Sunday, October 31, 2021

"उद्या"

 


लेखक : नंदा खरे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २८५, मूूल्य- ३०० रुपये.

'मनुष्य हा प्रगतशील प्राणी आहे' हे लहान असताना शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेलं वाक्य! आज माणसाच्या आयुष्यात हरघडी काही न काही नवीन शोध लागून त्यामार्फत अविरतपणे त्याची प्रगती चालू आहे. इतिहासावर नजर टाकली तर मागच्या १०० वर्षांत माणसाने अफाट प्रगती केली आहे, खास करून या एका शतकाच्या उत्तरार्धात माणसाने केलेली प्रगती अविश्वसनीय अशी आहे. आज अगदी सामन्यातला सामान्य माणूस घरबसल्या अशा अनेक गोष्टी करू शकतो ज्याचा २०-२५ वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल. या पावलापावलावर होत जाणाऱ्या प्रगतीने मानवी आयुष्य अधिकाधिक सुखकर होत चालले आहे यात शंकाच नाही परंतु सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी प्रगती भविष्यात संपूर्ण मानवजातीलाच आव्हान ठरू शकते हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोठमोठया शास्त्रज्ञांनी या भविष्यातील धोक्याची कल्पना आधीच देऊन ठेवली आहे शिवाय आपण नक्की कुठं थांबलं पाहिजे हे ठरवूनच आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आली आहे हेदेखील वेळोवेळी सांगितलं जातं. कारण माणसाची ही उत्तरोत्तर होणारी प्रगती जितकी 'तारक' आहे तितकीच ती 'मारक' आहे याची बरीच उदाहरणे आज मिळतील. हे सर्व लिहायचे कारण म्हणजे अलीकडेच माझ्या वाचनात आलेली नंदा खरे यांची एक अतिशय उत्तम कादंबरी "उद्या"! मानवाच्या प्रगतीला डोळ्यासमोर ठेऊन भविष्याचा वेध घेऊन लिहिलेली नंदा खरे यांची ही कादंबरी "उद्या"! नजीकच्या भविष्यकाळातलं एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं हे या कादंबरीतून डोकावतं. माणूस करत असलेल्या प्रगतीमुळे येऊ घातलेला भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदा खरे यांनी “उद्या” मध्ये विविध गोष्टींची सांगड घालून, आपल्या स्वातंत्र्यावर कशाप्रकारे अतिक्रमण होऊ शकतं हे खूप स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्यासाठी नंदा खरे यांनी आठ प्रकरणांतून ही कादंबरी उलगडत नेली आहे. "अस्तित्व", "सर्व्हलन्स", "लोगो न् पेनं", "जंगलात शेतं",  "बचके कहाँ जाओगे", "मुळं-पारंब्या", "लांडगेतोड" आणि "कुत्रे" अशा अतिशय सूचक शीर्षकांतून उलगडत जाणाऱ्या, मानवी अस्तित्वावरच प्रशचिन्ह उभं करणाऱ्या भविष्यवेधी कथांमधून ही कादंबरी आकार घेते. माणसाचं आयुष्य आज इतकं वेगानं बदलतंय की एखाद्या वर्षातच बऱ्याच गोष्टी कालबाह्य वाटायला लागल्या आहे, रोज-रोज बदलत जाणारं तंत्रज्ञान माणसाची मुळं उखडून एका वेगळ्या भूमीत, विश्वात रुजायला भाग पाडतंय. आजवर स्थलकाळातीत मानली जाणारी अनेक मूल्यं प्रगतीच्या या वावटळीत पाचोळ्यासारखी उडून गेली आहेत. कधी काळचं आपलं स्थिर जगणं विसरून माणूस आज या गतीमान प्रगतीचाच एक भाग झाला आहे. आपलं आजचं, उद्याचं आणि असलोच तर परवाच्याही आयुष्याचा विचार करून नंदा खरे यांनी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कादंबरी "उद्या" मधून. “उद्या” कांदबरीत भविष्यातील विविध पात्रांच्या जीवनात, प्रगतीच्या नावाखाली त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील आर्थिक ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे माणसाचे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं पहायला मिळते. लोकांच्या जीवनातील प्रेम, करुणा या भावनेचे स्थान आता जवळपास नाहीसं झालेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे समाजात मोठ्या प्रमाणात वाढलेली गुन्हेगारी. निसर्गात कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्रीवर या सर्वांचा होणार वाईट परिणाम आणि अशा परिस्थितीत स्त्रियांचे एकट्याने बाहेर पडण्याचे हिरावलेलं स्वातंत्र्य. नियंत्रणाबाहेर गेलेल्या लोकसंख्येत आपलं अस्तित्व प्लास्टिक कार्डापुरतं मर्यादित होत जाणं. रोल नंबर्स, बारकोड्स, वेगवेगळी प्रकारची कार्डच्या माध्यमातून मानवी आयुष्य चिन्हरूप, अंकरूप होत जाणं. या अपरिहार्य स्थितीत आपल्या अस्तित्वाचा कोंब त्यातल्या सत्त्वानिशी जपायचा कसा हा कळीचा प्रश्न घेऊन जगणारी ही भविष्यातील "उद्याची" पात्रे. नंदा खरेंची ही कादंबरी वाचत असताना बऱ्याच वेळा यातील अनेक गोष्टी "उद्याच्या" नसून आजच घडताहेत की काय असा भास होतो. भविष्यकाळातील एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं आणि त्यामधे अगदी अलगद अडकत जाणारा माणूस हे या कादंबरीचं मुख्य कथानक आहे. माणसाकडूनच निर्माण झालेल्या या जाळ्यात जितक्या तांत्रिक सुखसोयी उपलब्ध आहेत, तितकीच तांत्रिक पातळीवर प्रत्येक माणसावर पाळत ठेवली जात आहे. इथे प्रचंड प्रमाणात सर्वेलन्स आहे, सर्वत्र कॅमेरे आहेत, चेहऱ्यांवरचे बारीक हावभाव ओळखण्याचं सॉफ्टवेअर आहे, 'अस्तित्व कार्डा'सारख्या तांत्रिक सेवांतून जीवनाचं, अस्तित्वाचं प्रचंड केंद्रीकरण, एकीकरण झालं आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसाच्या आयुष्यातून निघून गेलेला खाजगीपणा. प्रत्येक संभाषण, प्रत्येक देवाण-घेवाण हे सगळं कॅमेऱ्यांना लक्षात घेऊनच करावं लागतं. सर्वेलन्स दैनंदिन जीवनात किती मुरलाय याचं वर्णन कादंबरीत काही ठिकाणी अगदी सहज आलं आहे. राज्यव्यवस्था आणि भांडवलदारांची म्हणावी तर स्वतंत्र वर्तुळं आणि उतरंडी आहेत, पण त्यांच्यातली रेषा धूसर आहे. लोकशाही तत्त्वाला धरून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या पदांवर एकाच छोट्या, सत्ताधारी वर्तुळातली तीच तीच माणसं आलटून-पालटून बसतात. राज्य कुठे संपतं आणि कॉर्पोरेशन कुठे सुरू होते, हे सांगणं अशक्य झालं आहे. तीच परिस्थिती संरक्षणव्यवस्था आणि सर्वेलन्स मधली. आम जनतेला पोलिसांकडून संरक्षण कमी आणि तिच्यावर पाळत ठेवणं जास्त जातंय. या सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींचं होणारं 'हंटिंग', स्त्रियांचं घटत जाणारं प्रमाण. याचाच फायदा घेऊन ठिकठिकाणी श्रीमंतांना बायका-सुना-वेश्या म्हणून मुली पुरवण्यासाठी अनेक राजकीय दलं आणि अधिकारी यांचा चालणारा "कारभार". परंतु सिस्टिमवर 'भरोसा' ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याने नंदा खरेंच्या "उद्या" मधील सर्व पात्रे नाईलाजाने हे सर्व सहन करत आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांतून निरनिराळ्या पातळ्यांवर, खेड्यांपासून महानगरांपर्यंत, सगळेच समाजातले घटक या जाळ्यात कसे अडकले आहेत हे नंदा खरे यांनी अतिशय तपशिलात मांडलं आहे. समाजातील वेगवेगळ्या वर्तुळांत राहणारी कादंबरीतील पात्रे हळूहळू एकत्र येऊन कादंबरीची "उद्याची" कथा पूर्णत्वास येते.

कुत्रीचं एक पिलू आईची नजर चुकवून रस्त्यावर गेलं, मोठी कार भरपूर आवाज करत येत होती. पिलू घाबरून चारी पाय फाकवून रस्त्यावर पसरलं. आई ताठरली, जास्त सावध झाली. गाडी गेली, पिलाच्या दोन्ही बाजूने गेली, योजनापूर्वक नव्हे, सहज. पिलू उठून आईकडे पळालं, आज-आत्ता वाचलंही, पण उद्या...? उद्या कशावरून वाचेल? नंदा खरेंच्या "उद्या" या कादंबरीचा हा शेवट वाचकाला फक्त प्रश्नच विचारात नाही तर भविष्यात येऊ घातलेल्या संकटाची भीतीदायक कल्पना देणारा आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण आज खरोखर कुठल्या दिशेने जात आहोत आणि त्याचा भविष्यात आपल्या आयुष्यावर, येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होऊ शकतो याचा प्रत्यय घेण्यासाठी प्रत्येकाने वाचावी अशी कादंबरी "उद्या"! आज आपण वाचूही पण उद्या......?? उद्याचे काय??






संदीप प्रकाश जाधव

Monday, October 25, 2021

"परिशोध"

 




लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २१२, मूूल्य- २२० रुपये


डॉ. एस. एल. भैरप्पा! "साक्षी", "आवरण", "उत्तरकांड", "पारखा" आणि आता "परिशोध"! जितकं वाचत जावं तितकं अधिकच वाचक त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडेल असे विषय! आजपर्यंत त्यांची वरील जी पुस्तके मी वाचली ती सगळीच वाचकाला त्याच्या वैचारिक पातळीच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारी आहेत हे जाणवलं! प्रत्येकवेळी एक काहीतरी दर्जेदार वाचन केल्याचा अनुभव देणारे विषय! वाचकाच्या मन आणि मेंदूवर ताबा घेणारे त्यांच्या हर-एक पुस्तकातील विषय मानसिक पातळीवर न संपता वाचकाला नेहमी अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. "अन्वेषण" या मूळ कन्नड कादंबरीचा सौ. उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ही कादंबरी "परिशोध"! "अन्वेषण" चा शब्दशः अर्थ "शोध". ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे मानवी जीवनाच्या "परिशोधाची" आणि भैरप्पांनी हा शोध विश्वनाथ अरसीकेरे या अनाथ मुलाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणला आहे. ‘मरण समजल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही. आत्महत्त्या करावी इतकं उत्कट दु:खही कधी आयुष्यात जाणवलं नाही. मग मला जीवनाची किंमत ठाऊक आहे असं म्हणता येईल काय?’ या प्रश्नात कादंबरीच्या कथेचे सार आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे, भैरप्पांनी विश्वनाथचा हा शोध त्याच्या स्वतःच्या तोंडून नव्हे तर त्याच्या आयुष्यात आलेल्या विविध लोकांच्या अनुभवातून उलगडत नेला आहे. जक्काजी मास्तर, रंगनाथ स्वामी, गंगण्णा, सुनंदा, हेडमास्तर, देशपांडे वकील अशा अनेकांच्या जीवनात काही काळ विश्व येऊन जातो आणि यातला प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या शोधातून साकारलेली, जीवनातील गुंतागुंत दर्शवणारी ही कादंबरी "परिशोध"! एका जीवघेण्या संघर्षाचा अविरत चाललेला शोध म्हणजे ही कादंबरी "परिशोध"!

वयाच्या ९-१० व्या वर्षीच आई-बहीण-आजी यांचा प्लेगच्या साथीत झालेला मृत्यू आणि पुढे वडिलांनी केलेल्या दुसऱ्या लग्नानंतर अनाथ झालेला 'विश्वा' अर्थातच 'विश्वनाथ'! घर आणि गाव सुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात शेजारच्या गावातील एका जंगमाकडून त्याचा सांभाळ सुरू होतो. जंगमाच्या आधाराने रुळावर येणारी विश्वाच्या आयुष्याची गाडी पूर्णपणे भरकटून जाते ती जंगमाच्या मृत्यूनंतर! नंतर पोटासाठी त्याचा प्रवास चालू होतो वेगवेगळ्या गावांतून. याच प्रवासादरम्यान त्याच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांच्या निवेदनातून "विश्वाचे" आयुष्य वाचक अनुभवत राहतात. सुरूवातीला कंठीजोईस म्हणजेच विश्वनाथच्या आजोबांपासून सुरू झालेला या शोधाचा प्रवास विश्वनाथच्या शाळेतील मुख्याध्यापकांपर्यंत येऊन थांबतो. वेगवेगळी वळणे घेत जाणारा, विश्वाच्या माध्यमातून वाचकाला विचारमग्न करणारा हा प्रवास माणसा माणसातील नातेसंबंध आणि स्त्री-पुरुष संबंधातीळ पीळ उलगडून तर दाखवतोच पण सोबतच माणसाच्या मनात सतत चाललेल्या नैतिक- अनैतिकतेच्या द्वंद्वावरसुद्धा विचार करायला भाग पाडतो. जंगमाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे आधार हरवलेल्या विश्वाने केलेले आत्महत्येचे प्रयत्न, अनपेक्षितपणे मिळालेल्या शरीरसुखाच्या अनुभवाने त्याला पुन्हा एकदा जगण्याची निर्माण झालेली इच्छा, देशपांडे वकिलांच्या घरी काम करून रहायला जाणे आणि त्यादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर कोणालाही न सांगता त्याचं तिथून निघून जाणं, नाटक कंपनीतील नोकरी, मुंबईत व्हिक्टोरिया (घोडागाडी) चालक म्हणून काम करत असताना वेश्यावस्तीतील त्याचा मुक्काम, साधुच्या मठातील वास्तव्य, शिक्षण घेता येण्याच्या आशेने केलेले लग्न आणि सासऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे केलेला पत्नीचा त्याग, विश्वाच्या या निर्णयामुळे त्याच्या पत्नीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विश्वाच्या मुलाचा झालेला मृत्यू - अशा क्रमाने विश्वाचे आयुष्य सतत ढवळत राहते, त्याच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो एक गूढ वाटत राहातो. विश्वाच्या या प्रवासात गुंतून गेलेल्या वाचकाच्या मनातही नकळत विश्वाचा ‘शोध’ चालू होतो. जगणे, उपभोग घेणे, सुख मिळविणे, यशस्वी होणे या सर्वसामान्य माणसाला हव्या असणाऱ्या गोष्टी विश्वाला मोहवू शकत नाहीत की गुंतवून ठेवू शकत नाहीत. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न विश्वा करत राहतो. या प्रयत्नाला वाचक त्याच्या आयुष्यातीलच एखादे पात्र असल्याप्रमाणे सुरुवातीपासूनच चिकटून राहतो. कादंबरीतील शेवटच्या प्रकरणात विश्वनाथच्या दैनंदिनीतील काही उतारे हेडमास्तरांच्या माध्यमातून वाचकांसमोर येतात. विश्वनाथ लिहीत असलेल्या त्याच डायरीतील एक विचार - "आयुष्य रेल्वेसारखं नसलं पाहिजे. रेल्वेत आपण जरी चालक असलो तरी कुणी दुसऱ्याने ट्रॅक बदलला तर आपली दिशा बदलते. आपण फक्त वेग नियंत्रित करू शकतो पण दिशा आपल्या हातात नसते. आयुष्य बस सारखं असलं पाहिजे. दिशा आणि वेग या दोन्हीवर आपलं नियंत्रण असतं. आपल्या आयुष्याची दिशा आपल्याला पाहिजे तिकडे वळवता आलं पाहिजे." जो वाचकाच्या डोक्यात कितीतरी वेळ घोळतच राहतो. वाचक आपल्या आयुष्याला या एका विचारासोबत 'रिलेट' केल्याशिवाय राहूच शकत नाही. शेवटी कादंबरी संपते तीदेखील प्रश्नचिन्हांवरच! विश्वाला प्रत्यक्ष भेटायचं आणि त्याच्याकडूनच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची असं ठरवणारे हेडमास्तर स्वत:लाच प्रश्न विचारतात - 'समोर बोलत असतानाही विश्वा आपल्याला कितपत सत्य सांगू शकेल? आणि 'त्यातलं मी किती जाणू शकेन?' या प्रश्नांसोबतच वाचकाला विचारात गुंतवून भैरप्पांनी मानवी आयुष्याचा हा न संपणारा "परिशोध" थांबवला आहे.

संग्रही घेऊन आवर्जून वाचावी अशी कादंबरी!





संदीप प्रकाश जाधव

Saturday, October 16, 2021

"आग्ऱ्याहून सुटका"

 



लेखक : डॉ. अजित जोशी

प्रकाशक : शिवप्रताप प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २९२, मूूल्य- ३३० रुपये.


तसे पहायला गेले तर शिवचरित्रातील प्रत्येक घटना ही स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे. आजपर्यंत बऱ्याच लेखकांनी शिवचरित्रातील घटनांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्यादेखील लिहिल्या ज्याच्या माध्यमातून त्यांनी इतिहासाचे अनेक पैलू लोकांसमोर उलघडून दाखवले. कादंबरीच्या स्वरूपात मांडलेल्या अशा ऐतिहासिक घटना आणि पात्रे जरी प्रेरणादायी असले तरी त्यांना नेहमीच एक कल्पनेची जोड असते, त्यामुळे कादंबरीतून मांडलेला इतिहास हा पूर्णपणे खरा कधीच मानता येत नाही परंतु तो सत्याच्या अधिक जवळ जाणारा असतो असं नक्कीच म्हणता येईल. इतिहासाचं जतन न केल्याने म्हणा अथवा तटस्थपणे न लिहिला गेल्याने म्हणा स्वराज्याचा, शिवरायांचा, संभाजी महाराजांचा बराचसा इतिहास हा एकतर अंधारातच राहिला किंवा कादंबऱ्यांतील काही काल्पनिक घटनांनाच खरा इतिहास मानला गेला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर संशोधनात्मक लिखाण खूपच कमी झाले आहे हेदेखील त्यामागील एक कारण आहे असं म्हटलं तरी चालेल. शिवचरित्रात अनेक अद्भुत, थरारक, रोमांचकारी प्रसंग आहेत आणि त्यातीलच एक सर्वांत चित्तथरारक प्रसंग म्हणजे औरंगजेब बादशहाच्या आग्ऱ्यातील नजरकैदेतून महाराजांची झालेली सुटका. फक्त मराठे किंवा स्वराज्याच्याच नाही तर अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुघल आणि स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग! मिर्झाराजा जयसिंग याच्याबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात स्वराज्याचा बराच मोठा मुलुख, बरेच किल्ले मुघलांना द्यावे लागले. अशा परिस्थितीत जर शिवाजी महाराज कायमचे आग्ऱ्यात अडकले गेले असते तर हे श्रीं चे राज्य उभे तरी राहिले असते का? आणि याचीच दुसरी बाजू, जर महाराज तिथेच अडकून पडले असते तर औरंगजेबाला आपल्या आयुष्याच्या शेवटची जवळपास २७ वर्षें दख्खनेत घालवावी लागली असती का? त्याला याच दख्खनच्या मातीत गुडघे घासत जीव सोडावा लागला असता का? हे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. औरंगजेबाच्या तोंडून निघालेलं वाक्य, "हमारी जिंदगी की सबसे बडी गलती यह है की हमनें सिवा को आगरा से भागने दिया"! हे सांगण्यास पुरेसे आहेत की इतिहासावर या एका घटनेचा किती मोठा प्रभाव आहे आणि याचा काय परिणाम झाला आहे. औरंगजेबासारख्या महाकपटी, धूर्त बादशहाच्या कडेकोट पहाऱ्यातून महाराज आपले सर्व सहकारी आणि संभाजी महाराजांसोबत सहीसलामत कसे निसटले असतील या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सध्या सर्वमान्य असणारी "मिठाईच्या पेटाऱ्यांची कथा"! महाराज आग्ऱ्याच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून संभाजी महाराजांसोबत पळाले असेच आपण आजपर्यंत ऐकत, वाचत आलो. परंतु खरंच महाराजांना संभाजी महाराजांसोबत पेटाऱ्यातून पळून जाणं शक्य होतं का? हा विचारच आपण कधी केला नाही. शिवाजी महाराजांच्या इतर मोहिमांवर नजर टाकली तर नेहमी काळाची पावले ओळखून आपली वाटचाल करणारे महाराज हा पेटाऱ्यांचा, जोखमीचा मार्ग निवडून त्या नजरकैदेतून सुटतील हे मनाला पटत नाही. शिवाय एकाचवेळी स्वराज्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा जीव (महाराज स्वतः आणि संभाजी महाराज) धोक्यात घालण्यासारखे पाऊलदेखील महाराज उचलतील का? हासुद्धा एक प्रश्नच आहे. शिवाय आग्ऱ्यातून सुटल्यानंतर महाराज राजगडावर कसे पोहचले? कोणत्या मार्गाने पोहचले? नंतर संभाजी महाराज राजगडावर कसे पोहचले? याच्याही सर्वमान्य अशा सुरस कथा आहेत. आग्ऱ्यातून सुटकेबद्दलचे हे सर्व समज तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत का याचा आपण कधी विचारच नाही केला. "मोठे कारस्थान उपयोगी पडले" हे शब्द आहेत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे! आग्ऱ्यातील नजरकैदेतून सुटकेच्या कटाला खुद्द छत्रपतीच जर "मोठे कारस्थान" म्हणत असतील तर तो कट किती गुंतागुंतीचा आणि कुटील असला पाहिजे याचा फक्त विचारच केलेला बरा. डॉ. अजित जोशी यांनी याच ऐतिहासिक घटनेवर नव्याने सखोल संशोधन करून, जुन्या आणि नव्या ऐतिहासिक पुराव्यांचा पुन्हा एकदा अभ्यास केल्यानंतर, याघटनेदरम्यान तसेच या घटनेपूर्वी झालेल्या बऱ्याच ऐतिहासिक प्रसंगांचा तांत्रिकदृष्ट्या विचार करून जी सांगड घातली आहे त्यातून हे पुस्तक, "आग्ऱ्याहून सुटका" साकारलं आहे. इ. स. १६६६ मध्ये आग्ऱ्यात काय घडले? शिवाजीराजे नजरकैदेत का व कसे अडकले? आग्ऱ्याहून निसटण्यासाठी राजांनी कोणता कट रचला? मुघलांच्या कडेकोट पहाऱ्यातील सैनिकांची दिशाभूल करून महाराज नजरकैदेतून कसे निसटले? त्यांना त्यासाठी बादशहाच्या लोकांपैकी कोणी मदत केली असेल का? महाराज संभाजीराजांसोबत त्या नजरकैदेतून एकाच वेळी, एकाच मार्गाने निसटले की संभाजीराजांना नंतर स्वतंत्रपणे सोडवले गेले? तसे असेल तर संभाजी महाराज नंतर राजगडी कसे पोहचले? या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. अजित जोशी यांनी त्यांच्या नवीन संशोधनाच्या आधारे "आग्ऱ्याहून सुटका" या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे आणि बखरी, तत्कालीन परिस्थिती, संदेशवहन आणि राजकारण तसेच शिवाजी महाराज, औरंगजेब, मिर्झा राजा जयसिंग आणि त्याचा पुत्र रामसिंग यांचे स्वभावविशेष या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून, तर्कशास्त्राच्या आधाराने घेतलेला शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेचा हा थरारक वेध. डॉ. अजित जोशी यांच्या मेहनतीतून साकार झालेला, आवर्जून वाचावा असा एक संशोधनात्मक ग्रंथ "आग्र्याहून सुटका".





संदीप प्रकाश जाधव

Monday, October 11, 2021

"तहान"

 



लेखक : सदानंद देशमुख

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन


                                             पृष्ठे- २०५, मूूल्य- २५० रुपये.

विश्वास पाटलांची "पांगिरा" ही पाण्यासारख्या ज्वलंत विषयाला हात घालणारी, अस्सल ग्रामीण कादंबरी ८-९ महिन्यांपूर्वी वाचली होती. त्यावेळी सदानंद देशमुख यांची "तहान" ही अशाच विषयावरील कादंबरी बऱ्याच लोकांनी वाचायला सुचवली. नंतर "तहान" संग्रही घेतली खरी पण इतर पुस्तके वाचण्याच्या नादात बरेच दिवस तशीच पडून राहिली. अलीकडेच Pustakexpress.Com वर "तहान"चा परिचय वाचल्यानंतर या कादंबरी वाचनाची "तहान" आणखी न वाढवता लगेचच वाचायला हातात घेतली. "तहान" ही कोणत्याही प्रकारची असू शकते सत्तेची, भोगाची, आसक्तीची आणि ती भागवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे जरी खरे असले तरी या गोष्टींसाठी माणूस स्वतःच्या मनाला मुरड घालू शकतो प्रसंगी पूर्णपणे दुर्लक्षसुद्धा करू शकतो परंतु पाणी ही एक अशी गोष्ट आहे जिथे माणूस पूर्णपणे हतबल होऊन जातो. 'पाणी म्हणजे जीवन' हे फक्त पुस्तकांत वाचून माहिती असणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष काय असतं, तहानेने व्याकुळ होणाऱ्या खेड्यांतील लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि पाण्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाण्याशिवाय काय हाल होतात याचं विदारक आणि तितकंच प्रत्ययकारी चित्रण सदानंद देशमुख यांनी "तहान" मधून केलेलं आहे. १-२ बैठकींत पूर्ण होऊ शकणाऱ्या या २०५ पानी छोटेखानी कादंबरीच्या माध्यमातून ज्या मोठ्या आणि गहन विषयाला सदानंद देशमुख यांनी लोकांसमोर मांडले आहे ते खरेच विचार करायला लावणारे आहे. १९९८ साली लिहिल्या गेलेल्या या कादंबरीतील बऱ्याच घटना वाचत असताना आज २०२१ मध्ये महाराष्ट्रातील अशी हजारो खेडी डोळ्यांसमोर येतात जिथे प्रत्यक्ष त्या घटना घडत आहेत. वाचत असताना प्रत्येक पानावर वाचकाच्या मनात एकच विचार येत राहतो की जर हे असंच चालू राहिलं तर पुढच्या पिढीचं भविष्य काय असेल? पाण्याच्या तहानेनं व्याकूळ होणाऱ्या हजारो खेड्यांचं चित्रण पारखेड या गावाला प्रातिनिधिक स्वरूपात घेऊन देशमुख यांनी केलेलं आहे. शहरात राहून आपण टाळत असलेल्या किंवा दुर्लक्ष करत असलेल्या वास्तवाकडे आपल्याला ही कादंबरी खेचून नेते. या गावातील पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष, तळ गाठलेल्या विहिरी, कोरडा धुरळा, पाण्यापायी एका कोवळ्या मुलीचा कोरड्या विहिरीत पडून झालेला मृत्यू, अधम परिस्थितीत तेथील लोकांचं जगणं, खेडे आणि शहर  यांच्यात असणाऱ्या अंतराची होणारी जाणीव, घाणेरडा वास मारत असतानाही नाईलाजास्तव ते पाणी पिऊन जगणारे, आजारी पडणारे लोक हे सर्व कादंबरीतून अनुभवनाऱ्या वाचकाला कादंबरीच्या शेवटी शेवटी हे वातावरण अक्षरशः घेरून टाकते. वाचून झाल्यानंतर कितीतरी वेळ हा विषय, यातील लोक, यातील घटना आपल्या डोक्यात घोळतच राहतात आणि अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. 

पारखेड गावातील शेवाळे या शेतकरी कुटुंबाला प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कादंबरी. कृषिसंस्कृतीचा प्रतिनिधी असणारा राघोजी शेवाळे, बदलणाऱ्या काळानुसार जगलं पाहिजे असं म्हणणारा त्याचा तरुण मुलगा बबन शेवाळे, राघोजीची सतत भांडणारी बायको रामकोर, लग्नाला आलेली तरुण मुलगी वर्षा आणि राघोजीचं जीवापाड प्रेम असणारी एक बैलजोडी मुरल्या-छबिल्या यांच्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून सदानंद देशमुख यांनी हा पाण्यासारखा गंभीर विषय मांडला आहे. "तहान" ही कादंबरी पाण्याच्या या दुर्भिक्षासोबतच दोन पिढ्यांचा संघर्षदेखील चित्रित करते. आपल्या शेतात राबणारी आपली बैलजोडी ही आपल्या संसाराचा अविभाज्य भाग आहे अशी श्रद्धा असणारा राघोजी! आपलं आयुष्य हे या दोन बैलांच्या जीवावर चाललं आहे याची जाणीव ठेवून त्यांना जीवापाड जपणारा राघोजी हा छबिल्या आणि मुरल्या यांच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. याउलट केवळ आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टीने या बैलांकडे पाहणारा त्याचा मुलगा बबन! पाणीटंचाईच्या काळात संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी याच बैलजोडीचा आधार घेऊन बबन पाण्याचा व्यवसाय चालू करतो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून त्यांचं राहणीमान तर बदलत जातंच पण अधिकाधिक पैसे कमावण्याच्या नादात बैलांकडे होणारं त्याचं दुर्लक्ष राघोजीसोबतच वाचकाच्या डोळ्यांतसुद्धा पाणी घेऊन येतं. पाण्याचा हा व्यवसाय करत असताना रत्नाचा बबनच्या आयुष्यात झालेला प्रवेश, तिच्यावर त्याने उडवलेला पैसा, अतिपैसे कमावण्यासाठी त्याने चालू केलेली बैलांची कुतरओढ, त्यातून बैलांचे होणारे हाल, पाण्यासाठी चालू झालेलं गावाचं आंदोलन, पाण्याचा प्रश्न मिटला की आपल्या बैलांना आराम मिळेल या एकाच भावनेने आंदोलनात सामील झालेला राघोजी, आंदोलनादरम्यान उसळल्या गेलेल्या दंगलीत स्वतःचा पाय मोडून घेऊन असहाय होऊन घराच्या ओसरीवर पडून राहणारा, पैशाच्या मागे लागलेल्या कुटुंबाकडून दुर्लक्षित होणारा, आपलं दुखणं विसरून बैलांसाठी तडपडणारा राघोजी शेवाळे, गावात सरकारकडून टँकरने पाणीपुरवठा चालू झाल्यानंतर बबनच्या धंद्याला लागलेली घरघर, रत्नासोबत असणारं बबनचं नातं समजल्यानंतर त्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणारा पोलिस आणि गावातीलच त्याच्या परिचयाचे काही लोक, पाण्याचा धंदा जवळपास बंद झालेला असताना झालेली ही पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी बबनची होणारी कसरत, पाण्याच्या पैशातून घरात आणलेल्या गोष्टींचे परत घरातून बाहेर जात असताना शेवटी बबनला झालेला पश्चात्ताप आणि बैलांप्रति उफाळून आलेलं प्रेम या सर्वांतून पुढे सरकत असताना पावला-पावलावर पाण्याचं महत्व सांगणारी ही अतिशय उत्कृष्ट कादंबरी "तहान". शेवटी एका असहाय्य तडफडीचा वाचकाला अनुभव देत ही कादंबरी जिथे संपते तिथेच आपल्या मनात पुन्हा सुरू होते आणि आपल्याला अस्वस्थ करत राहते. शेवाळे कुटुंबाच्या माध्यमातून सदानंद देशमुख यांनी पाण्याच्या दुर्भिक्षाकडे ज्या पद्धतीने लक्ष वेधलं आहे ते खूप विचार करायला लावतं. 

आवर्जून वाचावी अशी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव

Saturday, October 2, 2021

"महात्म्याची अखेर"

 


लेखक : जगन फडणीस

प्रकाशक : लोकवाङ्मय गृह


                                             पृष्ठे- १३९, मूूल्य- १५० रुपये.


'कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळंच दिसतं' अशी एक मराठी म्हण आहे. हे खरं की खोटं हा जरी संशोधनाचा विषय असला तरी गांधींचा द्वेष करणाऱ्यांच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. "गांधीदोष" झालेल्या माणसाला "गांधी" ही व्यक्ती सर्व ठिकाणी चुकीचीच दिसते. बऱ्याच वेळा इतिहासातील थोर लोकांबद्दल जाणून न घेता आपण ऐकीव गोष्टींवरच त्यांच्याबद्दल आपले मत बनवत असतो आणि गांधी, टिळक, सावरकर, आंबेडकर या लोकांबाबत हे थोडं जास्तच झालंय असं माझं वयक्तिक मत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चंद्रकांत वानखडे यांचं "गांधी का मरत नाही" हे वाचण्यापूर्वी गांधींबद्दल अशा बऱ्याच ऐकीव गोष्टी डोक्यात घर करून होत्या आणि त्यानुसारच गांधींची एक प्रतिमा(खलनायकी) नेहमी समोर उभी रहायची, पण या पुस्तक वाचनानंतर त्या प्रतिमेला तडा तर गेलाच शिवाय गांधींच्या समकालीन लोकांबद्दल जाणून घेण्याची इच्छादेखील निर्माण झाली. गांधींच्या वाट्याला टोकाचं प्रेम आणि टोकाचा विरोध या दोन्ही गोष्टी आल्या हे चंद्रकांत वानखडे यांचं पुस्तक वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं. परंतु "गांधी का मरत नाही" हे पुस्तक वाचल्यानंतर डोक्यात नवीनच एका प्रश्नाने उचल खाल्ली तो म्हणजे गांधींसारख्या अशा निस्वार्थी माणसाची हत्या का झाली असावी? गांधींची हत्या का केली असावी असं जेव्हा जेव्हा कोणालाही विचारलं तेव्हा फाळणी, पंचावन्न कोटी आणि गांधींच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे हिंदूंवर होणारा अन्याय ही कारणे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समोर येत आणि इतकी वर्षे मीही हेच समजत होतो. परंतु जगन फडणीस यांच्या "महात्म्याची अखेर" या पुस्तकाने गांधी हत्येबद्दलचा माझा हा समज पूर्णपणे खोडून काढला. हे पुस्तक हातात आलं आणि त्यांच्या हत्येचं कारण त्यामुळे उलगडलं. अगदी एकाच शब्दात सांगायचं, तर फक्त आणि फक्त "द्वेष" हे एकच कारण त्यांच्या हत्येमागे होतं हेच हे पुस्तक वाचून लक्षात येतं. जगन फडणीस यांनी तत्कालीन घटनांना जे संदर्भ आणि पुरावे दिलेले आहेत त्यावरून आजपर्यंत आपल्या मनात असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांचे निरसन होते. गांधींमुळे फाळणी झाली, गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी द्यायला भाग पाडले, गांधी मुस्लिमधार्जिणे होते अशी कारणे देऊन नथुराम गोडसे कडून झालेल्या त्यांच्या खुनाचे नेहमीच समर्थन केले जाते. गांधीद्वेष करणारे हे लोक नेहमी गांधी हत्येचेदेखील समर्थन करत असतात, पण या हत्येचे असे समर्थन करणाऱ्यांपैकी किती जणांनी खरोखरच गांधी समजून घेतलाय हा एक प्रश्नच आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गांधींचा खून केला आणि त्यानंतर आजतागायत वरील कारणे देऊन गांधींना मारणे देशहितासाठी कसे योग्य होते म्हणणारे सोयीस्करपणे एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतात. ती म्हणजे १९४८ पूर्वीसुध्दा गांधींना मारण्याचे जवळपास ७ वेळा प्रयत्न केले गेले आणि तेदेखील तेव्हा, जेव्हा फाळणी आणि ५५ कोटी हे विषय चर्चेतसुद्धा नव्हते. इतकेच काय तर देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल हे देखील अजून कोणी सांगू शकत नव्हते तेव्हा! म्हणजे १९३४ पासून गांधींना मारण्याचे प्रयत्न झाले. ते का? कशासाठी? याची उत्तरे न देता ३० जानेवारी १९४८ ला झालेली त्यांची हत्या खोटी कारणे देऊन कशी योग्य होती हेच सांगितले गेले आणि तोच खरा इतिहास समजून पुढच्या पिढीने या "महात्म्याला" चेष्टेचा विषय करून टाकले. अलिकडील काही वर्षांत तर हा गांधीविरोध काही लोकांनी इतका टोकाला नेऊन ठेवला आहे की गांधींना 'राष्ट्रपिता' मानण्यासदेखील विरोधाची भाषा चालू झाली आहे. जगन फडणीस यांचं हे पुस्तक गांधी द्वेष करणाऱ्या लोकांना, ते करत असलेल्या चुकीच्या प्रचाराला दिलेलं एक प्रकारचं उत्तरच आहे. सुरुवातीलाच लेखकांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे काही महात्मा गांधींचे चरित्र नाही, गांधींवर आतापर्यंत देश-विदेशातील विद्वानांनी बरेच लिखाण केले आहे पण या सर्वांतून एक विचार सुटला आहे आणि तो म्हणजे गांधींचा खून कोणत्या कारणांतून करण्यात आला हा! गांधींच्या खुनाचे तसेच खुन्याचे सामर्थन करणारे कधी फाळणी तर कधी ५५ कोटींचे कारण पुढे करतात, पण गांधींचा खून या दोन कारणांनी नाही तर त्याहीपलीकडे असलेल्या काही कारणांमुळे झाला हे पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न जगन फडणीस यांनी केला आहे. महात्मा गांधींच्या आयुष्याची अखेर आणि त्यांच्या राजकारणातील काही अखेरच्या घटना यावर या पुस्तकातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे  त्यामुळे "महात्म्याची अखेर" हे नाव सुद्धा तितकंच समर्पक वाटतं. ९ प्रकरणे आणि १३९ पानांतून जगन फडणीस यांनी १९३४ पासून १९४६ पर्यंत घडलेल्या बऱ्याच घटनांचा पुराव्यानिशी उल्लेख करून गांधी हत्येच्या कारणांचा नव्याने शोध घेतला आहे.

प्रत्येकाने आवर्जून वाचावे असं पुस्तक "महात्म्याची अखेर".




संदीप प्रकाश जाधव



"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये