लेखक : ना. सं. इनामदार
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
पृष्ठे- ४८३, मूूल्य- ४०० रुपये.
मराठी साहित्यविश्वातील पहिल्या १० ऐतिहासिक कादंबरींची जर यादी बनवायची म्हटलं तर ना.सं.इनामदार यांच्या "राऊ"चा उल्लेख त्यात आवर्जून करावाच लागेल. बाजीराव म्हटलं की मस्तानी हे नाव आपसूकच ओठांवर येतं. आजच्या पिढीत असे बरेच लोक सापडतील ज्यांना मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही पण खरं तर मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं. अवघं ४१ वर्षांचं आयुष्य! २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला एक थोर सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणाऱ्या, मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षं वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि एकच वादळ उठले. त्याच वादळाला केंद्रस्थानी ठेवून इनामदार यांनी ही कादंबरी लिहिली आहे. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यातील नाते जरी या कादंबरीच्या केंद्रस्थानी असले तरी एका मनस्वी प्रियकरासोबतच राजकारण धुरंधर सेनानीची ओळख आपल्याला लेखकांनी करून दिली आहे. इतिहासातील या वादळी प्रेमकहाणीला कल्पनेची जोड देताना ऐतिहासिक घटनांना कोणताही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी ना.सं. इनामदार यांनी घेतली आहे. अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही प्रेमकहाणी रंगवत असताना बाजीरावांचा पराक्रम, त्यांनी बदलेली युद्धशैली, पायदळ-तोफखाना यांना बाजूला ठेऊन प्रचंड वेगाने शत्रूवर आक्रमण करून त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचं राजकारण, थोरल्या महाराजांप्रती असणारी त्यांची श्रद्धा, त्यांची स्वराज्यनिष्ठा, काशीबाई-बाजीरावांचं आणि बाजीराव-चिमाजी अप्पांचं नातं, बाजीरावांचं त्यांची आई राधाबाईंसोबतचं नातं अशा अनेक अंगांना इनामदार यांनी स्पर्श केला आहे. २० वर्षांत लढलेल्या जवळपास ४० हून अधिक लढाया जिंकून अजिंक्य राहणारा हा थोर सेनानी घरातील इतर नाती जपत असताना कुटूंबकलहात अडकून आपल्याच माणसांकडून पराभूत होतो तेव्हा दुःखात व्याकुळ होणारा बाजीरावसुद्धा इनामदारांनी अतिशय ताकदीने रंगवला आहे. काशीबाईंच्या मनात आपल्या पतीविषयीची असणारी प्रतिमा आणि श्रद्धा यांचा मेळ घालताना मस्तानीबद्दल असणाऱ्या बऱ्याच गैरसमजांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न इनामदार यांनी या कादंबरीतून केला आहे. धर्म, जात, रूढी, परंपरा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जुळलेली ही प्रेमकहाणी! सत्ता सांभाळत असताना, युद्धभूमीवर आवश्यक असणाऱ्या कणखरपणासोबतच थोरल्या बाजीरावांच्या मनात असलेला त्यांच्या प्राणप्रिय मस्तानीसाठीचा हळवा कोपरादेखील लेखकांनी वाचकांसमोर आणला आहे. नवऱ्याचं वागणं पटत नसलं तरी सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे तसेच राऊवर असणाऱ्या श्रद्धेमुळे काशीबाईंची होणारी घुसमट वाचकाच्या मनालाही जाणवत राहते. शनिवार वाड्यातील राजकारण, श्रीमंतांची पत्नी काशीबाई यांची अगतिकता, श्रीमंतांच्या भावंडांचे हेवेदावे, सत्तासंघर्ष हे सर्व असूनही बाजीराव-मस्तानी ही वादळी प्रेमकहाणी बहरतच राहते. कादंबरीची सुरुवात होते शनिवारवाड्याच्या वैभवशाली वास्तू पासून! कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तेव्हा जाणवते ही कहाणी फक्त बाजीराव पेशव्यांचीच नाही तर अवघ्या हिंदुस्थानाचं सत्ताकेंद्र असणाऱ्या शनिवारवाड्याचीदेखील आहे. सात मजली शनिवारवाड्याचं कादंबरीतील वर्णन आणि स्थापत्यशास्त्राच्या नमुन्यांतून लेखकांनी वाचकांसमोर ती भव्य वास्तू अक्षरशः जीवंत केली आहे. ना.सं. इनामदारांनी आपल्या शब्दांतून बाजीराव पेशव्यांची संपूर्ण कारकिर्दच वाचकांच्या डोळ्यांसमोर उभी केली आहे. त्यामुळेच की काय १९७४ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीची जादू आजही कायम आहे.
आजपर्यंत फक्त प्रेमवीर म्हणून रंगवलं गेलेल्या बाजीराव पेशव्यांबद्दलचे विचार बदलायला भाग पाडणारी, आवर्जून संग्रही घेऊन वाचावी अशी कादंबरी "राऊ".
संदीप प्रकाश जाधव