लेखक : पु. ल. देशपांडे
प्रकाशक : मौज प्रकाशन
पृष्ठे- १७१, मूूल्य- २०० रुपये.
पु. ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाई. मराठी साहित्यविश्वाला मिळालेलं एक रत्नच. जगामध्ये असे मोजकेच साहित्यिक असतील ज्यांचं नाव अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले आणि मराठी साहित्यविश्वातील अशा एका नावाला स्वतंत्र परिचयाची गरज नक्कीच नाही. वाचनाची आवड असो वा नसो पु.लंच्या एखाद्या तरी पुस्तकाचे नाव प्रत्येक मराठी माणूस नक्कीच सांगू शकेल इतकं ते आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहचले. भाई नावाने ओळखल्या जाणाऱ्या पु.लंची जादू आजच्या मोबाईल युगातही कायम आहे. अगदी माझ्यापुरतंच सांगायचं झालं तर रिकाम्या वेळेत मोबाइल हातात असताना माझा सर्वांत जास्त वेळ पु.लंचे कथाकथन ऐकण्यातच जातो. कितीही वेळा ऐकलं तरी ऐकतच रहावं असं अगदी सहज, सुंदर आणि हसतखेळत होणारं सादरीकरण! 'स्टँड-अप' कॉमेडी हा प्रकार आजच्या पिढीला नवीन वाटत असला तरी बऱ्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एक-दोन पिढ्यांना पु. ल. देशपांडेंनी त्यांच्या कथाकथनांमधून अगदी खळखळून हसवलंय. आज पु.लंच्या लेखणीची ताकद न अनुभवणारे लोक अपवादानेच सापडतील. अगदी सहज सुंदर भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लेखनाची जादूच अशी आहे की आपण मनाच्या आनंदी अवस्थेत पु.लंचे एखादे पुस्तक जर वाचले तर आपला आनंद द्विगुणित होईल तसेच जर दु:खी अवस्थेत वाचले तर त्या दु:खाची तीव्रता खूप कमी होईल आणि या गोष्टीचा अनुभव बऱ्याच वाचकांनी घेतलाही असेल. पु.लंनी त्यांच्या आयुष्यात अनेक लेख, कथा, कादंबऱ्या लिहिल्या ज्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या त्यांपैकीच एक अतिशय सुंदर आणि अजरामर पुस्तक म्हणजे "बटाट्याची चाळ". शाळेत असतानाचा "बटाट्याची चाळ" नावाचा पाठ्यपुस्तकातील धडा ज्यामध्ये पंतांचे वजन वाढल्याने ते डायट करायचे ठरवतात नंतर त्या डायटचा कसा बोजवारा उडतो हे आजही आठवते पण तेव्हा असणाऱ्या विनोद समजण्याच्या 'कुवतीनुसार' त्याचा आनंद घेताच नाही आला आणि असे माझ्यासारखे बरेच वाचक असणार यात शंकाच नाही. 'बटाट्याची चाळ" च्या माध्यमातून पु. ल. देशपांडेंनी चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी, चाळीत राहणाऱ्यांची सुख-दुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घेण्याची तेथील लोकांची वृत्ती आणि प्रत्येकाच्या पोटात असलेली उदंड माया या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र उभं केलं आहे. आज विकासाच्या नावाखाली प्रत्येक छोट्यामोठ्या शहरांत उभारल्या जाणाऱ्या 'आधुनिक चाळी' बघताना, तिथे वावरताना प्रकर्षाने जाणीव होते ती याच हरवलेल्या संस्कृतीची! "बटाट्याची चाळ" या पुस्तकाचं लक्ष वेधून घेणारं मुखपृष्ठच या चाळ संस्कृतीबद्दल खूप काही सांगून जातं. एक डेरेदार वृक्ष आणि त्याच्या बुंध्यामध्ये वसलेली "बटाट्याची चाळ"! एखाद्या डेरेदार वृक्षाच्या पसरलेल्या हजारो फांद्या ज्याप्रमाणे त्याच्या बुंध्याशी एकरुप होतात त्याचप्रमाणे या चाळीतील वेगवेगळ्या विचारांचे लोक या चाळ संस्कृतीशी एकरुप होऊन राहतात. वरवर बघितले तर ही चाळ प्रचंड गजबजलेली दिसते परंतु इथली नाती एखाद्या वृक्षाइतकीच भक्कम आहेत हेच सांगणारं असं हे मुखपृष्ठ. चाळ संस्कृतीचे वैभव दाखवताना पु.लंनी 'बटाट्याच्या चाळीतील' काही इरसाल पात्रांना घेऊन जी धमाल उडवलेली आहे ती हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुखसुद्धा करते. पु.लंनी उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला आपलीशी वाटते कारण या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला फिरत असतात, रोजच्या आयुष्यात येतात आणि भेटतात. त्यामुळेच पुस्तक वाचताना आपण चाळीतील या पात्रांमधील आपलेपणात हरवून जातो. १९५८ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची जादू आजही तशीच असण्याचं हेदेखील एक कारण आहे. पु.लंच्या सूक्ष्म निरीक्षणातून साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा मग ती सोकाजी दादा त्रिलोकेकर असोत किंवा आचार्य बाबा बर्वे, अण्णा पावशे, राघू नाना सोमण, कोचरेकर मास्तर, काशिनाथ नाडकर्णी असोत सर्वचजण वाचकाला मनमुराद हसवून जातात. विनोदाच्या माध्यमातून व्यक्ति-व्यक्तींमध्ये असणारे दोषही पु.लंनी तितक्याच सफाईदारपणे वाचकांसमोर आणले आहेत. १२ प्रकरणांची ही "बटाटयाची चाळ" जितकं हसवते तितकंच तिच्या शेवटच्या टप्प्यात ती वाचकाच्या डोळ्यात अश्रूदेखील उभं करते, ‘एक चिंतन’ हे प्रकरण वाचताना! वेगळं काहीतरी वाचन आणि भरपूर करमणूक देणारी पु.लंची ही "बटाट्याची चाळ"! एक सांस्कृतिक वैभव दाखवणारी कथा आणि त्या कथेतील जिवंत पात्रांसोबत भाई जणू काही वाचकाचं बोट धरून त्याला "बटाट्याच्या चाळी"तूनच फिरवून आणतात.
आज जवळपास लोप पावलेल्या चाळ संस्कृतीचं जवळून दर्शन घडवणारं, प्रत्येकाने आवर्जून वाचावं आणि संग्रही ठेवावं असं पुस्तक "बटाट्याची चाळ".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment