ तयार करून, तर कधी वासनेची शिकार बनवून अनेक स्त्रियांना नको असताना 'गर्भदान' करते. पुढे गर्भाला अंकुर फुटायला लागला, पाय फुटायला लागले, की मग महागंभीर प्रश्न तयार होतात. या प्रश्नांचे डंख असह्य झाल्यानंतर काही जणी गर्भाचा देठच खुडून टाकतात, काही जणी गर्भच फेकून देतात, तर काही जणी गुपचूप त्या गर्भाचा गोळा विक्रीला काढतात. विक्री झाल्यानंतरही जेव्हा काळीज तडफडायला लागतं, समाजाचा दबाव वाढायला लागतो तेव्हा हात-पाय हलवणारा आपला गर्भगोळा परत आणणाऱ्या स्त्रियाही काही कमी नाहीत. अशाच पुरुषप्रधान संस्कृतीची बळी पडलेली या कथेची नायिका 'धुरपी'. पोटचा गोळा विकणारी आणि त्याला परत आणून झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप करणारी 'धुरपी' उत्तम कांबळे यांनी खूप ताकदीने या कथेत साकारली आहे. 

एक संवेदनशील आणि वाचनिय कथासंग्रह.




संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये