Tuesday, November 30, 2021

"राऊ"

 



लेखक : ना. सं. इनामदार

प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ४८३, मूूल्य- ४०० रुपये.


मराठी साहित्यविश्वातील पहिल्या १० ऐतिहासिक कादंबरींची जर यादी बनवायची म्हटलं तर ना.सं.इनामदार यांच्या "राऊ"चा उल्लेख त्यात आवर्जून करावाच लागेल. बाजीराव म्हटलं की मस्तानी हे नाव आपसूकच ओठांवर येतं. आजच्या पिढीत असे बरेच लोक सापडतील ज्यांना मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही पण खरं तर मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं. अवघं ४१ वर्षांचं आयुष्य! २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला एक थोर सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणाऱ्या, मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षं वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि एकच वादळ उठले. त्याच वादळाला केंद्रस्थानी ठेवून इनामदार यांनी ही कादंबरी लिहिली आहे. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यातील नाते जरी या कादंबरीच्या केंद्रस्थानी असले तरी एका मनस्वी प्रियकरासोबतच राजकारण धुरंधर सेनानीची ओळख आपल्याला लेखकांनी करून दिली आहे. इतिहासातील या वादळी प्रेमकहाणीला कल्पनेची जोड देताना ऐतिहासिक घटनांना कोणताही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी ना.सं. इनामदार यांनी घेतली आहे. अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही प्रेमकहाणी रंगवत असताना बाजीरावांचा पराक्रम, त्यांनी बदलेली युद्धशैली, पायदळ-तोफखाना यांना बाजूला ठेऊन प्रचंड वेगाने शत्रूवर आक्रमण करून त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचं राजकारण, थोरल्या महाराजांप्रती असणारी त्यांची श्रद्धा, त्यांची स्वराज्यनिष्ठा, काशीबाई-बाजीरावांचं आणि बाजीराव-चिमाजी अप्पांचं नातं, बाजीरावांचं त्यांची आई राधाबाईंसोबतचं नातं अशा अनेक अंगांना इनामदार यांनी स्पर्श केला आहे. २० वर्षांत लढलेल्या जवळपास ४० हून अधिक लढाया जिंकून अजिंक्य राहणारा हा थोर सेनानी घरातील इतर नाती जपत असताना कुटूंबकलहात अडकून आपल्याच माणसांकडून पराभूत होतो तेव्हा दुःखात व्याकुळ होणारा बाजीरावसुद्धा इनामदारांनी अतिशय ताकदीने रंगवला आहे. काशीबाईंच्या मनात आपल्या पतीविषयीची असणारी प्रतिमा आणि श्रद्धा यांचा मेळ घालताना मस्तानीबद्दल असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न इनामदार यांनी या कादंबरीतून केला आहे. धर्म, जात, रूढी, परंपरा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जुळलेली ही प्रेमकहाणी! सत्ता सांभाळत असताना, युद्धभूमीवर आवश्यक असणाऱ्या कणखरपणासोबतच थोरल्या बाजीरावांच्या मनात असलेला त्यांच्या प्राणप्रिय मस्तानीसाठीचा हळवा कोपरादेखील लेखकांनी वाचकांसमोर आणला आहे. नवऱ्याचं वागणं पटत नसलं तरी सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे तसेच राऊवर असणाऱ्या श्रद्धेमुळे काशीबाईंची होणारी घुसमट वाचकाच्या मनालाही जाणवत राहते. शनिवार वाड्यातील राजकारण, श्रीमंतांची पत्नी काशीबाई यांची अगतिकता, श्रीमंतांच्या भावंडांचे हेवेदावे, सत्तासंघर्ष हे सर्व असूनही बाजीराव-मस्तानी ही वादळी प्रेमकहाणी बहरतच राहते. कादंबरीची सुरुवात होते शनिवारवाड्याच्या वैभवशाली वास्तू पासून! कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तेव्हा जाणवते ही कहाणी फक्त बाजीराव पेशव्यांचीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचं सत्ताकेंद्र असणाऱ्या शनिवारवाड्याचीदेखील आहे. सात मजली शनिवारवाड्याचं कादंबरीतील वर्णन आणि स्थापत्यशास्त्राच्या नमुन्यांतून लेखकांनी वाचकांसमोर ती भव्य वास्तू अक्षरशः जीवंत केली आहे. ना.सं. इनामदारांनी आपल्या शब्दांतून बाजीराव पेशव्यांची संपूर्ण कारकिर्दच वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी केली आहे. त्यामुळेच की काय १९७४ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीची जादू आजही कायम आहे.

आजपर्यंत फक्त प्रेमवीर म्हणून रंगवलं गेलेल्या बाजीराव पेशव्यांबद्दलचे विचार बदलायला भाग पाडणारी, आवर्जून संग्रही घेऊन वाचावी अशी कादंबरी "राऊ".






संदीप प्रकाश जाधव


Tuesday, November 23, 2021

"बटाट्याची चाळ"


 

लेखक : पु. ल. देशपांडे

प्रकाशक : मौज प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १७१, मूूल्य- २०० रुपये.


पु. ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाई. मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक रत्नच. जगामध्ये असे मोजकेच साहित्यिक असतील ज्यांचं नाव अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले आणि मराठी साहित्यविश्वातील अशा एका नावाला स्वतंत्र परिचयाची गरज नक्कीच नाही. वाचनाची आवड असो वा नसो पु.लंच्या एखाद्या तरी पुस्तकाचे नाव प्रत्येक मराठी माणूस नक्कीच सांगू शकेल इतकं ते आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहचले. भाई नावाने ओळखल्या जाणाऱ्या पु.लंची जादू आजच्या मोबाईल युगातही कायम आहे. अगदी माझ्यापुरतंच सांगायचं झालं तर रिकाम्या वेळेत मोबाइल हातात असताना माझा सर्वांत जास्त वेळ पु.लंचे कथाकथन ऐकण्यातच जातो. कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच रहावं असं अगदी सहज, सुंदर आणि हसतखेळत होणारं सादरीकरण! 'स्टँड-अप' कॉमेडी हा प्रकार आजच्या पिढीला नवीन वाटत असला तरी बऱ्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एक-दोन पिढ्यांना पु. ल. देशपांडेंनी त्यांच्या कथाकथनांमधून अगदी खळखळून हसवलंय. आज पु.लंच्या लेखणीची ताकद न अनुभवणारे लोक अपवादानेच सापडतील. अगदी सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लेखनाची जादूच अशी आहे की आपण मनाच्या आनंदी अवस्थेत पु.लंचे एखादे पुस्तक जर वाचले तर आपला आनंद द्विगुणित होईल तसेच जर दु:खी अवस्थेत वाचले तर त्या दु:खाची तीव्रता खूप कमी होईल आणि या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वाचकांनी घेतलाही असेल. पु.लंनी त्यांच्या आयुष्यात अनेक लेख, कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या त्यांपैकीच एक अतिशय सुंदर आणि अजरामर पुस्तक म्हणजे "बटाट्याची चाळ". शाळेत असतानाचा "बटाट्याची चाळ" नावाचा पाठ्यपुस्तकातील धडा ज्यामध्ये पंतांचे वजन वाढल्याने ते डायट करायचे ठरवतात नंतर त्या डायटचा कसा बोजवारा उडतो हे आजही आठवते पण तेव्हा असणाऱ्या विनोद समजण्याच्या 'कुवतीनुसार' त्याचा आनंद घेताच नाही आला आणि असे माझ्यासारखे बरेच वाचक असणार यात शंकाच नाही. 'बटाट्याची चाळ" च्या माध्यमातून पु. ल. देशपांडेंनी चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी, चाळीत राहणाऱ्यांची सुख-दुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घेण्याची तेथील लोकांची वृत्ती आणि प्रत्येकाच्या पोटात असलेली उदंड माया या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र उभं केलं आहे. आज विकासाच्या नावाखाली प्रत्येक छोट्यामोठ्या शहरांत उभारल्या जाणाऱ्या 'आधुनिक चाळी' बघताना, तिथे वावरताना प्रकर्षाने जाणीव होते ती याच हरवलेल्या संस्कृतीची! "बटाट्याची चाळ" या पुस्तकाचं लक्ष वेधून घेणारं मुखपृष्ठच या चाळ संस्कृतीबद्दल खूप काही सांगून जातं. एक डेरेदार वृक्ष आणि त्याच्या बुंध्यामध्ये वसलेली "बटाट्याची चाळ"! एखाद्या डेरेदार वृक्षाच्या पसरलेल्या हजारो फांद्या ज्याप्रमाणे त्याच्या बुंध्याशी एकरुप होतात त्याचप्रमाणे या चाळीतील वेगवेगळ्या विचारांचे लोक या चाळ संस्कृतीशी एकरुप होऊन राहतात. वरवर बघितले तर ही चाळ प्रचंड गजबजलेली दिसते परंतु इथली नाती एखाद्या वृक्षाइतकीच भक्कम आहेत हेच सांगणारं असं हे मुखपृष्ठ. चाळ संस्कृतीचे वैभव दाखवताना पु.लंनी 'बटाट्याच्या चाळीतील' काही इरसाल पात्रांना घेऊन जी धमाल उडवलेली आहे ती हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुखसुद्धा करते. पु.लंनी उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आपलीशी वाटते कारण या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला फिरत असतात, रोजच्या आयुष्यात येतात आणि भेटतात. त्यामुळेच पुस्तक वाचताना आपण चाळीतील या पात्रांमधील आपलेपणात हरवून जातो. १९५८ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची जादू आजही तशीच असण्याचं हेदेखील एक कारण आहे. पु.लंच्या सूक्ष्म निरीक्षणातून साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा मग ती सोकाजी दादा त्रिलोकेकर असोत किंवा आचार्य बाबा बर्वे, अण्णा पावशे, राघू नाना सोमण, कोचरेकर मास्तर, काशिनाथ नाडकर्णी असोत सर्वचजण वाचकाला मनमुराद हसवून जातात. विनोदाच्या माध्यमातून व्यक्ति-व्यक्तींमध्ये असणारे दोषही पु.लंनी तितक्याच सफाईदारपणे वाचकांसमोर आणले आहेत. १२ प्रकरणांची ही "बटाटयाची चाळ" जितकं हसवते तितकंच तिच्या शेवटच्या टप्प्यात ती वाचकाच्या डोळ्यात अश्रूदेखील उभं करते, ‘एक चिंतन’ हे प्रकरण वाचताना! वेगळं काहीतरी वाचन आणि भरपूर करमणूक देणारी पु.लंची ही "बटाट्याची चाळ"! एक सांस्कृतिक वैभव दाखवणारी कथा आणि त्या कथेतील जिवंत पात्रांसोबत भाई जणू काही वाचकाचं बोट धरून त्याला "बटाट्याच्या चाळी"तूनच फिरवून आणतात. 

आज जवळपास लोप पावलेल्या चाळ संस्कृतीचं जवळून दर्शन घडवणारं, प्रत्येकाने आवर्जून वाचावं आणि संग्रही ठेवावं असं पुस्तक "बटाट्याची चाळ".





संदीप प्रकाश जाधव



Sunday, November 14, 2021

"दशक्रिया"

 


लेखक : बाबा भांड

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २०८, मूूल्य- २०० रुपये.


अलीकडेच येऊन गेलेला मराठी चित्रपट "दशक्रिया" ज्या मराठी कादंबरीवर बेतला आहे ती बाबा भांड यांची कादंबरी म्हणजे "दशक्रिया"! खरंतर चित्रपटाचा विषय ऐकूनच या कादंबरीबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं त्यामुळेच चित्रपट न पाहता प्रथम कादंबरी वाचायचं ठरवलं आणि कादंबरी संग्रही घेतली पण आज बऱ्याच दिवसांनी ती वाचायचा योग आला. हिंदू संस्कृतीत माणसाच्या मरणानंतर केला जाणारा एक महत्त्वाचा विधी म्हणून 'दशक्रियेकडे' पाहिले जातं. मरणानंतर माणसाचं काय होतं हा जरी स्वतंत्र संशोधनाचा विषय असला तरी मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी या शुद्ध हेतूने आणि श्रद्धेने वर्षानुवर्षांपासून केला जाणारा हा 'दहाव्याचा' विधी आज खरंच त्याचं पावित्र्य राखून आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि त्याचंच अगदी विदारक चित्रण बाबा भांड यांनी त्यांच्या "दशक्रिया" मधून केलेलं आहे. "दशक्रिया" ही कहाणी जरी भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याभोवती फिरत असली तरी त्या कहाणीच्या माध्यमातून बाबा भांड यांनी ज्या विषयाला हात घातला आहे त्याने वाचक सुन्न आणि निःशब्द होऊन जातो. आज शेकडो घाटांवर पार पडणाऱ्या या 'दशक्रियेच्या' विधींवर एखाद्या गरिबाचं आयुष्य कसं अवलंबून असतं, याचा शोकांत वेध बाबा भांड यांनी या कादंबरीतून घेतला आहे जो बऱ्याच वेळा वाचकाला अतिशय भावनिक करतो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक पैठण शहर आणि पैठणचा घाट बाबा भांड यांनी त्यांच्या लेखणीतून वाचकांसमोर उभा केला आहे. 'दशक्रियेच्या' नावाखाली पैठणच्या घाटावर घडणारे वास्तव तर लेखकांनी उजेडात आणलंच आहे शिवाय मरणानंतरच्या विधी, रुढी - परंपरांचे स्तोम, विदारक जातीव्यवस्था, अर्थार्जनाचे संतापजनक पण तितकेच करुणाजनक प्रकारदेखील वाचकांसमोर येतात जे वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. घाटावरचं हे वास्तव बघून वाचक अस्वस्थ होतो आणि यातच या कादंबरीचं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं नाही होणार. जर तटस्थपणे पाहिलं तर सामाजिक वास्तवाचं एक वेगळंच दर्शन या कादंबरीतून होतं. कादंबरीचं नाव जरी "दशक्रिया" असलं तरी दहाव्याच्या विधीपेक्षा समाजातील उच्च-नीच अशा अनेक वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर येऊन करावा लागणारा विदारक संघर्ष हाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. शाळेत जाणारा लहान भानुदास हा या कादंबरीचा नायक! पैठणला गोदावरीच्या घाटावर दररोज दशक्रियेचे विधी होत असतात. हे विधी सुरू होण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून त्या व्यक्तीच्या अस्थी असलेली राख पाण्याकडे पाठ करुन खांद्यावरुन पाण्यात सोडली जाते. अशा अस्थींची राख पाण्यात सोडत असताना काही मुलं पाण्यात उभं राहून त्या राखेखाली लोखंडी चाळण धरतात. हे करत असताना जर कधी राख पाण्यात पडली तर थेट पाण्यात बुडी मारुन राख-माती उपसत राहतात, कारण या राखेत त्यांना सापडतं रुपया-दोन रुपयाचं एखादं नाणं किंवा क्वचितप्रसंगी एखादा सोन्याचा तुकडादेखील! अशा मुलांच्या घोळक्यातीलच एक मुलगा म्हणजे हा कादंबरीचा नायक भानुदास! एक पाय मोडल्याने नोकरी गमावून कायमचा घरात बसून राहणारा भानुदासचा बाप, नवऱ्याच्या मदतीशिवाय आपल्या संसाराचा गाडा जिद्दीने ओढणारी भानुदासची आई, भानुदासच्या दोन छोट्या बहिणी, शिक्षणासोबतच शिवणकाम शिकणारा भानुदासचा भाऊ निवृत्ती, नदीतील राख चाळण्यासाठी मुलांना चाळण भाड्याने देणारा पत्रे सावकार, घाटावर दशक्रियेचे विधी करणारे केशव भटजी, लहुजीनगरमधील म्हातारी आत्याबाई, भगत कुटुंबातील सदस्य, घाटावर अंत्यविधीसाठी लाकडे पुरवणारा बाबा आणि इतरही काही पात्रे कादंबरीत तितकीच महत्त्वाची आहेत. भानुदासचं रोजचं काम म्हणजे शाळेत जाताना घाटावर कोणी दशक्रियेसाठी आलेलं सावज दिसतंय का, कुणाची राख येतेय का ते पाहायचं आणि त्यातून दिवसाकाठी मिळालेल्या पैशातून घराला हातभार लावायचा. दारिद्र्याने पूर्णपणे ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणार्‍या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रूढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातीव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अशा अनेक वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरण आणि पारंपरिक व्यवसाय यांच्या कात्रीत सापडलेली एक पिढी, पैशांमुळे मानवी नात्यांचे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी अशा अनेक गोष्टींना कवेत घेऊन सद्य:स्थितीचं अतिशय क्लेशदायक चित्रण आपल्यासमोर उभी करते. भानुदास आणि घाटावर चालणाऱ्या "दशक्रिया" यांच्या विचारात गढून गेलेल्या वाचकाच्या मनाला कादंबरीचा शेवट चटका लावून जातो. घाटावर जितक्या जास्त "दशक्रिया" तितके जास्त अर्थार्जन या एकाच भावनेने घाटावर लोकांच्या राखेची वाट बघणाऱ्या भानुदासला जेव्हा त्याच्याच लाडक्या मामेबहिणीची राख घाटावर विसर्जनासाठी आलेली समजते तेव्हा त्याच्या बालमनाला जो धक्का बसतो त्याठिकाणी ही कादंबरी संपते. वाचकाला सुन्न करून होणारा हा कादंबरीचा शेवट वाचकाच्या मनात बरेच अनुत्तरित प्रश्न सोडून जातो.

तटस्थ आणि वास्तववादी शैलीमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते. संग्रही घेऊन आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "दशक्रिया".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, November 7, 2021

"देवाज्ञा"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २८६, मूूल्य- ३०० रुपये.


"देवाज्ञा"! नारायण धारप यांच्या कल्पनाशक्तीच्या पेटाऱ्यातून निघालेली एक भन्नाट भयकादंबरी! वेगवेगळ्या मार्गांनी मृत्यूला स्पर्श करून आलेल्या लोकांना हेरून, संमोहित करून परत त्यांना त्याच मृत्यूसमयीच्या अवस्थेत घेऊन जाऊन निरनिराळे प्रयोग करणारा एक आचार्य आणि त्याचा मठ यांच्याभोवती फिरणारे कथानक! मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांना जीवन आणि मृत्यूच्या मधेच अडकवून गैरकृत्यांसाठी वापर करता यावा म्हणून स्वतःच्या मठात त्यांना रहायला बोलावणारा हा आचार्य म्हणजे या कादंबरीतील एक गूढ पात्र आहे! नेहमी रहस्यांकडे आकर्षित होणाऱ्या मानवी मनाची नेमकी नस पकडून धारप यांनी एकाहून एक सरस भयकथा-कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं कथानक वाचकांसमोर आणून ठेवलं जे वाचताना त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज येतो. "देवाज्ञा" मधील विषयदेखील अगदी असाच अफलातून आहे. प्रत्येक व्यक्तीला मरणानंतर माणसाचे काय होते हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते, मृत्यूनंतरच्या आयुष्याचे हे कुतूहल हाच एक धागा पकडून धारपांची ही कादंबरी सजली आहे. त्यांच्या या रहस्यकथेचा एक भाग बनून वाचक कथेसोबत जोडला जातो आणि त्यामुळेच कादंबरीत घडणाऱ्या बऱ्याच घटना अक्षरशः आपल्याच अंगावर आल्याचा भास वाचत असताना कित्येकदा होतो. वाचक कथेत पूर्णपणे गुंतून गेला असताना अनपेक्षित धक्क्यातून वेगळे वळण घेऊन शेवटाकडे जाणारे कथानक आणि त्यातून निर्माण होणारा क्लायमॅक्स हे धारपांच्या भयकथांचं वैशिष्ट्य ज्याला ही "देवाज्ञा" देखील अपवाद नाही. संगीता या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाने या कादंबरीची सुरुवात होते. या आत्महत्येच्या प्रयत्नातून अगदी मृत्यूला स्पर्शून आलेल्या संगीताचा हॉस्पिटलमधे असताना परिचय होतो तो आचार्यांशी! निःस्वार्थी भावनेने आचार्य करत असलेल्या सामाजिक कार्याने संगीता प्रभावीत होते आणि त्यामुळेच आचार्यांकडून त्यांच्या मठात रहायला येण्याचं निमंत्रण ती अगदी निःसंकोचपणे स्वीकारते. मठातील संगीताच्या प्रवेशानंतर कादंबरी खऱ्या अर्थाने वेग पकडते आणि वाचक कथेत गुंतायला चालू होतो. संगीताप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूला स्पर्श करून आलेल्या, समाजाच्या विविध स्तरातील आणि वयोगटातील मठात राहणाऱ्या इतर काही पात्रांच्या आयुष्याचा फ्लॅशबॅकमधे जाऊन परिचय करून देताना धारपांनी अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी मांडणी, वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय मठात आलेल्या लोकांना तिथे राहण्याची कोणतीच सक्ती नसल्याने मधेच मठ सोडून गेलेल्या काही लोकांच्या कथादेखील वाचकाच्या कुतूहलात भर टाकतात. आचार्य करत असलेल्या प्रयोगातून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे हे संगीतासोबतच वाचकासाठीसुध्दा हळूहळू एक गूढ प्रकरण होऊ लागते. मठात सध्या राहत असलेल्या तसेच पूर्वी काही विचित्र अनुभव आल्यामुळे मठ सोडून गेलेल्या पात्रांची मदत घेऊन संगीताने आचार्यांच्या या मठाच्या माध्यमातून चालणाऱ्या गूढ, रहस्यमय प्रयोगाचा लावलेला छडा आणि या सर्व प्रवासादरम्यान घडणाऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनांतून होणारा कादंबरीचा शेवट! अनपेक्षित धक्क्यातून होणारा शेवट हा या कथानकाचा कळस आहे. मृत्यूरेषेच्या पलीकडे कशाला तरी स्पर्शून आलेल्या लोकांमध्ये झालेले बदल मग ते काहींना स्पर्शून गेलेल्या अनामिक अशा चांगल्या शक्तीमुळे झालेले असोत अथवा काहींना झालेल्या वाईट शक्तीच्या संसर्गाने झालेले असोत, या दोन टोकाच्या शक्तींमधील संघर्ष हा या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय हा अगदी नेहमीच्याच पठडीतील शेवट धारपांनी केला असला तरी ज्या पध्दतीने धारप यांनी कथेत गुंतून गेलेल्या वाचकाला धक्का देऊन शेवट केला आहे त्याला तोड नाही. 

अतिशय रोमहर्षक, अकल्पित आणि एक भन्नाट विषय! वाचकाला जागेवर खिळवून ठेवणारं, एखाद्या भयपटाला शोभणारं कथानक! भयकथांचं वेड असणाऱ्यांनी आर्जून वाचण्यासारखी नारायण धारप यांची कादंबरी "देवाज्ञा".





संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये