लेखक : बाबा भांड
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे- २०८, मूूल्य- २०० रुपये.
अलीकडेच येऊन गेलेला मराठी चित्रपट "दशक्रिया" ज्या मराठी कादंबरीवर बेतला आहे ती बाबा भांड यांची कादंबरी म्हणजे "दशक्रिया"! खरंतर चित्रपटाचा विषय ऐकूनच या कादंबरीबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं त्यामुळेच चित्रपट न पाहता प्रथम कादंबरी वाचायचं ठरवलं आणि कादंबरी संग्रही घेतली पण आज बऱ्याच दिवसांनी ती वाचायचा योग आला. हिंदू संस्कृतीत माणसाच्या मरणानंतर केला जाणारा एक महत्त्वाचा विधी म्हणून 'दशक्रियेकडे' पाहिले जातं. मरणानंतर माणसाचं काय होतं हा जरी स्वतंत्र संशोधनाचा विषय असला तरी मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी या शुद्ध हेतूने आणि श्रद्धेने वर्षानुवर्षांपासून केला जाणारा हा 'दहाव्याचा' विधी आज खरंच त्याचं पावित्र्य राखून आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि त्याचंच अगदी विदारक चित्रण बाबा भांड यांनी त्यांच्या "दशक्रिया" मधून केलेलं आहे. "दशक्रिया" ही कहाणी जरी भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याभोवती फिरत असली तरी त्या कहाणीच्या माध्यमातून बाबा भांड यांनी ज्या विषयाला हात घातला आहे त्याने वाचक सुन्न आणि निःशब्द होऊन जातो. आज शेकडो घाटांवर पार पडणाऱ्या या 'दशक्रियेच्या' विधींवर एखाद्या गरिबाचं आयुष्य कसं अवलंबून असतं, याचा शोकांत वेध बाबा भांड यांनी या कादंबरीतून घेतला आहे जो बऱ्याच वेळा वाचकाला अतिशय भावनिक करतो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक पैठण शहर आणि पैठणचा घाट बाबा भांड यांनी त्यांच्या लेखणीतून वाचकांसमोर उभा केला आहे. 'दशक्रियेच्या' नावाखाली पैठणच्या घाटावर घडणारे वास्तव तर लेखकांनी उजेडात आणलंच आहे शिवाय मरणानंतरच्या विधी, रुढी - परंपरांचे स्तोम, विदारक जातीव्यवस्था, अर्थार्जनाचे संतापजनक पण तितकेच करुणाजनक प्रकारदेखील वाचकांसमोर येतात जे वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. घाटावरचं हे वास्तव बघून वाचक अस्वस्थ होतो आणि यातच या कादंबरीचं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं नाही होणार. जर तटस्थपणे पाहिलं तर सामाजिक वास्तवाचं एक वेगळंच दर्शन या कादंबरीतून होतं. कादंबरीचं नाव जरी "दशक्रिया" असलं तरी दहाव्याच्या विधीपेक्षा समाजातील उच्च-नीच अशा अनेक वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर येऊन करावा लागणारा विदारक संघर्ष हाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. शाळेत जाणारा लहान भानुदास हा या कादंबरीचा नायक! पैठणला गोदावरीच्या घाटावर दररोज दशक्रियेचे विधी होत असतात. हे विधी सुरू होण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून त्या व्यक्तीच्या अस्थी असलेली राख पाण्याकडे पाठ करुन खांद्यावरुन पाण्यात सोडली जाते. अशा अस्थींची राख पाण्यात सोडत असताना काही मुलं पाण्यात उभं राहून त्या राखेखाली लोखंडी चाळण धरतात. हे करत असताना जर कधी राख पाण्यात पडली तर थेट पाण्यात बुडी मारुन राख-माती उपसत राहतात, कारण या राखेत त्यांना सापडतं रुपया-दोन रुपयाचं एखादं नाणं किंवा क्वचितप्रसंगी एखादा सोन्याचा तुकडादेखील! अशा मुलांच्या घोळक्यातीलच एक मुलगा म्हणजे हा कादंबरीचा नायक भानुदास! एक पाय मोडल्याने नोकरी गमावून कायमचा घरात बसून राहणारा भानुदासचा बाप, नवऱ्याच्या मदतीशिवाय आपल्या संसाराचा गाडा जिद्दीने ओढणारी भानुदासची आई, भानुदासच्या दोन छोट्या बहिणी, शिक्षणासोबतच शिवणकाम शिकणारा भानुदासचा भाऊ निवृत्ती, नदीतील राख चाळण्यासाठी मुलांना चाळण भाड्याने देणारा पत्रे सावकार, घाटावर दशक्रियेचे विधी करणारे केशव भटजी, लहुजीनगरमधील म्हातारी आत्याबाई, भगत कुटुंबातील सदस्य, घाटावर अंत्यविधीसाठी लाकडे पुरवणारा बाबा आणि इतरही काही पात्रे कादंबरीत तितकीच महत्त्वाची आहेत. भानुदासचं रोजचं काम म्हणजे शाळेत जाताना घाटावर कोणी दशक्रियेसाठी आलेलं सावज दिसतंय का, कुणाची राख येतेय का ते पाहायचं आणि त्यातून दिवसाकाठी मिळालेल्या पैशातून घराला हातभार लावायचा. दारिद्र्याने पूर्णपणे ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणार्या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते आणि रोगट रूढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातीव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अशा अनेक वर्गांना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरण आणि पारंपरिक व्यवसाय यांच्या कात्रीत सापडलेली एक पिढी, पैशांमुळे मानवी नात्यांचे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी अशा अनेक गोष्टींना कवेत घेऊन सद्य:स्थितीचं अतिशय क्लेशदायक चित्रण आपल्यासमोर उभी करते. भानुदास आणि घाटावर चालणाऱ्या "दशक्रिया" यांच्या विचारात गढून गेलेल्या वाचकाच्या मनाला कादंबरीचा शेवट चटका लावून जातो. घाटावर जितक्या जास्त "दशक्रिया" तितके जास्त अर्थार्जन या एकाच भावनेने घाटावर लोकांच्या राखेची वाट बघणाऱ्या भानुदासला जेव्हा त्याच्याच लाडक्या मामेबहिणीची राख घाटावर विसर्जनासाठी आलेली समजते तेव्हा त्याच्या बालमनाला जो धक्का बसतो त्याठिकाणी ही कादंबरी संपते. वाचकाला सुन्न करून होणारा हा कादंबरीचा शेवट वाचकाच्या मनात बरेच अनुत्तरित प्रश्न सोडून जातो.
तटस्थ आणि वास्तववादी शैलीमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते. संग्रही घेऊन आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "दशक्रिया".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment